टिल्लू-पिल्लू संकटात
कोंबडेकाकूंना एका कामासाठी बाहेर जायचं होतं.जाण्याआधी त्यांनी टिल्लू या त्यांच्या पिल्लास सांगितलं की,मी येईपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही.शहाण्या बाळासारखं वागायचं.तसच वागण्याचं टिल्लू पिल्लूने कबूल केलं.कोंबडेकाकूंनी त्याचं लाड करुन त्या कामासाठी निघून गेल्या.जाताना त्यांनी कावळा,कबूतर आणि पोपटास टिल्लू-पिल्लूकडे लक्षं देण्यास सांगितलं.सर्वांनी होकार दिला.
टिल्लू पिल्लू घरातच खेळू लागला.पण त्याला काही वेळाने त्याला कंटाळा आला.थोडं बाहेर जाऊन येऊ या.असं तो स्वत:शीच बोलला.पण आईने तर सक्त ताकीद दिली होती,बाहेर न पडण्याची, त्याला आठवलं. बाहेर न पडण्याचं आपण आईस कबूल केलय,त्यामुळे आता बाहेर पडलो तर आईची फसवणूक होईल,असं त्याला वाटलं.पण हा विचार त्याने झटकून टाकला.
आपण घराच्या बाहेर पडू आणि लगेच आत येऊ,असं स्वत:लाच सांगत टिल्लू पिल्लू घराचा उंबरठा ओलांडू लागला.तेव्हा दाराजवळच्या झाडाच्या लोंबकाळणाऱ्या एका फांदीवर बसलेल्या पोपटाने त्याला हटकलं,
अरे बाळ, तू असा बाहेर पडू नकोस, तुझ्यावर मांजर हल्ला करेल नि खाऊन टाकेल.
टिल्लू-पिल्लूने पोपटाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्याकडे तुच्छतेनं बघून तो आता बाहेर पडला आणि अंगण ओलांडणार तोच, कबुतर त्याच्याजवळ येऊन म्हणाला,
अरे तू, असा एकटा जाऊ नकोस,समोर एक अजगर दगा धरुन बसलाय.तुला बघताच तो हल्ला करुन तुला ठार करेल. पण टिल्लू पिल्लूने कबुतरच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष केले. जो त्याच्या आईचं ऐकत नाही तर आपलं काय ऐकणार असं स्वत:शीच पुटपुटून कबूतर उडून गेला.
टिल्लू पिल्लू तुरुतुरु पुढे जाऊ लागला.छान वारा सुटला होता.आंब्याची झाडं मोहरुन गेली होती.इकडे तिकडे पक्षी उडत होते.स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता.टिल्लू पिल्लूला ही भ्रमंती खूप आवडली होती.असं एकट्याने फिरण्यातच मस्त मजा असते.आई आपल्याला कां बरं ही मजा घेऊ देत नाही?असं तो मनात म्हणाला.घरी गेलो की आईला जाब विचारुन तिच्याशी कट्टीच घ्यायला हवी.असे काहीबाही विचार त्याच्या मनात येत राहिले.
थोडं दूर गेल्यावर कावळा त्याच्या जवळ आला नि त्याला म्हणाला.
अरे, तुझं आतपर्यंत फिरणं बस झालं.समोर एक लांडगा बसलाय.तुला बघताच तो तुझ्यावर उडी मारेल नि खाऊन टाकेल तुला.
प्रत्येकजण आपल्याला उगाचच घाबरवतोय.त्यांना आपला आनंद काही बघवत नाही.दुष्ट लेकाचे, असं तोंडातल्या तोंडात पुटपुटून टिल्लू पिल्लूने कावळ्याच्याही सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं नि तो पुढे निघाला.
टिल्लू पिल्लू संकटात सापडणार हे लक्षात येताचे कावळा जोरजोराने ओरडू लागला.ते बघून पोपट आणि कबूतर तिथे आले.याच्या आईला कळवलं पाहिजे नाहीतर याचा जीव धोक्यात यायचा.कावळा पोपटाला म्हणाला.
अरे, मी याला सावध केलं होतं.पोपट म्हणाला.
मी सुध्दा सावध केलं होतं.पण हा स्वत:ला फारच शहाणा समजतो.मरु दे त्याला.भोग म्हणावं न ऐकण्याची शिक्षा.कबूतर रागाने म्हणाला आणि उडून गेला. पोपटही उडून गेला.
कावळ्याला काही सूचेना तो जोरजाराने ओरडू लागला.त्याचं ओरडणं टिल्लू पिल्लूच्या आईच्या कानावर गेलं.काहीतरी अशूभ घडतेय हे तिच्या लक्षात आलं.त्यामुळे आपलं हातातलं काम सोडून ती, कावळा ओरडत असलेल्या ठिकाणाकडे पळत सुटली.ती जेव्हा टिल्लू-पिल्लू जवळ पोहचली,तेव्हा समोरचं दृष्य बघून ती प्रचंड घाबरुन गेली. कारण समोर दडून बसलेल्या अजगराने बरोबर डाव साधला होता.टिल्लू पिल्लू नजरेच्या टप्प्यात येताच त्याने त्याला गिळण्यासाठी जिभ बाहेर काढली.तो टिल्लू पिल्लूला गिळणार तोच झरदिशी एक गरुड खाली आला नि त्याने अलगद टिल्लू पिल्लूला उचललं.अजगर चरफडतच राहिला.
कावळ्याच्या आरडाओरडीमुळे तो गरुड पक्षी तिथे आला होता. गरुडाने चोचीत पकडून ि टिल्लू पिल्लूस वर नेल्याचं बघून कोंबडीच्या जीवात जीव आला.मात्र ती धाय मोकलून रडू लागली. ते बघून गरुड हळूवार खाली आला आणि त्याने अलगद टिल्लू पिल्लूला आईजवळ सोडले.
झाल्या प्रकाराने तो भेदरुन गेला होता.त्याला काही सूचत नव्हतं.आईला बघताच त्याने मान खाली घातली आणि रडायला लागला.
गरुड त्याला म्हणाला,हे बघ बाळ,आज तुझ्या प्राणावरच बेतलं होतं.मी वेळेवर आलो नसतो आलो तर तुला अजगराने गिळलं असतं.
हो हो हो टिल्लू पिल्लू रडत रडत म्हणाला.
हे संकट तू स्वत:हून ओढावून घेतलस ना…
हो हो हो..टिल्लू पिल्लूने पुन्हा मान हलवली.
कशामुळे घडलं असं..गरुडाने विचारलं.
आईचं न ऐकल्यानं,टिल्लू पिल्लू म्हणाला.
आईचच नव्हे तर तुला सावध करणाऱ्या पोपट,कबूतर आणि कावळे काकांचही तू ऐकल नाहीस.मोठयाचं सांगणं आपल्या हिताचं असतं.तिकडे दुर्लक्षं केलं की अशी संकटं येतात.
हो हो हो गरुड काका..यापुढे मी कधीही आईची अवाज्ञा करणार नाही आणि ती सांगेल तसंच वागेन.टिल्लू पिल्लू म्हणाला आणि हुंदके देत आईच्या कुशीत शिरला.
सुरेश वांदिले