(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बुडूक आणि तुडूकची मात्रा

रविचे वडील मोठे नामांकित डॉक्टर. त्यांच्याकडे रुग्णांची मोठी रांग लागायची. रविवारचा एक दिवस सोडला तर, सहाही दिवस किमान दहा तास तरी दवाखाना सुरुच. त्यामुळे त्यांची संपत्ती हळूहळू वाढत गेली. काही वर्षात ते धनाढ्य झाले.

अशा या श्रीमंत डॉक्टरांच्या घरी रविचा जन्म झाला, तोच मुळी सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच. त्यामुळे त्याला बालपणापासून सर्व सुखसोईंची काहीच कमतरता नव्हती. त्याने म्हणायचा अवकाश की हवी ती गोष्ट त्याच्यापुढे हजर! त्याच्या कोडकौतुकात त्याचे आईबाबा कोणतीही कसूर सोडत नसत. रवी हळूहळू मोठा होऊ लागला. आपल्या घरी लक्ष्मी पाणी भरते हे त्याच्या लक्षात आलं. त्याचा त्याला आता अभिमान वाटू लागला.

लक्ष्मी प्रसन्न असल्यावर आपणास काहीही करण्याची गरज नाही, असं त्याला अधूनमधून वाटायचं. त्याचे काही मित्र त्याला मग हरबऱ्याच्या झाडावर चढवत. त्याचं फुकाचच कौतुक करत. फक्त त्याला त्यांनी राजाच तेव्हढं बनवायचं सोडलं होतं. हरबऱ्याच्या झाडावर चढवण्याची जबर किंमत मग हे मित्र वसूल करत. म्हणजे त्याला महागड्या महागड्या वस्तू घ्यायला लावून त्या स्वत:ला भेट म्हणून ते घेत. आजूबाजूच्या महागड्या हॉटेलात जाऊन ते रवीच्या पैशावर मौजमजा करत असत.

रविचे बाबा त्याला महिन्याच्या खर्चासाठी पैसे देत. इतरांच्या तुलनेत ते बरेच असत. पण तो सतत हे पैसे मित्रांवर उडवत असल्याने हळूहळू पैसे कमी पडू लागले.

आपणास आणखी पॉकेटमनी वाढवून हवा, असं त्याने एके दिवशी आईबाबांना सांगितलं.

वा! वा! कां नाही, अरे मी कमवतो ते सारेच पैसे तुझेच की राज्या. बाबा कौतुकानं म्हणाले.

बाबांना बिलगून रवीने त्यांना थँक्यू म्हंटलं.

अहो, तुमच्याकडे भरपूर पैसे असले तरी, ते तुमच्या कष्टाचे आहेत. आधीच आपण याला खूप पैसे देतो, आणखी कशासाठी हवेत हे तर विचारा आधी…आई रागाने म्हणाली. आपल्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो करणारी आई आज कशी काय अशी वेगळीच बोलली, असं रविला वाटून त्याने चेहऱ्यावर नापसंतीचे भाव आणत आईकडे बघितलं.

बाबानांही आधी आश्चर्य वाटलं आणि लगेच रविची आई जे म्हणते यात त्यांना तथ्य वाटू लागलं.

बाळ, तुला आणखी पैसे कशासाठी हवेत, त्यांनी रविला जवळ घेऊन विचारलं. याचं काय उत्तर द्यावं हे आधी त्याला कळेना. काय सांगावं याचा तो विचार करु लागला.

याचा अर्थ तू पैशाची उधळपट्टीच करतो, असा नाही का? त्याला गप्पच राहिल्याचं बघून आईनं विचारलं.

उधळपट्टी म्हणजे काय? रवीने विचारलं.

अरे, उधळपट्टी म्हणजे नासधूस करणं. उधळून लावणं.

पण मी काही पैशांची नासधूस करत नाही.

मग काय करतोस?

मित्रांना हॉटेलमध्ये घेऊन जातो, त्यांना छान छान खाऊपिऊ घालतो. त्यांना भेटवस्तू देतो…

पण बाळा, हे सगळं कशासाठी करतोस तू? तुझे मित्र करतात का असा खर्च?

नाही…

मग तूच का करतोस त्यांच्यावर इतका खर्च? आईने पुन्हा विचारलं. आई आपला पिच्छा सोडणार नाही हे लक्षात आल्याने रविने त्याचे मित्र त्याचं कसं कौतुक करतात, तो किती स्मार्ट आहे, हुषार आहे, श्रीमंत आहे, असं सारखं सांगत असतात, असं सांगितलं.

अच्छा, तर तुला ते हरबऱ्याच्या झाडावर चढवतात म्हणायचं. बाळा, कोणताही पराक्रम न गाजवता, काहीही विशेष कामगिरी न करता जेव्हा कुणी कौतुक करतं, तेव्हा समजायचं की ते आपणास हरबऱ्याच्या झाडावर चढवून मूर्ख बनवतात आणि आपला हेतू साध्य करतात. आईने त्याला समजावून सांगितलं.

माझ्या हे लक्षात आलं नाही हो…बाबा म्हणाले.

अहो, मुलांना केवळ पैसे देऊन चालत नाही. त्यांना त्याचा उपयोग चांगल्या हेतूसाठी, कामासाठी करण्याचं आपण सांगायला हवं की नाही? बाबांकडे बघत आई म्हणाली

अगदी बरोबर…  

नाहीतर तुमच्या पैशाच्या जीवावर रवीचं वागणं म्हणजे वडिलांचं, बुडूक आणि नाचे तुडूक तुडूक व्हायचं.

आँ! रवीने ऑ फाकला..

बाळा, बाबांच्या पैशाच्या जोरावर किंवा कीर्तिवर आपला मोठेपणा जे दाखवतात ना, त्यांच्यासाठी ही म्हण आहे. मोठेपणा, कीर्ती, संपत्ती ही परिश्रमाने, अभ्यासाने चांगल्या सवयीने मिळत असते. मित्रांवर विनाकारण पैसे उडवून नव्हे. आई म्हणली.

रवीला आईचं म्हणण पटलं. त्याने  आपल्याला यापुढे पॉकेटमनी नको, जेव्हा गरज भासेल तेव्हाच आणि तेवढेच पैसे मागेल असं स्वत:हून सांगितलं.

बुडूक आणि तुडूकची मात्रा लागू पडल्याचं बघून आई बाबा दोघेही खूष झाले.