
वाट चुकली, बरच झालं!
ही गोष्ट आहे २०२० सालातील.
तिला, माद्रिद येथे झालेल्या हवामान बदल परिषदेत, मत मांडण्यासाठी बोलावण्यात आलं. यासाठी तिची रितसर निवड झाली, २० हजार अर्जांमधून! या आनंदातच ती माद्रिदच्या परिषदेत उपस्थित राहिली. एकापाठोपाठ एक वक्ते, व्यासपीठावर येऊन बोलू लागले. आपला क्रमांक कधी येईल, याची वाट ती बघू लागली. पण, अशी संधीच तिला मिळेना. ती, रात्रभर त्या ठिकाणी बसून राहिली. कधीतरी आयोजकांचं लक्ष, तिच्याकडे गेलं. त्यांनी तिला व्यासपीठावर बोलावलं. मग मात्र तिने, ही संधी सोडली नाही. “मोठ्या परिषदेतील चर्चा आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या, छोट्या पर्यावरणरक्षक कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद साधला गेला तरच, पर्यावरण रक्षणाची चळवळ सक्षक्तपणे पुढे जाईल, अन्यथा सारे प्रयत्न वाया जातील.” असं मत तिने निर्भिडपणे व्यक्त केलं. तिच्या मताची, जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. तिच्या रुपाने पहिल्यांदाच, जागतिक पातळीवर नेपाळी तरुणाईचा आवाज गुंजला.
०००
ती, आता नेपाळी आदिवासींच्या प्रदेशात जनजागृतीच्या कार्यात गढून गेलीय. हे आदिवासी निसर्गाला धरुन राहतात. त्यामुळे स्थानिक प्रयत्नांनीच व स्थानिकांना विश्वासात घेऊन पर्यावरण रक्षण करणं, भाग असल्याचं, ती ठामपणे सांगते. त्यामुळे बरेचदा तिला विकासविरोधी ठरवलं जातं. पण, ती याकडे दुर्लक्ष करते. तरुणाईन पर्यावरणरक्षणासाठी झोकून दिलं नाही तर, त्यांचं भविष्य अंधकारामय होईल, हे पोटतिडकीने सांगते. अधिकाधिक तरुणांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी, प्रेरीत करते.
०००
पर्यावरण रक्षणासाठी काही करावं, असं काही तिच्या मनात नव्हतं. या मुलीला, सूक्ष्मजीवशास्त्रात रस असल्याने तिने आधी याविषयात मूलभूत शिक्षण घेतलं, मग याच विषयात संशोधन करण्यासाठी नेपाळच्या ललितपूर येथील त्रिभून महाविद्यालयात प्रवेश घेतला.या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे, शैक्षणिक वर्षं सुरु होण्याआधी करिअर सल्लागारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. त्याप्रमाणे तिने, मार्गदर्शकांची भेट घेतली. त्यांनी तिच्यासमोर तीन पर्यायांच्या चिठ्या टाकल्या. त्यातून तिने जी चिठ्ठी उचलली, त्यात लिहिलं होत,पर्यावरण!
या पर्यायाने, तिचं पुढचं आयुष्य बदलून गेलं. वर्गातील प्राध्यापक, पर्यावरणरक्षण, हवामानबदल, जागतिक तपमानवाढ, याविषयी पोटतिडकीने बोलत. त्यांच्या या पोटतिडकीने ती भारावून गेली.
०००
पर्यावरण रक्षणाचा विषय, नव्या पिढीच्या जीवनमरणाशी आणि अस्तित्वाशी निगडित असल्याचं, तिच्या लक्षात आलं. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, आपणही काहीतरी करायलाचं हवं असं, तिच्या मनाने घेतलं. बायोटेक्नॉलॉजीऐवजी, याच विषयात स्वत:ला झोकून देण्याचा निर्धार केला.
हवामान बदलामुळे, नेपाळमध्ये पहाडी प्रदेशातील वातावरण आणि ऋतुमानात दरवर्षी अनपेक्षित आणि चमत्कारिक बदल घडायला लागल्याचं, तिच्या लक्षात आलं होतं. हिमालयातील हिमनद्या वितळू लागल्या आहेत. याला प्रतिबंध केला नाही तर, या शतकाच्या शेवटी याहिमनद्यांपैकी, एकतृतियांश नद्या वितळून नामशेष होतील. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या सरोवरातील पाण्याची पातळी वाढेल. महापुराचा धोका वाढेल. सारख्या दरडी कोसळतील. सध्याच, अशा घटनांमुळे, या परिसारातील लोकांना जीव मुठीत धरुन राहावं लागतं.
हवामान बदलामुळे नेपाळवासियांचं जीवनमान धोकादायक बनलय. निरक्षरता आणि अज्ञानामुळे स्थानिक लोक भांबावून गेले आहेत. या समस्येला भिडण्याचं तिने ठरवलं. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसोबतचा संपर्क वाढवला. यातूनच तिला “युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, नेपाळी यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन (एनवायसीए)”,या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय हवामान परिषदेबाबत कळलं. या परिषेदत ती सहभागी झाली. स्थानिक लोकांच्या मदतीने पर्यावरण रक्षण करणं सुलभ जाऊ शकतं, हे तिला इथे कळलं. आता ती एनवायसीएची सक्रिय कार्यकर्ती झाली.
हे सगळं करत असतानाच, स्थानिक शाळेत, पर्यावरणशास्त्र हा विषय शिकवू लागली. मुलांमध्ये पर्यावरण रक्षण, हवामानबदल, पर्यावरणसंवर्धन याबद्दल जागृती केली, शाळेत पर्यावरण संवर्धन मंडळ स्थापन केले. मुलांना, झाडाची निगा राखण्याचं आणि कचऱ्याचं व्यवस्थापन शिकवलं. नेपाळमधील इतर ठिकाणीही पर्यावरण संवर्धन विषयावर चर्चासत्रांचं आयोजन करु लागली. हवामान बदलाविरुध्द शांततापूर्ण निदर्शनं करण्यासाठी मुलांना प्रेरित करु लागली. नेपाळच्या पंतप्रधानांना पत्र लिहून, पर्यावरणासाठी हानीकारण ठरु शकणाऱ्या सरकारच्या उर्जाधारेणाचा फेरविचार करण्याची मागणी तिने केली. तिच्या या मागणिची सरकारलाही दखल घ्यावी लागली.
००००
ही मुलगी म्हणजेच, श्रेया के.सी!
हल्ली मुक्काम नेपाळ!
सुरेश वांदिले