(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा…(भाग एक)

आपण जंगलाचा राजा असल्याचा अभिमान सिंहेश्वराला होता. त्यामुळे तो सर्व प्राण्यांना हिडिस फिडिस करत राहायचा. वननगरीत त्यामुळे सिंहेश्वराबाबत फार नाराजी होती. या सिंहेश्वराला चांगला धडा शिकवला पाहिजे असं अनेक प्राण्यांना वाटायचं. पण धडा कसा शिकवायचा हे काही कुणाला कळत नसे.

सिंहेश्वर धिप्पाड होता. त्याचा डामडौल इतरांपेक्षा वेगळा होता. त्याची गर्जना ऐकून बहुतेक सर्व प्राणी गर्भगळीत होत. त्याच्या पायाची अनुकचिदार नखं, त्याचा तो प्रचंड आकाराचा जबडा, जबड्यातील तीक्ष्ण दात बघून सर्वच प्राणी त्याला बघतातच चळचळ कापत. सिंहेश्वर कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यास मागेपुढे पाहत नसे. शिकारीच्या वेळेस त्याचं वेगानं धावणं, सावजावर उडी मारुन त्याची मान पकडणं, मग मटकावत त्या प्राण्याला खाणं हे त्याचं रुप अनेक प्राण्यांना माहीत होतं. त्यामुळे वननगरीतील कोणताही प्राणी त्याच्या वाटेला जात नसे. त्यामुळेसुध्दा सिंहेश्वराचा स्वत:बद्दलचा अभिमान आणखिनच वाढला होता.

सगळे प्राणी तुच्छ आहेत. आपणच एकमेव श्रेष्ठ आहोत. या वनाचेच नव्हे तर जिथेजिथे वन आहेत, त्याठिकाणचे सम्राट आहोत असं त्याला वाटायचं. दिवसेंदिवस त्याचं वागणं क्रुर होत गेलं. त्यामुळे वननगरीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे वनगरीच्या प्राण्यांनी ठरवलं की, आपण हे वनच सोडून दूर निघून गेलं पाहिजे. पण कुठं जायचं, हे काही कुणास सांगता येईना.

या समस्येवर चर्चा करण्यासाठी हत्तीरावांनी प्राण्यांची सभा बोलावली. यासभेला बहुतेक लहान मोठे प्राणी हजर होते. सभा सुरु होताच एक एक प्राणी सिंहेश्वराच्या क्रुरतेच्या गोष्टी सांगू लागले.

हा सिंहेश्वर स्वत:ला प्राण्यांचा राजा समजतो. पण याला राजा केले तरी कुणी? घोडेरावानं प्रश्न उपस्थित केला. हा असा प्रश्न आतापर्यंत कुणालाच पडला नव्हता. वनामध्ये प्रत्येकजण स्वतंत्रपणे जगत होता. आपआपल्या भागात सुखानं राहत होता. कुणाच्या अध्यातमध्यात हे प्राणी पडत नसत. आपआपले प्रश्न स्वत:च किंवा आजूबाजूच्या प्राण्यांच्या मदतीनं सोडवत असत. असं घोडेरावानं सभेच्या लक्षात आणून दिलं.

सिंहेश्वर स्वत:ला राजा समजतो तर मग त्याचा दरबार पाहिजे. त्याचं सैन्य पाहिजे. त्याने आपल्या नागरिकांची म्हणजे आपली काळजी घेतली पाहिजे. आपल्यासाठी सोई केल्या पाहिजे. उन्हाळ्यात आपणास पाण्याचा किती त्रास होतो. पाण्यासाठी किती भटकंती करावी लागते. सिंहेश्वरानं कधीतरी आपल्या पाण्याची व्यवस्था केली आहे का? वनाच्या आत असलेल्या तळ्यात उन्हाळयातही पाणी असतं. तिथे हा सिंहेश्वर आणि त्याची पोरटोरच पाणी पिऊ शकतात. आपण त्याच्या भीतीनं तिथे जाऊ शकत नाही. चुकून गेलो तर सिंहेश्वर आपल्याला मारुन टाकतो. मेजवाणी समजून आठ-आठ दिवस तिथेच खात बसतो. मौजमजा करतो. नाही का? हरिणीने ही बाब सर्वांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा, असा हा दुष्ट सिंहेश्वर आपला राजा कसा असू शकतो ? त्याला आपला राजा कुणी केले, याचा आपण जाब विचारलाचा पाहिजे. मोर म्हणाला.

पण, आपण हा जाब कुणाकडे विचारणार? कोल्हाला प्रश्न पडला. हा प्रश्न बरोबरच होता. कारण वननगरीमध्ये याचं उत्तर देणारे कुणीही नव्हतं. अशी चर्चा बराच वेळ सुरु होती. सिंहेश्वरापुढे आपण सर्वप्राणी हतबल आहोत, असं जवळपास एकमतच झालं.

आपण हे वनच सोडून गेलो तर..अजगर म्हणाला.

बरोबर आहे. हे वन सोडून गेलो तर या सिंहेश्वराला एकटच या जंगलात राहावं लागेल. मग त्याला शिकारीसाठी एकही प्राणी सापडणार नाही. भुकेने व्याकूळ होऊन तो मृत्यू पावेल. लांडगोबानं तर्क मांडला. त्यांचं म्हणणं अनेकांना पटलं. पण पुन्हा तोच प्रश्न आला की हे वन सोडून जायचं तर कुठे ? कारण प्राण्यांना वनाशिवाय दुसरीकडे राहता येणे शक्य नाही. वनातच त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची आणि त्यांच्या कुटुंबाची सोय होते. अशी दुसरी जागा कुठे मिळणार ? कोणताच प्राणी कधीही वनाच्या बाहेर गेला नव्हता. शहामृगानं चिंता व्यक्त केली. त्याचं म्हणणं योग्य होतं.

वननगरीच्या बाहेरचं जग कोणत्याही प्राण्याला फारसं ठाऊक नव्हतं. हत्ती, मोर अजगर अशासारखे प्राणी बाहेर एकदोनदा बाहेर जाऊन आले होते. पण बाहेरचं जग हे वनापेक्षा अधिक भीतीदायक होतं. तिथे खाण्या-पिण्याची राहण्याची आबाळ होण्याची जास्त शक्यता होती. वननगरी ही आपली हक्काची जागा आहे. सिंहेश्वराची अरेरावी आणि दुष्टपणा सोडला तर इथे मोठी सुरक्षितता होती. हत्तीरावानं आपला अनुभव सांगितला. मग आता करायचं तरी काय? करायच तरी काय? सिंहेश्वराच्या क्रुरतेपासून सुटका करुन घेणं शक्य नाही. आपणास असच भीतभीतच या वनात यापुढे राहवं लागेल, असं वाटून सर्व प्राणी खिन्न झाले.

ही सभा सुरु असतानाच त्या ठिकाणी काही मच्छरं आले होते. प्राण्यांची ही अवस्था बघून त्यांना दया येत होती. सिंहेश्वरापेक्षा कमी असतील तरी काही प्राणी चांगले धिप्पाड होते. त्यातील काही प्राणी शिकारही चांगली करु शकत असत. चपळ होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण सुळे आणि अणुकचिदार नखं होती. असं असूनही हे प्राणी एका सिंहेश्वरास घाबरतात हे ऐकून मच्छरांना दु:ख झाले. सभेतील प्राण्यांच्या चेहऱ्यावरचं दु:ख  आणि विशाद बघून एका मोठ्या मच्छराला राहवलं नाही. सभा संपत असतानाच तो मोठा मच्छर हत्तीरावाच्या कानाजवळ जाउुन म्हणाला, तुझी परवानगी असेल तर सिंहेश्वराला काटा काढण्याचा उपाय सांगू का मी. याबद्दल बोलू का या सभेतील प्राण्यांसोबतच. मोठ्या मच्छराचं हे बोलणं ऐकून त्या दु:खी आणि विषादपूर्ण वातावरणातही हत्तीला हसू आलं. तो फिदकन हसला. त्या हसण्यानं गंभीर झालेल्या सभेचा ताण थोडा कमी झाला.

हत्तीराव, तुम्ही कां हसता आहात. अजगरानं विचारलं.

हसणार नाही तर काय करणार अजगरराव, अहो एक मच्छर माझ्या कानात येऊन म्हणतो की तो सिंहेश्वराला धडा शिकवू शकतो. हा… हा… हा…

हत्ती खो खो खो हसू लागला. हत्तीचं बोल ऐकून इतरही प्राणी ही ही फी फी करत खिदळू लागले. ते हसणं खिदळणं एकूण मोठ्या मच्छराला राग आला. त्याने कोल्हाला डंख मारला. कोल्हा वेदनेनं विव्हळू लागला. वाचवा, वाचवा , वाचवा असं म्हणत ताडकन उभा राहिला.

कुणापासून वाचवा? लांडग्यानं विचारलं.

इथं तर कुणीच नाही. सिंहेश्वरही आलेला दिसत नाही. मग कोण आलंय इथं. मोरानं घाबरुन विचारलं.

असं घाबरु नका. इथं काही सिंहेश्वर किंवा भूत, राक्षस आलेला नाही. आम्ही आलो आहोत. मोठा मच्छर जोराने म्हणाला. तो आणि त्याच्या बरोबरचे साथिदार हत्तीच्या मस्तकावर बसले होते. हत्तीरावाच्या कानात पुन्हा तो मोठा मच्छर म्हणाला, या सर्वप्राण्यांना आमचं काय म्हणनं आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही सांगा.