(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 कोणतेही आव्हान स्वीकारणारे मेट्रो मॅन!

(भाग एक)

१५ डिसेंबर १९६४ !

हा दिवस तामिळनाडू राज्यात प्रचंड पाऊस आणि भयावह असं चक्रिवादळ घेऊन आला. या चक्रिवादळानं खूप विध्वंस केला. हजारो नागरिक मरण पावले. असंख्य देशोधडीला लागले. कित्येक रस्ते वाहून गेले. शेतातील पिकं नष्ट झाली. घरांची पडझड झाली. जनावरं वाहून गेली.

या चक्रिवादळात रामेश्वरम या शहराजावळील पंबम नदीवरील पूल पडला. त्यामुळे रामेश्वरम आणि उर्वरित तामीळनाडू राज्याचा संपर्क तुटला.  त्यामुळे हा पूल पुन्हा तातडीनं नव्यानेच बांधणं आवश्यक होतं. रेल्वेने विलंब न लावता हालचाली सुरु केल्या. सहा महिन्यात हा पूल बांधण्याचा संकल्प रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. तसे आदेश रामेश्वरम रेल्वेच्या सबंधित प्रमुख अधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रमुख अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पंबम नदीवरील पडलेल्या पुलाची पाहणी केली. हा पूल सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यातच तयार करता येऊ शकेल, असं त्यांच्या लक्षात आलं. किंबहुना तसं आव्हान तरी स्वीकारायला हवं, असं या अधिकाऱ्यांनी ठरवलं. हे खडतर आवाहन पूर्ण करण्याची जबाबदारी एका उत्साही आणि हुषार अभियंत्याकडे सोपवण्यात आली.

या अभियंत्यासाठी ही कठीण परीक्षा होती. मात्र, समोर येणारं प्रत्येक आव्हान, ही एक कर्तृत्व गाजवण्याची संधीच असते, असं समजून अथक परीश्रमासाठी तयार असणाऱ्या या तरुणानं हे आव्हान स्वीकारलं.

क्षणाचाही विलंब न लावता, त्याने कामाचं सुयोग्य नियोजन केलं. प्रत्येक टप्प्याची काटेकोर आणखी केली. त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली.

दोन

या पुलाचं काम सुरु झाल्यानंतरच्या ४६ व्या दिवशी तो अभियंता, रामेश्वरम येथील रेल्वेच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला आला. त्याला बघून ते वरिष्ठ अधिकारी खूप रागावले. पुल बांधणीचं इतकं महत्वाचं काम सोडून येण्याचं कारण त्यांनी विचारलं.

हे रागावनं ऐकून, तो अभियंता हसत म्हणाला,

सर, पूल बांधून पूर्ण झालाय…

काय? कसं शक्य आहे? तीन महिन्याचं काम ४६ दिवसात कसं पूर्ण होऊ शकतं? उगाच थापा मारु नकोस. ते वरिष्ठ अधिकारी त्या अभियंत्याला आणखी रागावून म्हणाले.

सर, मी खोटं कशाला बोलेन?तुम्ही माझ्यासोबत चला नि प्रत्यक्ष याची डोळा बघून खात्री करा! तो अभियंता म्हणाला.

त्याच्या सांगण्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याला अजिबातच विश्वास बसत नसूनही खात्री करण्यासाठी ते या अभियंत्यासोबत पम्बम नदीकडे निघाले. याने सांगितलेलं खोटं ठरलं तर त्याला मोठी शिक्षाच द्यायची, असं त्यांनी मनात ठरवलं.

ते दोघेही जेव्हा पम्बम नदीवर पोहचले तेव्हा चक्रिवादळात वाहून गेलेला पूल पुन्हा उभा राहिल्याचं बघून, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वत:च्या डोळयावर विश्वास बसेना. ही भुताटकी तर नाहीना, असं त्यांना वाटलं. त्यांनी स्वत:ला चिमटा घेऊन बघितला. समोर खरोखरच नवा पुल उभा राहिलेला बघून त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू ओघळले. त्यांनी या तरुण अभियंत्याला कडकडून मिठी मारली. त्याने घडवलेला चमत्कार रेल्वे मंत्रालायलाकडे,मोठ्या कौतुकानं पोहचवला. तेव्हा म्हणजेच ५८ वर्षापूर्वी या अभियंत्यास रेल्वेने हजार रुपयांचं पारितोषिक देऊन खास सन्मान केला. रेल्वेमध्ये असा सन्मान क्वचितच एखाद्याच्या वाटेला येतो.

तीन

यानंतर या अभियंत्याच्या हातून एका पाठोपाठ एक असे चमत्कारसदृष्य मोठ-मोठी कामं सुलभतेनं होत राहिली….

ते साल होतं १९७०!

हा अभियंता तेव्हाचे कलकत्ता आणि आताचे कोलकता येथे रेल्वे विभागात उपमुख्य अभियंता या पदावर काम करत असताना एके दिवशी त्याच्या वरिष्ठांनी त्याच्यापुढे एक वेगळच आव्हान ठेवलं. ते होतं मेट्रो रेल्वे बांधण्याचं ! ते वेगळं यासाठी की तोपर्यंत भारतात कुठेही मेट्रो रेल्वे उभी राहिली नव्हती. याचा अर्थ भारत त्यावेळी मेट्रोच्या अनुषंगाने अज्ञानीच होता. या अभियंत्याससुध्दा मेट्रो रेल्वेचं केवळ अत्यल्प आणि जुजबी ज्ञान होतं. जी गोष्ट फारशी माहीत नाही, ती करण्यासाठी फार धाडस लागतं आणि स्वत:वर शंभर टक्के आत्मविश्वास ! तो या अभियंत्याकडे पुरेपूर असल्यानं त्याने हे आव्हान स्वीकारलं. एकदा का कोणतही आव्हान स्वीकारलं की तहानभूक विसरुन कामाला लागायचं हे त्याचं वैशिष्ट्य ! आताही तसच झालं.

त्या काळात जपानमध्ये मेट्रो रेल्वेचं काम उत्तमरित्या झाल्याचं त्याला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने मेट्रो रेल्वे म्हणजे, नेमकं काय? हे बघण्यासाठी जपानला जाण्याची वरिष्ठांना परवानगी मागितली. ती मिळताच त्याने जपानकडे प्रयाण केलं. तिथे गेल्यावर त्याने पुढील चार दिवस केवळ मेट्रो रेल्वेचाच अभ्यास केला. या अभ्यासातूनच त्याच्या लक्षात आलं की हे काही फार अवघड कार्य नाही. तो कोलकता येथे परतला, तेव्हा त्याच्या मनात मेट्रो रेल्वे तयार होऊन धावायला सुध्दा लागली होती !

वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची त्याला खात्री होती. तो पुन्हा वेगाने आणि शिस्तबध्दरीत्या कामाला लागला. पुढच्या सहा-सात वर्षात भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोलकता येथे प्रत्यक्ष धावू लागली. भारतातील मेट्रो रेल्वेच्या पायाभूत सुविधांची पायाभरणी आणि उभारणी अशा प्रकारे झाली.