राज्य आणि केंद्रशासनामार्फत सर्व दुर्बल घटकातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना विनासायाय आपले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मदतीचा हात दिला जातो. त्याअनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, सुयोग्य कागदपत्रांसह सादर करावा लागतो. या शिष्यवृत्ती आता, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केल्या जातात. हे बँक खाते आधार कार्डाशी संलग्नित असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या शिष्यवृत्ती
(१) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना–
या योजनेचा लाभ आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिला जातो. या योजनेंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची ५० टक्के रक्कम शासन भरते. पहिला हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत व दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत देण्यात येतो. विद्यार्थ्याच्या कुटुंबियाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे.
शासकीय, शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठासह), विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतनांमधील निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. व्यवस्थापन कोटयातील आणि संस्था स्तरावरील प्रवेश घेणाऱ्यांना याचा लाभ दिला जात नाही. खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे यात प्रवेश घेतल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात नाही.
०००
(२) डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना–
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ शासकीय विद्यापीठे व उपकेंद्रातील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक, ‘अल्प-भूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल‘, घटकातील असतील त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
(१) अल्प-भूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजूर संवर्ग- मुंबई आणि पुणे विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणारी सर्व शहरे, औरंगाबाद आणि नागपूर – सर्व पात्र विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये आणि इतर ठिकाणच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना २० हजार रुपये.
(२) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक संवर्ग (कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १ लाख रुपये) – मुंबई आणि पुणे विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणारी सर्व शहरे, औरंगाबाद आणि नागपूर – सर्व पात्र विद्यार्थ्यांना १० हजार रुपये. इतर ठिकाणच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये.
(३) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक संवर्ग (कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा – १ लाखाच्या पुढे ते ८ लाख रुपये) – मुंबई आणि पुणे विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणारी सर्व शहरे, औरंगाबाद आणि नागपूर – १० हजार रुपये. एकूण शिष्यवृत्तींची संख्या ५००. यामध्ये ३३ टक्के महिलांसाठी आरक्षण. इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये. एकूण शिष्यवृत्तींची संख्या ५००. यामध्ये ३३ टक्के महिलांसाठी आरक्षण. या योजनेंतर्गत १० महिन्यांसाठी वार्षिक वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो.
००००
(३) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती–
मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जातो. अशा विद्यार्थ्यांनी पदविका, पदवी, पदव्युत्तर तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असावा. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत असावे. विदयार्थ्यांने १०वी ची परीक्षा महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणे आवश्यक .
या योजनेंतर्गत अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणारे प्रत्यक्ष वार्षिक शिक्षण शुल्क किंवा रुपये २५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरुपात दिली जाते.
(शिष्यवृत्ती क्रमांक १,२ आणि ३ संपर्क- संपर्क संकेतस्थळ – mahadbtmahait.gov.in
सुरेश वांदिले