(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

आई नापास (भागा एक)

 

   कल्याणी सातवीतून आठवीत जाताच, तिच्या आईने तिला आयआयटी प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकण्याची इच्छा बोलून दाखवली. खरं तर कल्याणीला आयआयटी म्हणजे काय, हे त्याक्षणी फारसं ठाऊक नव्हतं. कसलं तरी इंजिनीअरिंगचं शिक्षण एव्हढच तिच्या कानावरुन गेलं होतं. तिला एव्हढच माहीत होतं की तिचा मोठा भाऊ १२ वी नंतर इंजिनीअरिंग शिकायला गेला होता. मग आई आपल्याला आठवीतच कां बरं इंजिनीअरिंगला पाठवतेय? असा तिला प्रश्न पडला. आईचं नेहमीच काहीतरी वेगळंच असतं, असं स्वत:शीच बोलून कल्याणी खेळायला गेली.

   खेळून परतली तेव्हा घरी तिचाच विषय चालला होता. कल्याणीला आत्ताच आयआयटी शिकवणी वर्गात टाकायला हवं असं आई, बाबांना सांगत होती. हे बोल कल्याणीच्या कानावर जाताच ती कान टवकारुन आईबाबांजवळ जाऊन उभी राहिली.

   अगं,तू जरा घाई करतेस असं वाटत नाही का? बाबा म्हणाले.

   यात कसली आलीय हो घाई. हीच योग्य वेळ आहे. पोराच्या वेळेस आपणास आठवीपासूनचे आयआयटी कोचिंग क्लास असतात हे माहीत नव्हतं. आता कळलय. आपल्या ओळखीच्या सगळ्यांनीच टाकलय त्यांच्या मुला-मुलींना आयआयटी शिकवणी वर्गात. आई म्हणाली.

   अगं, पण इतरांसारखच आपण वागलं पाहिजे असं नाही ना.

   अहो, तुमच्या लक्षात कसं येत नाही. आज स्पर्धा किती तीव्र आहे. आपण शिकवणी लावली नाही तर कल्याणी मागे राहील सर्वांच्या.

   अगं, पण तिला आयआयटीचा अभ्यास झेपायला हवा , मुळात आवड हवी. आपण तिला विचारायला हवं. तुला ठाउकच आहे की तिला जरी विशेष कष्ट न करता शाळेच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळत असले आणि समजायला जरी कठीण जात नसला तरी तिला गणितात फार रस नाही. तिला खरी आवड इंग्रजी विषयात आहे. इंग्रजीतलं काहीही वाचून काढते ती न कंटाळता. सगळा हॅरी पॉटर तिने वाचलाय.शिवा ट्रायलॉजीही तिने पंधरा दिवसात वाचून काढली. तेव्हा आपण दोघेही थक्क झालं होतो. आपल्याला तरी शक्य आहे ते. इंग्रजीत नेहमी टॉपर असते. भाषण स्पर्धेत धाडधाड इंग्रजी बोलते. निबंध स्पर्धेतही ती इंग्रजीत लिहते. मुख्याध्यापकांपर्यंत तिच्या इंग्रजी कौशल्याची ख्याती पोहचलीय. इतकं आपल्याला ठाऊक असताना आपण तिला असं इंजिनीअरिंग करायला पाठवणं, मला तर पटत नाही बुवा.

   अहो, हे सारं काही मला माहीत आहे. पण आपण काही तिचे शत्रू नाहीत. राहिला प्रश्न आयआयटी प्रवेशपरीक्षेचा अभ्यास न झेपण्याचा. इतरांच्या मुला-मुलींना झेपतोय की नाही त्यांच्यापेक्षा कल्याणी हुषार आहे, आई म्हणाली.

   बाजूलाच उभ्या असलेल्या कल्याणीकडे बघत तिने विचारलं,

काय गं तुला झेपेल ना..

   याचं काय उत्तर द्यावं हे कल्याणीला कळलं नाही. त्यामुळे ती गप्प बसली. खाली मान घालून टाइल्सला अंगठा घासू लागली. ती अस्वस्थ झाली की असच करायची, हे बाबांना ठाऊक होतं. तिची अस्वस्थता दूर करण्यासाठी बाबांनी तिला विचारलं.

   बाळं तू जाशील का, आयआयटीच्या शिकवणी वर्गात.

   तिथे जाऊन काय हो करायचं बाबा? कल्याणी सहज बोलून गेली.

   गधडे, शिकवणी वर्गात काय फुगडी खेळायला जातात का? वेड्यासारखं बोलू नकोस, आई रागावून म्हणाली.

   तिला रागावतेस का? समजावून सांग की आयआयटी शिकवणी वर्गात जाऊन काय करायचं ते.

   तुम्हीच सांगा ना! म्हणे काय करायचं ते, आई चढ्या आवाजात म्हणाली.

   मग बाबांनी आयआयटी म्हणजे काय, तिथे कसा प्रवेश मिळवायचा असतो. तिथं जाऊन काय करायचं असतं, काय शिकायचं असतं हे सारं कल्याणीला समजावून सांगितलं.

   म्हणजे मला दादासारखं इंजिनीअर करणार आहात का तुम्ही? कल्याणीने विचारलं.

   होय, ते सुध्दा आयआयटीमधूनच. आयआयटीत प्रवेश मिळाला की भाग्यच उजळेल हो माझ्या सोन्यासारखी लेकीचं. आई तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाली.

000

   आईच्या हट्टापुढे बाबांचं काही चाललं नाही. कल्याणीचं नाव तिने आयआयटी प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकलच शेवटी.

   कल्याणी अनिच्छेनेच वर्गाला जाऊ लागली. तिला तो वर्ग अजिबातच आवडला नाही. शिकवणी वर्गात गणित , रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये काहीच रस वाटेना. वर्गाला जाण्याची वेळ आली की तिच्या अंगावर काटा यायचा. हळूहळू तिला वर्गातलं काहीही कळेनासं झालं. त्याचा परिणाम तिच्या चाचणी परीक्षांवर होऊ लागला. पाचव्या चाचणी परीक्षेत तिला शून्य गुण मिळाले. तेव्हा शिकवणीच्या सरांनी तिच्या बाबांना बोलावून घेतलं. कल्याणीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. तिला जर असेच गुण मिळत राहिले तर तिच्या मनावर खूप परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलं.

एकतर  तिला मनापासून अभ्यास करायला सांगा किंवा तिला वर्गातून काढून घ्या. उगाच जबरदस्ती करु नका. तुम्ही तिला वर्गात ठेवलीत तर आम्हालाच फायदा आहे. पण मुलांच्या इच्छेविरुध्द त्यांना काहीही करायला लावू नये असही आम्हास वाटतं. आता निर्णय तुम्हीच घ्या..संचालक म्हणाले.

   योग्य तो निर्णय लवकरच घेऊ, असं बाबांनी त्यांना सांगितलं.

अपूर्ण

   000