(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

हिप हिपअफगानिस्तान (भाग एक)

भाग एक

 कॉलनीतल्या टोळीनं ठरवलं की अभ्यास अभ्यास फार झाला. आता काही तर धम्माल करायला पाहिजे. टोळीमध्ये टिल्लू, पिल्लू, तेजू, विनू, पिनू अशी सोसायटीतील हुषार मुलं होती. परीक्षेत कोण पुढे राहणार यात त्यांच्यात चुरस असायची. त्यांचे आईबाबाही त्यांना अभ्यास एके अभ्यास याशिवाय दुसरीतिसरीकडे बघू देत नसत. त्यामुळे शाळा घर शिकवणी वर्ग या पलिकडे त्यांचे विश्वच उरले नव्हते.

          ही टोळी एकाच वर्गात म्हणजे आठवीत एकाच शाळेत होती. अभ्यास अभ्यास करुन कंटाळलेल्या या टोळीने दिवाळीची सुटी लागण्या आधी एके दिवशी शाळा सुटल्यावर अर्धा तास शाळेतच घालवला. टिल्लूने सर्वांना तशी विनंती केली होती. त्याप्रमाणे सर्व टोळी थांबली. शाळेतल्या मैदानात एका झाडाखाली सर्व जण गोळा झाले.

 काय रे  टिल्लू कशासाठी सर्वांना थांबायला सांगितलस, पिल्लूने विचारलं.

          होना, तेजू म्हणाली.

 उशीर झाला तर आईबाबांचा ओरडा खायला लागायचा, विनू म्हणाला.

          अरे, सांगतो की एवढे हातघाईवर येऊ नका..टिल्लू म्हणाला.

 हे, बघा दोस्तानो उद्यापासून आपणास दिवाळीच्या सुट्या लागत आहेत.

 यात नवीन काय, सगळ्यांच ठाऊक आहे की ते, पिनू स्मार्टपणे म्हणाला.

          अरे, पण त्याला काय म्हणायचे ते तर ऐकू या. पिल्लू पिनूकडे बघत म्हणाला.

          आता अभ्यास अभ्यास खूप झाला असं तुम्हास वाटत नाही का.

          वाटून काय उपयोग. आई बाबा डोक्यावर बसलेत ना.

          सुट्टित सुध्दा ते आपल्याला अभ्यासाला जुंपतील. तेजू म्हणाली.

 आपण या सुटित अभ्यासच केला नाही तरटिल्लू म्हणाला.

 हे सांगण्यासाठी आम्हास आज बोलावले होय तू, विनू म्हणाला.

          अगदी बरोबर, आपण प्रत्येकाने घरी सांगून टाकू या की यंदा सुटित नो अभ्यास, फक्त धम्माल.      असं बोलताच क्षणी आपल्याला घराबाहेरच काढतील आपले आई बाबा. पिल्लू म्हणाला.

          असं कसं काढतील. आपल्याला काही मतंबित आहेत की नाही. आपले सुध्दा काही हक्क आहेत की नाही. विनू काहीतरी तरी बोलायचं म्हणून बोलून गेला.

          विनूच्या बोलण्यात नक्कीच पाईंट आहे. आपल्या डोक्याला होणारा ताप किती दिवस आपण सहन करायचा नाही कारे, विनूकडे बघत तेजू म्हणाली.

          पण मग आपण काय करायचं ?

          आपण पळून जाऊ या.. पिल्लू म्हणाला.

 पळून जाण्यात किती थ्रिल आहे नाही का.

          भेकड पळत असतात. आपल्यासारखे शूरवीर कुठे पळतात . ही कल्पना एकदम बोगस आहे. पळून कुठे जाणार आपण.

 अफगानिस्तानात जाऊ या कारे आपण ? तेजू तोंड वेडावत म्हणाली, सर्वजण खोखो हसले.

 हसू नका टिल्लू म्हणाला. अफगानिस्तानात जाण्याची आयडिया एकदम झ्क्कास आहे. टिल्लू म्हणाला. त्याने मग पिल्लूच्या कानात काहीतरी सांगितलं. पिल्लूनं तेच तेजूच्या कानात सांगितलं. तेजूनं विनूच्या आणि विनूनं पिनूच्या कानात टाकलं.

          सर्वांचे चेहेर उजळले.

          हिप हिप ,टिल्लू जोरात म्हणाला.

          अफगानिस्तान ! पिल्लू, तेजू, विनू, पिनू एकासुरात जोरात म्हणाले. सर्वांचे चेहरे खुलले. टोळी घरी परतली.

000

 दुसऱ्या दिवशी टोळी सोसायटीतील हनुमान मंदिराच्या जवळ भेटली. अफगानिस्तानला कसं जायचं याची त्यांनी चर्चा केली. घरी सांगून जायचं की सांगता जायचं यावर बराच खल त्यांनी केला. बजरंगबलीकडे चार पाच वेळा बघितलं, पण तो मात्र डोळे बंद करुनच बसलेला. त्याने काहीच ना उत्तर दिलं ना मार्गदर्शन केलं.असा नेमक्या वेळेलाच हा बजरंगबली असा कसा गप्प राहू शकतो रे. तेजू म्हणाली.

          त्याला अफनागिस्तान म्हणजे ठाऊक नसेल. विनू म्हणाला.

 छी बाई, तेजोमयी म्हणाली.

 यात काय झाल छी म्हणायला. आपल्या घरच्यांना सुध्दा अफगानिस्तान कुठे आहे, हे  ठाऊकाय.

          आता पुढे काय. पिल्लूनं विचारलं.

          जायचं म्हणजे जायचच. जग इकडचं तिकडे झालं तरी जे काही व्हायचं ते हा बजरंगबली बघून घेईल. आपण मात्र जायजच

 यस्स. हिप हिप अफगानिस्तान..असं टोळी एकासुरात म्हणाली. त्याचवेळी एका भाविकानं जोरात घंटी वाजवल्यानं त्या निनादात हा सूर मिसळून गेला. त्यामुळे कुणाचं लक्ष यांच्याकडे गेलं नाही.

000

          नंतर काही वेळ टोळी ऑपरेशन अफगानिस्तानावर विचार करत बसली. तिथे जायचं कसं. गेल्यावर करायचं काय. आईबाबांना सांगता जो पराक्रम गाजवायचा आहे, तो उघड झाल्यावर मग जे काही सर्वांचं वाजणार, तेव्हा काय करायचं, कसं करायचं. याचाही विचार टोळीनं केला.

 दुसऱ्या दिवशी सकाळीच आठ वाजता बजरंगबलीच्या मंदिरात एकत्र यायचं नि तिथून अफगानिस्तानात जायचं हे त्यांनी निश्चित केलं. टिल्लूने टोळीला पटवायचा प्रयत्न केला की आपण घरी कुणालाच सांगयाचं नाही. मात्र पिल्लूला हे मान्य झालं नाही. तो म्हणाला कुणाला तरी आपण सांगायलायच पाहिजे.आपलं काही बरंवाईट झालं तर..

 काही बरंवाईट होत नाही. झालं तर वाईट्टच होईल.

 विनोद पुरे झाला. तेजू म्हणाली. पिल्लू म्हणतो तसं आपण कुणाला तरी सांगायला पाहिजे. आपली शेरलॉक होमगिरी आईबाबांची डोके दुखी नको व्हायला. पिनू म्हणाला..

          ते बरोबर असलं तरी सांगायचं कुणाला? कुणाच्या पोटात दडून राहतं का काही.

 आपण टिल्लूच्या आजोबांना सांगितलं तर. ते टिल्लूचे फ्रेंड आहेत. ते मदत करतील.

          त्यांना कशाला सांगायचं. त्यांनाही घेऊन जाऊकी अफगानिस्तान यात्रेला.

          पण ते यायला तयार होतील का रे..

 त्यांना विचारु या की. ते येतात दर शनिवारी या मंदिरात. तेव्हा आपण त्यांना गाठू. टिल्लू म्हणाला. सर्वांनी त्यास होकार दिला. शनिवारपर्यंत वाट बघण्याचं ठरलं. शनिवार कधी उजाडतो नि कधी नाही असं टोळीला झालं. आजोबा किती वाजता बाहेर पडतात हे टिल्लूनं टोळीस सांगून ठेवलं होतं. त्याप्रमाणं शनिवारी आजोबाच्या पाठोपाठ सर्व टोळी मंदिरात पोहचली. बजरंगबलीच्या मूर्तीला फेरी घालत असताना टोळी आजोबांना दिसली. अरे वा, देवानं बुध्दी दिली म्हणायची, असं मनात म्हणून ते स्वत:शीच हसले. फेरी पूर्ण झाल्यावर आजोबा मंदिरातील एका बाकावर बसले. तिथे टोळी त्यांच्या भवती गोळा झाली.

 टिल्लूराव, इकडे कशी वाट चुकली तुमची, आजोबा हसत म्हणाले.

म्हंटल, आजोबा जिकडे नेहमीच वाट चुकवतात तिकडे कधीतरी आपण वाट चुकवून बघावी. पिनू डोळे मिचकावित म्हणाला.

 या विनोदानं आजोबा हसले. टिल्लूने त्यांच्या गळ्यात हात टाकला.

 कशासाठी रे ही लाडीगोडी टिल्लू.आजोबांनी विचारलं. याच क्षणाची टिल्लू वाटत बघत होता. त्याने टोळीचा अफगानिस्तान दौरा आजोबांच्या कानी घातला. अभ्यासावर उतारा, अफगानिस्तान दौरा, असं तेजू गमतीनं म्हणाली. हा दौरा आईबाबांना सांगता करायचाय. पण तुम्ही मात्र आमच्या सोबत आले पाहिजे अशी गळ पिल्लूनं घातली. आजोबांनाही सतत घरातच राहून राहून जाम कंटाळा आलाच होता. इकडे जाऊ नका. तिकडे जाऊ नका. असंच टिल्लूच्या आईबाबांचं चालायचं. त्यामुळे कॉलनीतला बगिचा आणि मंदिर यापलिकडे त्यांचं आणि तेजू, पिल्लू, टिनूच्या आजोबांचही जाणंच खुंटलं होतं. अफगानिस्तानला जाण्याची ही आयडिया झक्कासच होती. आपल्या नातवंडासारखीच चार पाच जण असल्यानं मज्जाच मज्जा येईल. ही मुलचं आपणास नि आपण त्यांना सोबत करु म्हणजे काहीच होणार नाही असं आजोबांनी ताडलं. त्यांनी टोळी सोबत अफगानिस्तानला येण्याचं कबूल केलं. तेजू, पिल्लू, टिनूच्या आजोबांनाही सोबत येण्यास तयार करतो, असं आश्वासन टोळीला दिलं. सारं काही गुप्त राहील असं त्यांनी बजरंगबलीकडे बघत सांगितलं.

000