
मूर्ख नागराज
नागराजांनी खूप दिवसांनी खास दरबार बोलावला. त्यामुळे झाडून सर्व दरबारी हजर झाले. विशेष काही कारण असेल तरच, नागराज असा दरबार बोलावत असत. त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असल्याचा अंदाज सर्व दरबाऱ्यांना आला.
नागराजांचे आगमन झाले.सर्वांनी त्यांना अभिवादन केले. ते आसनस्थ होताच त्यांनी दरबाराची कार्यवाही सुरु केली.
प्रधानजींना, त्यांनी निवेदन करावयास सांगितलं.
पण प्रधानजींना काहीच ठाऊक नव्हतं. त्यांना फक्त विशेष दरबार बोलवण्याचा आदेश आला होता. त्याची त्यांनी अंमलबजावणी केली होती.
त्यामुळे ते मान खाली घालून उभे राहिले. “नागराजांच्या मनातलं कस बरं कळणार आपणास?”असं त्यांना बोलावं वाटलं पण,नागरजांच्या समोर तोंड उघडण्याची त्यांची टाप नव्हती. प्रधानजींची चांगलीच जिरली म्हणून इतर दरबारी मनातून आनंदून गेले .
एका दरबाऱ्यास, नागराजांनी प्रधानाची हकालपट्टी केली असून आपणास प्रधानांची वस्त्रे परिधान केल्याचे स्वप्न दरबारातच पडले. त्याला याचे हसू आले. नागराजांच्या नजरेतून ही बाब कशी बरी निसटणार? त्यांनी त्या दरबाऱ्यास चांगलं खडसावून बाहेर हाकलून लावलं. जे पद होतं तेही काढून घेतलं.
नागराज फारच रागावल्याचं सर्वांच्या लक्षात आलं.आता सर्वांनी माना खाली घातल्या.
“याचा अर्थ, आजचा दरबार आम्ही कशासाठी बोलावलाय, हे कुणासही ठाऊक नाही म्हणायचं?” नागराज गरजले. या गरजण्याने प्रधानजी बेशुध्द पडले.नागराजांनी सेवकांकरवी प्रधानजींना वैद्याकडे पाठवून दिले.
“बघा] प्रधानजींची हालत कशी झाली ते. नावाचाच प्रधान. त्याला माहीत असावे की नाही, दरबार कशासाठी बोलावला ते?} नागराजांनी जोरात फिस्स केलं. एकही दरबारी काहीही बोलला नाही.
“अरे, सर्वांच्या दातखिळया बसल्या की काय? आम्ही म्हणतो ते खरं की खोटं?” नागराजांनी फुन्हा फिस्स केलं.
सर्वांनी होकारार्थी मान हलवली.
“म्हणजे, आम्ही खरं बोलतो तर. प्रधानजींना ठाऊक नसेल, पण, तुमच्यापैकी कितीजणांना ठाऊक आहे,आम्ही कशासाठी दरबार बोलावला ते?”
नागराज नक्कीच वेडा झाल्याचे, बऱ्याच जणांच्या लक्षात आले.कारण त्यांच्या मनात काय चाललय] हे कसं काय कळणार इतरांना, असं सर्वांनाच वाटू लागलं. एकाही दरबाऱ्याने मान वर केली नाही.नागराजांचे डोळे आग ओकू लागले.त्यांनी आपला फना आणखी फुगवला.ते खूप चिडले की असं करीत.त्यावेळी त्यांच्यासमोर जो असेल, त्याला ते डोळयातून आगीचे किरणं सोडून जाळून टाकत.आता] कुणावरही ती पाळी नक्कीच येणार होती. प्रत्येकजण मनात] ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी प्रार्थना करु लागला.सर्वांचे शरीर भीतीने थिजून गेले. अनेकांची दातखिळी बसली.अनेकजण बेशुध्द पडले. काहींनी हळूच दरबारातून पळ काढला.
नागराजांचा संताप अनावर होत होता.आतापर्यंत सर्व घडामोडी बारकाईने बघणाऱ्या] राजपुत्रास दरबाऱ्यांची ही स्थिती बघवली नाही. आपण त्यांची बाजू घ्यायला हवी असं त्याला वाटलं.आपण काही बोललो तर,नागराज किमान ऐकून घेतील असं त्याला वाटलं.त्याने मोठा श्वास घेतला आणि उभा राहून म्हणाला,
“महाराज, आपली परवानगी असेल तर आम्ही काही बोलू इच्छितो.”
संतापाने लालबुंद झालेल्या नागराजांनी राजपुत्राकडे रागानं बघितलं.
“काय सांगणार तुम्ही?” ते गरजले.
“महाराज,तुमच्या मनात काय आहे,हे कसं कळणार आम्हा सर्वांना?”राजपुत्र म्हणाला.आपल्या मनातील राजपुत्र बोलल्याचे बघून, दरबाऱ्यांना किंचित हायसे वाटलं.आता, नागराज स्वत:च, आजचा विशेष दरबार कशासाठी बोलावला, हे सांगतील आणि आपल्या डोक्यावरची टांगती तलवार निघून जाईल, असं दरबाऱ्यांना वाटलं. सर्वजण नागराज काय प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकतेनं वाट बघू लागले.पण विपरीतच घडलं. नागराजाचा संताप काही कमी झाला नव्हता. राजपुत्राचे बोलण्याने, ते आणखी चिडले. त्यांचा संताप कैकपटीने वाढला. त्यांनी फणा फुगवला नि राजपुत्राकडे वळून आपल्या डोळयातून अग्निची किरणं सोडली. राजपुत्र क्षणार्धात जळून खाक झाला.
हे भयावह दृष्य बघून, उरले सुरले दरबारी माघारी पळत सुटले. दरबारात घडलेल्या घटनेची माहिती राजवाड्यात पोहचताच एकच हल्लकल्लोळ माजला. राणीसरकार ताडतीने दरबारात आल्या. राजपुत्राच्या राखेकडे बघून आक्रोश करु लागल्या.सर्व दरबारी निघून गेलेले, राणीसरकारांचा आक्रोश सुरु, हे बघून नागराज जरा गडबडलेच.त्यांनी राणीसरकांना कशासाठी आक्रोश करताहेत असं दरडावून विचारलं.
“म्हणजे, काय विपरीत घडलं? हे या दुष्टाला अजूनही कळलेलं दिसत नाही.”राणी सरकारांनी आक्रोश थांबवत,नागराजाचा धिक्कार केला. रागाच्या आणि संतापाच्या भरात काय विपरित करुन बसल्याचे त्यांनी नागराजांच्या लक्षात आणून दिलं.ते एकून नागराजांना दु:ख अनावर झालं.ते आक्रोश करु लागले.
राणीसरकार त्यांचा धिक्कार करत म्हणाल्या, “ नागराज आता आक्रोश करुन काय उपयोग?ज्याला स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही.त्याच्याकडून असे प्रमाद घडतच राहणार. तुम्ही, राज्य करण्याच्या,पात्रतेचेसुध्दा नाहीत, समजलात.
नागराज गर्भगळीत झाले.त्यांना आपली चूक कळली . पण आता, त्याचा काही उपयोग नव्हता.
सुरेश वांदिले