(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

संकटाची चाहूल

ताडोबाच्या जंगलातल्या हरणाच्या राजाच्या मुलांना आज
फारच आनंद झाला होता. तो आनंद ते लपवू शकत नव्हते. त्याचं नाचणं- बागडणं
नेहमीपेक्षा वेगळचं होतं. न राहवून त्यांच्या बाबांनी त्यांना विचारलच शेवटी…

अरे, इतके काय वेड्यासारखं नाचताहात? कसला आनंद झालाय तुम्हाला?

म्हणजे,  बाबा
महाराज तुम्हाला कळलं नाही
? एका राजपुत्राने महाराजांना विचारलं.

काय कळलं नाही ….

अहो, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खरं तर त्यासाठी आपण
समस्त हरणांनी मोठी मेजवाणीच करायला हवी..दुसरा राजपुत्र म्हणाला.

असं काय घडलय आज, मेजवाणी झोडण्यासारखं…

अहो, बाबा महाराज, आज आपल्या वननगरीतील वाघोबांच्या
नातेवाईकांना कुणीतरी मारलं..आहे ना ही आनंदाची गोष्ट..

काSय..दचकून हरीण महाराज ताडकन उभेच राहिले.

अरेरे वाईट झालं..ते दु:खाने म्हणाले..

आँ..बाबा महाराज तुम्ही हे काय म्हणताय..

तुम्हाला कां बरं दु:ख झालं..

अहो, वाघोबांचे नातेवाईक आपले शत्रू होते.. सारखं
आपल्यावर हल्ला करायचे. आपल्या प्रजेची हत्या करायचे..

त्यांना चांगली अद्दल नको का घडायला..

अरे मुर्खांनो, कसल्या अद्दलीची गोष्ट करताय
तुम्ही..वाघोबा हे या वननगरीचे राजे. त्यांच्यामुळं आपलं संरक्षण होतं..जंगल
सुरक्षित राहतं, हे कसं कळत नाही तुम्हाला…बाबांनी राजपुत्रांना समजावून
सांगितलं.

अहो, बाबा महाराज तुम्ही काहीबाही सांगू नका..

नाही रे बाळांनो, मी तुम्हाला काहीबाही सांगू कशाला? खरं तेच सांगतोय..वननगरीत वाघोबा नसते
तर शिकाऱ्यांनी आपली उठसूठ शिकार केली असती. वाघोबाच्या दराऱ्यामुळे ते कधीही येऊ
शकत नाही इथं..

खर की काय?

होय बाळांनो, वाघोबा आणि त्यांचे नातेवाईक इथं असतात
म्हणून मनुष्यप्राणी जंगलाची हानी करताना चारदा विचार करतो. वाघोबा नसते तर त्याने
कधीच या वननगरीतली सर्व झाडं कापून काढली असती आणि स्वत: राहायला आला असता.
वाघोबांपेक्षा कैकपटीने  दुष्टबुध्दीचा आहे
हा मनुष्यप्राणी. वाघोबा किंवा त्यांच्या नातेवाईकांना जेव्हा भूक लागते ना
तेव्हाच ते आपली शिकार करतात. उठसूठ कधी शिकार करताना बघितलं का तुम्ही आतापर्यंत…
महाराजांनी राजपुत्रांना विचारलं.

नाही बाबा ..कधीच नाही..

अरे, वाघोबांच्या नातेवाईकाची हत्या होणं म्हणजे आपणच
नव्हे तर इतरही प्राण्यांवर येऊ शकणाऱ्या मोठ्या संकटाची नांदीच समजली पाहिजे..वाघ
वाचला तर जंगल वाचेल जंगल वाचले तर आपण सर्वजण वाचू..कळलं का तुम्हाला

मग आता काय करायचं बाबा..एका राजपुत्राने काळजीच्या
सुरात विचारलं.

आपण सर्वजण सावध झालं पाहिजे. ही सावधगिरी वाघोबांच्या
रक्षणासाठी वापरायची. आपण इतरही प्राण्यांना तसं सांगू. तेही त्यांच्या त्यांच्या
पध्दतीनं संकटाची चाहूल लागली की वाघोबा आणि त्यांच्या नातेवाईकांना सावध करत
राहतील..

हरीण महाराजांचं सांगणं
राजपुत्रांना पटलं. वाघोबांच्या नातेवाईकांच्या हत्येची बातमी समजून व्यक्त
केलेल्या आनंदाची त्यांना लाज वाटली. त्याचं दु:खही झालं. त्यांनी ताडोबा देवाची
क्षमा मागितली.

आपल्या बरोबरीच्या इतर
प्राण्याच्या मुलांना त्यांनी मग गोळा केलं. वाघोबांचं रक्षण करणं कसं गरजेचं आहे,
हे त्यांना समजावून सांगितलं. सर्वांना ते पटलं सुध्दा..आपले नागरिक आपली किती
काळजी करताहेत हे वाघोबां कळलं. त्यांचे डोळे आनंदाश्रूने भरुन आले. आपल्या या
प्रेमळ नागरिकांच्या वाटेला फक्त गरज असेल तेव्हाच जायचं अशी शपथ त्यांनी ताडोबा
देवाच्या मंदिरात जाऊन घेतली. त्याशिवाय आपल्या जंगलावर वाकडी नजर ठेवणाऱ्या
कुणावरही दयामाया दाखवायची नाही याचीही शपथही त्यांनी तोडाबा देवाच्या दसाक्षिने
घेतली.

सुरेश वांदिले