(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उंदीरमामाने मनीमावशीला चकवा देऊन चिजवर ताव मारला. त्याला वाटलं मावशी काही आपल्याला पकडणार नाही. त्यामुळे मिशीला पुसत-पुसत शीळ वाजवत मामाने खिडकीतून खाली उडी टाकली. बघतो तर काय? मावशी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी! तिला बघून मामाचे धाबे दणाणले.

तो, त त त प प करत मावशीला म्हणाला…

म्हणजे मावशे, तुला कळलं तर सारं काही?

अरे चोरा! माझं नाक इतकं पॉवरफुल्ल आहे की मला बरोबर सगळयांचा वास येतो. हा! हा! हा! मावशी विकट हास्य करत म्हणाली.

सॉरी सॉरी, मावशे, खरतर तुला विचारुनच मी चीज खायला हवं होतं. पण मावशे, ही नाकाची आणि वासाची काय भानगड ! सांगशील का जरा? मी पडलो अडाणी. तुझ्याकडून थोडं ज्ञान मिळालं तर तेव्हढाच मीही ज्ञानी होईल. असं म्हणून मामाने मावशीच्या पायाला पाय लावला…

बरं तर, चल, आपण तिथे बसू, मग मी तुला वासाची गोष्टच सांगते.

मावशी आणि मामा एका कट्ट्यावर जाऊन बसले.

मावशी सांगू लागली. मामा कान देऊन ऐकू लागले.

माम्या, आपल्याला आणि या  माणसांना वास किंवा गंध येतो तो नाकामुळे.

क्या  बात है ! मामा म्हणाला.

क्या बात नाही रे, ही अंदरकी बात आहे. म्हणजे असं की आपल्या नाकाला दोन  छिद्रं असतात. त्याला नाकपुड्या म्हणतात. त्या नाकापुड्या बाहेरची हवा आत घेतात. आतली हवा बाहेर सोडतात.

म्हणजे हवा हवाई आणि हवा गवाई!

गप्प रे! पांचट विनोद करु नकोस.

सॉरी सॉरी…

तर नाकपुडीत आत जाणाऱ्या हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड असे वायू असतात. पाण्याची वाफ असते. धुळीचे कण असतात.

म्हणूनच तर ऑक्छी होत नाही ना? मामा अभिनय करत म्हणाला.

माम्या, तुला ऐकायचय की नाही?मी निघते.

नको नको, सांग सांग…मामा कान पकडत म्हणाला.

फळांना, फुलांना आणि पदार्थांना त्यांचा त्यांचा स्पेशल वास असतो.

म्हणजे चिजचा वेगळा, बटरचा वेगळा, समोशाचा वेगळा असचं ना.

वा माम्या! माझ्यासोबत राहून बराच हुषार झालास की रे…

हॅ हॅ हॅ…

तर माम्या, हा वास एका विशिष्ट रसायनांचा असतो. ही रसायनं बाष्पनशील असतात. म्हणजे ज्या रेणूंमुळे ही रसायनं तयार होतात ते रेणू हवेत उडून गायब होतात.

मग त्याचं काय होतं? मामांनी विचारलं.

आपण श्वाच्छोश्वास करतो तेव्हा हवेतले हे रेणू नाकाच्या आत येऊन नाकातील बारीक केसांमध्ये अडकतात.

 हो का? असं म्हणून मामाने त्याच्या नाकात पाय घातला.

खरचं की मावशे, खुपच केस आहेत माझ्या नाकपुडीत.

हे नाकातले केस एखाद्या चाळणीसारखं काम करतात. हवेतल्या धुळीला ही चाळणी अडवते. जेव्हा आपलं नाक गळू लागतं तेव्हा ते रेणू बाहेर पडतात. मात्र, वासाचे रेणू नाकाच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या पोकळीत शिरतात. या पोकळीच्या शेवटी “ओलफॅक्टरी बल्ब या नावाची वासग्रंथी असते. या ग्रंथी लाखो पेशिं(सेन्सरी न्युरान्स)नी बनलेल्या असतात. त्यांच्या आवरणावर वासाची रसायनं ओळखू शकणारे वेगळे रेणू असतात. या रेणूच्या खोबणीच्या आत हे शिरतात. प्रत्येक वासाच्या रेणूसाठी वेगवेगळी खोबण असते. त्यामुळे प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा वास येतो.

कसा काय? मामाने उत्सुकतेने विचारलं.

अरे, वासाचा रेणू खोबणित गेला की त्याला जोडलेला मज्जातंतू त्याची माहिती तत्काळ मेंदूला देतो. ही माहिती विद्दूत रासायनिक लहरीच्या रुपातली असते. आपल्या मेंदूत वास ओळखणारं स्पेशल केंद्रच असतं. या केंद्रात ही माहिती पोहचली की मग मेंदू कामाला लागतो.

कामाला लागतो म्हणजे? मामाला प्रश्न पडला.

माम्या, आपला आणि या माणसांचा मेंदू म्हणजे एक चमत्कारच आहे. त्याच्या आता प्रचंड माहिती साठवलेली असते. यामध्ये वेगवेगळया वासांचीही माहिती असते.

क्या बात है?

वैज्ञानिकांनी ढोबळ मानाने या वासांचं वर्गीकरण १० प्रकारात केलय.

वा S व, कोणते ते दहा प्रकार?

मोज बघू, मावशी म्हणाली, मामा वासाचे प्रकार पायाने मोजू लागला

सुगंधी (आल्हाददायक), गोड, रासायनिक, लिंबूसारखा, फळे (लिंबू वर्गीय सोडून), सडका, पेपरमिंट किंवा मिंट (पुदिन्या सारखा), पॉपकार्न (लाह्यांसारखा) झणझणीत, राळ(उद).हे ते दहा प्रकार. त्यामुळे एखादा वास मेंदू पर्यंत पोहचला की, तेव्हा तो त्याच्याकडे असलेल्या माहितीशी हा वास ताडून बघतो.

ग्रेट!

खरच ग्रेट रे ! कारण मग मेंदू सांगतो की हा वास गुलाबाचा आहे. हा वास जिलेबीचा आहे हा वास कचऱ्याचा आहे की सडक्या अंड्याचा आहे.

वा वा मस्तच!

माम्या हे तर काहीच नाही…जेव्हा गुलाबाचा वास नाकात शिरतो, तेव्हा नाकाला, मेंदू सांगतो की जरा खोलवर घे. नाक ही आज्ञा पाळतो. त्यामुळे मन प्रसन्न करणारा गुलाबाचा वास आपण अनुभवू शकतो.

आणि नासक्या टमारचा वास?

तो जर असेल तर मेंदू ताबडतोब नाकाला सांगतो, बाबा, घाणेरडा वास असल्यानं तुझ्या आतील स्नायुंना आकुंचन पाव, म्हणजे हा वास फार तुला त्रास देणार नाही.

आँ!

हाँ! मामा…आपल्याला उगाचच वास येत नाही. त्यासाठी इतक्या भानगडी होतात, मेंदू आणि नाकाच्या आत. 

पण मावशे, तुला, माझा वास कुठेही कसा येतो? मी तर पंधरापंधरा दिवस आंघोळ करत नाही. मामा डोळे मिचकावीत म्हणाला.

घाणेरडा कुठला? असं म्हणून मावशीने त्याची मिशी ओढली.