नेहमीप्रमाणे वाघोबा आजोबांकडे दोन्ही नातवांनी गोष्ट सांगण्याचा हट्ट केला.गोष्ट ऐकल्याशिवाय दोन्ही नातवंडं झोपी जाणार नाहीत हे ठाऊक असल्यानं त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.
आज त्यांच्या गोष्टीचा नायक होता,त्यांचा एक पूर्वज.त्याला ते विदूषक वाघोबा म्हणत.
पण विदूषक कां म्हणता तुम्ही त्यांना? एका नातवाने विचारलं.
अरे, विदूषक नाही का सर्कशीत वेडेवाकडे चाळे करुन प्रेक्षकांना हसवतो, त्यांचं मनोरंजन करतो, तसं हे आपले पूर्वज वाघोबा करायचे.
पण कशासाठी आजोबा?त्यांना असं का करावं वाटलं?
याचं खरं कारण कुणालाच कळलं नाही.
मग तुम्हाला काही कळलं का?
नाही, मला पण कळलं नाही.पण मी एक अंदाज बांधला.
कोणता बरं?
अरे, हे जे आपले विदूषक वाघोबा होते ना त्यांना सर्व प्राण्यांची मुलं फार आवडत.त्यांच्याशी खेळायला त्यांना आवडे. पण वाघोबाच्या भीतिने कुणीही त्यांच्याकडे मुलांना पाठवत नसत. विदुषक वाघोबांनी प्राण्यांच्या आईबाबांना खूप समजावून सांगितलं. आपण जरासुध्दा त्रास देणार नाही,भीती दाखवणार नाही. पण त्यांचं कुणी ऐकलं नाही. त्यामुळे हे वाघोबा विचारात पडले की आता नेमकं काय करावं बरं? विचार करता करता त्यांना एक कल्पना सुचली. ते एके दिवशी सक्काळी सक्काळी जिथे खूप पशू-पक्षी एकत्र येतात, त्या ठिकाणी गेले आणि कुणाच्याही न कळत एका झाडाला लटकले आणि चित्रविचित्र अंगविक्षेप करु लागले. वेगवेगळे आवाज काढू लागले. तिथे अचानकपणे आलेल्या वाघोबांमुळे बरेच प्राणी आणि त्यांची मुलं घाबरुन पळाले.झाडीआडून वाघोबा काय करतात ते बघू लागले. काही प्राण्यांची मुलं त्यांना न घाबरता झाडाखालीच थांबली. वेडेवाकडे आणि विचित्र चाळे करणाऱ्या वाघोंबाकडे बघून जोरजारात हसू लागली.
मग येतेय ना मजा तुम्हाला दोस्तांनो? विदुषक वाघोबांनी मुलांना विचारलं.
त्या मुलांनी हो चा गलका केला. मग विदुषक वाघोबांनी आणखी चित्रविचित्र नकला केल्या.वेगवेगळे हावभाव केले. मुलं खूप खुष झाली. त्यांनी टाळया वाजवल्या. विदुषक वाघोबांना आनंद झाला. ते थोड्यावेळाने झाडावरुन खाली उतरले आणि तिथे असलेल्या दोन- तीन मुलांना म्हणाले, बसा माझ्या पाठीवर मी फिरुवन आणतो ही आपली वननगरी.मुलांनी हैsय केलं.वाघोबा खाली बसले. मुलं त्यांच्या अंगावर चढली. वाघोबांनी त्यांना फेरी मारुन तिथेच आणलं.सर्वांनी वाघोबांना धन्यवाद दिलं. मग वाघोबा त्यांना म्हणाले,
आता मी इथे दररोज येईन. तुमच्याशी खेळीन.मग आपण जंगलात फिरुन येउु.चालेल ना? मुलं हो म्हणाली. वाघोबा परत त्यांना म्हणाले, तुमच्यासोबत तुमच्या मित्रानांही घेऊन या बरं का दोस्तांनो.
सर्व मुलांनी होकार दिला. वाघोबा आपल्या घरी आनदांने परतले. मुलही त्यांच्या घरी परतली.त्यांना आपल्या आईबाबांना आणि मित्रांना या प्रेमळ आणि गमतीशीर वाघोबाची माहिती दिली. झाडीमध्ये लपून बसलेल्या प्राण्यांना वाघोबांचा प्रेमळपणा दिसलाच होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बऱ्याच प्राण्यांनी आपली मुलं त्या झाडाखाली पाठवली.
काही वेळोन वाघोबा आले. कालच्यापेक्षा आज अधिक मुलं बघून त्यांना आनंद झाला. ते झाडावर चढले.एका जाडजूड फांदीला पकडून चित्रविचित्र हावभाव करुन आणि गोल गोल फिरुन मुलांना हसवू लागले. मुलही पोटधरुन हसू लागली. ती खाली उड्या मारु लागली. काही वेळाने वाघोबा खाली आले. त्यांनी मुलांना आळीपाळीने जंगल फिरवून आणले. मुलं खुष झाली.
आता बहुतेक सर्व प्राण्यांची भीती दूर झाली. ते आपल्या मुलांना वाघोबासोबत खेळायला पाठवू लागली. वाघोबा दररोज त्यांचे मनोरंजन करु लागले. त्यांना जंगलातून फिरवून आणू लागले. त्या मुलांशी वाघोंबासोबत घट्ट मैत्री झाली. वाघोबांना त्यांच्याशिवाय आणि मुलांना वाघोबांशिवाय करमेनासं झालं.
मुलांसोबत खेळणारा खिदळणारा वाघोबा, वेडा झाल्याची खात्री त्यांच्या दरबारातील लांडगा, कोल्हा, अस्वल या सारख्या प्राण्यांना झाली. शेजारच्या वननगरीचे सिंहमहाराज मोठं बक्षीस देतील आणि मोठा हुद्दा देतील या अपेक्षेने त्यांनी सिंहाला ही माहिती दिली. सिंहमहाराज आंनदले. वेड्या झालेल्या वाघोबाला ठार करणं अशक्य नाही, याची त्यांना खात्री पटली.त्यामुळे त्यांनी वाघोबांवर हल्ला करायचं ठरवलं.
मग काय झालं आजोबा?
जे व्हायचं तेच घडलं. लांडगा, कोल्हा आणि अस्वल या फितुरांमुळे, वाघोबा मुलांमध्ये रंगला असताना सिंहाने हल्ला केला. सिंहाने त्याला पकडलं.
अरे बापरे, मग?
आणि चमत्कार घडला!
चमत्कार! कसा चमत्कार?
अरे तिथे वनदेवता प्रगटली. तिने सिंहाच्या तावडीतून वाघोबाची सुटका केली आणि सिंहाची मान पकडून त्याला म्हणाली.
दुष्ट सिंहा, तू कपटाने वाघोबास ठार करायला निघालास, पण लक्षात ठेव तसं काही घडणार नाही.आम्ही त्याच्या बाजूने आहोत.
असं कां म्हणाली वनदेवता, आजोबा?
वनदेवता सिंहाला म्हणाली, अरे जो मुलांचे रंजन करतो, तो देवांना सुध्दा आवडतो. मुलं म्हणजे देवाघरची फुलं!या फुलांना आनंद देणाऱ्या वाघोबाचं आम्ही कसं वाईट होउु देणार?आता बघ दुष्टा तुझं कसं वाईट होतं ते ! असं म्हणून वनदेवतेने सिंहावर फुंकर मारली. क्षणार्धात सिंह त्या ठिकाणी दगड होऊन पडला. ते बघून त्याचे सैन्य घाबरले अणि तेही पळून गेले. कोल्हा-अस्वल आणि लांडग्याची पाचावर धारणा बसली. ते लटलट कापू लागले. वनदेवतेने त्या तिघांनांही शाप दिला. ते तिघेही सिंहाच्याबाजूला शिळा बणून पडले. वनदेवतेने सिंहाचेही राज्य वाघोबांना देऊन टाकले.वाघोबांनी वनदेवतेच्या पायावर डोके ठेऊन आशीर्वाद घेतला.
वनदेवता अंतर्धान पावली.
वाघोबा आणि मुलांनी जल्लोश केला. हे सगळं राज्य तुमचच आहे, कुठेही जा, खा, प्या, बागडा, नाचा, मजा करा.असं वाघोबांनी मुलांना सांगितलं. मी जसा राजा,तसचं तुम्ही सुध्दा या जंगलाचे राजे!
हे ऐकून मुलं अत्यानंदाने नाचू लागली.
पण बालमित्रांनो, जो राजा होतो त्याला जबाबदारीनं वागावं लागतं. आता या वनाच्या रक्षणाची राजा म्हणून माझी जशी जबाबदारी तशीच राजा म्हणून तुमच्या पैकी प्रत्येकाची जबाबदारी. विदुषक आजोबा मुलांना म्हणाले.
हो हो हो. सर्व मुलं आनंदानं म्हणाली. त्यांनी वाघोबाचा जयजयकार केला. अशा या विदूषक वाघोबाच्या राज्यावर पुढे कुणीही आक्रमण करण्यास धजावले नाही.आजोबा म्हणाले.
वा वा वा…मग आजोबा आपणही म्हणू या का?
काय ?
विदुषक वाघोबा अमर रहे!
अमर रहे!आजोबा आणि नातवंडं एका सुरात म्हणाली.
०००