तेजोमयीच्या बाबांना कधीकधी खूप राग यायचा. ते रागावले की बरेचदा त्यांना भान राहत नसे. रागाच्या भरात ते आदळआपट करत किंवा हातात येईल ती वस्तू धरुन आपटत. आईने बरेचदा समजावूनही त्यांना राग आटोक्यात आणता येईना. रागाचा शरीरावर होणारा परिणाम, असा एक लेख एकदा, तेजोमयीने त्यांना वाचायला दिला. तो कागद त्यांनी हातात घेतला आणि वर खाली बघून तेजोमयीकडे परत केला.
अहो, वाचा तरी. तेजोमयी म्हणाली.
या लेखात जे लिहिलय, ते त्यांना सर्व ठाऊक असल्याचं, बाबा म्हणाले.
मग असं जर असेल तर तुम्हाला राग कां येतो पुन्हा पुन्हा.. तेजोयमीस विचारावं वाटलं. हे विचारायाला जायचं आणि बाबांच्या रागाचा स्फोट व्हायचा. असं वाटून ती चूप बसली..
अलेक्झांडरचं, घरी आगमन झाल्यावर तरी बाबांचा राग कमी होईल असं आईला वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही.
सुरुवातीला बाबांच्या रागाची अलेक्झांडरला भीती वाटली. पण नंतर त्याला सवय झाली. मात्र राग आला की बाबा काही तरी फेकतात. ते तुटतं. त्यामुळे आपलचं नुकसान होतं,असं आईचं सांगणं त्याला समजलं असावं. त्यामुळे त्याने एक दोनदा, बाबांनी रागाच्या भरात फेकलेल्या वस्तू उडी मारुन पकडल्या होत्या. पण एकदा त्याची उडी चुकली आणि तो भिंतीवर धाडदिशी आपटला. त्याच्या डोक्याला किंचितशी जखमही झाली. तेव्हापासून बाबांची फेकंमफाक सुरु झाली की तो दुसऱ्या खोलित जाऊन झोपेच्या स्वाधीन व्हायचा.
मात्र, आज अलेक्झांडरचं वेगळच रुप बघायला मिळालं. कशावरुन तरी बाबांना राग आला. त्यांनी आरडाओरड सुरु केली. ती ऐकून आई दिवाणखान्यात आली. बाबांनी फेकण्यासाठी मोबाईल हातात घेतल्याचं तिच्या लक्षात आलं.कपाळावर हात मारत आई आतल्या खोलित निघून गेली.
बाबांनी हाती मोबाईल घेतला त्यावेळी अलेक्झांडर बाबांच्या आसपासच होता.त्याला काय वाटले कुणास ठाऊक, त्याने टी पॉयवर असलेल्या टॅब उचलला. बाबांचे लक्ष तिकडे गेले आणि मोबाईल खाली ठेऊन, ते अलेक्झांडरवर गरजले.
मूर्खा, खाली ठेव टॅब..किती महाग असतो, तुला ठाऊक नाही.
पण बाबांचं गरजणं, अलेक्झांडरने मनावर घेतलं नाही. टॅब आणखीनच घट्ट पकडून तो दुसऱ्या खोलीत पळाला.
टॅब खाली पडला तर किती नुकसान होईल, असं बाबा ओरडून म्हणाले.
त्यांच्या ओरडण्याने आई पुन्हा दिवाणखान्यात आली.
काय झालं असं सारखं ओरडायला. आईनं विचारलं.
अहो, तुमच्या लाडक्या ठोंब्याने टॅब नेलाय इथून. त्याच्या तोंडून पडला तर किती नुकसान होईल, हे ठाऊक आहे ना तुम्हास…
तुम्हाला आणि नुकसानीची चिंता..आई उपहासानं म्हणाली.
उगाच काही बाही बोलू नकोस..
यात काहीबाही काय? तुम्ही आता थोड्यावेळापूर्वी रागाच्या भरात मोबाईल फेकत होताच की..तो गुलाबाच्या पाकळयांमध्ये जाऊन पडणार होता का? तो खाली पडला असता तर मोठ्ठ नुकसान झालं असत ना..काय हो बरोबर ना..
यावर बाबांना काहीच बोलता येईना.
तुम्हाला जसा राग आला तसा तुमच्या सतत राग येण्याचा राग अलेक्झांडरला येउु शकतो की नाही? तुमचं पाहून त्यालाही काही फेकफूक करावं वाटलं असेल तर..लहान मुलं मोठ्यांचं अंधानुकरण करतात ना..तरी बरं अजून तेजोमयी तसं करत नाहीय..आई एका दमात बोलून गेली.
आईच्या बोलण्यावर बाबा काहीच प्रत्युत्तर देत नाही हे बघून अलेक्झांडर आणि तेजोयमी दुसऱ्या खोलितून दिवाणखान्यात आले.बाबांनी कान पकडून अलेक्झांडरला सॉरी म्हंटलं. अलेक्झांडरने टॅब अलगद सोफ्यावर ठेवला.
रागाचे शरीरावर होणारे परिणाम हा बाजुला काढून ठेवलेला लेख, तेजोमयीने बाबांना पुन्हा वाचायला दिला.. यावेळी मात्र त्यांनी या लेखातील एक एक शब्द काळजीपूर्वक वाचला..
०००