“जेव्हा मी झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, दहाबारा वर्षाचा. इतकं मोठं ते झाडं, त्यावरुन खाली पडल्यावर जीव गेला नाही, हे माझं नशिब! मात्र, माझ्या डोक्याला बराच मार लागला. पाय मुरगळला. पायाला चांगलीच जखम झाली. खरंतर त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना.
आता, हा झाडावरचा पराक्रम करायला कां बरं गेलो असेन मी? असं तुम्हाला नक्कीच वाटलं असणारं. जो असा आगावूपणा करतो त्याचं असंच काहीसं होतं, असंही तुमच्यापैकी अनेकांच्या मनात येऊन गेलं असणार.
मी आगावूपणा कां केला? या तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर तर द्यायलाच हवं ना.
अहो, मला शिकण्याची फार इच्छा. पण माझे बाबा मात्र त्याविरोधात. शिकून कोणता पराक्रम गाजवणार म्हणे. त्यांनी काही मला शाळेत घातलं नाही. मला ते शेतीवर घेऊन जात. मग, शेतीतली पडेल ती कामं करणं आलंच. त्यात काही माझं मन रमेना. माझ्या मनात सारखं शाळेचाच विचार. या विचाराविचारातच एके दिवशी शेतातल्या त्या मोठ्या झाडावर चढण्याचा अविचार करुन बसलो नि जायबंदी झालो. पण कधीकधी वाईटातून चांगलं घडतं, असं आपण नेहमी ऐकतो, त्याचा प्रत्यय मला या घटनेनंतर आला. मी जायबंदी झाल्याने मला शेतीची कामं काही करता येईना. मग, माझ्या बाबांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली नि रागारागात शाळेत टाकलं. ते म्हणाले,
“गधड्या शिक पाहिजे तेवढा”.
मग काय, एकीकडे पाय मुरगळल्याचं दु:ख असलं तरी शाळेत जाण्याची संधी मिळाल्याने ते दु:ख कुठल्या कुठे भुर्रSS उडालं. शाळेतल्या पुस्तकांनी, शिक्षकांनी माझं मन अगदी भारुन गेलं. हे पुस्तक वाच नि त्या पुस्तकाच्या फडशा पाड, असं माझं झालं. मला अभ्यासात गती असल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या शिक्षकांच्याही ते लक्षात आलं. आता, ते मला आपुलकीने नव्या नव्या गोष्टी शिकवू लागले. शिकताशिकता माझी तब्येत बरी झाली. पायही बरा झाला.
शिक्षणामुळे आपल्यापर्यंत चांगल्या संधी चालून येतात, असं मी ऐकून होतं. माझ्या बाबतीत ते खरं ठरलं. ते साल होतं १८२५!
अमेरिकच्या नौदलासाठी माझ्यासारख्या एका हुषार मुलाची गरज असल्याचं माझ्या शिक्षकांना कळलं. अभ्यासातील माझी प्रगती बघून त्यांनी माझ्या नावाची शिफारस केली. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी माझी परीक्षाबिरीक्षा घेतली. त्यात मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. मला, मग नौदलात शिकावू उमेदवार म्हणून नोकरी मिळाली.
मी निश्चय केला की, या संधीचं सोनं करायचं म्हणजे करायचच. मग काय, मी अधिकाधिक परिश्रम करु लागलो. त्याचं फळ मला मिळालं. मला नौदलाच्या जहाजातून १८२६ ते १८३० या चार वर्षात आपल्या पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याची संधी मिळाली. या अफाट जगाचं पुस्तक माझ्यासमोर उघडलं गेलं. हे सारं स्वप्नवत होतं.
आता, मी समुद्राच्या अदभूत जगाचा सखोल अभ्यास करु लागलो. रात्रंदिवस मी याचाच ध्यास घेतला. समुद्राच्या अभ्यासाशिवाय मला काहीच सूचेना. माझं खाणं, पिणं, झोपणं सारं काही समुद्रमय होऊन गेलं. जहाजावरच्या काहींनी तर मला वेडंही ठरवलं. पण मी काही त्यांची चिंता केली नाही.
दरम्यान एकदा, मी एका घोडागाडीच्या अपघातात सापडलो. या अपघाताने मला पंगू बनवलं. मी नौदलाच्या लष्करी कामासाठी अपात्र ठरलो. नौदलातून माझी कधीही हकालपट्टी झाली असती. पण माझ्या साहाय्याला, मी मन लावून केलेला समुद्राचा अभ्यास आला. याचा अभ्यास नौदलासाठी खूप उपयुक्त ठरेल, असं माझ्या बऱ्याच वरिष्ठांना वाटलं. त्यांनी मला नौदलातच कायम ठेवलं नि समुद्राचा आणखी अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मग काय विचारता, माझ्या मनातील “समुद्र घोडा” चांगलाच उधळला की.
आता, माझं जीवनच समुद्रमय होऊन गेलं. समुद्राचं मापन, चित्रण आणि आलेखनात मी तज्ज्ञता मिळवली. समुद्राच्या विविध नोंदीचे तक्ते-आराखडे-, वर्णन अशाही गोष्टीत प्रावीण्य मिळवलं. जलशास्त्र मापनाची साधनं आणि उपकरणं, उपलब्ध करुन देण्याचं मला सांगण्यात आलं. ते काम मी मोठ्या उत्साहानं करु लागलो. मग, मला समुद्राच्या कितीतरी अनेक नव्या नव्या गोष्टी कळू लागल्या.
अक्षरश: शेकडो बोटींच्या कप्तानांकडून त्यांच्या त्यांच्या जलप्रवासाचे तपशील मिळवले. त्याचाही सखोल अभ्यास केला. त्यातून मग समुद्रातील नद्या म्हणजेच विविध प्रवाह मला कळले. त्याच्या शास्त्रोक्त नोंदी मी करु लागलो. समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांच्या करामती कळल्या. समुद्रावरील हवामानाचा मी तज्ज्ञ झालो.
या सर्व अभ्यासामुळे, मला समुद्रातले नवे आणि कमी अंतराचे मार्ग शोधणं सोपं गेलं. त्यामुळे युरोप आणि अमेरिका प्रवासातील ४५ दिवसांचा वेळ, इंधन आणि पैसे वाचू लागले. समुद्र प्रवास कसा अधिकाधिक सुरक्षित होईल, याचं मार्गदर्शन करणं मला शक्य झालं.
पुढे, मला अमेरिका आणि ब्रिटनच्या नौदलाने १८५४ पासून केलेल्या समुद्राच्या खोलीबद्दलच्या नोंदीचा कसून अभ्यास करण्याची संधी मिळाली. तेव्हा, उत्तर अटलांटिक महासारगारच्या तळाशी, १६ हजार किलोमीटर लांबीची पर्वतरांग असल्याचं माझ्या लक्षात आलं. जगातील सगळया महासागराच्या तळावर पर्वतरांगा आहेत. त्याची लांबी ४० ते ४५ हजार किलोमीटर असल्याचा मी निष्कर्ष काढला. तो खरा निघाला. ” झाडाच्या पानावरील शिरांप्रमाणे, महासागराच्या तळावर उत्तर ध्रुवापासून ते दक्षीण धुवापर्यंत जाणाऱ्या पर्वतरांगा”, असल्याचं मी जगाच्या निदर्शनास आणलं.
माझ्या या दांडग्या अभ्यासातून, ” फिजिकल जिओग्रॅफी ऑफ द सी,” या ग्रंथाची निर्मिती झाली. सागरविज्ञान क्षेत्रातील हे पुस्तक म्हणजे, “गीता” च असल्याच, अनेकांचं म्हणणं पडलं.
आता, माझ्या या गोष्टीचं तात्पर्य काय?
तसा मी काही फार ग्रेटब्रिट पराक्रम गाजवला नाही. पण, मला एक कळलं की, आपल्यावर कोणतही संकटं आलं, तर त्याने खचून जायचं नाही. निराश व्हायचं नाही. प्रामाणिकपणे सतत प्रयत्न करत राहायचं. कष्ट उपसायचं. मग आपल्या मनात जे काही करायचय किंवा घडवायचय, जे काही आपलं स्वप्न असेल ते नक्कीच खरं ठरत.
याचा पुरावा म्हणजे,
मी, लेफ्टनंट मॅथ्यू फॉन्टेन मॉरी!
काहीजण माझं वर्णन,” आधुनिक समुद्रशास्त्राचा जनक “, म्हणून करतात. माझ्या जीवनातील दोन दोन जीवघेण्या अपघातांनी मी खचून गेलो असतो तर हे शक्य झालं नसतं. पण मी खचलोही नाही आणि डगमगलोही नाही. त्याचचं हे फळ म्हणायचं.
सुरेश वांदिले