न सुटलेले कोडे
सिंह महाराजांनी उंदरोबास जंगलाच्या तुंरुगाचा प्रमुख केला. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. अनेकांना हा महाराजांचा मूर्खपणा वाटला. अनेकांना फार आनंद झाला. आनंद होण्याचं त्यांचं कारण म्हणजे, हा पिटुकला उंदरोबा आपलं काहीही वाकडं करु शकणार नाही, याची त्यांना खात्री पटली.
उंदरोबास तुरंगाधिकारी करण्यास कोल्होबांनी विरोध केला. ते म्हणाले,
महाराज हा उंदरोबा तुरुंगाधिकारी झाल्याबरोबर आपल्या राज्यातील चोऱ्यामाऱ्या वाढतील. त्याला कुणालाही पकडता येणं शक्य होणार नाही. आपल्या राज्याचं नाव बदनाम होईल. इतर दरबाऱ्यांचंही असच मत पडलं.
मात्र, महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते. उंदराच्या आकारापेक्षा त्याच्या बुध्दीवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे कोणत्याही दरबाऱ्यांचे त्यांनी काहीही ऐकलं नाही. उंदरोबा वननगरीचे तुरुंगाधिकारी म्हणून रुजू झाले.
उंदरोबा, तुरुंगाधिकारी म्हणजे वननगरीत सुखनैव जाऊन चोरी करण्याची सुवर्णसंधीच सिंह महाराजांनी उपलब्ध करुन दिल्याचं वनातील काळ्या मांजरांना वाटलं. त्यांनी महाराजांचे मनातल्या मनात आभार माणले. बिनदिक्तपणे या मांजरी चोरी करु लागल्या.
उंदरोबा तुरंगाधिकारी झाल्याबरोबर चोरीचे प्रमाण दोन दिवसातच खूप वाढले. त्यामुळे सर्व दरबाऱ्यांनी महाराजांकडे तक्रार केली. उंदरोबास तुरंगाधिकारी नेमण्याचा निर्णय कसा चुकीचा असल्याचं सगळयांनी ठासून सांगितलं. त्याला ताबडतोब बदलून वननगरीतून हाकलून द्या अशी मागणीही त्यांनी केली.
चोऱ्या वाढल्या हे खरच होतं. मात्र त्याच्या आडून उंदरोबास अडचणीत आणण्याचा कुटील डाव महाराजांच्या लक्षात आला. आपण लवकरच दोन दिवसात निर्णय घेऊ असं सांगून महाराजांनी दरबार बरखास्त केला.
त्यांनी लगेच उंदरोबास महालात बोलावून घेतलं.आज दरबारात काय घडलं ते त्यांनी उंदरोबास सांगितलं.
महाराज, आपल्या नागरिकांना मी तुरुंगाधिकारी नको असेन तर मी स्वत:च माझा राजीनामा देतो, असं उंदरोबा म्हणाला.
उंदरोबा, असा उतावळेपणा करु नका. तुमच्या राजीनाम्याने समस्या सुटणार नाही. या चोऱ्या कां वाढल्या आणि त्या कोण करताहेत जरा तुमच्या सुपिक बुध्दीला चालना देऊन शोधून काढा. मग सगळयांची बोलतीच बंद होईल. महाराज म्हणाले.
उंदरोबास त्यांचं म्हणन पटलं. महालाच्या बाहेर पडताच तो विचार करु लागला की, आपण आता नेमकं काय करायला हवं? चोरांचा शोध कसा घ्यायचा? विचार करत जात असताना एका झाडाखाली तो विश्रांतीसाठी थांबला.
त्या झाडावरच्या फांद्यांवर बरेच पोपट गप्पाटप्पा करण्यात रंगून गेले होते. अचानक एका पोपटाचे लक्ष उंदरोबाकडे गेले. विचारात गढून गेलेल्या उंदराची दया त्याला आली. तो खाली उतरला आणि उंदराच्या समोर येऊन म्हणाला,
उंदरोबा अरे, असा चिंताग्रस्त कां?
उंदरोबाने मग त्याला वननगरीत अचानक चोरीच्या घटना वाढल्या असून त्यासाठी आपणासच काही प्राणी जबाबदार धरताहेत. या चोराला कसं पकडायचं याचा मी विचार करत होतो,याचं सविस्तर वर्णन केलं.
पोपटाने काही क्षण डोळे मिटले. डोळे उघडल्यावर तो उंदरोबास म्हणाला,
उंदरोबा, मी तुला यासाठी मदत करु शकतो.
कशी काय?
अरे, माझे असंख्य मित्र झाडावर आहेत. त्यांना पूर्ण वननगरीत पसरवून ठेवतो.ते इकडून तिकडे उडत राहतील आणि वेड्यावाकड्या हालचालीकडे लक्ष ठेवतील.त्यांना गडबड आढळली की ते विशिष्ट आवाज काढतील.तेव्हा समजायचं की चोर चोरीसाठी बाहेर पडला.
अरे वा वा.छान…तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या साहाय्याने मी नक्कीच चोरांना पकडेन.
ठरल्यानुसार सर्व पोपट मग वननगरतील विखुरले आणि ते सगळीकडे लक्ष ठेऊ लागले. काळया मांजरीच्या हालचाली एका पोपटास संशयास्पद वाटल्या.ताबडतोब विशिष्ट आवाज काढून त्यांनी उंदरोबास सावध केले. महाराजांनी दिलेल्या सैनिकांसह काळ्या मांजरीचा पाठलाग उंदरोबा करु लागला. एका घरी ती चोरी करणार, तोच शिपायांच्या सहाय्याने उंदरोबाने तिला शिताफिने पकडले.याला कसं काय कळलं आपल्या चोरीचा प्लॅन,असा विचार मनात येऊन काळ्या मांजरीला धक्का बसला.
पुढच्या काही दिवसात आणखी काही मांजरी उंदराने पोपटांच्या साहाय्याने पकडल्या.
हे कसं काय शक्य आहे, कोल्होबास वाटलं. अशाने हा उंदरोबा कधीच तुरुंगाधिकारी पदावरुन हटवला जाणार नाही.हे त्याने ओळखले. आता आपणच काहीतरी करुन याला तावडीत पकडला पाहिजे असं ठरवून कोल्होबाने सिंह महाराजांच्या घरी स्वत:च चोरी करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे तो लपतछपत महाराजांच्या घरी जात असल्याचं एका पोपटाने बघितलं.त्याने विशिष्ट आवाज काढून उंदरास सावध केलं.तत्काळ, सैनिक घेउुन महाराजांच्या महालाच्या आसपास उंदरोबा पोहचला.गुपचूप महालात शिरत असताना त्याने कोल्होबास सैनिकाच्या साहाय्याने पकडलं.
हे बघून कोल्होबा घाबरुनच गेला.
तो सैनिकांना दरडावून म्हणाला,अरे मी महाराजांच्या दरबारातील प्रमुख सरदार आहे,तुम्ही मला पकडून घोडचूक करत आहात.
अहो सरदार साहेब,चोरी करण्याचा प्रयत्न करुन तुम्ही आधीच खूप मोठ्ठी घोडचूक केली आहे.ती चूक आता आम्ही तुम्हाला महाराजांपुढे सादर करुन दुरुस्त करु…उंदरोबा कोल्होबाच्या समोर येऊन म्हणाला.त्याला बघताच कोल्होबा चपापलाच.त्याच्या अंगाला घाम फुटला.तो सुटकेसाठी हालचाल करु लागला.सैनिकांनी त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं.कोल्होबास तसच महाराजांपुढे उंदरोबानं सादर केलं.महाराज कोल्होबावर प्रचंड चिडले.त्याची सरदारकी काढून घेऊन १० वर्षाची शिक्षा ठोठावली.
कोल्होबास चोरी करताना उंदरोबाने पकडल्याचे वृत्त वनव्यासारखे वननगरीत पसरले.एवढ्या पिटुकल्या उंदरास कसं शक्य झालं हे,असं अनेकांना वाटलं. त्याच्याकडे जादूच असली पाहिजे. असा बहुतेकांचा समज झाला. नकोच त्याच्या वाटेला जायचं असं दरबाऱ्यांनी आणि इतर प्राण्यांनी ठरवलं.त्यामुळे वननगरीत चोरी होणं बंद झालं.
महाराज उंदरोबावर खुष झाले.त्याला त्यांनी दरबारात मानाचे स्थान दिले.आणखी तुला काय हवं ते माग असं त्यांनी उंदरास विचारलं.
आपल्या वननगरीत पोपटांसाठी खास वेगळं उद्यान करुन द्या असं उंदरोबा म्हणाला.
अरे, मी तुझ्यासाठी माग म्हंटलं .पोपटांसाठी नव्हे.महाराज म्हणाले.
महाराज मी आणि पोपट वेगळे थोडेच आहोत…
आँ…महाराजांसह दरबारातील इतरांनी आँ फाकला.उंदीर आणि पोपट एकच कसे आहेत हे विचारुन आपलं डोकं खराब करण्याऐवजी, पोपटांसाठी स्वतंत्र उद्यान देणचं योग्य असं महाराजांना वाटून,त्यांनी उंदरोबाची मागणी मान्य केला.
उंदरोबाच्या मागणीमुळे पोपटांना स्वतंत्र उद्यान मिळाले. पोपट आणि उंदरांची मैत्री आणखी पक्की झाली.
पोपट आणि उंदिर एकच कसे,हे कोडे समजावून घेण्यासाठी अनेकांनी डोके खूप चालवले.मात्र कुणालाही याचं उत्तर मिळालं नाही. उंदरास मूर्ख ठरवणारे आपणच खरे मूर्ख,याची खात्री ब-याच दरबाऱ्यांना पटली.
सुरेश वांदिले