महाराजांचा कोणता आदर्श?
महाराजांचा तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे. गोष्टीचा शेवट केल्यावर आजी टिल्लूला म्हणाली. कोणतीही गोष्ट सांगितली की आजी, याचा हा आदर्श ठेवला पाहिजे, त्याचा तो आदर्श ठेवला पाहिजे असं सांगायची. त्याशिवाय तिची गोष्ट पूर्ण होत नसे.
समजा, मी महाराजांचा आदर्श नाही ठेवला तर काय होईल? आभाळ कोसळेल की पृथ्वी दुभंगेल? असं एकदा डोळे मिचकावत त्याने आजीला विचारलं.
या अडचणीच्या प्रश्नाने आजी जरा गडबडली.
नाही म्हणजे…तसं…असं आजी करु लागतातच टिल्लूची आई तिच्या मदतीला धावली.
अरे, तू काहीही आजीस विचारु नकोस. तुझ्या भल्यासाठीच सांगते ना ती. आई म्हणाली.
अगं पण आई, मी कुठे काय म्हणालो? फक्त विचारलं की महाराजांचा आदर्श नाही ठेवला तर काय होईल माझं? टिल्लू म्हणाला.
काय होईल म्हणजे? आई सांगण्याचा प्रयत्न करु लागली. पण नेमकं काय सांगावं हे तिलाही सूचेना. आजीसुध्दा विचारात गुंतून गेली. आपला नातू फार आगावू तर होत चाललाय का? असं एक डोळा बारीक करुन आजी, त्याच्याकडे बघत स्वत:शीच पुटपुटली. पण तो तसा नाही हे याची तिला शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ते बघून तिच्याजवळ जात टिल्लू म्हणाला…
मग आजी सुचलं का तुला? मी महाराजांच्या आदर्श नाही ठेवला तर काय होईल,याचं उत्तर.
अरे, तू आजीला कां बरं त्रास देतोस? या चर्चेत सहभागी होत, टिल्लूचे बाबा टप्पू म्हणाले.
प्रश्न विचारणं म्हणजे त्रास देणं होतं का बाबा? टिल्लूने प्रतिप्रश्न केला. पण, बाबा महाराजांना तर खूप प्रश्न पडायचे. त्या प्रश्नांची उत्तरं ते त्यांची माँसाहेब, आबासाहेब, गुरु आणि आजीकडून मिळवायचे, मग हा प्रश्न विचारण्याचा आदर्श मी ठेवायचा नाही म्हणता?
अरे शहाण्या,ते महाराज होते…
मग मी टिल्लू आहे ना! महाराज जर प्रश्न विचारु शकतात आणि टिल्लू कां नाही, हे असं कसं? टिल्लू बाबांकडे बघत म्हणाला.
अरे सोन्या, ती गोष्ट आहे.
अहो बाबा, गोष्ट आदर्शाचीच कशाला हवी मग?
काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू? आई गरजली.
मग कशी गोष्ट हवी तुला? बाबांनी विचारलं.
अहो बाबा, गोष्टीतले कां होईना पण महाराज, खेळणारे, उंडारक्या करणारे, चोरुन आब्यांच्या झाडावर चढून आंबे खाणारे,खालून दगड फेकून चिंचा पाडणारे, आईबाबांना न सांगता जंगलात जाऊन रानमेवा चाखणारे, पक्ष्यांच्या पाठिमागे लागणारे, काहीही कारण नसताना हाणामारी करणारे आणि मग लगेच दोस्ती करणारे, असे कां असू शकत नाही?
असे कां असू शकत नाही बुवा, महाराज? बाबांनी त्यांच्या आईस विचारलं.
म्हणजे थोडक्यात काय, तर वाया गेलेले! आई पुटपुटली.
अगं आई, लहानपणी असं जे वागतात ते वाया जातात, असा काही सिध्दांत आहे की नियम? टिल्लू डोळे मिचकावित म्हणाला.
शहाण्या…बस झाला आगावूपणा.आई त्याला रागावली. बाबा कौतुकाने टिल्लूकडे बघू लागले.
आता उद्यापासून गोष्ट सांगायची की नाही… याचा आजी विचार करु लागली.
सुरेश वांदिले