(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर तालिबानच्याच बातम्या. पेपर उघडला तरी तालिबानच्या बातम्या. तालीबान.. तालीबान हे कानावर पडून तेजोमयी अगदी वैतागून गेली.

तुला, नाही का रे वैताग आला हे ऐकून, अलेक्झांडरला तेजोमयीने विचारलं.

नाही  ब्बॉS  मला काय करायचय तालिबान फालिबानचं..असं काहीसं अलेक्झांडरला सांगावसं असल्याने, त्याने तशी मुद्रा केली.हे भाव तेजोमयीने बरोबर ओळखले.

बरं आहे बुवा, तुझं, तुला खायला प्यायला मिळालं की मज्जाज मज्जा..आमचं तसं नाही ना..अलेक्झांडरकडे बघत तेजोमयी म्हणाली..

आमचं तसं नाही तर कुणाचं तसं आहे गं.. बाबा या संभाषणात सहभागी होत म्हणाले..

काय हो बाबा..तुम्ही आमचं संभाषण असं चोरुन ऐकत होतात की काय?

गधडे, चोरुन कशाला ऐकीन. तू एवढया जोरात बोलत होतीस की ते माझ्या कानावर आपोआप आलं. म्हणून आपलं काही गुपित असेल तर असं जोरानं सांगायचं नसतं..बाबांनी तेजोमयीस समजावलं.

पण बाबा, माझं काही गुपित बिपित नाही. तालिबान तालिबान सारखं कानावर पडून वैताग आलाय, म्हणून अलेक्झांडरला विचारत होते, त्याचं काय म्हणून..

त्याचं काय म्हणजे..

म्हणजे त्याला वैताग नाही का आला…

मग काय सांगितल त्याने? तो बरा आहे ना…? मी म्हणतो, ज्याचा आपल्याला त्रास होतो, वैताग येतो, त्याचा विचारच करायचा कशाला फार..

असं कसं म्हणता बाबा..अहो,तुम्ही बघत नाहीत का टीव्हीत, हे जे कोण तालिबानी आहेत, ते कसं लोकांना त्रास देताहेत, छळताहेत..नको नको ते करताहेत..

दिसतय ना..

मग तुम्हाला वाईट वाटत नाही का हो.. तेजोमयीनं विचारलं. यावर बाबा निरुत्तर झाले. कारण या बातम्यांकडे इतर बातम्यांसारखंच त्यांनी बघितलं होतं. म्हणजे अर्ध ऐकलं. अर्ध नाही ऐकलं. खरं तर त्यांना फार काही वाटल नव्हतं. बाबा विचार करु लागले, मुलं किती संवेदनशील असतात नाही का? आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या राष्ट्रातील घटनांनी त्यांचं भावविश्व ढवळून निघतं..आपणास काहीही वाटत नाही..तेजोमयीच्या मनात प्रचंड खळबळ उडालेली दिसतेय..

आता तिला सारं काही समजावून सांगितलं पाहिजे. बाबा स्वत:शीच बोलले. मग त्यांनी तालिबानी कोण आहेत. ते नेमके काय करत आहेत. त्यांच्या हातात बंदुकाच कां दिसतात? त्यांचा आणि भारताचा काही संबंध येऊ शकतो का, अशी बरीच माहिती मिळवली..आणि एके दिवशी व्यवस्थित तेजोमयीस समजावून सांगितलं..

आजची मुलं खऱ्या अर्थाने वैश्विक मुलं आहेत. त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. सगळयांची त्यांना काळजी वाटते. हीच मुलं भविष्यात सर्वांच्या हितासाठी आणि भल्यासाठी प्रयत्न करणार बघ..बाबांनी आईस सांगितलं.

कळलं, का रे ठोंब्या तुला..आई अलेक्झांडरकडे बघत म्हणाली.

आईने विचारल्यावर त्या बिचाऱ्याची काय टाप नाही म्हणायची…अलेक्झांडरने खुषित येऊन मान हलवली….आई-बाबा आणि तेजोमयीने त्याच्या या कृतिस हसून दाद दिली.

०००