वाघोबाची वाचा गेली…
वननगरीत आज आक्रित घडलं. वाघोबांनी आज डरकाळी फोडली नाही की शिकारीसाठी एखाद्या हरणाचा पाठलाग केला नाही. याचं हरणांना दु:ख होण्याचं काही कारण नव्हतं. पण इतक्या वर्षात असं कधी कधी घडलं नव्हतं.
अरे, आज वाघोबाचा उपासबिपास आहे की काय? एका हरीण काकूने दुसरीस विचारलं.
असू दे, नाहीतर नसू दे. आपल्या काय घेणंदेणं. वाघोबा त्याचं-त्याचं बघून गेईल. दररोज उपास करण्याची सद्बुध्दी त्याला ताडोबा देव देवो, अशी आपण प्रार्थनाच करायला हवी. म्हणजे आपल्यावरची टांगती तलवार तर जाईल ना!
वा गं, वा शहाणे! अगं काहीही झाला तरी वाघोबा या जंगलाचा राजा आहे. त्याच्यामुळे हे जंगल टिकून आहे. हे जंगल आहे म्हणून आपण इथे राहू शकतो, खायला लुसलुशीत गवत मिळतं. आपली पोरंटोरं खेळू–बागडू शकतात. त्याच्या या इतक्या मोठ्या उपकारासाठी चार दोन दिवसातून आपल्यातला एक जण त्याच्या पोटात गेला तर काही बिघडत नाही. म्हणूनच कदाचित देवानं आपल्याला त्याचं खाद्य बनवलं असावं. आपण त्याची काळजी घेतो आणि तो आपली काळजी घेतो. समजलं का?
दुसऱ्या काकूंना ते समजलं असावं.
अगं, मग वाघोबाला जाऊन विचारायचं का?
नाही म्हणजे, हा जरा आगावूपणाच होईल. जिवाला धोकासुध्दा आहेच. पण राजाची कुणीतरी चौकशी नको का करायला?
दुसऱ्या हरीण काकूला पहिल्या हरीण काकूचं हेही म्हणनं पटलं असावं.
ती म्हणाली,
ताडोबा देवाची जी काय इच्छा असेल तसं घडेल, आपण खरोखरच वाघोबाकडे जाऊन बघू या.
असा विचार करुन दोन्ही हरीण काकू भीतभीतच वाघोबाकडे निघाल्या. सुदैवाने वाघोबा एका तलावाच्या काठावर उतरलेल्या चेहऱ्याने बसलेला त्यांना दिसला. त्या दोघींचा वास येऊनही त्याने काहीच हालचाल केली नाही. तेव्हा दोघींच्या आणखी जिवात जीव आला. त्या आणखी वाघोबाच्या जवळ गेल्या. पण वाघोबा काहीच हालचाल करेना. तेव्हा या दोन्ही काकूंना जरा काळजीच वाटली. वाघोबा मेलाबिला तर नाही ना,असही एका काकूला वाटलं. पण हा दुष्ट विचार तिने झुरळासारखा झटकून टाकला.
त्या दोघी आता वाघोबाच्या आणखी नजिक पोहचल्या. त्यांना बघताच वाघोबा जोरजोराने रडू लागला. डरकाळी फोडणारा वाघोबा असा मुळूमुळू रडतो हे बघून दोन्ही काकूंच्या ह्रदयास पाझर फुटला…
दोन्ही काकू त्याच्या बाजूला बसल्या. एकिने त्याचे डोळे पुसले, दुसरीने नाकातून येणारा शेंबूङ!
वाघोबा, अरे तू रडतोस का? तूच असा रडायला लागला तर आमच्यासारख्या प्रजेनं कुणाकडे बघायचं? एका काकूने विचारलं.
हरीणकाकू अगं, रडणार नाही तर काय करणार?मोठ्ठच संकट कोसळलय आपल्यावर.
आँ! काय झाले रे वाघोबा. तुला जर ते संकट वाटत असेल तर मग आमचं काय?
हरीण काकू, आता तू- मी असं काही राहिलच नाही. मी, हे जंगल आणि इथे राहणारे प्राणी सारेचजण जात्यात सापडलो आहोत.
तू काय म्हणतोस ते काहीच कळत नाही बुवा?
चला माझ्यासोबत मी तुम्हाला आपलं संकटच दाखवतो. असं म्हणून वाघोबाने त्याच्याकडे असलेल्या जादूने त्याला स्वत:ला आणि दोन्ही हरीण काकूंना पंख आणले. या पंखांने ते तिघेही उडू लागले.
वाघोबा त्यांना म्हणाला, वर आकाशात बघू नका. खाली बघा.
दोन्ही काकू खाली बघू लागल्या. त्यानांही धक्काच बसला. कधी काळी घनदाट जंगल होतं. आता ते विरळ विरळ झालं होतं. काही ठिकाणी तर केवळ जमिनीच जमीन दिसत होती.
बापरे बाप! दोन्ही काकू म्हणाल्या. पंखांमुळे त्या तिघांनीही खूप अंतर कापलं. सगळीकडे त्यांना जंगल तोड चाललेली, जंगलात काहीबाही काम चाललेली दिसली. वाघोबा तर घाबरलेलेच होते. पण दोन्ही हरीण काकू त्याहून घाबरुन गेल्या. त्यांचा जीव वरखाली-खालीवर होऊ लागला. ते बघून वाघोबा परत फिरले आणि ताडोबा देवाच्या मंदिरात उतरले.
००००
तेथील दृश्य तर आणखीनच विदारक होतं. कारण मंदिराच्याबाहेर येऊन खुद्द ताडोबा देव आक्रोश करत होते.
वाघोबा आणि हरीण काकूंना बघतातच त्यांचा आक्रोश थांबला.
वाघोबांनी दंडवत करत त्यांना विचारलं,
देवा काय झालं, असं आक्रोश करायला? तुमचीच जर ही स्थिती तर मग आम्हा पामरांची काय कथा! असं म्हणत वाघोबांनी हुंदका दिला. हरणांची तर वाचाच गेली.
ताडोबा देव सांगू लागले, अरे वाघोबा, या मानवानं आपल्या देशातलं गेल्या २५ वर्षात १५ लाख हेक्टर जंगल नष्ट करुन टाकलं.
बापरे! काय सांगता, देवा? वाघोबा दचकून म्हणाले. त्यांच्या अंगावर शहारे आले होते.
होय रे, जंगलाची नुसती तोडातोड चाललीय, कुणी खाणीसाठी जंगल तोडतय, कुणी रस्त्यांसाठी कुणी पुलासाठी, कुणी कारखान्यासाठी, तर कुणी वीज प्रकल्पासाठी, तर कुणी घरं बांधण्यासाठी जंगलतोड चालवलीय. आपल्या पृथ्वीमातेनं मोठ्या मायने सांभाळलेल्या जंगलामधून दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर जंगल नष्ट केलं जात आहे. तो एक इंग्लंड नावाचा देश आहे,त्याच्या आकाराएवढं हे क्षेत्रं!,
देवा! देवा!! हे फारच विपरीत घडतय.वाघोबा म्हणला. त्याला रडू कोसळलं.
ताडोबा देव त्याची सांत्वना करत देत म्हणाला,
वाघोबा, तुझी काळजी समजते रे मला.जंगलाचं नष्ट होणं म्हणजे अनंत समस्या निर्माण करणं हे मानवाला कसं कळत नाहीच हेच मला समजेनास झालय. दरवर्षी असं जंगल नष्ट होत राहिलं तर तू, हरणं आपले जंगलातले आपले नातेवाईक आणि मी नाही शिल्लक राहणार. पण या पृथ्वीवरचं जंगलच नाहिसं झालं तर मग मानवावरही अनेक संकटं कोसळतील. निसर्गाचं संतुलन बिघडेल. ते आत्ताच बिघडलय.ते नंतर इतकं बिघडेल की या मानवाची सगळी प्रगती त्यात एके दिवशी नष्ट होऊन जाईल.
ताडोबा देवाच्या तोंडून हे सारं ऐकता ऐकता वाघोबाचीही वाचा गेली. हरीण काकू कधीच्याच बेशुध्द पडल्या होत्या.
ताडोबा देवाच्या अश्रूच्या धारा काही कमी होत नव्हत्या.
सुरेश वांदिले