नाही म्हणजे नाही…
ऋषीने आज ठरवलं शाळेत जायचं नाही म्हणजे नाही. तो फार हट्टी नाही. पण जेव्हा कधी हट्ट करतो तेव्हा मात्र कुणालाही ऐकत नाही.
बरेच दिवसानंतर त्याने आज हट्ट केला होता. शाळा संपत आलीच होती. मात्र शाळेत वेगवेगळे उपक्रम सुरु होते. त्यात त्याने भाग घ्यावा असं त्याच्या आई-बाबांना वाटत होतं.
आज कथाकथनाची स्पर्धा होती. तो कथाकथन चांगला करु शकतो असं आईबाबांना वाटत असल्याने त्याने आज शाळेत जायला हवं असं, आईबाबांना वाटत होतं.
मात्र ऋषीचा शाळेत जायला ठाम नकार.
आईबाबांनी कित्ती समजावलं. मोमोज देतो, आईसक्रीम देतो, पिज्जा देतो असं काही काही आमिष त्यांनी दाखवली. पण गडी ढिम्म! त्याच्या तोंडाला काही पाणी सुटलं नाही. शेवटचा उपाय म्हणून आई त्याला म्हणाली, तू नाही गेलास तर बघ..
बघ काय मम्मा, मी मारेन असंच तुला म्हणायचय ना…
तस नाहीरे.
तसच आहे, तू मारलस तरी मी आज जाणार नाही.
पण इतका हट्ट बरा नाही बाळ, बाबा त्याला समजावत म्हणाले.
पण बाबा, मला आज जायचच नाही तर कां तुम्ही आग्रह करता? ऋषिने प्रतिप्रश्न केला.
स्पर्धेत भाग घेता आला असत ना…
बोरिंग असते ती…
आता यावर काय बोलणार असं बाबांना वाटलं.
तू आमचं ऐकलं नाहीस तर तुला उचलून घेऊन जाईल. बाबा रागावत म्हणाले..
न्या की…मी शाळेत जाईन नि झोपी जाईन.
आँ! बाबा आणि आईने एकाच वेळी आँ केला.
किती रे हा हट्ट…असा हट्ट करणं चांगलं नाही राज्या.आई त्याला जवळ घेत म्हणाली.
मला ठाऊक आहे मम्मा,पण आज मला कंटाळा आला असेल तर मी स्पर्धेत कसा काय चांगली कामगिरी करणार? तिथे जाऊन मी झोपणारच ना.मग गेली की नाही तुझी खेप वाया. मला नेण्या-आणण्यासाठी तुझा असा वेळ वाया जाणं बरोबर का, तूच मला सांग?
ऋषीचा प्रश्न बिनतोड होता. याचे उत्तर ठाऊक असूनही आईबाबांना देता येणं शक्य नव्हतं. दोघांनींही ह्ट्टी ऋषीपुढे हात जोडले. त्याचा नाद सोडून दोघेही आपल्या कामाला लागले.
ऋषी हसला. परवाच बाबाने त्याला दिलेल्या गोष्टीच्या नव्या पुस्तकात त्याने डोके खुपसले.बघता बघता तो या कथा वाचण्यात दंग होऊन गेला.
शाळेत गेला असता तर त्याचा नि माझा वेळ वाया गेला असता, घरी राहिला तर त्याचा वेळ सत्कर्णी लागला…आई पुस्तकात रंगून गेलेल्या ऋषीकडे बघत बाबांना म्हणाली.बाबांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
सुरेश वांदिले