(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रहस्य

व्लादिमिर पुतीन यांच्या उजव्या हातातील मधल्या बोटात असलेल्या अंगठीचे रहस्य काय असावं ? या अंगठीमध्ये वाघाच्या मिशीचा तुकडा अभिमंत्रित तर करुन ठेवला नसेल ना ?

   असे  प्रश्न नारदांना पडले. परवा ते पृथ्वीतलावर वार्षिक भ्रंमतीसाठी येत असताना क्रेमिलनमध्ये जाऊन पोहचले. तेव्हा पुतीन यांच्या हातात अंगठी बघून थक्क झाले. अंगठीचा चमत्कार रावणाच्या दशक्रियेनंतर संपल्याची समस्त देवलोकांची धारणा होती. सुधारणेचे वारे तेव्हाच देवलोकात इतके जोरात वाहिले की, इंद्रसेनांनी उजव्या हातातील मधल्या बोटात कैक युगे विलसलेली अंगठी ब्रम्हांडात भिरकावून दिली. ही अंगठी त्यांसी ब्रम्हदेवांनी दिली होती. इंद्रसेनाच्या सामर्थ्याची गुरुकिल्ली त्यात दडलेली होती.

   तथापि, ही अंगठी गेल्यावर इंद्रसेन दुबळे झाल्याचा दाखला नाही. युगे येत गेली, जात गेली. इंद्रसेनांचे सिंहासन फारसे इकडे तिकडे झाले नाही. याचा अर्थ अंगठी बोटात होती तेव्हा आणि नव्हती तेव्हा इंद्रसेन जिथे आणि जसे होते तसेच राहिले.

   अंगठी फेकून दिल्यावर प्रागतिकतेचा सूर्य मिरवण्याचे इंद्रसेनांनी कमी केले नव्हते. देवलोकातील ज्यांनी त्यांच्या या प्रागतिक विचाराची खिल्ली उडवून हातातल्या अंगठया आणि गळयातले मंत्रभारित सोन्याच्या साखळीतले खडे फेकून दिले नाही, त्यांची इंद्रसेनास किव येत असे. मात्र ते सारे इंद्रसेनावर फिदीफिदी हसत.

   हा इतिहास नारदेश्वरांच्या नजरेसमोरुन अबलख अश्वासारखा धावत गेला. हा अश्व त्यांच्या नाकाजवळ फुरफुरल्याने त्यांना जोरदार शिंक आली. या आवाजाने सुरक्षा सैनिक धावत येऊन त्यांनी नारदांना बंदिस्त केले. त्यांना पुतीन यांच्यासमोर सादर केले.

   पुतीन, नारदांच्या डोळयात रोखून बघत असताना अंगठीतून निघणाऱ्या प्रकाशाने नारदांचे डोळे दिपले. त्याही स्थितीत त्यांनी ती अंगठी बुब्भूळ मोठठे करुन बघून घेतली. ते दचकलेच. ब्रम्हदेवाने इंद्रसेनांना दिलेली आणि त्यांनी नंतर फेकून दिलेली तर ही अंगठी नसावी ना, असं त्यांना वाटून गेलं. छे छे. त्यांनी अविश्वसाने मान हलवली. काहीतरी आठवून त्यांनी ती अंगठी काळजीपूवर्क बघण्यासाठी पुन्हा बुब्भूळ मोठे केले, तोच श्वेतवर्णीय ॲम्यूरस्के अबलख घोडा त्यांच्या नजरेसमोर तरळला. या घोडयावर चढवून आपणास खोल दरित ढकलून दिले जाईल अशी विचित्र भीती त्यांसी वाटली. पण, त्या अबलख घोडयावर पुतीनच आरुढ झाले आणि घोडा चौफेर उधळला..

   अंगठीचे रहस्य सोडवता न आल्याने नारदेश्वर बिच्चारे सांप्रतकाली डोकेदुखीच्या चक्रात सापडले आहेत.