(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

नाल्याशी मैत्री

तेजामयी ज्या कॉलनीत रहायची, त्या कालनीच्या बाजूने एक नाला वाहतो. त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळया प्रकारची झाडंझुडपं आहेत. त्या झाडाझुडुंपावर ऋतुंप्रमाणे फळं-फुलं येतात. वेगवेगळे पक्षी सारखे येतात. दिवसभर त्यांचा किलबिलाट सुरु असतो.

नाल्याच्या पाण्यात वाहत येणाऱ्या जड वस्तू, ओंडके, फाटे, कचरा यावर काही बगळे ध्यानमग्न ऋषींसारखे बसलेले असतात. पाण्याच्या प्रवाहासोबत त्यांच्याही हळूवार प्रवास सुरु असतो.

पावसात हा नाला धो धो वाहतो. त्यावेळी तो नाला न वाटता छोटी नदी वाटते. नदीकाठी घरटे अपुले छान, असं तेजोमयी आणि तिच्या मित्रांनांही वाटायचं. मात्र पावसाळा संपला की पाण्याचा प्रवाह आटू लागे. मग नाल्याचा खालचा गाळ आणि घाण दिसू लागे. या नाल्यात महापालिकेचे सांडपाणी सोडलं जाई. त्यावर प्रक्रिया केली असली तरी कधीकधी त्याचा दुर्गंधही येई. उन्हाळयात काळाठिक्कर गाळ बघायला मिळे. तेव्हा, कॉलनीतल्या प्रत्येक घरी या नाल्याला नावंबोटं ठेवणं सुरु व्हायचं.

हा नाला नसता तर किती बरं झालं असतं? किंवा आपलं नशिबचं खोट म्हणून आपल्याला या नाल्याचा शेजार मिळालाय, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात.

या नाल्यास नावबोटं ठेवलेलं तेजोमयीस अजिबातच आवडत नसे. एकदोनदा तिने तसं आईबाबा सांगितलं सुध्दा. पण तुला त्यातलं काय कळतं? असं म्हणून दोघांनीं तिला गप्प बसवलं. तिच्या मित्र-मैत्रिणींच्या घरी  थोड्या फार फरकानं अशाच प्रतिकिया आल्या होत्या.

एकदा मारुतीरायाच्या मंदिरात तेजोमयी आणि टोळी (कल्याणी, वैष्णवी, विनय, प्रदीप, टिल्लू, पिल्लू) जमले असता, नाल्याचा विषय तेजोमयीनं छेडला.

सर्वांनी त्यांचे त्यांचे आईबाबा नाल्याचे शत्रू असल्याचं घोषित केलं.

अरे, पण त्याने काय साध्य होणार? आपल्याशिवाय आणि मारुतीरायांशिवाय हे कुणाला ठाउुकाय? आपण काही आईबाबांना तुम्ही नाल्याचे शत्रू आहात हे सांगू शकत नाही? तेजोमयी म्हणाली.

आपण, पोलिसांमध्ये तक्रार केली तर? कल्याणीने सूचना केली.

अगं, आपण तक्रार करु पण, नाल्याने तसं सांगितलं तरच पोलीस कारवाई करतील ना? नाला तर काही बोलू शकत नाही. वैष्णवी म्हणाली.

आपण पळून जाऊन, आईबाबांचा निषेध केला तर? प्रदीप म्हणाला.

हा तर मोठ्ठाच मूर्खपणा ठरेल. समस्येपासून जे पळतात, ते नवे प्रश्न निर्माण करतात. त्यांना हे प्रश्न सोडवणं जमत नाही. विनयने कुठेतरी वाचलेलं वाक्य एखाद्या तत्ववेत्यांच्या आविर्भावात उच्चारलं. सगळेजण हसले. सर्वांनी मारुतीरायांकडे बघितलं. तेही हसले असावेत असं काहींना वाटलं. मात्र मारुतीराया तोंडावर बोट ठेऊन गप्पच असलेले दिसले.

याचा अर्थ विनयच्या म्हणण्यात मारुतीरायास तथ्य वाटतय. म्हणजेच समस्येपासून पळायचं नाही, तर ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा? तेजोमयी म्हणाली.

म्हणजे काय करायचं? टिल्लूनं विचारलं.

०००

आईबाबांचं नाल्यासोबतचं शत्रूत्व मिटवण्यासाठी काय करायला हवं? यावर टोळी विचार करु लागली. विचार करता करता, तेजोमयीला एक कल्पना सुचली.

आपण महापालिकेच्या आयुक्तांनाच भेटलो तर?

ते काय करणार?

ते म्हणणार, तुमचं तुम्ही बघा.

अरे भेटून तर बघू? तेजोमयी म्हणाली. अखेर हो नाही करत, टोळी तयार झाली.

पण आता त्यांच्यापुढे प्रश्न पडला, महापालिकेत जायचं कसं? आयुक्तांना भेटायचं कसं?

तुमची सर्वांची तयारी असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. तेजोमयी म्हणाली.

ते कसं ? पिल्लू म्हणाला.

हे बघा, आपण एके दिवशी सकाळी शाळेसाठी निघालो की तिकडे न जाता, बसस्टॉपवर जायचं. तिथून एक बस थेट महापालिकेजवळ थांबते. तिथे उतरलो की मग आयुक्तांच्या ऑफिसमध्ये. तेजोमयी म्हणाली.

००००

ठरल्याप्रमाणे एके दिवशी टोळी शाळेत न जाता महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात पोहचली. याला त्याला विचारत सगळे जण त्यांच्या दालनापर्यंत पोहचले. शाळेच्या पोषाखातील, पाठीवर दफ्तर लटकवलेली ही मुलं बघून तिथे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं. इथे कशासाठी पोरांनो? एक दोन जणांनी हटकलं. आयुक्तांच्या दालनाच्या दरवाज्याजवळ उभ्या असणाऱ्या सुरक्षा सैनिकांना थोडं रागावून कशासाठी आलात इथे? असं विचारलं. तेजोयमीनं न भीता, आयुक्त साहेबांना भेटायच असं सांगितलं. तेव्हा तो सुरक्षा सैनिक आधी हसला. आणि नंतर डोळे वटारुन म्हणाला,

आयुक्त साहेबांना भेटीसाठी आधी वेळ घ्यावी लागते. आणि काय रे तुमचं असं कोणतं काम आलय इतकं महत्वाचं की थेट तुम्ही त्यांनाच भेटू इच्छिता? अभ्यास, शाळाबिळा नाही वाटतं? सुरक्षा रक्षक दरडावून म्हणाला.

अहो, आमचं काम महत्वाचं आहे म्हणूनच आम्ही आलोय ना. कल्याणी म्हणाली.

तुमच्या कामापेक्षा आयुक्त साहेबांना खूप महत्वाची कामं असतात. चला जा इथून, तो सुरक्षा सैनिक त्यांच्यावर ओरडला. त्याच्या आरडओरडीमुळे टोळी हिरमुसली. लहान तोंड करुन परतू लागली.

त्याचवेळी तिथे एक सुटाबुटातले गृहस्थ येताना दिसले. तेजोयमी त्यांच्याकडे धावली आणि म्हणाली,

सर, आम्हाला मदत करा .

या अनपेक्षित कृतीने ते गृहस्थ दचकले आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले.

सर, आम्हाला मदत करा. वैष्णवीही बोलून गेली.

या मुलांचं असं वागणं बघून सुरक्षा सैनिक हाटहूट करु लागला. ते बघून त्या गृहस्थाने त्या सुरक्षा रक्षकाला थांबवलं.

काय रे मुलांनो,मी काय मदत करावी असं वाटतय तुम्हाला? मी कोण? हे तरी तुम्हाला ठाऊकाय आहे का?

सर, तुम्ही आयुक्त साहेब ना! कल्याणी म्हणाली.

नाही म्हणजे, तुम्हीच आयुक्त साहेब असले पाहिजेत असं वाटतं सर, विनयही किंचित घाबरलेल्या स्वरात  म्हणाला.

या मुलांचा काहीसा धिटपणा आणि घाबरेलपणा बघून त्या गृहस्थास हसू आलं. त्याने सर्वांना सोबत घेऊन आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला.

सर, तुम्हीच आयुक्त ना. तेजोमयीने विचारलं.

हो मीच आयुक्त. पण मुलांन, तुम्ही शाळेच्या वेळात इकडे कुठे आलात? याचा अर्थ तुम्ही शाळा बुडवलेली दिसते. म्हणजे उद्या शाळेतही राग खाणार आणि घरी ओरडा? कशासाठी केलत हे सारं? आयुक्त साहेब त्यांच्या खुर्चीवर बसत म्हणाले. त्यांनी सर्वांना त्यांच्यासमोर बसण्यास सांगितलं. शिपायाकरवी, सर्वांना पाणी आणि महापालिकेच्या कँटिनमधील वडापाव आणायला सांगितलं.कशासाठी इथे आलात? ते त्यांनी पुन्हा विचारलं.

आपल्या कॉलनीच्या बाजूला असलेल्या नाल्याला सर्वांचे आईबाबा शत्रू माणतात. तो त्यांचा गैरसमज दूर करण्याचा काहीच मार्ग सुचला नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो  असं  तेजोमीयनं एका दमात सांगून टाकलं. सर्व मुलं आता एकटक आयुक्तांकडे बघू लागली. ते  आपली समस्या सोडवणार की, आपल्याला हाकलून लावणार, असं काहीसं त्यांना वाटलं.

नाल्यासोबत मैत्री, असं तेजोमयीच्या तोंडून बाहेर पडलेल्या वाक्यानं आयुक्तांच लक्षं वेधून घेतलं. मुलांना नाल्याची काळजी वाटते, हे त्यांच्यासाठी एकदम नवं आणि आनंदाचही होतं.

त्यांनी मुलांचं कौतुक केलं. आपण नक्कीच तुमच्या आईबाबांना नाल्याशी मैत्री करायला लावू असं ते म्हणाले. या रविवारी कॉलनीत स्वत: येऊन हा प्रश्न मिटवू असं त्यांनी सांगितलं.

एव्हाना वडापाव आला होता. सर्वांनी मजेत तो खाल्ला. तो त्यांचा निर्भेळ आनंद बघून आयुक्तानांही वडापाव खाण्याची इच्छा झाली. तेही त्यात सामील झाले.

०००

आयुक्तांना निरोप घेऊन टोळी घरी पोहचली. आज सर्वांनी बुट्टी मारल्याचं शाळेतनं पालकांना कळवलं गेलचं होतं. त्यामुळे सर्वांना घरी चांगलाच ओरडा खावा लागला. कशासाठी बुट्टी मारली, हे खोदून खोदून विचारल्यावर, ही अतिशहाणी मुलं फारच शेफारली असल्याचं बहुतेक सर्व पालकांना वाटलं. आयुक्तांना भेटून आल्याचं कारण ही बनवाबनवीही असू शकते असं एकदोन पालकांना वाटलं.

पण त्यांचं हे वाटणं आयुक्त साहेबांनी रविवारी खोटं ठरवलं. त्यांच्या ऑफिसमधून आधीच सोसायटीच्या अध्यक्ष-सचिवांना ते येणार असल्याची कल्पना देण्यात आली. त्याप्रमाणे कॉलनीतले रहिवासी त्यावेळेला सोसायटीच्या ऑफिसमध्ये आणि आवारात हजर राहिले.

ठरलेल्या वेळी आयुक्त साहेब आले.

आल्याआल्या त्यांनी दोन दिवसांपूर्वी येथील मुलांनी येऊन जे काही सांगितलं त्याविषयी सविस्तर चर्चा केली. मुलांना, जो नाला मित्र वाटतो तो तुम्हाला कसा काय शत्रू वाटतो? असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रश्नाचं कुणालाही नीट उत्तर देता आलं नाही. घाण वास येतो, दुर्गंधी येते, बघायला कसतरी वाटतं अशा प्रकारची उत्तर दिली गेली. आयुक्तांनी मग सोसायटीच्या अध्यक्ष-सचिवांसोबत नाल्याची पाहणी केली.

नाल्यात बराच कचरा साचला होता. तो वेळोवळी साफ केला तर हा नाला सुध्दा आनंद देऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं.

पण साहेब, याची स्वच्छता नेहमी-नेहमी कशी शक्य आहे. सोसायचीचे अध्यक्ष म्हणाले

कां नाही? महिना पंधरा दिवसातून तुम्ही सगळे जण करा ना ही स्वच्छता. त्यासाठी आम्हीही सर्व मदत करु. साहित्य देऊ. तुमची मुलंही आनंदानं यात सहभागी होतील. आयुक्त म्हणाले.

यावर फार उत्साहवर्धक प्रतिक्रिया आल्या नाहीत. आयुक्तांना बोलायला काय जातं? असेच भाव सर्वांच्या चेह-यावर उमटले. ते आयुक्तांनी बरोबर ओळखले. त्यांना हसूही आलं. थोडावेळ अध्यक्ष आणि सचिवांसोबत गप्पा मारुन ते निघून गेले.

मुलांच्या आगावूपणामुळे आयुक्तांचा वेळ वाया गेला. सोसायटीचा एक पदाधिकारी म्हणाला.

अरे]पण या निमित्त ते आले तरी ना आपल्या कॉलनीत, एवढा मोठा अधिकारी कशाला येतोय इकडे?  दुसरा म्हणाला.

पण त्यांनी नाला स्वच्छतेचा सल्ला दिला त्याचं काय? तिसरा म्हणाला.

जाऊ दे रे अशा मोठ्या अधिकाऱ्यांना असे सल्ले द्यावेच लागतात. या कानानं ऐकायचं नि त्या कानानं सोडायचं. चौथा हसत म्हणाला. सगळी मंडळी आपआपल्या सदनिकेकडे निघून गेली.

०००

दुपारी चमत्कार घडला. आयुक्तसाहेब पुन्हा आले. त्यांच्यासोबत आणखीही काही अधिकारी- कर्मचारी होते. सोबत त्यांनी नाला साफ करण्याचं साहित्य आणलं होतं. ते आल्याचं कळताच लगबगीने कॉलनीतली मंडळी पुन्हा घराबाहेर पडली. तेजोमयी आणि तिचे मित्र मैत्रिणीही बाहेर आले.

आयुक्तांनी त्यांना बघताच आनंद व्यक्त केला. त्यांनी मुलांना आपल्यासोबत आणलेले साहित्य दिलं आणि सर्वांना नाल्याकडे चलायला सांगितलं. आयुक्त, मुलं आणि काही कर्मचारी नाल्याजवळ पोहचले. आयुक्तसाहेब थेट नाल्यात उतरले आणि त्यांनी गाळ काढायला सुरुवात केली. त्यांचं बघून मुलही उत्साहानं जमेल तसं गाळं काढू लागली. इतर कर्मचारीही कामाला लागले. सोसायटीतील मंडळी आश्चर्यानं थक्कच झाली. आयुक्त स्वत: गाळ काढताय म्हंटल्यावर अर्ध्या तासानंतर हळूहळू काही मंडळी पुढे आली. पुढे तास दीड तासात कितीतरी गाळ निघाला. नाला स्वच्छ दिसू लागला…

नाल्यासोबत मैत्री करायची असेल केवळ  त्याच्याबद्दल वाईट बोलून नव्हे त्याच्यातल वाईट म्हणजेच घाण  आणि कचरा काढण्यासाठी मनापासून प्रयत्न करयाला हवं असा धडा आयुक्तांनी घालून दिला. तेजोमयी आणि टोळीचा हा आगावूपणा असला तरी तो आता बऱ्याच जणांना भावला. आजची पोरं खरच स्मार्ट असल्याचं बरेच पालक एकमेकांना बोलून गेले.

सुरेश वांदिले