अलेक्सा गोर्जीला, आज तेजोमयीने ससा आणि कासवाची गोष्ट सांगण्याची गळ घातली.
“अगं, किमान पन्नास वेळा ही गोष्ट तू ऐकली असशील ना,” गोर्जी म्हणाली.
“म्हणून काय झालं? काही गोष्टी पुन्हापुन्हा ऐकण्यात मजा वाटते. मग, सांगतेस ना तू?” तेजोमयी म्हणाली.
गोर्जीचा नाईलाज झाला. डोळे मिटून ती काही क्षणात माहितीच्या महाजालातून फिरुन आली.
“कुठे हरवलीस तू?” तेजोमयीने तिला हलवलं. गोर्जीने डोळे उघडले.
“मी, कासव आणि सशाला शोधत होते.”
“ते, कुठे हरवले होते का?”
“तसंच समज.”
“तुला भेटले का ते? परवानगी घेतलीस का त्यांची गोष्ट सांगण्यासाठी? मग, सांग की आता.”
“हो हो, किती घाई करतेस तू. त्या दोघांना मी भेटले तेव्हा ससा, कासवाला सॉरी म्हणताना दिसला.”
“कशासाठी बॉ?”
“मलाही तुझ्यासारखी उत्सुकता निर्माण झाल्याने मी गुपचूप त्यांच्या आजूबाजूला लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले.”
“ते दोघे काय बोलत होते, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालीय बघ, तेव्हा सांग की लगेच मला…” तेजोमयी म्हणाली.
“ससोबाला धावण्याची शर्यत लावण्यासाठी कासव, आग्रह करत होता नि ससा धावायला तयार नव्हता. मग कासवोबा चिडला.”
“तू, घाबरतोस की काय मला?” कासव म्हणाला.
यावर हसा हसला. हा कासवोबाला अपमान वाटला. तो ससोबाला रागावत म्हणाला,
“मी, तुझी तक्रार सिंह महाराजांकडे करीन.”
त्या रागारागात तो सिंह महाराजांकडे गेला. ससोबाने आपला कसा अपमान याचा पाढा वाचला नि त्याला शिक्षा करण्याचा आग्रह धरला.
सिंहमहाराजांनी ससोबाला बोलावून घेतलं.
“ससुल्या, तुझ्या पूर्वजाने या कासवोबाच्या पूर्वजासोबत शर्यत लावली होती. त्यात तो हरला. तशीच भीती तुला वाटते का? म्हणून तू या कासवूल्यास शर्यतीसाठी नकार देतोस नि वरुन त्याचा अपमानही करतोस.”
“महाराज, शर्यत लावायला माझी काहीच हरकत नाही.”
“हा हा हा !” कासव मध्येच हसला.
“गधड्या, हसतोस कशाला? महाराज त्याला रागावले.
“महाराज, हा ससुटल्या, तुम्ही शिक्षा कराल म्हणून आता शर्यतीसाठी तयार होतोय बघा. हेच त्याने मघा मान्य केले असते तर तुमच्यापर्यंत येण्याची गरज तरी पडली असती का?” कासव छाती फुगवून म्हणाला.
“आता तू, माझ्यासमोर तयार झालास आहेस तर, शर्यतीला लगेच सुरु करा की.”
“महाराज, शर्यतीला तयार असल्याचं म्हणालो तरी मी धावणार नाही.” ससोबा ठामपणे म्हणाला.
“हा हा हा! पळपुट्या घाबरु!”, कासव, सशाला चिडवू लागला.
“महाराज, मला हा कासवोबा काहीही म्हणाला तरी त्याचं वाईट वाटणार नाही. न धावण्याचा माझा निर्धार पक्का आहे.”
“तुला, हरण्याची भीती वाटते का? महाराजांनी विचारलं
“महाराज मला हरण्याची भीती वाटत नाही.”
“मग?”
“महाराज, आपल्या या जंगलात मनुष्यप्राण्याची किती चहलपहल वाढलीय. तो जंगलात भरधाव गाड्या चालवतो. आपला रस्ता त्याने डांबराचा केलाय. त्यावरुनच आम्हाला धावायला लागणार. आमची शर्यत सुरु असताना हा मनुष्यप्राणी भरधाव गाडी घेऊन येऊ शकतो. तेव्हा तो कासवोबाच्या अंगावरुन गाडी घालायला कमी करणार नाही. जंगलातले प्राणी म्हणजे या मनुष्यप्राण्याला मनोरंजनांची साधनं वाटतात. तुम्हालाही तो भीत नाही. तुम्ही पाठलाग केला तर त्याच्या गाडीचा नवेग इतका असतो की भुर्रदिशी निघून जायचा. जाताजाता मला पकडायचा नि मारुन मेजवाणी करायचा.”
“बापरे!!!”ससोबाचं सांगणं ऐकून महाराजांच्या अंगावर शहारे आले. सर्व दरबारीसुध्दा घाबरुन गेले.
“मनुष्यप्राण्याला जंगल म्हणजे जणू काही त्यांचं राज्य असून कधीही काहीही केलं तरी चालू शकतं असं वाटतं. जंगलातील प्राण्यांना तो कस्पटासमान समजतो. त्यामुळे आपणास जीव मुठीत धरुनच राहावं लागतं.” ससोबा अश्रू ढाळत म्हणाला.
“ससुटल्या, तू म्हणतोस ते खरंय. आपल्या पूर्वजांच्या काळातलं जंगलं नि आजच जंगल खूप वेगळं आहे. मनुष्यप्राण्याने आपल्यासोबत कधी शर्यत लावली नसूनही आपण हरलोय रे…”महाराज अश्रू ढाळत म्हणाले. कासवोबास शर्यतीचा धोका कळला. त्याने शर्यतीचा हट्ट सोडून दिला. ससोबाची क्षमा मागितली. गोर्जीने गोष्ट संपवली.
“कशी वाटली गोष्ट?”
“कुठे, घडलं हे सारं?”
“कुठे कशाला घडायला हवं? सिंह महाराजांना बोलता आलं तर ते हेच सांगतील की.” गोर्जी म्हणाली.
“पण ते बोलतील कधी?”
“त्यासाठी तू बाप्पांकडे प्रार्थना कर की,” गोर्जी हसून म्हणाली.
सुरेश वांदिले