राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
अनुसूचित जाती संवर्गातील ब-याच विद्यार्थींनींना देशातील दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळत असतो. अशा विद्यार्थींनींना सर्व प्रकारचं अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही योजना राबवण्यात येते.
या संस्थांमध्ये आयआयटी, एनआयटी, आएआयएम, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, फिल्म ॲण्ड टीव्ही इंस्टिट्यूट, जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, केंद्रीय विद्यापीठे आदी संस्थांचा समावेश आहे. याशिवाय काही दर्जेदार खजगी शिक्षण संस्था ( उदा- बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिलाणी, इंडियन बिझिनेस इंस्टिट्यूट) यांचा समावेश आहे. (या संस्थांची संपूर्ण यादी संकेतस्थळावरील, रोजगार लिंक या ठिकाणी बघावयास मिळते.)
शिष्यवृत्तीचे स्वरुप
या शिष्यवृत्तीमध्ये (१) अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क, (२) परीक्षा शुल्क, (३)नोंदणी शुल्क, (४) ग्रंथालय शुल्क, (५) संगणक खरेदी शुल्क, (६) जिमखाना शुल्क, (७)संस्थेच्या विकास (डेव्हलपमेंट)कामांसाठीचे शुल्क,(८) वसतिगृह शुल्क,(९) भोजन शुल्क अशासारख्या बाबींचा खर्च भागविण्यासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्यात समावेश आहे.
इतर लाभ
(१) एखाद्या संस्थेतील वसतिगृहात संबंधित विद्यार्थींनीस प्रवेश न मिळाल्यास त्यांना, अशा संस्थेच्या वसतिगृहासाठीचे आणि भोजन शुल्क दिले जाईल. (२)वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थींनींना निर्वाह भत्ता दिला जाईल. (३) अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांच्या खरेदीसाठी व इतर शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे दरवर्षी १० हजार रुपयांचं अर्थसहाय्य केलं जाईल.
अटी आणि शर्ती
(१) संबंधित विद्यार्थींनी महाराष्ट्राची रहिवासी असावी. (२) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावं. (३) पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनीची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनीच कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी. (३) संबंधित विद्यार्थीनीस प्रथम वर्षास प्रवेश मिळायला हवा. (४) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेतली जाणारी दहावी आणि १२ वीची परीक्षा किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या इतर शैक्षणिक मंडळातून उत्तीर्ण होणं आवश्यक. (५) पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीनीस बारावीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळणं आवश्यक. (६)थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीनीस पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमामध्ये किमान ५५ टक्के गुण मिळणं आवश्यक . (७) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीनीस पदवीपरीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळणं आवश्यक.
या शिष्यवृत्तीसाठी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थीनीही अर्ज करु शकतात. मात्र पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थीनी उपलब्ध न झाल्यासच अशांचा विचार केला जातो.
योजनेचा अर्ज ,www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार लिंक येथे ठेवण्यात आला आहे.
संपर्क– आयुक्त समाजकल्याण, ३, चर्च रोड, पुणे- ४११००१, ईमेल-swcedn.nattionalscholar@gmail.com
०००