(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ससा आणि बेडूक

एकदा एक ससोबा, नदीजवळील मऊशार गवत खात असताना, नदिच्या पाण्यातून काही बेडकं बाहेर आलीत. इकडेतिकडे बघत असताना त्यांना ससा दिसला. त्याबरोबर त्यातील एक बेडूक सोडून इतरांनी, पाण्यात उड्या घेतल्या. क्षणार्धात ते दिसेनासे झाले.

हे सर्व ससा बघत होता. आपण दिसल्याबरोबर, फक्त एक सोडून सर्वांनी पाण्यात कां बरं उड्या मारल्या असतील? आपली भीती वाटली असेल का त्या सर्वांना? मग, या बेडकाला कां बरं वाटली नसेल भीती? असे प्रश्न सशाच्या मनात निर्माण झाले.

आपल्या मनातील शंका, त्या बेडकास विचारावी असं ससोबास वाटलं. पण विचारायचं कसं? हा प्रश्न त्याला पडला. आपण त्याच्याकडे गेलो तर, तोही पाण्यात उडी मारुन निघून जायचा. ससा मनात म्हणाला. तो विचार करत बेडकाकडे एकटक बघत राहिला.

बेडूकही सशाकडे एकटक बघू लागला. हा ससा आपल्यावर हल्ला करेल, म्हणून, आपले सवंगडी लगेच माघारी निघून गेले. पण इतका वेळ होऊनही हा ससा जागचा हलला नाही. आपल्यावर हल्ला करण्याचे कोणतीही हालचाल त्याच्याकडून घडत नाही. आम्ही समजत होतो तसा हा, भीतीदायक दिसत नाही. खरच असं असेल का? असे विचार  बेडकाच्या मनात येऊ लागले. असा बराच वेळ गेला. दोघांनीही काहीच हालचाल केली नाही.

एकाएकी ससा जोराने हसला..

हे बघून बेडकास आश्चर्य वाटलं. काहीतरी प्रतिसाद द्यायला हवा म्हणून, तोही हसला. दोघेही हसतहसत एकमेकांच्या जवळ आले आणि बराच वेळ हसत राहिले.

थोड्योवळाने बेडकाने सशाला विचारलं, “काय रे ससोबा, कशासाठी हसतोस तू इतका?”

“बेडकोबा, तू कशासाठी हसतोस बॉ?”

“अरे, तू हसलास, म्हणून, मी हसलो.”बेडूक म्हणाला.

“हो का, अरे, तू काहीच करत नव्हतास ना, म्हणून मी हसलो.” ससा म्हणाला.

“गंमतच म्हणायची. बघ हसण्यामुळे, आपण एकमेकांच्या जवळ आलो. बोलू लागलो. माझ्या मनात असलेली तुझ्याबद्दलची भीती गेली.” बेडूक म्हणाला.

“तुझे मित्र, कां बरं, मी दिसताच नदीत उडी मारुन निघून गेले?” सशाने विचारलं.

“तू,खाशील अशी ,भीती वाटते बेडकांना.”

“मग, तुला नाही का,भीती वाटली?” सशाने बेडकास विचारलं.

“वाटली होती. पण, मी विचार केला, कुणीतरी सांगितलं म्हणून, आपणास ससोबाची भीती वाटते. ते खरं की खोटं याची, खातरजमा नको का करायला? म्हणून मी मागे राहिलो.” म्हणाला.

“समजा, मी तुझ्यावर हल्ला केला असता तर?”

“तर, माझ्या मित्रांची भीती, खरी ठरली असती. म्हणूनच मी, मागचे दोन पाय पाण्यातच टाकून होतो. तू हल्ला केला असतास तर, लगेच वळून पाण्यात शिरलो असतो. पण बघ, तसं काही झालं नाही. तू मला काहीही केलं नाहीस. सशाची भीती, आम्ही बेडकं उगीचच बाळगत होतो, याची खात्री पटली. तुझ्या रुपाने मला एक नवा मित्र मिळाला. थोडी सावधगिरी बाळगली, स्वत: खात्री केली की, असा फायदा होतो.” बेडूक म्हणाला.

सशाला आनंद झाला. त्याने बेडकास पाठिवर बसवलं आणि सगळया वनाची भ्रंमती करुन आणली. बेडकाने सशाला, नदीचे पाणी ज्या ठिकाणी सर्वात गोड असते, ते ठिकाण दाखवलं. ते पिऊन ससा तृप्त झाला.

सुरेश वांदिले