मैत्री वेळापत्रकाशी
मुलांच्या मासिकात आलेल्या महिन्याच्या प्लॅनरकडे बोट दाखवत तेजोमयीनं बाबांना विचारलं ,
बाबा, हे मासिक प्रत्येक महिन्याला कां बरं असं प्लॅनर देतं?
अगं,प्लॅनर म्हणजे नियोजन करुन ठेवण्याचं वेळापत्रक!
पण त्याचा काय उपयोग? तेजोमयीनं विचारलं.
त्याचा खूप उपयोग होतो. आपणास एखादं कार्य कधी पूर्ण करायचय? एखादं पुस्तक वाचून कधी पूर्ण करायचय? गणिताची सूत्रं पाठ करायची असेल तर ती कधीपर्यंत करायची? मित्र मैत्रिणींचे वाढदिवस कधी आहेत आणि त्यांच्यासाठी भेट वस्तू कधी घ्यायच्या? अशा छोट्या मोठ्या गोष्टी महिन्याच्या सुरुवातीला लिहून ठेवल्या नि प्रत्येक आठवडयात या प्लॅनरवर नजर टाकली की ठरवलेल्या किती गोष्टी झाल्या नि किती करायच्या राहिल्या हे कळतं. तसं मग आपल्याला वेळंच व्यवस्थापन करता येतं. महत्चाच्या गोष्टींना किती वेळ द्यायचा हेही कळतं. शिस्त लागते. म्हणून या प्लॅनरच महत्व! तू पण कर ना या प्लॅनरची मैत्री नि बघ,तुझ्यातला फरक.बाबा म्हणाले.
000
काय दुर्बध्दी झाली नि आपण बाबांना प्लॅनरबद्यल विचारलं असं तेजोमयीला वाटलं. कारण आठवड्याभराने बाबांनी तिला प्लॅनरची आठवण करुन दिली. तेजोमयीनं काहीच केलं नव्हतं.
काही हरकत नाही.उद्या कर,असं बाबा म्हणाले.
तेजोमयी डोक्याला हात लावून बसली.
नको ते प्रश्न, नको ती कटकट, असं ती बाल मासिकातल्या प्लॅनरकडे बघत म्हणाली.असं ती म्हणताच, त्या प्लॅनरला वाचा फुटली.तो तेजोमयीच्या पुढयात उभा होऊन म्हणाला,
तेजोमयी, मी म्हणजे कटकट असं समजू नकोस हं.
कटकट नाही तर काय? अरे, तू दर महिन्याला या मासिकात येतोस, सहज उत्सुकता म्हणून विचारलं तर बाबांनी लगेच काम लावलं.
मग करना.
म्हणे करना.30 दिवसाचे तीस कॉलम भरायचे म्हणजे सोप्पं काम वाटतं का तुला.
प्रारंभी सर्व कामं कठीणच वाटतात . पण सुरुवात केली तर सोपी वाटायला लागतात,असं गांधीजी म्हणत.
फोक्या तानू नकोस, तुझा नि गांधीजींचा काय रे संबंध.
संबंध म्हणून काय विचारतेस?अगं गांधीजी प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक आठवडयाचं, प्रत्येक महिन्याचं इतकच नव्हे तर प्रत्येक वर्षाचं प्लॅनर तयार ठेवायचे. कधी, काय, केव्हा करायचं हे सारं काही ठरलेलं असायचं त्यांचं. म्हणूनच तर त्यांच्याकडून इतकी मोठं मोठी काम झालीत.आपण त्यांच्या तितके महान नसू पण प्लॅनर लिहलं तर आपणही ब-याच गोष्टी साध्य करु शकतो. समजलं का? प्लॅनर म्हणाला.
तेजोमयीनं आपल्याला सारं काही समजल्यासारखी मान हलवली.
00
किती तरी वेळ तेजोमयी बाप्पांसमोर उभी होती. पण बाप्पांनी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. बाप्पा काहीतरी लिहिण्यात गढून गेले होते.
शुक…शुक बाप्पा, तेजोमयी म्हणाली.
थांब गं एक मिनिट, तिच्याकडे न बघताच बाप्पा म्हणाले.
बाप्पा, आज तुम्ही माझ्याकडे बघतच नाही. किती वेळेपासून मी इथे उभी आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही. एवढं कशामध्ये तुम्ही बिझी आहात हो?
मी प्लॅनर लिहितोय.बाप्पा तिच्याकडे न बघताच उत्तरले.
काय, तुम्हीसुध्दा तेच करताहात?भला मोठा आ वासून तेजोमयी म्हणाली. तिची ही प्रतिक्रिया एैकून बाप्पांनी तिच्याकडे बघितलं.
तुम्हीसुध्दा म्हणजे काय गं?
अहो, आमच्याकडेही प्लॅनरचच पुराण चाललय. तुम्हालाही तोच संसर्ग झालेला दिसतोय.
छे छे, मी प्रत्येक महिन्याला प्लॅनर लिहित असतो.
बस बस बाप्पा.आता मला प्लॅनरच महत्व, वेळेचं महत्व काही सांगू नका, ते एैकून एैकून डोकं पकलय माझं.बाबा म्हणाले प्लॅनर लिही, खुद्य प्लॅनरसुध्दा तोच उपदेश करुन गेलाय. आता तुम्ही सुध्दा.ते नको बॉ!
अगं, मी तर काहीच बोललो नाही अद्याप.कोणी कितीही उपदेशाचं डोस दिले तरी त्यातलं आपल्या हिताचं काय,हे लक्षात घ्यावं बाळं. म्हणजे मग काही गोंधळ उडत नाही आपल्या मनात.पण प्लॅनर लिहिलं ना बाळ की सचिन तेंडूलकर होणं सोप्प जातं.
म्हणजे हो काय ?
कारण दररोज कधी, कुठे प्रॅक्टिस करायची, क्रिकेटच कोणतं पुस्तक वाचायचं, कधी व्यायाम करायचा, वगैरे,वगैरे तो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला लिहायचा. तस्साच वागायचा,म्हणून तो ग्रेट झालाय बर कां तेजू.असं बोलून बाप्पा पुन्हा आपल्या कामात दंग झाले.
सुरेश वांदिले
000