(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 रेश्माचं झाडं होताना…    

अभ्यास करता करता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकलीच. कारण ती काही फळा-फुलांनी बहरेली हिरवीगार झाडं नव्हती. तर जळून काळी ठिक्कर पडलेली, फांद्यांची सालं विस्कटून गेलेली, पानं शुष्क झालेली अशी दोन्ही झाडं एखाद्या भूतासारखीच वाटत होती.

दचकलेली रेश्मा घामाने ओलिचिंब झाली. ती ओरडणार तोच, एका झाडाने तिला पकडलं आणि दुसऱ्याच्या ताब्यात दिलं. रेश्माने भीतिने डोळे गच्च बंद केले. ही झाडं आता आपल्याला गिळून टाकणार अशी तिला भीती वाटू लागली.

रेश्माला घेऊन ती दोन्ही झाडं प्रचंड वेगानं उडू लागली. कितीतरी वेळ ती उडत होती. मग कधीतरी त्यांचा वेग हळूहळू कमी होऊ लागला. रेश्माला त्याची जाणीव झाली. तिने दोन्ही डोळे किलकिले करुन बघितले. ती झाडं खाली येत होती. खाली अग्निच्या ज्वाळा दिसू लागल्या. आता तर रेश्माची खात्रीच पटली, ही झाडं आपल्याला या आगित टाकणार याची. तिच्या घशाला कोरड पडली. देवाचा धावा करु लागली….

पण तसे काही झाली नाही. त्या दोन्ही झाडांनी रेश्माला अलगद खाली उतरवले.

एक झाडं तिला प्रेमानं म्हणालं,

बाळ डोळे उघड, तू घाबरु नकोस, आमची भीती बाळगू नकोस. तुला आम्ही काही करणार नाही.

आपल्या आजोबांसारखेज प्रेमळ बोल ऐकून रेश्माच्या जिवात जीव आला. तिने डोळे उघडून बघितलं. झाडांनी तिला एका नदीच्या किनारी आणलं होतं.

आपणास काहीही झालं नाही हे बघून तिला विश्वास बसत नव्हता. तिने अवतीभवती बघितलं. समोर विस्तिर्ण जंगल होतं. तिथे वणवा पेटला होता. त्या वणव्यात एक एक वृक्ष जळून खाक होत होतं.

रेश्माला नदी किनारी घेऊन आलेला अचानक एक वृक्ष अचानक रडू लागला…तो म्हणाला,

रेश्माताई, बघ,बघ हा असा वणवा कधीही लागतो आणि आमच्या भाऊबहिणींना जाळून टाकतो. मी राम आणि हा माझा भाऊ कृष्ण आम्हीसुध्दा अशाच एका आगीत सापडलो. पण देवाच्या कृपने वाचलो. पण आमची स्थिती बघ काय झाली ते. तुला आम्ही भूत आहोत असं वाटलं ना?

हो हो हो… रेश्मा म्हणाली.

आम्ही भूत नाहीत पण जंगल असच पेटत राहिलं तर ही सगळी झाडं खरोखरच भूत बणून जातील.असं बोलून त्याने हुंदका दिला.

तूच आता काहीतरी कर ताई?

म्हणजे मी काय करु? आणि मी काहीतरी करु शकते हे तुम्हाला कसं काय वाटलं? रेश्मानं भीतभीत विचारलं.

तू झाडांवर आणि कृत्रिम बुध्दीमत्तेवर खूप खूप प्रेम करतेस हे आम्हाला ठाऊक आहे.

पण ते कसं शक्य आहे? आपण तर आजच पहिल्यांदा भेटलो.

झाडांवर प्रेम करणारी माणसं ही झाडासारखीच असतात. प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी, सर्वांचं सदैव चांगलं चिंतणारी. तुला तर ठाऊकच आहे ना झाडं परस्परांशी बोलतात. त्यांना जाणून घेतात. तुही झाडं आणि आम्हीसुध्दा झाङ. मग तुझ्याबद्दल आम्हाला सारं काही न कळायला काय झालं? दुसरे झाड म्हणाले.

आपण एक झाड, या कल्पनेनेच रेश्मा भारावून गेली.आपण झाडासारखे हलतोय डुलतोय, आपल्या अंगाखांद्यावर पक्षी येऊन बागडाहेत. गात आहेत. या कल्पनेत ती रंगून गेली. इतकी की नदीला ओलांडून वणवा तिच्यापर्यंत कधी पोहचला तिला कळलं नाही.

त्या ज्वाळा तिला गिळणार तोच ती ओरडली वाचवा, मला वाचवा. ओरडतच ती खाडदिशी जागी झाली…

तिला दरदरुन घाम सुटला होता. आपण स्वप्न बघत असल्याचं तिच्या लक्षात आल्यानं तिला थोडसं हायस वाटलं आणि त्या क्षणी परवाच तिने जंगलातील वणव्याविषयी वाचलेलं तिला आठवलं.

 युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिका या देशातलं ०.५ अब्ज हेक्टर जंगल अशाच वणव्यात गेल्या काही वर्षात जळून खाक झालं. आता हे वनक्षेत्र पूर्ववत होण्यासाठी किती तरी वर्ष लागतील. झाडांना कदाचित नवी पालवी येईल. पण जळून खाक झालेले पशू,पक्षी,सूक्ष्म जीव काही जिवंत होणार नाहीत. हे वणवे काही प्रमाणात नैसर्गिक असले तरी आता मात्र तापमानबदलामुळे त्यात भयावह वाढ झालीय. या तापमानबदलास किंवा हवामानबदलास मानवी हस्तक्षेप मोठाच कारणीभूत झालाय. तापमानात वाढ झाल्याने भूपृष्ठाचं तापमान सतत वाढत चाललय. त्याची सर्वाधिक झळ कोरडं हवामान असणाऱ्या भागाला बसते. तिथे वणवे लगेच पेटून सर्वत्र आग पसरते.

रेश्मा राहते अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात. तिथे ८० टक्के भागात दरवर्षी दुष्काळ पडतो. तेथील हवेच्या आद्रतेचं प्रमाण बिघडून गेलेय. आसपासच्या जंगलाला सतत आग लागत राहते. आगीचे लोट आणि धुर यामुळे रेश्माला सतत मास्क लावू राहावा लागतो. या जंगलातील झाडं तर जळून खाक होतात. पण जंगलात राहणारे शेकडो पशू-पक्षी-किटक-सूक्ष्मजीवही भक्ष्यस्थानी पडतात.

ते दोन्ही झाडं म्हणाले, त्याप्रमाणे मी सुध्दा एक झाड असेल तर या वणवण्यात एके दिवशी मी आणि माझ्यासारखी अनेक मुलं मुली जळून खाक होतील का?रेश्माच्या मनात विचार आला. या विचाराने ती थरथर कापू लागली.

संकट तिच्यापर्यंत पोहचलं होतं. पण संकटाला भिण्याऐवजी त्याचा सामना करायचा ही शिकवण तिच्या आजोबांनी तिला दिली होती. या शिकवणीची तिला आठवण झाली.

झाडं म्हणालं त्याप्रमाणे कृत्रिम बुध्दीमत्तेचा उपयोग यासाठी नक्कीच करता येईल, असं रेश्मा मनात म्हणाली. या विचाराताच  ती झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी याच विचारात ती उठली. कृत्रिम बुध्दीमत्तेचा उपयोग करायाचा म्हणजे काय करायचं? तिला या विषयात आवड चांगली आणि गती असल्याने तिच्या बाबांनी याचाच अधिकाधिक अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता.

कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आता चित्र काढण्यासाठी, कविता करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामांसाठी केला जात असल्याचं तिला एव्हाना चांगलंच ठाऊक झालं होतं. तसाच उपयोग जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी करता येणार नाही का? रेश्माने स्वत:ला प्रश्न केला.

अर्थातच, या प्रश्नाचं उत्तरही तिनेच स्वत:ला दिलं. ते उत्तर हो असं होतं. या उत्तराने तिच्यात उत्साह संचारला. ती  तिच्या प्राध्यापकांना जाऊन भेटली. या कल्पनेनेही तेही भारावले. तिला त्यांनी उत्तेजन दिलं. दिशा सुचवली.

मग, रात्रंदिवस जंगल्यातील वणव्याच्या अभ्यासात रेश्मा गढून गेली. तापमान, हवेतील आद्रता, वाऱ्याचा वेग, मातीचा कोरडेपणा, मानवी हस्तक्षेप हे घटक, वणव्यासाठी जबाबदार असल्याचं तिच्या लक्षात आलं.

मग तिने कृत्रिम बुध्दीमतेचा भाग असलेल्या मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. एखाद्या यंत्राला स्वत:हून विचार करण्यासाठी काही आकडेमोड (कोडिंग) किंवा अलगोरिदम तयार करुन त्याला ते देता येतं. त्यानंतर तो या तंत्राच्या सहाय्याने त्याला विचारलेल्या समस्येचा निराकरणासाठी उत्तरं शोधू शकतो. यास डीप लर्निंग म्हणतात.

डीप लर्निंग तंत्राने युक्त मशिन किंवा यंत्र त्याला विचारलेली समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी, त्याच्याकडे दिलेली माहिती याचा स्वत:च सूक्ष्म अभ्यास करतो आणि समस्यचं उत्तरही शोधतो.

रेश्मानं या डीप लर्निंग तंत्राचा वापर करण्याचं ठरवलं. वणवा लागणाऱ्या घटकांची विस्तृत माहिती ती यंत्राला पुरवू लागली…

त्यातूनच एक नवं प्रारुप किंवा मॉडेल तयार झालं. जंगलातील वणवे कधी लागू शकतात याचा अंदाज करणारं! हे प्रारुप ९० टक्के अचुक अंदाज व्यक्त करत असल्याचं स्पष्ट झालं.

त्यामुळे जंगलावर कधीही उद्भवू शकणाऱ्या या संकटाचा सामना करणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे जंगलातील झाडांसोबत पशू-पक्षी आणि सूक्ष्मजीवाही वाचू शकतील.

जंगलातील वणव्यांसाठी कृत्रिम बुध्दीम्मत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर वाईल्ड फायर, या संशोधन प्रकल्पावर आधारित एक तिने ॲपही तयार केला.

या ॲपची चर्चा जंगलातील वणव्यासारखीच अमेरिकेत पसरली. तिचं संशोधन तपासलं गेलं. त्यात ते मेरिटमध्ये उत्तीर्ण झालं. नोव्हेंबर २०२१ मध्ये रेश्मा कोसाराजू या १५ वर्षीय मुलीच्या, जंगल संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगाने केलेल्या या संशोधनाची दखल घेऊन चिल्ड्रन्स क्लायमेट पारितोषिकासाठी निवड केली गेली…

जंगलातले प्राणी, जंगलातली झाडं आणि मी वेगवेगळचे थोडेच आहोत. त्यांना वाचवणं म्हणजे मला स्वत:लाच  आणि माझ्या सारख्या मुलांनाच वाचवणं! असं रेश्माला वाटतं.

जंगलांचा अंधाधुंदरित्या तोड करणाऱ्या मोठ्या मानणांसाही असंच वाटावं अशी मनोमने प्रार्थनाती कायम करत असते.

सुरेश वांदिले