शाळा मिळाली
समीर त्याच्या भावंडामध्ये तिसरा.शेंडेफळ.त्यामुळे सर्वांचा लाडका.लहानपणी त्याचं खूप कोडकौतुक झालं.त्याच्या दोन्ही मोठ्या भावांना वाचण्याचा छंद, तर समीरला बाहेर भटकण्याचा. त्याचे दोन्ही भाऊ पुस्तकं घेऊन बसले की हा पठ्ठा तिथून पळालाच म्हणून समजा.पुस्तक वाचण्यातला आनंद, दोन्ही भावांनी त्याला समजावून सांगितला. पण ते काही समीरला पटलं नाही.त्यामुळे पुढे जेव्हा तिघेही शाळेत जाऊ लागले तेव्हा समीरला,अभ्यासाची पुस्तकं वाचण्याचा जाम कंटाळा येऊ लागला.
त्याचे दोन्ही भाऊ मात्र मनलावून अभ्यास करत.त्यांना परिक्षेत चांगले गुणही मिळत.पण समीर मात्र अगदीच काठावर पास व्हायचा.एक-दोन वर्षे त्याला याबद्दल कुणी फारसं काही बोललं नाही. शेंडेफळ असण्याचा फायदा त्याला मिळाला. आईबाबांनी समजावलं. दोन्ही भावांनी समजावलं. पण समीरचं पुस्तकात लक्षच लागेना. त्यामुळे वर्गातही लक्ष लागेना. एके दिवशी त्याने शाळेत जाणच टाळलं.
आता जायचं कुठे? हा प्रश्न त्याला पडला. त्याची निरर्थक भ्रमंती सुरु झाली. या गल्लीतून त्या गल्लीत जात असताना, त्याला एके ठिकाणी एक कारागीर शाडूच्या मूर्ती तयार करत असल्याचं दिसलं. तो काही क्षण तिथे उभा राहिला. मूर्तीची निर्मिती बघताना तो भार हरपून गेला.
मूर्ती बनवणाऱ्याच्या हाताकडे बघत राहिला. बऱ्याच वेळानंतर कुणाचं तरी समीरकडे लक्ष गेलं. त्याने समीरकडे हसून बघितलं. त्याला बसायला सांगितलं. समीरही हो नाही करत बसला. पुन्हा मूर्ती घडवणाऱ्याकडे लक्षपूर्वक बघू लागला. शाडूच्या मातीतून हाताचा उपयोग करुन मूर्ती तयार करता येते, ही गोष्ट त्याच्यासाठी नवी होती. त्यात त्याला खूप रसही वाटू लागला. शाळा सुटण्याच्या सुमारास तो घरी परतला. रात्री झोपेतही त्याला ते मूर्ती घडवणारे हात दिसत राहिले. दुसऱ्या दिवशीसुध्दा समीर शाळेत न जाता, पुन्हा मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यात गेला. ज्या ठिकाणी मूर्तिकार मूर्ती घडवत होता, तिथे जाऊन बसला. भान हरवून बघू लागला. त्याची ही तन्मयता बघून मूर्तिकाराने, ‘तू मूर्ती तयार करायला शिकशील का?’ असं विचारलं. समीरने लगेच हो म्हंटलं.
मूर्तिकाराने समीरला सांगितलं की, ‘तू फक्त माझ्याकडे बघत राहा. नंतर दोन दिवसांनी तसंच करायला सुरुवात कर.’
समीरने दोन दिवस काळजीपूर्वक व मनलावून मूर्तिकाराकडे लक्षं दिलं. तिसऱ्या दिवशी स्वत: मूर्ती बनवायला सुरुवात केली. त्याच्या अपेक्षेपेक्षाही लवकर मूर्तिचा साचा बनवण्याची क्रिया समजल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने श्री गणेशाचं नाव घेऊन त्याचीच मूर्ती घडवायला घेतली. दिवसभरात गणेशाची लहानशी सुबक मूर्ती तयार झाली.
दुसऱ्या दिवशी मूर्तिकाराने त्या मूर्तिला रंग कसा द्यायचा, हे शिकवलं. त्याप्रमाणे समीरने तासा-दोन तासात मूर्तिला रंगवलं. त्यामुळे त्या गणेशाच्या मूर्तीत प्राण आल्यासारखे वाटले.
ही मूर्ती त्या मूर्तिकारने समीरला घरी घेऊन जाण्यास सांगितलं. समीरने मोठ्या आंनदात ही मूर्ती घरी आणली. तो घरी पोहचला तेव्हा त्याच्या घरी त्याचे वर्गशिक्षकही पोहचले होते. त्यांना बघून समीर चपापला. त्याच्या हातून मूर्ती खाली पडता पडता राहिली. सरांचे त्याच्याकडे लक्ष गेले. बाबांचंही लक्ष गेलं.
बाबांनी त्याला रागाने विचारलं…
“कुठे गेला होतास तू गधड्या? चार दिवसांपासून शाळेत गेला नाहीस म्हणून सर सांगत होते.”
समीरने मान खाली घातली. अंगठयाने जमीन खणू लागला. तो काहीच बोलत नाही हे बघून बाबा त्याच्या अंगावरच चालून गेले. सर मध्ये पडले म्हणून तो वाचला. समीर थरथर कापू लागला. त्याच्या हाताला कंप सुटला. मूर्ती पडते की काय, असं पुन्हा वाटू लागलं. तेव्हा प्रसंगावधान राखून सरांनी ती मूर्ती हातात घेतली.
“अरे, वा सुबक सुंदर मूर्ती दिसतेय. कुणी दिली तुला?” सरांनी विचारलं.
“मी बनवली. “समीर कसाबसा बोलला.
“कधी बनवली?”सरांनी विचारलं. यावर समीर गप्प बसला.
“अच्छा तर मागचे चार दिवस तू शाळेत गेला नाहीस तेव्हा हे उद्योग करत होतास म्हणायचा.”बाबा कडाडले. समीर गप्पच होता. बाबांकडे बघण्याची त्याची हिम्मत होत नव्हती.
“परांजपेसाहेब, न सागंता शाळेत अनुपस्थित राहणं बरोबरच नाहीच, पण या चार दिवसात समीरने मूर्तीकला शिकलेली दिसते. गणतीची सुंदर मूर्ती त्याने घडवलीय. शाळा बुडवली पण मूर्ती घडवली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
“म्हणजे याच्या शाळेला बुट्टी मारण्यास तुमचा पाठिंबा समजायचा का?”बाबा सरांकडे नाराजिने बघत म्हणाले.
“नाही हो, अजिबातच नाही. हे असले उद्योग फावल्या वेळात करायचे असतात. शाळेच्या वेळेत नाही. आधी शिक्षण मग छंद-बिंद! समीर, तू पहिल्यांदाच शाळेतून अनुपस्थितीत राहिलास म्हणून तुला यावेळेस माफी. मात्र यानंतर तू अनुपस्थित राहिलास तर शाळेतूनच काढून टाकू हं”.सर, समीरला म्हणाले.
“काय रे, गधड्या कळलं का तुला?” .बाबा समीरवर ओरडले.
समीर कसाबसा हो म्हणाला. बाबांचा निरोप घेता घेता, समीरने मूर्ती खूप सुरेख बनवली म्हणून सरांनी पुन्हा कौतुक केलं. या कौतुकाने बाबांचा राग कमी झाला. त्यांनी मूर्ती हातात घेऊन बारकाईने बघितली. त्यांनाही मूर्ती खूप आवडली. त्यांनी घरातील सर्वांना मूर्ती बघायला बाहेर बोलावलं. सर्वांनाच मूर्ती खूप आवडली. सर्वांनी समीरचं खूप कौतुक केलं. मात्र यासाठी शाळेला बुट्टी मारायची नाही, असं प्रत्येकानं बजावलं.
सर्वांनाच, समीर हो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी तो शाळेत गेला. त्याला बघून सरांना आंनद झाला. पण समीरचं लक्ष काही लागेना. दुपारच्या सुटीत त्याने शाळा सोडली आणि मूर्तिकाराचा कारखाना गाठला. मूर्तिकाराने काही म्हणायच्या आतच समीर मूर्ती करण्यासाठी सज्जही झाला. मूर्तिकारास आनंद झाला. त्याने त्याला विचारलं, “तुला कसं काय यावं वाटलं इकडे?”
“मी काल मातीत हात घातले. मूर्ती घडवू लागलो तेव्हाच मला कळलं की आपल्याला हे करण्यातच खरा आनंद मिळतोय. म्हणून मी आज पुन्हा इकडे आलो.”
“अरे, पण यासाठी तुला शाळेला बुट्टी मारावी लागली असेल.”
समीरने मानेनेच होकार दिला.” तुझे सर आणि घरी आईबाबा रागावले तर…”
यावर समीर काहीच बोलला नाही. तो मूर्ती करण्यात गढून गेला. त्याने आज सरस्वतीची मूर्ती बनवली. शाळेची वेळ संपल्याचं लक्षात आल्यावर तो जाण्यासाठी उठला. उद्या, रंग कसा द्यायचा हे सांगण्याची त्याने मूर्तिकारास विनंती केली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा समीर दुपारीच शाळेतून सटकला आणि मूर्तिकाराच्या कारखान्यात आला. मूर्तिकाराने त्याला सरस्वतीच्या मूर्तिला रंग कसा द्यायचा हे शिकवलं. पुन्हा एक सुबक मूर्ती तयार झाली. ही मूर्ती घरी घेऊन जायची की नाहीए या विचारात तो पडला. ही मूर्ती इथेच ठेवली तर चालेल का? असं त्याने मूर्तिकाराला विचारलं. त्याने त्याच्यासाठी एक कोपरा दिला. इथेच तुझ्या मूर्त्या ठेवत जा, असं सांगितलं.
समीर शिळ घालत मजेत घरी आला. अर्धा दिवस शाळा आणि अर्धा दिवस मूर्तिकाम असं समीरचं छान चाललं होतं. खरंतर त्याला शाळेत जायचय नसायचं, पण सर आणि बाबांच्या भीतिने तो शाळेत जायचा. दुपार कधी होते नि आपण शाळेतून कधी सटकतो, असं त्याला वाटायचं. त्याचं सगळं लक्ष मूर्तिकाराच्या कारखान्याकडे असायचं. अभ्यासात अजिबातच नसायचं.
दुपारच्या वेळी बाहेर पडून त्याने आठ-दहा दिवसात आणखी दोन-तीन मूर्ती बनवल्या. मूर्तिला रंग देऊन झाला की त्याला अपरिमित आनंद व्हायचा.
पण एके दिवशी या त्याच्या आनंदावर विरजण पडलं. कारण समीर शाळेतून दुपारी बुट्टी मारतो हे सरांच्या लक्षात आलच होतं. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. आज तो शाळेच्या बाहेर पडताच तेही त्याला कळू न देता मूर्तिकाराच्या कारखान्यात त्याच्या पाठोपाठ पोहचले. आज नव्या मूर्तिला घडवण्यासाठी घेणार तोच समीरसमोर सर दत्त म्हणून उभे ठाकले. त्यांना बघून समीरच्या हातून मातीचा गोळा खाली पडला.
तो कसाबसा उभा राहिला. सरांकडे न बघता त त त प प करु लागला.
सर काहीही बोलले नाहीत. ते आले तसेच निघून गेले. आता ते घरी जाणार नि बाबांना सांगणार. म्हणजे आज शाळेतून हकालपट्टी आणि बाबांच्या हातचा मार! अशी दुहेरी शिक्षा मिळणार, हे त्याच्या लक्षात आल्यानं तो रडू लागला. मूर्तिकाराने त्याला कसबसं शांत केल. त्याच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.
मूर्तिकारास परिस्थितीची नेमकी जाणीव झाली. तो उठला. त्याने समीरच्या कप्प्यातील त्याने तयार केलेल्या मूर्त्या घेतल्या आणि आपल्यासोबत समीरला घरी चलायला सांगितलं.
कशासाठी? असं सुध्दा समीर त्याला विचारु शकला नाही.
मूर्तिकारासोबत समीर घरी आलेला बघून बाबांना आश्चर्य वाटलं.ते दिसताच समीर थरथर कापू लागला.
मूर्तिकाराने वेळ न दवडता, समीरने तयार केलेल्या मूर्त्या दाखवल्या. एकाहून एक सुबक मूर्त्या बघून बाबांना मनातून आनंदून जात होते. पण या मूर्त्या याने कधी घडवल्या, हा प्रश्न त्यांना प्रत्येक मूर्ती बघताना पडू लागला.
म्हणजे हा पुन्हा शाळा बुडवायला लागला की काय? त्यांना शंका आली. ते याबद्दल विचारणारच तोच सरही समीरच्या घरी पोहचले. तेव्हा बाबांच्या लक्षात सारं काही आलं. बाबांनी त्यांना बसायला सांगितलं.
सर,काही बोलणार तोच बाबाच त्यांना म्हणाले,
“सर तुम्ही समीरची तक्रार करायला आलात हे कळलय मला.”
“असा बेशिस्त मुलगा आमच्या शाळेत राहू शकत नाही.हे सांगायला आलो होतो, परांजपे साहेब, त्याच्यामुळे इतरही मुलं वागू लागली तर शाळेचं नाव खराब व्हायचं. म्हणून आम्ही समीरचं नाव शाळेतून काढण्याचं ठरवलय.”
“बर, झालात तुम्हीच तसा निर्णय घेतला ते. बाबा बोलून गेले.”
“म्हणजे? सरांनी बाबांकडे आश्चर्याने बघितलं. मूर्तिकारही आश्चर्यचकीत झाला. बाबांनी समीरने घडवलेल्या मूर्त्या सरांना दाखवल्या.
“म्हणजे शाळेला बुट्टी मारुन समीर मूर्त्या घडवायला लागला म्हणायचा.”सर म्हणाले.
“होय सर, त्याला त्याची खरी शाळा मिळाल्याची म्हणून मला जाणीव झाली. त्यामुळे उद्या मीच शाळेत येऊन त्याचं नाव काढून मूर्तिकाराच्या कारखान्यात त्याला दिसलेल्या आणि आवडलेल्या शाळेत टाकायचं ठरवलय, या मूर्त्या बघून.”
“काय सांगता?” सर आणि मूर्तिकार दोघेही एकाच वेळी म्हणाले. बाबांचा निर्णय ऐकून त्यांची भीती वाटत असूनही समीर त्यांना बिलगला. त्याने आतापर्यंत दाबून धरलेल्या अश्रूच्या धारा मोकळ्या केल्या.
०००