(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यात मच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचली नाही.

या इवलाशा किटकानं महाराजांवर कोणती जादू केली कुणास ठाऊक?” वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले.

मला तर यात काहीच जादूबिदू वाटत नाही. आपल्या महाराजांना वेडेपणाचा झटका आला असला पाहिजे. कोल्होबांनी उत्तर दिलं.

आपणास खिजवण्यासाठीसुध्दा त्यांनी ही कृती केली असली पाहिजे. गेंडोबा म्हणाला.

तसं असेल तर आपण महाराजांना जाब विचारायला हवा, लांडगोबांचं म्हणण पडलं.

मी तर म्हणतो, जाब कसला विचारता, हाकलूनच लावाना, असले वेडे चाळे करणाऱ्या सिंहाला, आपल्या राज्याच्या बाहेर.अस्वलाने मत मांडलं.

महाराजांच्या वागण्याबद्दल असंच वेडंवाकडं काहीबाही प्राणी बोलत राहिले. या प्राण्यांच्या आसपास असणाऱ्या पण त्यांच्या नजरेत न येणाऱ्या काही मच्छरांनी ते स्पष्टपणे ऐकलं नि त्यांनी महाराजांना सारं काही सांगितलं.

सिंह महाराजांनी लगेच दरबार भरवला आणि आपल्याबद्दल कोण काय काय बोलत होतं, हे त्यांनी भर दरबारात सांगितलं.

अरे बापरे, यांना कळलं तरी कसं हे? वाघोबांनी गेंडोबाकडे आश्चर्यानं बघत इशारा केला.

माहीत नाही बॉ!” गेंडोबाने इशारा केला.

असं इशाऱ्याइशाऱ्यात काय बोलता? मला सारं काही  कळतं. यापुढे असं जर काही घडलं तर याद राखा.असं बोलून महाराजांनी दरबार बरखास्त केला.

महाराजांना खरोखरच जादू येत असली पाहिजे, यावर प्राण्यांनी शिक्कामोर्तब केलं. पण कुणाच्याही मनातून, मच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा देऊन महाराजांनी वेडेपणाच केलाय ही गोष्ट मात्र गेली नाही.

०००

महाराजांना वेडच लागल्याचं प्रत्येक प्राण्यास वाटू लागलं. अशा वेड्या राजाला हाकलून लावण्याची चांगली संधी असल्याचं वाघोबांच्या मनात आलं. त्यांनी गुपचूपपणे शेजारच्या राज्याचे सम्राट सिंहेश्वर यांच्याशी संधान बांधलं. आपल्या वेड्या राज्याला हाकलून लावण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. ही विनंती सम्राट सिंहेश्वरांनी मान्य केली. त्याबद्दल वननगरीतला काही भाग देण्याचं वाघोबांनी कबूल केलं.

या वाटाघाटी वाघोबांनी एकट्यानेच केल्याने इकडची खबरबात तिकडे पोहचणार नाही, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे ते आपलं काम फत्ते झालं, या समजुतीच्या आनंदातच वननगरीकडे परत निघाले. मात्र त्यांना हे ठाऊक नव्हते की सिंह महाराजांच्या मच्छर मित्रांनी ही खबरबात कधीचीच त्यांच्यापर्यंत पोहचवली होती. त्यामुळे महाराज सैन्य घेऊन सीमेपर्यंत पोहचलेसुध्दा. वाघोबा दिसताच त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. शेजारच्या राज्यावर हल्ला  केला. असं काही घडेल याची जराही कल्पना नसलेल्या दुसऱ्या राज्यातील सम्राट सिंहेश्वरांना जराशीही हालचाल करता आली नाही. ते आणि त्यांचे सैन्य आपसुकच महाराजांच्या हाती आले.

दुसऱ्या राज्यातील सिंहेश्वराला बंदिस्त करुन महाराजांनी आपल्या राज्यात आणलं. वाघोबा आधीच बंदिस्त झाले होते. महाराजांनी विशेष दरबार बोलावून वाघोबा कसे फितूर झाले याची संपूर्ण माहिती दिली. या सिंहेश्वरच्या मदतीने आम्हास हाकलून लावून आपल्या वननगरीचा हिस्सा त्याला द्यायला वाघोबा कसा तयार झाला हेही त्यांनी दरबाऱ्यांना सांगितलं.

सिंहमहाराजांना हे कळलं तरी कसं? आपण जेव्हा बोलत होतं, तेव्हा तिथे कुणीही नव्हतं.वाघोबा आणि त्या सिंहेश्वरांच्या मनात आलं. या महाराजांना नक्कीच काळी जादू अवगत असावी अशी दोघांचीही खात्री झाली.

मात्र खरं काय, ते महाराजांनाच ठाऊक होतं.

त्यांनी आपल्या मच्छर मित्रांचं आभार माणलं. आपल्या महालाच्या बाजूलाच त्यांच्यासाठी राजवाडा बांधण्याची घोषणा केली. तेव्हा आपला महाराज वेडाच नव्हे तर ठार ठार वेडा झाल्याची खात्री, सर्वच प्राण्यांना झाली. ठार वेडा असला तरी आपला महाराज मोठा जादुगार असल्यानं त्याला सारं काही कळतं याची खात्री पटल्याने, सर्वांनी गप्प राहण्यात शहाणपणा असल्याचं ओळखलं.