(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

हरबऱ्याच्या झाडावर गाढवोबा

एकदा वननगरीत सिंह महाराजांनी, स्पर्धा जाहीर केली. ही स्पर्धा होती हरभऱ्याच्या झाडावर चढून दाखवण्याची. जो कुणी ही स्पर्धा जिंकेल, त्याला वननगरीचा प्रधान करण्यात येईल,असं महाराजांनी घोषित केलं.

हरबऱ्याच्या नाजूक झाडावर चढणार तरी कसं? वननगरीतल्या एकाही प्राण्यास ते शक्य नव्हतं. सिंह महाराज आपल्याला मूर्खात काढताहेत अशी सर्वांची समजूत झाली. त्यामुळे या स्पर्धेत कुणीही भाग घ्यायला समोर येईना.

अहो, हे शक्य नाही. उगाच आपल्या प्रजाजनांना खोटी आशा दाखवणं बरोबर नाही. महाराणी एके दिवशी महाराजांना म्हणाल्या.

कां शक्य नाही महाराणी?जगात काहीही अशक्य नाही. इच्छा तिथे मार्ग आणि मार्ग मिळाला की मग हरबराच काय, गव्हाच्या लोंबीवर सुध्दा चढता येऊ शकतं ? महाराज गरजले.

मग महाराज, तुम्हीच कां चढून बघत नाही?महाराणी हसत म्हणाल्या.

राणीसाहेब ही स्पर्धा राजासाठी नाही, प्रजाजनांसाठी आहे. असं बोलून महाराजांनी वेळ मारुन नेली.

०००

आपण घोषित केलेल्या स्पर्धेत कुणीच भाग घेत नाही, हे बघून महाराजांनी मग हरबऱ्याच्या झाडावर चढून दाखवण्याचा पराक्रम करणाऱ्यास अर्धे राज्यच देण्यात येईल,असं घोषित केलं.

सिंह महाराजांचा हा मूर्खपणा असून ते उगाच बनवाबनवी करत असल्याची प्रत्येकाची समजूत झाली. तथापि, हरबऱ्याच्या झाडावर चढणं अजिबातच शक्य नसल्याचं हे पक्क ठाऊक असूनही काही प्राण्यांना अर्धे राज्य मिळू शकतं या बाबीने तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी हरबऱ्याच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. सगळेच तोंडघशी पडले. त्यांचं हसू झालं. महाराजांनी त्यांना मूर्खात काढलं.

आता या स्पर्धेत कुणीही भाग घेण्याची हिमंत करेना. मात्र एके दिवशी एक गाढवोबा, महाराजांना भेटला आणि त्याने या स्पर्धेत आपण भाग घेण्यास आपण तयार असल्याचं त्यांना सांगितलं. मात्र त्याची एक अट होती.तो म्हणाला, आपण हा पराक्रम दरबारात सर्वांच्या समक्ष करु. महाराजांनी ही अट मान्य केली.

महाराजांनी ताबडतोब खास दरबार भरवला. दरबारात एक हरबऱ्याचं झाड आणून ठेवण्यात आलं. सर्व दरबारी हजर झाले. आपला मूर्खपणा सिध्द करण्यासाठी स्वत:हून तयार झालेल्या गाढवाची फटफजिती बघण्यासाठी  इतर प्राण्यांनी दरबारात गर्दी  केली.

 महाराज दरबारात येताच, त्यांनी गाढवास हरबऱ्याच्या झाडावर चढून दाखवण्यास सांगितलं.

महाराज, झाडावर चढण्याचं आव्हान स्वीकारुन मी जन्मजात कसा मूर्ख आहे, हेच सिध्द करतोय असं सर्व दरबाऱ्यांना वाटतय. तसच तुम्हाला पण वाटत का हो? गाढवाने महाराजांना प्रश्न केला.

गाढवोबा, हा काय प्रश्न झाला?त्याचा आणि हरबऱ्याच्या झाडावर चढण्याचा काय बरं संबंध? महाराजांनी विचारलं.

महाराज संबंध आहे. कोणत्याही मूर्खास हरबऱ्याच्या झाडावर चढणं शक्य नाही. जो हुषार आहे, समर्थ आहे, बुध्दीमान आहे, तोच या झाडावर चढू शकतो की नाही? गाढवोबाने विचारलं.

अगदी बरोबर…महाराज बोलून गेले.

याचा अर्थ महाराज, मी मूर्ख नसून हुषार आहे, समर्थ आहे, बुध्दीमान आहे,असाच होतो की नाही?गाढवोबा म्हणाले.

अगदी बरोबर…महाराज पुन्हा बोलून गेले.

म्हणजे महाराज, या सर्व दरबाऱ्यांपेक्षा मीच अधिक समर्थ,बुध्दीवान आणि हुषार आहे की नाही?

अगदी बरोबर..महाराज बोलून गेले.

महाराज महाराज, हे आपण काय बोलताहात, हा गाढवच फक्त बुध्दीमान आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ. हा तर अन्याय झाला. कोल्होबा ताडदिशी उठून आपली नाराजी व्यक्त करत म्हणाला.इतर प्राण्यांनीही नाराजी व्यक्त केली.

कोल्होबा, अहो, हरबऱ्याच्या झाडावर चढण्याच्या स्पर्धेत मी भाग घेतलाय तुम्ही नाही. गाढवोबा म्हणाला.

मग आधी त्यावर चढून दाखवन नि नंतर नको ते प्रश्न विचार.कोल्होबा चिडून म्हणाला.

हा हा हा..गाढवोबा हसत म्हणाले,कोल्होबा, अहो, मी हरबऱ्याच्या झाडावर चढलो सुध्दा…ते तुम्हाला दिसलं नाही, त्याला मी काय करु?

गाढवोबा,काहीतरी काय बोलतोस?कधी आणि कोणत्या हरबऱ्याच्या झाडावर चढलास? आम्हाला तर काही दिसलं नाही?बनवाबनवी करतोय होय? सिंह महाराज दरडावून म्हणाले.

महाराज, माझी काय टाप आपणास फसवण्याची. अहो, जे गुण माझ्याकडे नाहीत, ते मी माझ्याकडे आहे, असं सांगताना, तुम्ही हो हो बरोबर म्हणत होतात ना.

म्हणजे? महाराजांनी रागावून विचारलं.

महाराज, म्हणजे मी असा स्वत:पाशी नसलेल्या गुणांचा डिंडिम वाजवून हरबऱ्याच्या झाडावर स्वत:ला चढवलं की नाही. गाढवोबा हसत हसत म्हणाला.

गाढवोबाने आपल्याला बरोबर शब्दात पकडलं, हे महाराजांच्या लक्षात आलं. चरफडण्यावाचून ते आता काही करु शकत नव्हते. कबूल केल्याप्रमाणे त्यांना आपलं अर्धे राज्य गाढवोबास द्यावं लागलं.

ज्याला मूर्ख समजत होतो तोच शहाणा निघाला. शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरली निघाला, असं दरबारी एकमेकाला सांगू लागले.बऱ्याच दरबाऱ्यांना गाढवोबाचा जयजयकारही केला.

सुरेश वांदिले