(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्वागत करा पहाटे..पहाटे..

बघता बघता जुनं वर्ष संपलं. तेजोमयी बाप्पांना म्हणाली.

      बाळ असच असतं. काळ वेगानं धावत असतो. आपल्याला वाटतं खूप वेळ आहे, आजचं काम उद्या केलं तरी चालू शकतं. खरय ना. बाप्पा म्हणाले.

      हो ना.

      मग त्यामुळे आपण टाइमपास करायला जातो. आपल्याला पटतच नाही की हा टाइमपास म्हणजे वेळ वाया घालवणं .खरय ना.

      हो हो  बाप्पा.

      वेळ भूर्रकन निघून जाते नि आपण आहो तिथेच राहतो. ठरवलेल्या गोष्टी होत नाही. प्रगतीला खिळ बसते.

      खरय ना.

      खरय बाप्पा. पण हेच तुम्ही मला गेल्या वर्षी पण सांगितलं होतं.

      होतं ना! नवीन वर्ष आलं की त्याची पुन्हा उजळणी केली की बरं असतं.

      पण हे ऐकून कान विटले हो बाप्पा.

      उत्तम. मी माझं काम केलं.आता तुला त्यातून काय बोध घ्यायचा हे तू ठरवायच. मात्र एकच लक्षात राहू दे. काळ कुणासाठी थांबत नाही.जो वेळेचा सदूपयोग करतो तो यशस्वी होतो.जो करत नाही.त्याच्यावर काळ सुड उगवतो.बाप्पा हसत हसत म्हणाले.तेजोमयीने होकारार्थी मान हलवली..

दोन

     बाप्पांचे उपदेशामृत पिऊन तेजोमयीने आपल्या मैत्रीणींकडे धाव घेतली. 31 डिसेंबरला अमूक करणार, तमूक करणार, ढमूक करणार याचं प्लॅनिंग तेजोमयीनं मैत्रिणींसह सुरु केलं.

   मस्त पार्टी करु या का? दे धम्माल! रात्र जागून काढू. कल्याणी म्हणाली.

   टीव्हीवरचे कार्यक्रम पाहू रात्रभर. झक्कास असतात. वैदेही म्हणाली.

   मरीन ड्राईव्हवर  जाऊया. पाणीपुरी, वडापाव, पिज्जा खाऊया, पेप्सी पिऊया. तिथे खूप लोक आले असतात. ते नाचतात. आरडाओरडा करतात. फटाके फोडतात. आपणही तसच करु या,मिहीरनेही तोंड उघडलं.

नेमकं काय करायचं? यावर कुणाचही एकमत होईना. तेव्हा टोळी बाप्पांसमोर उभी राहिली. त्यांनी आपली अडचन त्यांच्या समोर ठेवली.

बाप्पांनी विचारलA,

कशासाठी हवा तुम्हाला माझा सल्ला,टाइमपास करण्यासाठी की वेळ उत्तम जावा म्हणून...

बाप्पा, सल्ला हवाय, उपदेश नको..तेजोमयी नाक फुगवत म्हणाली.

बरं तर…माझ्या सल्ला तुम्हाला ऐकायला लागेल.याच आश्वासन द्या आधी…

हो नाही करत सर्वांनी बाप्पांना प्रॉमिस केले.बाप्पांच्या चेहऱ्यावर छान हसू आलं,ते म्हणाले…

   बाळांनो, नवीन वर्षाचं स्वागतं रात्री बारा वाजता करण्याएैवजी पहाटे पहाटे करण्याचं प्लॅनिंग कराना!

     व्हाs! काs?  सगळी टोळी, अंगावर पाल पडल्यासारखी जोरानं ओरडली.

      एव्हढं ओरडून आश्चर्य व्यक्त कण्यासारखं काय बरं म्हणालो? बाप्पांनी विचारलं.

      हे बघा बाप्पा, नवीन वर्षाचं स्वागत रात्री 12 लाच करायचं असतं. पहाटे कुणीही करत नाही.

      नसेना का! मात्र तुम्ही कराना. रात्र जागून काढायची नि नव्या वर्षाचा सूर्य जेव्हा तुमच्या स्वागताला येतो, तेव्हा अंथरुणात पडून राहायचं. हे कितपत योग्य? नवीन वर्षाचा प्रारंभच जर असा उशिरा उठण्यानं झाला,आळसानं झाला तर आख्खं वर्षच आळसात नाही का जाणार तुमचं? विचार करा नि कृती करा उद्या...बाप्पा म्हणाले.

बाप्पांचं म्हणणं योग्यच असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं.पार्टीचा बेत त्यांनी रद्द केला.यंदा ३१ डिसेंबरला लवकरच झोपून,१ जानेवारीचा २०२३ चा सूर्योदय बघण्यासाठी पहाटेच उठण्याचा निर्धार सर्वांनी केला.

सुरेश वांदिले

00