
१२ वीनंतर, आयआएमचा राजमार्ग (पूर्वार्ध)
इंडियन इंस्टिट्यूट मॅनजमेंट (आयआयएम) या संस्थांनी, गेल्या काही वर्षात नवे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या संस्थांमध्ये पूर्वी केवळ पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. आता काही, आयआयएमनी १२ वी नंतर, प्रवेशाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा लाभ मुलांनी घ्यायला हवा. आयआयएम ब्रँडचा लाभ मिळून या विद्यार्थ्यांना, पुढील चार ते पाच वर्षात खात्रीशिररित्या चांगले करिअर घडवता येऊ शकते.
(१) आयआयएम कोझिकोड
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२५) आयआयएम कोझिकोडने, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ऑनर्स वुइथ रिसर्च), हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातील सर्व घटकांना उपयुक्त ठरणाऱ्या, नव्या वैश्विक विचासरणीला अंगिकारणाऱ्या आणि नावीन्यतेला प्राधान्य देणाऱ्या मनुष्यबळ निर्मितीसाठी, हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.
या अभ्यासक्रमात व्यवस्थापन ज्ञानशाखेच्या विस्तृत विषय घटकांसोबत इतर आंतरज्ञानशाखीय विषय घटकांचाही समावेश करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांचा चौफेर व्यक्तिमत्व विकास अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणे (पब्लिक पॉलिसी), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग, मानसशास्त्र आणि वर्तणूकशास्त्र (बिव्हेरिअयल सायंस), वित्त आणि बिग डाटा, लिबरल स्टडीज इन मॅनेजमेंट, विपणन, विक्री आणि डिजिटल प्रमोशन, अशासारखे विषयही अभ्यासता येतील. इंटर्नशीप, संशोधन सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातील.
अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण किंवा १० वीनंतर, कोणत्याही विषयातील शासनमान्य पदविका.
निवड प्रक्रिया – या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, शैक्षणिक कामगिरी, चाळणी परीक्षेतील गुण आणि मुलाखत, हे तीन घटक विचारात घेतले जातील.
चाळणी परीक्षा- या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला, (आयआयएम कोझिकोड- बीएमएस ॲप्टिट्यूड टेस्ट (आयआयएमके- बीएमएस- एटी) चाळणी परीक्षा द्यावी लागेल. या चाळणी परीक्षेव्दारे विध्यार्थ्याच्या भाषिक (व्हर्बल ॲबिलिटी) आणि संख्यात्मक (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी) क्षमतेची चाचणी घेतली जाईल. ही संगणकाधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची परीक्षा असेल.
जेइइ-मेन परीक्षेत, सुयोग्य गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा द्यावी लागणार नाही. जेइइ-मेनमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित, त्यांची पुढील टप्प्यासाठी निवड केली जाईल. या टप्प्यात निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती मुंबई, बेंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, कोझिकोड, नवी दिल्ली येथे घेतल्या जातील. या प्रक्रियेत उमेदवारांची सर्वधारण आणि सामाजिक जाणीव, शैक्षणिक कामगिरी, व्यक्तित्व, संवादकौशल्य, वृत्ती (ॲटिट्यूड), अभ्यासक्रमासाठीची सक्षमता या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल. मुलाखतीचा कालावधी साधारणत: १५ मिनिटे राहील.
या अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२५ आहे. चाळणी परीक्षा २२ जून २०२५ रोजी होईल.
संपर्क- आयआयएम कॅम्पस कोझिकोड- ६७३५७०, भ्रमणध्वनी-९५१३२५२०९९ , संकेतस्थळ- https://iimk.ac.in, ईमेल- bmsathelpdesk@iimk.ac.in
(२) आयआयएम इंदौर
पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (आयपीएम) हा अभ्यासक्रम सुरु करणारी, आयआयएम इंदौर ही आपल्या देशातील पहिली आयआयएम ठरली. व्यवस्थापकीय नेतृत्व करण्यासाठी महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने संरचना करण्यात आली. हा अभ्यासक्रम २०११ साली सुरु करण्यात आला. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, “बॅचलर ऑफ आर्ट्स- बीए (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ॲण्ड मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन- एमबीए,” ही पदवी प्रदान केली जाते. ३ वर्षानंतर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमातून बाहेर पडता येते. त्याला बीए (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ही पदवी प्रदान केली जाते.
या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तीन वर्षात, अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, विधि आणि सार्वजनिक धोरणे, या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया पक्का केला जातो. माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित केले जाते. यामुळे व्यवसाय उद्योगातील वास्तवतेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम बनतो. चौथ्या आणि पाचव्या वर्षी, वित्त, कार्यान्वयन, मनुष्यबळ आणि व्युहनीती (स्ट्रॅटेजी), माहिती तंत्रज्ञान विपणन, हे एमबीएचे मुख्य विषय शिकवले जातात. या विद्यार्थ्यांना सामाजिक इंटर्नशीप, उन्हाळी इंटर्नशीप, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अदलाबदल योजना, आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (आयपीमॅट) ही चाळणी परीक्षा घेतली जाते. ही संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा आहे. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई ही परीक्षा केंद्रे आहेत.
अर्हता- (अ) कोणत्याही शाखेतील १२ वी, पास श्रेणीत उत्तीर्ण. (ब) दहावी पास श्रेणीत उत्तीर्ण.
परीक्षा आणि निवड प्रकिया
या अभ्यासक्रमासाठी निवड, (१) कल चाचणी (ॲप्टिट्यूड टेस्ट) आणि (२) मुलाखत या दोन घटकांवर आधारित केली जाते. कलचाचणीच्या पेपरमध्ये तीन विभाग (सेक्शन) असतात (१) संख्यात्मक क्षमता (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी)- बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस), (२) क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी – लघुउत्तरी प्रश्न (शॉर्ट ॲन्सर). क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीच्या भागात अलजेब्रा, मॉर्डन मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, जॉमेट्री, डाटा ॲनॅलिसिस, अॅरिथमॅटिक यावरील प्रश्नांचा समावेश असतो, (३) भाषा क्षमता (व्हर्बल ॲबिलिटी) बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस)- या भागात व्हर्बल रिझनिंग, रिडिंग कॉम्फ्रिहेन्शन, एरर्स इन युसेज, या घटकांवर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक अचुक उत्तरास चार गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो. (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी सेक्शन (शॉर्ट ॲन्सर) साठी निगेटिव्ह गुण नाहीत.) परीक्षेचा कालावधी दोन तास. प्रत्येक सेक्शनसाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो. उमेदवारांना पेपरमध्ये ठरवून दिलेल्या सेक्शनच्या क्रमानुसारच प्रश्न सोडवावे लागतात. या तिनही भागांसाठी विशिष्ट असा कटऑफ (किमान गुण) ठरवण्यात येतो. तो कटऑफ प्राप्त करणे आवश्यक आहे. हे किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचीच निवड मुलाखतीसाठी केली जाते. (प्रत्येक संवर्गासाठी हे किमान गुण वेगवेगळे राहतात. प्रत्येक संवर्गासाठीची मेरिट यादी वेगवेगळी तयार केली जाते.)
कलचाचणी सोबतच मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. अशाच उमेदवारांची निवड अंतिम निवड यादीसाठी केली जाते. कलचाचणीस ६५ टक्के वेटेज आणि मुलाखतीस ३५ टक्के वेटेज दिले जाते. अंतिम यादित ज्या उमेदवारांची निवड होत नाही, त्यांना कळवले जात नाही.
संपर्क – आयआयएम इंदौर, राऊ -पितमपूर रोड, इंदौर-४५३५५६, दूरध्वनी- ०७३१ -२४३९६८७ संकेतस्थळ -www.iimidr.ac.in, ईमेल-ipmadmissions @iimid.ac.in
३) आयआयएम रांची
या संस्थेच्या इंटिग्रेटेड (बीबीए+एमबीए) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण. तीन वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना बीबीए पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षाच्या कालावधीत, मानव्यशास्त्र, समाजशास्त्र, कला, विज्ञान, व्यवस्थापन अशासारख्या बहुज्ञानशाखीय विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल घडून, तो व्यवसाय, कार्पोरेट उद्योग जगातील समस्या सोडवण्यासाठीचे कौशल्य प्राप्त करतो.
या अभ्यासक्रमाला, आयआयएम – इंदौरमार्फत घेतल्या जाणाऱ्या, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (आयपीमॅट) मधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.
संपर्क- प्रबंधननगर, नया सराई रोड, रांची- ८३५५०३ संकेतस्थळ- https://iimranchi.ac.in/ipm/ ईमेल-chair.ipm@ iimranchi.ac.in
(४) आयआयएम रोहतक
२०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून रोहतक इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने, पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड (बीबीए+ एमबीए) अभ्यासक्रम सुरु केला आहे. प्रज्ञावंत मुलांना जागतिक पातळीवर, व्यवस्थापकीय व उद्योजकीय नेतृत्व करणे सुलभ जावे,या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी, आयआयएम- रोहतकव्दारेच घेतली जाणारी, संगणकाधारित (कॉम्पुटर बेस्ड) परीक्षा, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. यापेपरमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, व्हर्बल ॲबिलिटी असे तीन घटक असतात. प्रत्येक घटकावर बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे, प्रत्येकी ४० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी चाळीस मिनिटांचा कालावधी दिला जातो. प्रत्येक प्रश्नाच्या अचुक उत्तराला चार गुण दिले जातात. उत्तर चुकल्यास एक गुण कपात केला जातो. या परीक्षेतील गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.(अपूर्ण)
सुरेश वांदिले