(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सुरक्षित रहिये!

परवा, टिल्लू रणखांबेचे बाबा टीव्ही बघत असताना, मोबाइलमधील डाटामध्ये फेरफार करणाऱ्या, मोबाइल मधील माहिती पळवणाऱ्या किंवा अशाच प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या गुन्हेगारांची  बातमी त्याच्या कानावर पडली. त्यावेळी तो तिथे इंग्रजी शब्दसंग्रह कसा वाढवावा, याची माहिती मोबाइलवरील एका ॲपवर वाचत होता.

मोबाइलचा डाटा हॅक करणारी बातमी कानावर पडताच, त्याचं लक्ष टीव्हीच्या पडद्याकडे गेलं. त्याने ही बातमी काळजीपूर्वक ऐकली. मोबाइलमध्ये साठवून ठेवलेली माहिती, महत्वाचे डाक्युमेंट, पासवर्ड हे, कितीही सुरक्षित ठेवले तरी, सायबर गुन्हेगार ही माहिती अलगद काढून घेऊ शकतात. त्यामुळे, आपला मोबाइल अनोळखी व्यक्तीस देऊ नये. ओटीपी देऊ नये. पासवर्ड सांगू नये. पासवर्ड कठीण ठेवावा. तो सतत बदलत राहावा. अशा सूचनासुध्दा, बातमी देणारी ताई सांगत होती. हे ऐकताऐकता टिल्लूला अवचित हसू आलं. त्यामुळे बाबांनी त्याच्याकडे चमकून बघितलं.

“काय रे, ही माहिती म्हणजे काही विनोद वाटला का?” बाबा किंचित नाराजीच्या स्वरात म्हणाले.

“नाही हो बाबा, मला अमिताभ बच्चन यांची आठवण झाली.”

“त्यांनी यावर काही विनोद केलाय का?”

“अहो बाबा, काहितरीच काय, उलट तेच तर सारखे, जानकार बनिये, सुरक्षित रहिये, असं सांगत नाहीत का?”

“अरे हो, अगदी बरोबर. पण तुला ते नेमकं आताच कां आठवलं बरं?”

“योग्य वेळी योग्य गोष्ट आठवणं हाच सूज्ञपणा नाही का बाबा. तेच तर बहुतेक लोक करत नसावेत, म्हणून अशा बातम्या कानी पडतात. अमिताभ बच्चन यांना, पुन्हापुन्हा तेच सांगावं लागतं.” टिल्लू म्हणाला. बाबांना स्मार्ट टिल्लूचं फार कौतुक वाटलं. त्याला जवळ घेऊन त्यांनी त्याची पाठ थोपटली. टिल्लू सुखावला.

००००

गेल्या आठवड्यात टिल्लू, त्याचे आईबाबा आणि शेजारचे देशपांडे काकाकाकू दोन दिवसांच्या रायगड किल्ला सहलीवर गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीला बघण्यासाठी बऱ्याच पर्यटकांनी गर्दी केली होती. वेगवेगळी ठिकाणं बघत टिल्लू आणि मंडळी टकमक टोकावर पोहचली. या ठिकाणी त्यावेळी या पाचांशिवाय कुणी नव्हतं. सगळयांनी हे टकमक टोक डोळा भरुन बघितलं. देशपांडेकाका म्हणाले,

“आपल्या सगळयांचा इथे फोटो काढता आला असता तर, बरं झालं असतं.”

“अहो काका, मी काढतोना.” टिल्लूने पुढाकार घेतला.

“पण, तू त्यात नसशीलना.”

“मग कुणीतरी एकाने फोटो काढा.”

“मग तो फोटोही अपूर्णच राहणार.”

“मग सेल्फी काढूया.”

“सेल्फीत तेव्हढी मजा येत नाही.”

ही चर्चा त्याचवेळी तिथे आलेल्या एका व्यक्तीने ऐकली असावी. तो लगबगीने समोर आला नि आपण फोटो काढून देऊ का, असं त्याने स्वत:हून विचारलं. देशपांडेकाका लगेच हो म्हणाले नि त्यांनी आनंदाने आपला मोबाइल त्या व्यक्तीच्या हाती दिला. पण त्याचवेळी डोळ्याची पापणी हलण्याच्या आधी, टिल्लू त्या व्यक्तीकडे झेपावला नि त्याने तो मोबाइल हिसकावला. या प्रकाराने ती व्यक्ती हडबडली. देशपांडे काकाकाकू आणि टिल्लूचे आईबाबा गडबडले. टिल्लू असा मूर्खासारखा कां वागला असावा, असा प्रश्न देशपांडेकाकांना पडला. तसं त्यांनी टिल्लूच्या बाबांना बोलून दाखवलं. बाबांनी त्या व्यक्तीची क्षमा मागितली. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

टकमक टोकानंतर सगळी मंडळी महाराजांच्या समाधीस्थळी पोहचली. तिथेही टिल्लूने, देशपांडे काकांना त्यांचा मोबाइल फोटो काढण्यासाठी कुणाला देऊ दिला नाही. टिल्लूच्या या अशा वागण्याने देशपांडेकाका चांगलेच वैतागले.

०००

टिल्लूचं, असं हे विचित्र वागणं सोडलं तर, रायगड सहल संस्मरणीय झाली. परतीच्या प्रवासात बाबांच्या डोक्यात टिल्लूच्या विचित्र वागण्याचेच विचार येत राहिले. घरी गेल्यावर त्याला चांगलं खडसवायचं हे त्यांनी मनोमन ठरवलं.

रायगडाच्या सहलीवरुन परतल्यावर, घरात पाऊल टाकताच, टिल्लूच्या बाबांनी त्याला चांगलच खडसावलं.

“पण बाबा, मी रायगडावर असं का वागलो असेन, याचा काही विचार केलाय का तुम्ही?”

“तुझ्या वागण्याला मूर्खपणा म्हणतात. देशपांडे काका-काकूंना काय वाटलं असेल?” आई म्हणाली.

“त्यांना काय वाटलं असेल, ते असू दे. पण, मी काय सांगतो ते तर ऐकाना.”

“तू काय डोंबल्याचं सांगणार?”

“अहो बाबा, परवा आपण मोबाइल सुरक्षिततेविषयी ऐकलं ना.”

“त्याचा इथे काय संबंध?”

“अहो बाबा, आपण आपला मोबाइल अनोळखी व्यक्तीकडे देणं बरोबर नाही.”

“अरे, तो काय पळून जाणार होता का? अशा पर्यटनस्थळी एकमेकांना मदत करणारे सह्रदयी लोक असतातच. त्या व्यक्तीने स्वत:हून फोटो काढून देण्याविषयी आपल्याला विचारलं.”

“अगं आई, त्याच्या ह्रदयात काय, हे बघण्याऐवजी, त्याच्या हातात काय, हे नको का बघायला?”  

“म्हणजे रे काय?” बाबांनी आश्चर्याने विचारलं. टिल्लूच्या डोक्यात काहीतरी वेगळाच किडा तुरुतुरु धावत असल्याचं त्यांच्या पटकन लक्षात आलं. त्यांनी लगेच देशपांडेंना बोलावून घेतलं. टिल्लूच्या डोक्यात, रायगडावरील व्यक्तीच्या हातून मोबाइल हिसकावून घेण्याबाबात काहीतरी वेगळं चालल्याचं त्यांनी देशपांडेंना सांगितलं. सगळेजण सरसावून बसले.

टिल्लू सांगू लागला.

“अहो बाबा, ती व्यक्ती मोबाइल हॅकर कशावरुन नसेल?”

“काहीतरी काय बोलतोस?”

“असं हातात मोबाइल घेतल्याने कसा काय मोबाइल हॅक होऊ शकतो? मला तर ती व्यक्ती सभ्यच वाटली.”

“अहो काका, तंत्रज्ञान किती प्रगत झालंय, याची चर्चा आपणच दररोज करतोना.”

“मग बरोबरय ते. त्यात काय चुकीचं? आतासुध्दा आपण बोलत असताना, एखादं नवं तंत्रज्ञान आलेलं असेल, इतकी त्याची गती.”

“मग, अशाच तंत्रज्ञानाच्या मदतीने, एखादी हुषार व्यक्ती त्याच्या हातात किंवा एखाद्या बोटात, असं एखादं यंत्र किंवा चिप बसवू शकतो. त्या चिपला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची जोड देऊन मोबाइल मधील डाटा पळवून नेण्यासाठी प्रशिक्षित करु शकतोना. हातात मोबाइल आला की लगेच या चिपला हातातीलच पेशींच्या मदतीने सूचना देऊन माहिती चटदिशी काढून घेऊ शकतोना किंवा मग ती प्रशिक्षित स्मार्ट चिप, मोबाइलचा स्पर्श होताच, मोबाइलमधील डाटा पळवापळवीचा कारभार करु शकतेना.” टिल्लूच्या मनात जे आलं होतं, ते त्याने संगतवार  सांगितलं. देशपांडेकाका आणि बाबा अवाक झाले.

देशपांडेकाकांना,  टिल्लूचं हे सांगणं आगावूपणा वाटलं. ते हसून म्हणाले,

“कल्पनाविलास छान आहे टिल्लूराव. त्यामुळे तुम्ही नका देऊ तुमचा मोबाइल कुणाच्या हाती. आम्ही आमचं बघू काय करायचं ते?” टिल्लूच्या डोक्यावर टपली मारत ते निघून गेले.

टिल्लूने बाबांकडे बघितलं. बाबा आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत होते. अनोळखी व्यक्तीला फोटो काढण्यासाठी चटकन मोबाइल देण्यातला धोका त्यांच्या लक्षात आला. केवळ ओटिपी देऊन किंवा पासवर्ड शोधूनच नव्हे तर, हाताच्या स्पर्शातूनही मोबाइलचा डाटा पळवला जाऊ शकण्याची, जी शक्यता टिल्लूला वाटते, ती सध्याच्या एआयच्या काळात अशक्य नसल्याचही त्यांच्या लक्षात आलं.

टिल्लूच्या स्मार्ट विचाराचं त्यांना भारीच कौतुक वाटून त्याला त्यांनी मिठी मारली.

सुरेश वांदिले