(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

हिप हिपअफगानिस्तान 

भाग दोन

टोळीनं अफगानिस्तानाला जाण्याचा निवडला तो शनिवारच. कारण आजोबांचं मंदिरात जाणं सर्वांनाच ठाऊक होतं. त्यांच्या पाठोपाठ टोळी गेल्यावर टोळीचा काही दुसरा विचार आहे हे कुणाच्याही लक्षात आलं नसतं. शनिवारी सर्व आजोबामंडळी आणि टोळी सकाळी आठ वाजताच बजरंगबली मंदिरात पोहचली. बजरंगबलीस नमस्कार आणि फेरी मारुन झाल्यावर सर्व आजोबांसह टोळीनं अफगानिस्तानकडे प्रयाण केलं

000

 दोन तास उलटले तरी आजोबा घरी परतलं नाही  म्हणून टिल्लूच्या आईबाबांना काळजी वाटू लागली. मंदिरात इतका वेळ कधीच बसत नसत. टिल्लूही घरी आला नव्हता. टिल्लूच्या बाबांनी पिल्लूच्या घरी विचारणा केली. पण तिथेही तो नव्हता. पिल्लू आणि आजोबा घरी नसल्याचं, त्याच्या आईबाबांनी सांगितलं. पिल्लूच्या आईबाबांनी तेजूच्या घरी विचारलं. तेजूच्या आईबाबांनी टिनूच्या घरी आणि टिनूच्या आईबाबांनी पिनूच्या घरी. तेव्हा या सर्वांच्या लक्षात आलं आख्खी टोळीच घरी नाहीय. सोबत आजोबा मंडळी नाहीय.

          आता मात्र सर्वांच्या घरी चिंतेचं वातावरणं निर्माण झालं. टिल्लूचे बाबा मंदिरात जाऊन आले. पूजाऱ्याने आजोबा आणि मूलं आल्याचं आणि दहा मिनिटे मंदिरात थांबल्यावर सर्वजण मंदिरातून निघून गेल्याचं त्यांनं सांगितलं. याचा अर्थ मंदिरातूनच सर्व आजोबा आणि टोळी गायब झाली होती.

000

          टिल्लूच्या बाबांनाघाम फुटला. आपले वडील असं कसं बेजाबदारपणे वागू शकतात. असं ते स्वत:लाच म्हणाले. ते घाईघाईत घरी आले. तो पर्यंत तेजू, पिल्लू,टिनू आणि पिनूचेही आईबाबा त्यांच्या घरी गोळा झाले होते. टिल्लूच्या बाबांसोबत आजोबा परत आल्याचे बघून काहीतरी गडबड घडल्याचं सर्वांच्या लक्षात आलं.

          आता काय करायचं हो. कुठे शोधायचं यांना. पिल्लूची आई म्हणाली.

 मुलं काय लहानच आहे, पण बाबांचं काय, त्यांना नको का कळायला असं वागल्यानं आमच्या जीवास किती घोर लागेल म्हणून. टिल्लूची आईची किंचित फनकाऱ्यानं टिल्लूच्या बाबांकडे बघत म्हणाली.

          अहो आमच्या घरी पण तेच, पिल्लूच्या आईनेही तेच रडगाणं लावलं. तेजू, पिल्लू, टिनूचेही आजोबा असेच गायब झालं होते. म्हणजे या सर्वांनी  आपला मामा बनवायचा असं तर ठरवलेलं दिसतय. तेजूचे बाबा म्हणाले.

          आता घरी येऊ द्या, चांगलीच खरडपट्टी काढते,त्यांची. तेजूची आई रागानं म्हणाली.

 ते आपण सगळेच जण करु, पण आता काय करायचं.कुणालाही नीट काही माहीत नाही. सोबत पैसे आहेत की नाही ठाऊक नाही. जेवणार कुठं. चक्कर येऊन पडले तर. कित्ती आफतच नाही का.

          सर्व आईबाबांना मुलांचा आणि आपल्या वडिलांचा फार राग आला होता. पण तो राग व्यक्त करण्याची वेळ नव्हती. बघता बघता दोन वाजले. पण कुणाचा अद्याप पत्ता नव्हता .टिल्लूच्या आजोबांकडे मोबाइल होता. पण तो त्यांनी घरीच ठेवल्याचं बाबांना दिसलं. आता संपर्क करायचा तर कुठे आणि कुणाकडे हा प्रश्न सर्वांना पडला. दुपारी जेवण्यासाठी मंडळी घरी गेली. कुणालाही अन्न गोड लागेना.

 0000

 आजोबांचा आणि मुलांचा राग जरी आला होता तरी आता त्याची जागा चिंतेनं घेतली होती. पुन्हा सर्व आईबाबा टिल्लूच्या घरी जमले. चार वाजायला आले होते. आता मात्र सर्वांनाच फार भीती वाटायला लागली. शेवटी सर्वानुमते ठरलं की नजिकच्या पोलीस ठाण्यात जायचं नि हरवल्याची तक्रार दाखल करायची.

          सर्व बाबामंडळी पोलीस ठाण्यात गेली. इन्सपेक्टर साहेबांना भेटले. सकाळपासून सहातास झाले तरी चार आजोबा नि पाच मुलं घरी परतली नाहीत. त्यांच्याशी काहीच संपर्क होत नाही. ते कुठे गेले हे काही माहीत नाही. असं जेव्हा टिल्लूच्या बाबांनी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं, तेव्हा तेही चक्रावलेच. सलग सहा तास नऊ व्यक्ती कुणालाही सांगता अशा गायब होतात, तेव्हा ती काळजी करणारी घटनाच असते. त्यांनी सर्व रिपोर्ट नोंदवून घेतला. टिल्लूचे आजोबा आणि टिल्लू पिल्लूचे तेजूचे वर्णन लिहून घेतले. वायरलेस वरुन या वर्णनाच्या व्यक्तींची माहिती त्यांनी सर्वत्र कळवली. काळजी करु नका. असं त्यांनी सर्व बाबांना सांगितलं.

 हे सगळं करण्यात दीडदोन गेले. सात वाजायला आले. पण अद्यापही कुणी घरी आलं नव्हतं. मोबाइल वरुन पिल्लूच्या आईनं कळवलं. तेव्हा पिल्लूच्या बाबांना रडूच कोसळलं.

 अहो रडू नका, कुणालाच काही होणार नाही.असे नऊ जण एकाएकी गायब होऊ शकत नाही. कुणी त्यांना पळवूही शकत नाही. शिवाय तुमची मुलं स्मार्ट दिसतात.त्यांचा स्मार्टपणा आणि या सर्व आजोबांचा वयोमानानुसार आलेला सुज्ञपणा यांचा मेळ घालून समजा, ते कोणत्याही संकटात सापडले तरी ते सुखरुप घरी परत येतील बघाइन्स्पेक्टर साहेबांनी सर्वांना समजावलं. सर्व बाबांचे चेहरे रडवलेले झाले होते.

          सर्वजण जाण्यासाठी निघाले तोच टिल्लूच्या बाबांचा मोबाईल वाजला. सर्वमंडळी घरी परत आल्याचं आईनं सांगितलं. सर्वांना हायसं वाटलं. इन्स्पेक्टर साहेबांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांनी आपल्या गाडीतून सर्व बाबांना  सोसायटीत पोहचवलं. त्यांच्यासोबत तेही टिल्लूच्या घरी आले.

000

 टिल्लूच्या घरी सर्व मुलांच्या आईंचं रागावणं सुरु होतं. मुलं खाली मान घालून बसली होती तरी आजोबामंडळी वेगवेगळ्या दिशेनं बघत होती. वातावरण तंग होतं. इन्स्पेक्टर साहेबांच्या लक्षात सर्व परिस्थिती आली. वातावरणातला ताण कमी व्हावा म्हणून ते म्हणाले,

 झालं गेलं ते गंगेला मिळालं, असं म्हणतात. चला चहा पिऊ या की,

          हो साहेब, बसा मी लगेच चहा करते. टिल्लूची आई म्हणाली.

 इन्स्पेक्टर साहेब बसले. सर्व बाबा मंडळीही बसली. इन्स्पेक्टर साहेबांना उत्सुकता होती की जवळपास दहा तास ही नऊ मंडळी गेली तरी कुठे ? त्यांनी थेट प्रश्नच विचारला.

 कसा गेला आजचा दिवस..

 मस्त ! टिल्लूचे आजोबा आणि पिल्लूचे आजोबा एकाच वेळी म्हणाले. इकडे तिकडे बघणारे सर्व आजोबा मंडळी आता इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागले. मुलंही वर बघू लागली. सर्वांच्या मनावरील ताण थोडा कमी झाला.

          मस्त म्हणजे? गेला होतात तरी कुठे इतका वेळ? इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं.

 अफगानिस्तान..टिल्लूच्या  आजोबांनी सांगितलं.

          क्या बात है, दहा तासात अफगानिस्तानात जाऊन परत सुध्दा आलात. आम्हाला सुध्दा सांगा की याचं सिक्रेट..

          इन्स्पेक्टर साहेब आश्चर्यचकित होऊन आणि किंचित उपहासानं विचारतं झालं

000

          अफगानिस्तान मोहिमेचा वृत्तांत मग एक एक देऊ लागला. अफनागिस्तान नावाचं एक नवं ट्रेझर हंट गेम व्हिलेज लागलं होतं. वेगेवगळ्या प्रकारची खेळ, दुकानं, थिम पार्क ,खाण्यापिण्याची रेलचेल, पुस्तकांची दुकानं आणि अफगानिस्तान नावाच्या अनोख्या परिराज्याचा सैरसपाटा असं बरचं काही आहे तिथं. तेजूनं सांगितलं.

 वाव, आम्हास सुध्दा जायला पाहिजे की तिथे..पण बाळांनो, हे तुम्ही आईबाबांना सांगितलं असतं तर त्यांनी नसतं का नेलं तुम्हास दाखवायला. त्यांनीही आनंद घेतला असता याचा. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले.

 आता मुलांची कळी खुलली. पिनू पटकन म्हणाला,

 तोच तर प्रॉब्लेम आहे ना ,आईबाबांना आमच्या अभ्यासाशिवाय काही सुचत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास अभ्यास. सुट्यातही तेच.

          हो का. पण म्हणून आईबाबांना असं सांगता दहा तास बाहेर राहणं बरोबर नाही ना बाळांनो.

          अहो काका आम्ही कुठे लपून गेलो. आम्ही बजरंगबलीस आधी सांगायचा प्रयत्न केला. पण तो ढिम्म राहिला .मग सर्व आजोबांना सांगितलं. ठरवून सांगितलं.

          खरचं की..हुषार आणि शहाणी बाळ आहात तुम्ही..पण आजोबा तुम्ही कां बरं सांगितलं नाही घरी..मुलं मुलांसारखीच वागणार. पण आपण तसं नसत वागायचं . तुमची मुलं किती काळजी करत होती बघा दिवसभर. रडकुंडीला आली ती..

          इन्स्पेक्टर साहेब, घरी सांगायचं नाही, असच आमच्या सर्वांचं ठरलं होतं, टिल्लूचे आजोबा इन्स्पेक्टरसाहेबांकडे बघत म्हणाले.

           अहो साहेब, आम्ही सांगितलं असतं तर ना या पोरांना जाता आलं असतं ना आम्हाला .या सगळ्यांनी आम्हाला जवळपास बंदिस्तच केल्यासारखं आहे. इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. कोलमडाल. गाडीचा धक्का बसेल.खाली पडाल. हाड तुटेल. जखम होईल. डोक्याला मार लागेल. हेच कानावर पडलं असतं आमच्या. टिल्लूचे आजोबा म्हणाले.

 वृध्द माणसांना असं एकाच जागी एकाच ठिकाणी बसवून ठेवणं योग्य आहे का सांगा बरं साहेब, पिनूचे आजोबा म्हणाले.

          कधीतरी महिन्या दोनमहिन्यातून आम्हास बाहेर नेलं, इकडे तिकडे फिरवलं. तर काय बिघडेल हो यांचं

          आम्ही काय दररोज थोडच ने म्हणतो यांना.

          यांना जसा रुटिनचा कंटाळा येतो, आम्ही वृध्द झालो म्हणून आम्हास येत नाही, असं कसं समजतात ..

 एकापाठोपाठ एक आजोबा मंडळी आपल्या मनातलं बोलत गेली. त्यांचं बोलणं खरचं होतं. गेल्या वर्षभरात एकही आजोबा मंदिर सोडल्यास घराच्या बाहेर पडले नव्हते. त्यांना कुणीही स्वत:हून बाहेर हॉटेलात, सिनेमाला, बगिच्यात, मॉलमध्ये नाटक, समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेले नव्हते. तसा विचारसुध्दा एकाही बाबांच्या मनात आला नव्हता. सर्व आईबाबांच्या लक्षात आपण चूक करतोय हे लक्षात येतं गेलं. बाबामंडळीचा राग तसा गेलाच होता. आईमंडळींचा राग हळूहळू कमी झाला. चेहऱ्यावरची नाराजी दूर झाली.

          इन्स्पेक्टर साहेबांनी चहा संपवला. ते जायला निघाले. दारात पाऊल ठेवल्यावर ते परत फिरले. सर्व आजोबांच्या पायाला नमस्कार केला. टिल्लूला जवळ घेऊन म्हणाले, या मुलांमुळे माझीही चूक लक्षात आली. उद्या मी माझ्या आईबाबांना घेऊन अफगानिस्तान सफरीस जातो..

          हिप हिप, पिल्लू म्हणाला

          अफगानिस्तान..इतर मुलांनी सुर दिला..