
मूर्खपणाचे रहस्य
गाढवाच्या राजास एकदा प्रश्न पडला, की आपल्या बांधवांना मूर्ख कां समजल्या जात असेल बरं? आपल्याला विचार करता येतो, याचा अर्थ आपण मूर्ख नाही.पण हे इतरांना पटणार कसं?
याच विचारात हा गाढव राजा एकदा नदीकाठी गवत खात बसला असताना, त्याला वाटलं की आपल्या तथाकथित मूर्खपणालाच शक्ती बनवलं तर?ही कल्पना त्याला फार आवडली. तो तडक सिंह महाराजांकडे गेला.
त्यावेळी सिंह महाराज वेगवेगळया कारणांनी त्रस्त झाले होते. त्यातले एक महत्वाचे कारण होते, शेजारच्या वनाईतील वाघोबा राजाच्या आक्रमक हालचाली. हा वाघोबा सिंह महाराजांच्या वननगरीवर हल्ला करुन ते गिळंगृत करण्यासाठी सतत कोणता तरी उपदव्याप करत असे. त्यामुळे सिंह महाराजांना जरा सुध्दा शांतता मिळत नसे. त्यांचा सगळा वेळ या वाघोबाने केलेल्या कुरघोडीवर मात करण्यासाठी जात असे. त्यामुळे त्यांना इतर गोष्टींकडे अजिबात लक्ष देणं जमेना.
आता या वाघोबाचा बंदोबस्त कसा करावा, या विचारात सिंह महाराज गढून गेले असताना, गाढवांचा राजा त्यांच्याकडे आला. नमस्कार चमत्कार झाल्यावर सिंह महाराजांच्या चेहऱ्यावरील काळजी बघून गाढव राजाने त्याचं कारण विचारलं. तेव्हा सिंह महाराजांनी त्याला सारं काही सांगितलं आणि मोठा नि:श्वास घेतला.
महाराज, मी तुम्हाला या समस्येतून मुक्ती देऊ शकतो. गाढवोबा म्हणाले.
त्यावर सिंह महाराजांना खरतर हसू येत होतं पण त्यांनी कसतरी स्वत:ला रोखलं. तू कसा काय माझ्या उपयोगी पडू शकतो,असं गाढवोबास विचारलं.
महाराज, आम्हाला सर्वजण मूर्ख समजतात, आम्हाला काही अक्कल नाही अशी सगळयांची ठाम समजूत आहे.
यात खोटं थोडच आहे, असं सिंह महाराजांना म्हणावं वाटलं, पण ते चूप बसले आणि तू माझ्या उपयोगी कसा काय पडू शकतो? हे पुन्हा विचारलं.
महाराज, आमच्यावर मूर्खपणाचा आणि विचारच करता न येण्याचा जो ठप्पा पडलाय ना, त्याचा लाभ घेऊन मी वनाई राज्यात जातो. मी मूर्ख म्हणून माझ्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतील. मी वनाईत सर्वत्र इकडे तिकडे मूर्ख नव्हे तर महामूर्ख बणून फिरत राहील. माझ्या कानावर जे जे पडेल ते तुम्हाला गुपचूप सांगत राहील.
ही कल्पना सिंह महाराजांना फार आवडली. गाढवास सर्वजण मूर्ख समजतात,ते तसं नसून तो खूप हुषार असल्याची खात्री त्यांना पटली.
पण महाराज, माझी एक अट आहे.गाढवोबा म्हणाला
कोणती? सिंह महाराजांनी विचारलं.
आपलं हे गुपित कधीही तुम्ही उघडं करायचं नाही.
महाराजांनी तशी गाढवोबा समोर शपथच घेतली.
००००
गाढवोबा, वनाई राज्यात हळूच एके दिवशी शिरले. खाली मान घालून इकडे तिकडे फिरु लागले. आपण किती बावळट, किती मूर्ख आहोत,हे सिध्द करण्याची कोणतीही संधी ते सोडत नसत. त्यासाठी चित्रविचित्र चाळे करत. त्यामुळे गाढवोबाकडे कुणीही लक्ष देत नसत. ते आजूबाजूला असला तरी महत्वाची चर्चा करण्यास कुणालाही काळजी वाटत नसे.
अशा या चर्चेतूनच वनाईचा राजा वाघोबा वननगरीवर मोठा हल्ला करणार असल्याची त्याला माहिती मिळाली. त्याची तयार पूर्ण करण्यात तो गुंतला होता. ही माहिती कळताच, सिंह महाराजांनी वेळ न दवडता वनाईवर हल्ला केला. हल्ल्याची पूर्ण तयारी न झाल्याने वाघोबाची बाजू कमकुवत होती. त्यामुळे त्याला फारसा प्रतिकार करता आला नाही. सिंह महाराजांनी वाघोबास पराभूत करुन त्याला तुरुंगात टाकलं.
०००
वनाईवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ सिंह महाराजांनी मोठा समारंभ केला. या समारंभात त्यांनी या युध्दात ज्यांनी पराक्रम गाजवला त्यांचा सत्कार केला. त्यांना बक्षीस दिले. सर्वात मोठे बक्षीस, गाढवोबास जाहीर झाले.
सर्वांना फार आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. समारंभात कुजबूज सुरु झाली. प्रजाजन नाही नाही ते बोलू लागले. सिंह महाराजांना याचा राग आला. त्यांनी गर्जना करुन सर्वांना चूप बसवले.
खरं काय ते सांगण्याची तीव्र इच्छा त्यांना होत होती. पण त्यांना गाढवोबास दिलेल्या शपथेची आठवण झाली. त्यामुळे त्यांना काही बोलता येईना.
महाराज दरडवल्यामुळे समारंभात गोळा झालेल्या प्राण्यांना फार काही बोलता आलं नाही. मात्र आपला महाराज गाढवापेक्षाही गाढव, मूर्ख आणि बावळट असलल्याचं दबक्या आवाजात बरेच जण बोलू लागले. हे दबके स्वर महाराजांच्या कानावर पडले. याचं त्यांना हसू आलं. हा बावळपटपणाचा, मूर्खाचा अंगरखा पांघरुण राहायला काय हरकत आहे. गाढवोबाची ही जशी शक्ती ठरली तशी ही आपली महाशक्ती ठरेल ना! हा विचार त्यांच्या मनी आला आणि ते स्वत:वर खुष झाले.
पण खरं काय ते त्यांना आणि गाढवोबासच माहीत होतं. या दोघांनी पांघरलेल्या मूर्खपणाच्या झुलीच्या आडून भल्या भल्याचा पाडाव केला. हा महामूर्ख सिंह कसा काय सतत यशच मिळवतो? याचं रहस्य कुणालाही शेवटपर्यंत कळलं नाही.