कोण बिच्चारे?
तेजामयी आणि बाबा दररोज संध्याकाळी घराजवळ असलेल्या बागेत फिरायला जात. परवा ते जरा उशिरा बागेत गेले. त्यावेळी अंधार दाटून आला होता. बागेतील रंगीबेरंगी लाईट लागल्याने, इंद्रधनुष्यी प्रकाशाने बाग अंधारात उजळून निघाली. पायवाटेवरुन चालणाऱ्यांसाठी कोणतीही अडचण नव्हती.
बागेतील या पायवाटेची एक फेरी पूर्ण झाल्यावर, चालण्यास गती आणि लय प्राप्त होत असे. या लय आणि गतीत तेजोमयी आणि आणि बाबांची दुसरी फेरी सुरु असताना मध्ये कुणीतरी बाबांना हटकलं,
थांबा थांबा…
काय झालं काका? तेजोमयीनं विचारलं.
अगं थांब, इथे इकडून एक मोठा साप गेला. तो गृहस्थ घाबरलेल्या स्वरात म्हणाला. साप गेल्याचं कानावर पडताच या पायवाटेवरुन जाणारी माणसं एकमदम थबकली आणि थांबली. काहीजण इकडे-तिकडे सर्पोबा कुठे दिसतो का? म्हणून बघू लागले.
अहो, पण इथं थांबायचं कशायला? तेजोयमीने पुन्हा विचारलं.
साप गेला ना. एव्हढच पुन्हा तो गृहस्थ कपाळावरील घाम पुसत बोलला.
साप इथून गेल्यानं काही बिघडलं का? बाबांनी विचारलं.
साप असा रस्त्याच्या मधून जाणं चांगलं नसतं? ती व्यक्ती काहीतरी बोलायची म्हणून बोलली.
असं जाणं म्हणजे? आडवं की सरळ? तेजोमयीनं विचारलं.
याचं उत्तर काही त्या गृहस्थाला देता आलं नाही. त्याचा आपला एकच हेका, साप गेला थांबा. पुढं जाऊ नका. सापाचं असं जाणं चांगलं नसतं.
आम्ही गेलो तर काय होईल? बाबांनी विचारलं.
तुमचं तुम्ही बघा बुवा ! मी सांगण्याचं काम केलं. ती व्यक्ती म्हणाली. बाबा त्याच्या खांद्याला थोपटत म्हणाले,
अहो, साप इथे असा बसून थोडच राहणार? त्याला रस्ता दिसला असेल नि गेला असेल आतापर्यंत कुठल्याकुठे.
ठीक आहे, जा तुम्ही. मी उलट्या दिशेने जातो बुवा, मला नाही धोका पत्करायचा असं म्हणून ती व्यक्ती उलट्या दिशेने निघून गेली.
मांजर आडवी गेली तर वाईट होतं किंवा चांगलं नसतं हे तेजोमयीनं ऐकलं होतं आज त्यात सर्पोबाची भर पडली.
बिच्चारे! तेजोमयीच्या तोंडून उस्फुर्त उद्गार निघाले. बाबांनी तिच्याकडे बघितलं.
कोण बिचारे गं?
अहो सर्पोबा आणि मांजरताई नाही का? तेजोमयी म्हणाली. यावर बाबा हसले.
कां हो बाबा, काय झालं ?तेजोमयीनं विचारलं.
अगं ते बिच्चारे नाही तर आपण बिच्चारे! त्या निरुपद्रवी प्राण्यांना भिणारे आणि वरुन शूरवीर-बहादूर असण्याचा फुकाचा अहंकार बाळगणारे आणि आव आणणारे!
बाबांचं म्हणणं तेजोमयीस पटलं तिने बाबांकडे टाळीसाठी हात पुढे केला.
सुरेश वांदिले