
रेश्माचं झाडं होताना
अभ्यास करताकरता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकली. कारण ती काही फळा-फुलांनी बहरलेली हिरवीगार झाडं नव्हती. तर जळून काळी ठिक्कर पडलेली, फांद्यांची सालं विस्कटून गेलेली, पानं शुष्क झालेली अशी दोन्ही झाडं एखाद्या भूतासारखी वाटत होती.
दचकलेली रेश्मा घामानं ओलिचिंब झाली. ती ओरडणार तोच, एका झाडाने तिला पकडलं आणि दुसऱ्याच्या ताब्यात दिलं. रेश्माने भीतिने डोळे गच्च बंद केले. ही झाडं आता आपल्याला गिळून टाकणार अशी तिला भीती वाटू लागली.
रेश्माला घेऊन ती दोन्ही झाडं प्रचंड वेगानं उडू लागली. कितीतरी वेळ ती उडत होती. कधीतरी त्यांचा वेग हळूहळू कमी होऊ लागला. रेश्माला त्याची जाणीव झाली. तिने दोन्ही डोळे किलकिले करुन बघितले. ती झाडं खाली येत होती. खाली अग्निच्या ज्वाळा दिसू लागल्या. ही झाडं आपल्याला या आगित टाकणार, याची आता, रेश्माला खात्री पटली, तिच्या घशाला कोरड पडली. ती देवाचा धावा करु लागली…
पण, तसं काही झालं नाही. त्या दोन्ही झाडांनी रेश्माला अलगद खाली उतरवलं.
एक झाडं तिला प्रेमानं म्हणालं,
“बाळ डोळे उघड, तू घाबरु नकोस, आमची भीती बाळगू नकोस. तुला आम्ही काही करणार नाही.”
आपल्या आजोबांसारखे प्रेमळ बोल ऐकून रेश्माच्या जिवात जीव आला. तिने डोळे उघडून बघितलं. झाडांनी तिला एका नदीच्या किनारी आणलं होतं.
आपणास काहीही झालं नाही हे बघून तिला विश्वास बसत नव्हता. तिने अवतीभवती बघितलं. समोर विस्तिर्ण जंगल होतं. तिथे वणवा पेटला होता. त्या वणव्यात एक एक वृक्ष जळून खाक होत होते.
रेश्माला नदीकिनारी घेऊन आलेल्या दोन वृक्षांपैकी एक वृक्ष अचानक रडू लागला. स्फुंदत स्फुंदत तो म्हणाला,
” रेश्माताई, बघ बघ, हा असा वणवा कधीही लागतो नि आमच्या भाऊबहिणींना जाळून टाकतो. मी, राम आणि हा माझा भाऊ कृष्ण आम्हीसुध्दा अशाच एका आगीत सापडलो. मात्र, देवाच्या कृपने वाचलो. आमची स्थिती बघ, काय झाली ते. तुला आम्ही भूत आहोत असं वाटलं ना?” राम नावाच्या झाडानं आपली वेदना व्यक्त केली.
“हो हो हो…” रेश्मा कशीबशी म्हणाली.
“आम्ही भूत नाहीत, पण जंगल असंच पेटत राहिलं तर ही सगळी झाडं खरोखरच भूत बनतील.” असं बोलून राम झाडाने हुंदका दिला.
“तूच आता काहीतरी कर ताई?” लक्ष्मण नावाचं दुसरं झाडं म्हणालं.
” मी काहीतरी करु शकते हे तुम्हाला कसं काय वाटलं?” रेश्मानं भीतभीत विचारलं.
“तू झाडांवर आणि कृत्रिम बुध्दीमत्तेवर खूप खूप प्रेम करतेस हे आम्हाला ठाऊकाय.” राम म्हणालं.
“पण ते कसं शक्य आहे? आपण तर आजच पहिल्यांदा भेटलो.”
“झाडांवर प्रेम करणारी माणसं ही झाडासारखीच असतात. प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी, सर्वांचं सदैव चांगलं चिंतणारी. तुला तर ठाऊकच आहे ना, झाडं परस्परांशी बोलतात. त्यांना जाणून घेतात. तुही झाडं आणि आम्हीसुध्दा झाड! मग तुझ्याबद्दल आम्हाला सारं काही न कळायला काय झालं?” लक्ष्मण म्हणालं.
आपण एक झाड, या कल्पनेनेच रेश्मा भारावून गेली. आपण झाडासारखे हलतोय डुलतोय, आपल्या अंगाखांद्यावर पक्षी येऊन बागडताहेत, गाताहेत. या कल्पनेत ती रंगून गेली. इतकी की नदीला ओलांडून वणवा तिच्यापर्यंत कधी पोहचला तिला कळलं नाही.
त्या ज्वाळा तिला गिळणार तोच ती ओरडली, वाचवा, मला वाचवा. ओरडतच ती खाडदिशी जागी झाली…
तिला दरदरुन घाम फुटला होता. आपण स्वप्न बघत असल्याचं तिच्या लक्षात आल्यानं तिला थोडसं हायसं वाटलं. त्याक्षणी, परवाच तिने जंगलातील वणव्याविषयी वाचलेलं तिला आठवलं.
“युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिका या देशातलं ०.५ अब्ज हेक्टर जंगल अशाच वणव्यात गेल्या काही वर्षात जळून खाक झालं. हे वनक्षेत्र पूर्ववत होण्यासाठी कितीतरी वर्ष लागतील. झाडांना कदाचित नवी पालवी येईल. पण जळून खाक झालेले पशू, पक्षी, सूक्ष्म जीव काही जिवंत होणार नाहीत. हे वणवे काही प्रमाणात नैसर्गिक असले तरी तापमानबदलामुळे त्यात भयावह वाढ झालीय. या तापमानबदलास किंवा हवामानबदलास मानवी हस्तक्षेप मोठाच कारणीभूत झालाय. तापमानात वाढ झाल्यानं भूपृष्ठाचं तापमान सतत वाढत चाललय. त्याची सर्वाधिक झळ कोरडं हवामान असणाऱ्या भागाला बसते. तिथे वणवे लगेच पेटून सर्वत्र आग पसरते.”
रेश्माच्या नजरेसमोर तिने वाचलेली माहिती झरझर येऊ लागली. तिच्या घशाला कोरड पडली. जे स्वप्नात तिने बघितलं, त्याच्याशीच ही माहिती मिळतीजुळती होती.
“आता काय?” तिने स्वत:लाच प्रश्न केला. सकाळची सगळी कामं पटापट आटोपून ती तिच्या अभ्यासिकेत येऊन बसली. तिचं मन काही थाऱ्यावर नव्हतं. राम आणि लक्ष्मण या झाडांनी स्वप्नात दाखवलेल्या जंगल वणव्याने ती सैरभैर झाली. तिने डोळे गच्च मिटले आणि “आता काय?” पुन्हा स्वत:लाच प्रश्न केला.
कोणत्या प्रदेशातील जंगलात नेलं होतं, हे राम आणि लक्ष्मण या झाडांना विचारलं असतं तर, बरं झालं असतं, असं तिला वाटलं. त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की आपण ज्या (अमेरिकेतल्या) कॅलिफोर्नियात राहतो, तिथे ८० टक्के भागात दरवर्षी दुष्काळ पडायला सुरुवात झालीय. तेथील हवेच्या आद्रतेचं प्रमाण बिघडून गेलय. आसपासच्या जंगलाला सतत आग लागते. आगीचे लोट आणि धुर यामुळे आपल्याला नि आपल्या सारख्या शेकडो मुला-मुलींना सतत मास्क लावावा लागतो. या जंगलातील झाडं जळून खाक होतानाच तिथे राहणारे शेकडो पशू-पक्षी-किटक-सूक्ष्मजीव मृत्यूमुखी पडतात.
“राम-लक्ष्मण झाड म्हणाले, त्याप्रमाणे मी सुध्दा एक झाड असेल तर या वणवण्यात एके दिवशी, मी आणि माझ्यासारखी अनेक मुलं मुली जळून खाक होतील का?” रेश्माच्या मनात अचानक, या विचाराची विज चमकून गेली. या विचाराने ती शहारली. थरथर कापू लागली. तिने घुटभर पाणी पिलं नि स्वत:ला कसंबसं सावरलं.
०००
संकट आपल्यापर्यंत पोहचल्याचं रेश्माच्या लक्षात आलं. पण कोणत्याही संकटाला, कठीण प्रसंगाला भिण्याऐवजी आणि पळ काढण्याऐवजी त्याला भिडायचं, ही शिकवण तिच्या आजोबांनी दिली होती. त्याची तिला त्याक्षणी आठवण झाली. तिला जरासं हायसं वाटलं.
राम नावाचं झाडं म्हणालं, त्याप्रमाणे कृत्रिम बुध्दीमत्तेचा उपयोग यासाठी नक्कीच करता येईल, असं रेश्मा स्वत:ला म्हणाली. पण नेमकं काय करायचं? तिला प्रश्न पडला.
या विषयात चांगली आवड आणि गती असल्यानं रेश्माच्या बाबांनी तिला याचाच अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे ती गेली एक दोन वर्षे या विषयाची जमेल तेव्हढी माहिती घेत होती. अभ्यासत होती. त्यातूनच तिला ठाऊक झालं की, कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आता चित्र काढण्यासाठी, कविता करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामांसाठी केला जातोय.
“मग, असाच उपयोग जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी केला तर?”, रेश्मा स्वत:शीच बोलली. या विचारमंथनाने तिच्यात उत्साह संचारला. ती तिच्या प्राध्यापकांना जाऊन भेटली. या कल्पनेने तेही भारावले. तिला, त्यांनी उत्तेजन दिलं. दिशा सुचवली.
जंगलातील वणव्याच्या अभ्यासात रेश्मा रात्रंदिवस गढून गेली. तापमान, हवेतील आद्रता, वाऱ्याचा वेग, मातीचा कोरडेपणा, मानवी हस्तक्षेप हे घटक, वणव्यासाठी जबाबदार असल्याचं तिच्या लक्षात आलं.
मग तिने कृत्रिम बुध्दीमतेचा भाग असलेल्या, “मशिन लर्निंग” या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. एखाद्या यंत्राला स्वत:हून विचार करण्यासाठी काही आकडेमोड (कोडिंग) किंवा अल्गॉरिदम तयार करुन देता येतं. त्यानंतर ते यंत्र, या तंत्राच्या सहाय्याने त्याला विचारलेल्या समस्येचा निराकरणासाठी उत्तरं शोधू शकतो. यास “डीप लर्निंग” म्हणतात.या तंत्राने युक्त मशिन किंवा यंत्र त्याला विचारलेली समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी, त्याच्याकडे दिलेली माहिती याचा स्वत:च सूक्ष्म अभ्यास करतो नि समस्येचं उत्तरही शोधतो.
रेश्मानं, या “डीप लर्निंग” तंत्राचा वापर करण्याचं ठरवलं. वणवा लागणाऱ्या घटकांची सखोल माहिती ती यंत्राला पुरवू लागली. त्यातूनच एक नवं प्रारुप किंवा मॉडेल तयार झालं. जंगलातील वणवे कधी लागू शकतात याचा अंदाज करणारं! हे प्रारुप ९० टक्के अचुक अंदाज व्यक्त करत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जंगलावर कधीही उद्भवू शकणाऱ्या या संकटाचा सामना करणं शक्य होऊ शकतं. त्याचबरोबर जंगलातील झाडांसोबत पशू-पक्षी आणि सूक्ष्मजीवही वाचू शकतात.
या विषयाचा रेश्माचा अभ्यास इतका सखोल झाला की तिने, जंगलातील वणव्यांसाठी, कृत्रिम बुध्दीमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर वाइल्ड फायर, या अभ्यासावर आधारित एक ॲप तयार केला. या ॲपची चर्चा जंगलातील वणव्यासारखीच अमेरिकेत पसरली. तिचं संशोधन तपासलं गेलं. त्यात ते मेरिटमध्ये उत्तीर्ण झालं. जंगल संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगानं केलेल्या या संशोधनाची दखल सर्वोच्च पातळीवर घेतली गेली. चिल्ड्रन्स क्लायमेट पारितोषिकासाठी रेश्माची निवड झाली…
ते साल होतं २०२१. महिना होता नोव्हेंबर. त्यावेळी रेश्माचं वय होतं १५ वर्षे!
“जंगलातले प्राणी, जंगलातली झाडं आणि मी वेगवेगळे थोडेच आहोत. त्यांना वाचवणं म्हणजे मला स्वत:लाच आणि माझ्या सारख्या मुलांनाच वाचवणं!” असं रेश्माला वाटतं.
“जंगलांचा अंधाधुंदरित्या तोड करणाऱ्या मोठ्या मानणांसाही असंच वाटावं,” अशी मनोमन प्रार्थना ती कायम करत असते. तिच्या स्वप्नात आलेल्या, राम-लक्ष्मण झाडांपर्यंत ही प्रार्थना पोहचलीय. मानवास, ही सद्बुध्दी दे यासाठी ते आणि त्यांच्या जंगलातील शिल्लक वृक्षराजीसुध्दा, रेश्माच्या या प्रार्थनेत सामील झाले आहेत.
तर अशी ही रेश्मा कोसाराजू,हल्ली मुक्काम साराटोगा,कॅलिफोर्निया.
सुरेश वांदिले