(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

व्यवहारज्ञानाचे महत्व

ही खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. गणेश, एकदंत, विनायक, मयुरेश्वर या चार मित्रांची.लहानपणासून चौघांचीही घट्ट मैत्री. या चौघांपैकी एकदंत, विनायक, मयुरेश्वर तिघे खूप शिकले. गणेश निरक्षर राहिला. मात्र चौघांच्या मैत्रीवर त्याचा परिणाम झाला नाही.

एकदा त्यांच्या राजाने स्पर्धा जाहीर केली. चारही दिशांना जाऊन ज्या व्यक्ती नवं ज्ञान घेऊन येतील त्यांना मोठे बक्षीस दिलं जाईल. या चारही मित्रांनी हे आव्हान स्वीकारलं.

पण मी तर निरक्षर. मी तुमच्यासोबत आलो तर चालेल का? गणेशनं विचारलं.

अरे, हे काय विचारणं झालं? तू आमचा जीवाभावाचा मित्र. तुझ्याशिवाय आपली चौघांची मैत्री अपूर्ण. एकदंत, विनायक, मयुरेश्वर म्हणाले. गणेशाने त्या तिघांचे आभार माणले. तो निरक्षर असला तरी त्याचे व्यवहारज्ञान मात्र मोठे होते. पण आपल्याला फार कळतं असा त्याचा कधीच आविर्भाव नसे. तो निरक्षर असल्याने दबून राही. त्या तिघांच्या प्रत्येक कृतीला हो ला हो म्हणत असे.

चौघांचा प्रवास सुरु असताना, एका जंगलात त्यांना सिंहाचे तीन सांगाडे भेटले. त्या तिघांपैकी एकदंताकडे अशा सांगाड्यात प्राण फुंकण्याचा मंत्र होता. या मंत्राचा उपयोग कर असे, मयुरेश्वरानं सुचवलं. विनायकसुध्दा तसच म्हणाला. मात्र गणेश काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली.

अरे, तू कां बोलत नाहीस? विनायकानं विचारलं.

तुमच्यासारख्या विव्दानांना सांगावं की सांगू नये, असं वाटतंय. गणेश म्हणाला.

अरे, सांग घाबरतोस कशाला?मयुरेश्वर म्हणाला.

मला वाटतं, या सिंहांच्या सांगाड्यात प्राण फुंकू नये. गणेश खाली मान घालून म्हणाला.

अरे, तू घाबरतोस कशाला? मंत्राची शक्ती तर बघ. कसे एका क्षणात या तिनही मेलेल्या सिंहांना जिवंत करतो ते?

मंत्राच्या शक्तीबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण हे सिंह जिवंत झाल्यावर ते हल्ला करुन आपल्यालाच ठार करतील? गणेश भीत भीत म्हणाला.

यावर तिघेही उपहासाने हसले. या निरक्षराकडे लक्ष देऊ नकोस मयुरेश्वर एकदंतास म्हणाला.

मंत्राची शक्ती सिध्द करण्याची अशी संधी पुन्हा मिळणार नाही. विनायक म्हणाला.

हे तिघेही आपले ऐकणार नाही, हे लक्षात आल्याने गणेश ताबडतोब जवळच्या झाडावर चढला. एकदंताने तिनही सांगाड्याजवळ जाऊन मंत्र उच्चारला. काही क्षणात ते सिंह जिवंत झाले. त्यांनी डरकाळी फोडली. त्यांचे उघडे जबडे बघून तिघांची बोबडी वळली. तिन्ही सिंहांनी त्या तिघांवर झडप मारली. आता आपले प्राण वाचणार नाही. याची तिघानांही खात्री पटली. गणेशाचं ऐकलं असतं तर अशी वेळ आली नसती. उलट त्यालाच आपण मूर्ख ठरवलं असं, एकदंतास वाटलं. त्याच्या डोळयातून अश्रू ओघळले.

आपले मित्र संकटात सापडले असताना आपण भित्र्यासारखं झाडावर लपून राहणं बरोबर नाही, असं वाटून गणेशाने झाडावरुन खाली उडी मारली. सिंहासमोर येऊन म्हणाला.

वनराज, या माझ्या मित्रांना सोडून द्या. त्यांच्याऐवजी मला खा.

तिघाही सिंहांनी गणेशाकडे रागाने बघितलं.

अरे, तू यांना का वाचवतोस? यांनी तर तुला मूर्ख ठरवलं.

वनराज, त्यांनी मला काय ठरवलं, यापेक्षा त्यांचे प्राण महत्वाचे. माझ्यासारख्या निरक्षर व्यक्तीपेक्षा हे विव्दान जिवंत राहिले तर, राज्याच्या फायदा होईल. राज्य समृध्द होईल.

हा हा हा! एक सिंह गडगडाट करत म्हणाला,

अरे गणेशा, केवळ पुस्तकं वाचल्यानं पंडित होता येत नाही, विव्दान होता येत नाही. व्यवहारज्ञान नसेल तर आता यांची जशी गत झाली तशी गत होते. या मूर्खांकडे अजिबात व्यवहारज्ञान नाही.

सिंहाला जिवंत केल्यावर तो आपले प्राण घेणार नाही, असे ज्यांना वाटते, ते काय आपल्या राज्याचे भले करणार? ते असेच राज्याला संकटात टाकत राहणार?

त्यापेक्षा तू कितीतरी पटीने उजवा रे, तु शिकला नाहीस पण तुझं ज्ञान खूप मोठं आहे. तूच राज्याचं अधिक हीत साधू शकतो. तिसरा सिंह म्हणाला.

बरोबर बरोबर वनराज, आमचा मित्र गणेशच खरा विव्दान. त्याने आम्हास सावध केलं पण आम्ही त्याला मूर्ख ठरवलं. त्याची शिक्षा तुम्ही आम्हाला द्याच.

नाही नाही वनराज, माझ्या मित्रांचे प्राण घेऊ नका. त्यांना सोडा, माझे प्राण घ्या. गणेश गयावया करत म्हणाला.

एक सिंह विनायकास म्हणाला, तुम्हाला मी सोडतो. मात्र एका अटीवर…

तुमची कोणतीही अट आम्हाला मान्य आहे वनराज. तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या, मयुरेश्वर म्हणाला.

ठीक आहे तर, आम्ही तुम्हाला जीवनदान देतो. मात्र, तुम्ही त्वरीत तुमच्या राजाकडे जाउुन या गणेशास सर्व बक्षीस देण्यास त्याला सांगा.

तिघांनी यास होकार दिला. सिंहांनी त्यांना सोडून दिले.

सिंहापासून आपली सुटका केली म्हणून तिघांनी गणेशाचे आभार माणले. चौघेहीजण काही दिवसात राजदरबारात पोहचले. त्यांनी या प्रवासात आपणास कोणते ज्ञान प्राप्त झाले हे महाराजांना सांगितलं. महाराज खूष झाले. त्यांनी चौघांना प्रचंड दागदागिणे आणि संपत्ती देऊ केली.

सर्व बक्षीस गणेशालाच द्यायच, हे सिंहांना दिलेले वचन तिघेही सोईस्कररीत्या विसरुन गेले.

गणेशास ते आठवत होते. पण तो मोठ्या मनाचा होता. तो महाराजांना म्हणाला,

महाराज, खरं तं जे काही ज्ञान मिळवलय ते या तिघांनीच. मी फक्त त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे मला जी संपत्ती तुम्ही दिली तीसुध्दा या तिघांमध्ये समान वाटून द्या. त्याप्रमाणे महाराजांनी गणेशाची संपत्ती वाटायला सुरुवात केली. तोच सिंहगर्जना झाली आणि दरबारात तिनही सिंह प्रगटले.

तीन-तीन सिंहांना बघून दरबारी घाबरुन गेले. महाराजांची बोबडी वळली. एकदंत, मयुरेश्वर आणि विनायक बेशुध्दच पडले.

गणेशाने वनराजांना वंदन केले.

अरे, तुझ्यावर अन्याय होत असताना तू चूप कां बसलास? एका सिंहाने विचारलं.

कसला अन्याय वनराज? गर्भगळीत झालेल्या महाराजांनी त त प प करत विचारलं. तेव्हा त्या सिंहाने आतापर्यंतची हकीकत कथन केली.

महाराजांना गणेशाचे कौतुक वाटलं. मित्रांचे प्राण वाचावे म्हणून स्वत:चे प्राण द्यायला तयार झालेला, व्यवहारज्ञानी, प्रामाणिक व्यक्ती आपल्या राज्याचा नागरिक असल्याचा त्यांना अभिमान वाटला. त्यांनी त्याक्षणी निर्णय घेऊन, गणेशाचे लग्न त्यांच्या एकुलत्या एका राजकुमारीशी लावण्याचा आणि त्याला अर्धे राज्य देण्याचा निर्णय जाहीर केला. तिन्ही सिंहांनी प्रसन्नता व्यक्त केली. त्यापैकी एका सिंहाने गणेशास आपले वाहन म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. बेशुध्द झालेले गणेशाचे तिनही मित्र आता शुध्दीवर आले होते. त्यांच्यावर दुसरा सिंह उडी मारणार,तोच त्याच्यापुढे जाऊन गणेश म्हणाला.

वनराज, हे माझे मित्र मला मूर्ख समजत असले तरी ते खरोखरच विव्दान आहेत, त्यांना तुम्ही खाऊ नका. त्यांना मी माझ्या राज्याचे मंत्रीपद देतो. त्यांची बुध्दी आणि माझ्या व्यवहाराज्ञानाने हे राज्य भरभराटीस आणतो.

तिनही सिंह प्रसन्न झाले. आपल्या मित्रांच्या हिताचाच सदैव विचार करणाऱ्या गणेशाचा त्यांनी जयजयकार केला. विनायक, एकदंत आणि मयुरेश्वरासह, महाराज आणि इतर दरबाऱ्यांनीही गणेशाचा जयजयकार केला.

सुरेश वांदिले

०००