(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रस्तेवाले जोशी! (भाग एक)

अरे, ते रस्तेवाले जोशी का?असं त्याने संबंधितांना विचारलं.

होय सर, संबंधित म्हणाला. ते ऐकताच तो तडक जागेवरुन उठला आणि स्वत:हून त्यांना अदबिने भेटला.

आजूबाजूचे सारेच, हे बघून चकित झाले. कोण हे, रस्तेवाले जोशी? सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. बहुतेकांना वडेलाले जोशी माहीत!. पण रस्तेवाले वाले जोशी, हे जरा वेगळचं प्रकरण होतं.

ज्याने रस्तेवाले जोशी का? असं विचारलं] तो काही लहानसहान असामी नव्हता. त्याला भारतात बरेच जण क्रिकेटचा देव मानतात तर ऑस्ट्रेलियात, डॉन ब्रॅडमेन नंतरचा श्रेष्ठ फलंदाज!

म्हणजेच आपला सचिन तेंडूलकर. त्याला ऑस्ट्रेलियन सरकारने, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित केलेय. हा आपल्या देशातील भारतरत्न सारखा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. तो सचिन शिवाय फक्त दुसऱ्या एका भारतीयास आणि त्यातही मराठी मानसास मिळालाय. तो मराठी माणूस म्हणजे डॉ.विजय जोशी अर्थात रस्तेवाले जोशी.

सचिनच्या बरोबरीने ज्यास सर्वोच्च पुरस्कार मिळतो, याचा अर्थ तो सुध्दा तोलामोलाचा आणि त्याने काहीतरी भव्य दिव्य केलं असणारच ना?

नक्कीच…रस्तेवाले जोशी यांनी जे काही केलय, ते अफलातून आणि अदभूत असच! त्यांनी पोलाद निर्मितीच्या कारखान्यातून लोखंड वितळल्यानंतर बाहेर पडणारा जो कचरा असतो, त्यापासून रस्ते निर्मितीचे तंत्र शोधून काढलं. या कचऱ्यास स्लॅग म्हणतात. पोलाद कारखान्याच्या आसपास लाखो टनांचा असा कचरा साचून साचून मोठमोठ्या टेकड्या निर्माण होतात. त्याचं करायचं काय? ही मोठी समस्या सर्व देशांना भेडसावतेय. ऑस्ट्रेलियात सर्वत्र अशा खूप खाणी आहेत. त्यातून असला कचरा/स्लॅग निर्माण होऊन ठिकठिकाणी मोठ्या टेकड्या निर्माण झाल्या.

या समस्येवर मात कसं करायचं?हे ऑस्ट्रेलियन सरकारला कळत नव्हतं. ही समस्या सोडवण्यासाठी कुणी समोरही येत नव्हतं.

ही साधाणत: १९९२ सालातील गोष्ट. तेव्हा विजय जोशी यांनी नुकतीच मुंबईच्या व्हीजेटीआय या अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. टाटा, जॅकोब इंजिनीअरिंग, रिलायन्स पेट्रोकेमिकल्स, रसायनी, दीपक फर्टिलायझर अशा भारतीय कंपन्यांमध्ये नोकरी करुन ते मस्कतला गेले. तिथून न्यूझिलंड देशात गेले. या देशातील रस्ते निर्मितीच्या संशोधन  कार्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला. त्यांनी सुचवलेल्या शिफारशी न्यूझिलंड सरकारने त्या देशातील रस्तेबांधणीच्या बाबींसाठी मान्य केल्या. न्यूझिलंडमध्ये बरेच नाव कमावल्यावर विजय जोशी यांनी १९९१ मध्ये ऑस्ट्रेलियात स्थलांतरासाठी अर्ज केला.

ऑस्ट्रेलियात त्यांनी एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. त्या कंपनीची स्थापना आदल्या दिवशीच झाली होती. पोलाद कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याचा  काही चांगल्या कामासाठी उपयोग करण्याचे काम या कंपनीकडे सोपवण्यात आले होते. विजय जोशींनी मुलाखत झाली. त्यात त्यांची निवड झाली. या कचऱ्याचं आपणास काय करायचय सर, त्यांनी व्यवस्थापकास विचारलं. त्यांच उत्तर होतं,तूच सांग बघू.

अशी, विजय जोशी यांच्या नोकरीची सुरुवात झाली. त्यांना या अशा कचऱ्याचा नेमका काय आणि कसा उपयोग करायचा याचं फारच फारच जुजबी ज्ञान त्यांना होतं. पण नवं शिकण्याची आणि आव्हान स्वीकारण्यासाठी सदैव तयारी असलेल्या विजय जोशी यांनी, कचऱ्यातून सोनं काढून देण्याचं आव्हान स्वीकारलं. सर्वत्र पडून असलेला लाखो टन कचरा आणि भविष्यात दरवर्षी तयार होणारा दोन लाख मेट्रिक टन कचऱ्याचा सुयोग्य वापारासाठी तंत्र-युक्ती-उपाय शोधण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. त्यासाठी त्यांनी पुढील तीन वर्षं संशोधनात गाडून घेतलं.

या कचऱ्याचा उपयोग रस्ते, ईमारती किंवा इतर बांधकामात कसा करता येईल? याशिवाय त्यांना काही सूचत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या संशोधनाची दिशा याच एकमेव मार्गाने सुसाट धावत होती. याच सुसाट वेगाने त्यांना एके दिवशी, जे त्यांच्या मनात होतं त्या ठिकाणी त्यांना नेऊन पोहचवलं. या कचऱ्याचा उपयोग रस्ते बांधणीसाठी करता येणं शक्य असून, या रस्तबांधणीसाठी जे दगड, मुरुम, माती लागतं त्यापेक्षाही हा कचरा अधिक कणखर आणि अधिक काळ टिकणारा असल्याचं त्यांना दिसलं. म्हणजे त्यांच्या संशोधातून ते सिध्द झालं. हा मोठाच क्रांतीकारी शोध होता. स्लॅगच्या रुपाने मोठे साहित्य सर्वत्र उपलब्ध होत असल्याने यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होणारच होतीच. शिवाय कोट्यावधी रुपयेही वाचणार होते.

त्यांनी या स्लॅगचा वापर करुन प्रायोगिक स्तरावर एक रस्ता आपल्या कार्यालयाजवळच बांधला. त्यावरुन शेकडो टन स्लॅग वाहून नेणारे असंख्य ट्रक दौडवले. स्लॅग पासून तयार झालेला रस्ता हा जबदरस्त दणकट झाल्याचे जोशी आणि त्यांच्या ऑफिसच्या लक्षात आले.

त्याच सुमारास सिडनी येथील विमानतळाची एक धावपट्टी बांधण्याच्या निविदेची जाहिरात ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात आली. आपण हा रस्ता स्लॅग पासून बांधून देऊ शकतो. त्यामुळे कोट्यावधी रुपये वाचतील. असे जोशी यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. पण त्यांचे म्हणणे या अधिकाऱ्यांनी हसण्यावारी नेले. जवळपास त्यांना हाकलूनच लावले. पण जोशी यांनी चिकाटी सोडली नाही. ते वारंवार विमानतळ अधिकाऱ्यांना भेटत राहिले. स्लॅगपासून कशी ठणठणीत धावपट्टी तयार करता येईल. हे आपल्या संशोधनाच्या आधारे सांगत राहिले. त्यांची ही चिकाटी आणि सातत्य आणि आत्मविश्वास बघून विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांना धावपट्टी बांधण्याचे काम दिलं.

अट एकच होती.

याची संपूर्ण जबाबदारी जोशींची. म्हणजे असं की, उद्या काही भलबुरं झालं तर, त्याची संपूर्ण भरपाई जोशींच्या कंपनीला द्यावी लागणार होती. हे खरं तर मोठचं धाडस होतं. ज्या बंदिस्त गुहेत ज्वालामुखी आहे की विषारी नाग भरलेले आहेत याची यत्किंचतही कल्पना नसताना, तिकडे प्रस्थान करणं स्वत:चा सर्वनाश करुन घेणचं असल्याचं, कंपनीनं जोशींना समजावण्याचा प्रयत्न केला. यावर जोशीचं म्हंणणं होतं, या गुहेची ही एक बाजू झाली. पण समजा ही गुहा अलिबाबाची निघाली तर? गुहा उघडण्याचा मंत्र तर ठाऊक आहे ना आपणास…जोशींच्या उलट प्रश्नाला कंपनीला काही उत्तर देता आलं नाही. त्यामुळे तुझ्या जबाबदारीच वर तू पुढे जा असं सांगून कंपनी मोकळी झाली.(अपूर्ण)