सर्वांचा सन्मान करा..(भाग एक)
खूप खूप वर्षांपूर्वी सध्याच्या सिंहमहाराजांच्या आजोबांच्या आजोबांना वननगरितील एका उंदरानं शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटका केली होती. तेव्हापासून सिंह महाराजांची प्रत्येक पिढी उंदरांसोबत छान संबंध ठेऊन होते. कोणत्याही पिढीचे सिंहमहाराज उंदिरांना हिडीस फिडीस करत नसत. प्रत्येक पिढीचा सिंह महाराज त्यांच्या वारसांना एक धडा शिकवायचे की केवळ शक्ती असल्यानेच विजय मिळवता येतो असं नाही तर कधीकधी युक्तीच शक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरते. त्यामुळे लहानमोठा भेदभाव करायचा नसतो. सगळ्यांशी चांगलं वागायला हवं. कोण कधी आपल्या मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही.
सिंहमहाराजांची प्रत्येक पिढीने ही शिकवण तंतोतंत अंगिकारली. सध्याचे सिंहमहाराज तर आणखी दोन पावलं समोर होते. ते उंदराचाच सन्मान करायचे असं नाही तर मुंगीसारख्या छोट्या जीवाचाही आदर करायचे. त्यांना जपायचे. ते आपल्या दरबाऱ्यांना सांगायचे सुध्दा की सर्वांशी आपुलकीनं, बरोबरीच्यानात्यानं वागलं की सर्वजणआनंदी राहतात.
पणसिंह महाराजांचं हेअसं उंदिर ,मुंगी आणि छोट्या छोट्या प्राण्यांशी प्रेमळ व आपुलकिनं वागणं, बोलणं पंतप्रधानवाघोबांना पटायचं नाही. त्यावरुन दोघांमध्ये वादविवाद सुध्दा व्हायचे.
महाराजअसं प्रेमळपणे वागत राहिलात तर हा उंदऱ्या आणि ती मुंगीटली,ती खारुटली तुमच्या आमच्या डोक्यावर बसतील.
यावर महाराज हसत म्हणाले,
वाघोबाजी, तुम्ही कशासाठी चिंता करता हो.अहो तो पिटुकला उंदिर नि चिटुकली मुंगी, इवलीशी खारुमावशी माझ्या डोक्यावर बसल्यानं माझी आयाळ गळून जाणार नाही की माझी मान वाकडी होणार नाही. तुमच्या झुपकेदार मिशांची शान कमी होणार नाही की तुमच्या जिभेवर फोडं येणार नाहीत.
वाघोबांना महाराजांचं बोलणं अजिबातच आवडलं नाही. खरं तर त्यांना महाराजांचा रागही आला. त्यांना आपल्या मिशीवर केलेला विनोद आवडतच नसे. महाराजांच्या जागी दुसरं कुणी असतं तर वाघोंबांनी त्यास एक लगावून दिली असती. पण महाराजांसमोर असा आगावूपणा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते नाखुशी दर्शवत म्हणाले,
महाराज, तुमचं म्हणणं मला पटत नाही. हे शुल्लक आणि क्षुद्र प्राणी कुठे आणि आपण शक्तीशाली राज्यकर्ते कुठे. महाराज अशा कमकुवतांना अशी ढील देणं बरोबर नाही. त्यांच्याशी कठोरपणेच वागायला हवं. असं जर वागलो नाही तर आपला दबदबा राहणार नाही. त्यांच्यावर आपला वचक राहणार नाही. हे शुल्लक आणि शुद्र प्राणी आपणास भिणार नाहीत. जर कुणी भ्यालेच नाही, आपला वचक त्यांच्यावर राहिला नाही तर आपण राज्य कसे करणार? तुमचे आणि माझे आदेश कोण पाळणार?त्यामुळे आपल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल. अव्यवस्था निर्माण होईल. कुणाचा पायपोस कुणात राहणार नाही. जो तो आपल्या मर्जीचा राजा होईल, महाराज. असा गोंधळ कोणत्याच राज्यासाठी चांगला नसतो. आपले शत्रूतर टपूनच बसले आहेत. आपल्या राज्यात कधी अंदाधुंदी निर्माण होते नि त्याचा आपण फायदा घेतो ते. आपल्या राज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या गेंडा राज्याचे आपल्या राज्यावर किती दिवसांपासून डोळा आहे. पूर्वेकडचे डायनोसार राजेही डोळ्यात तेल घालून आपले राज्य कधी कमकुवत होते नि आपण कधी आक्रमण करुन ही वननगरी घशात घालतो यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. या गोंधळाचा लाभ घेऊन शेजारील गेंडाश्री महाराज आणि डायनोसर महाराज आपल्यावर आक्रमण करतील. वननगरी हकनाक त्यांच्या ताब्यात जाईल. वाघोबा, महाराजांना समजावून सांगू लागले.
अस्वल, कोल्हा, लांडगा या दरबाऱ्यांनीवाघोबांना पाठिंबा दर्शवला.
अस्वल म्हणाले,
महाराज तुमच्या आजोबाश्रींच्या काळात जो काही या उंदरानं पराक्रम गाजवला तो आताही गाजवेल असं नाही. त्यास नको तं महत्व दिल्यानं तो शेफारुन जाईल. महाराजांचा मित्र मित्र म्हणून हा उंदिर आणि त्याचे भाऊ बंद महालाचा ताबा घेतील.
कोल्हा म्हणाला,
महाराज अस्वलराव जे बोललं त्यावर विचार करा. त्यांनी बोलून दाखवलेली भीती खरी ठरु शकते. या मुंगटल्यांचा तर काही भरोसाच नाही. लाखा-लाखानं येतील नि आपल्या सगळ्यांना चावत बसतील. आपणास पळून जाण्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही.
लांडगोबा कोल्होबांच्या बोलण्यास सहमती दर्शवत म्हणाले,
हे जीव आहेत लहान पण भारी करामती असतात त्यांच्या. लहान तोंडी मोठा घास घ्यायला हे कमी करणार नाहीत. त्यांच्या करामती आपल्या लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झाला असेल महाराज. तेव्हा आपण काहीच करु शकणार नाही.
०००
सिंह महाराजांनी वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. मनातून या सर्व दरबाऱ्यांचा महाराजांना खूप खूप राग आला होता. आपल्या राज्यातील बिचाऱ्या या निरुपद्रवी छोट्या जीवांबद्दल त्यांची अशी वाईट मतं बघून महाराजांना वाईट वाटलं. आपल्या दरबाऱ्यांना आपल्या शक्तीचा गर्व आणि अहंकार वाटतो. त्यांच्या गर्व आणि अंहकारचा फुगा एके दिवशी फोडणं गरजेचं होतं, हे त्यांच्या लक्षात आलं. राजा म्हणून त्यांना असं एकांगी विचार करणं बरोबर नव्हतं. वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा,अस्वलराव यांच्या सारख्या मोठ्या शक्तीशाली प्राण्यांसोबत राज्यातील छोटे जीव-जंतू-प्राणी-पक्षी हे त्यांचे प्रजानन होते. सर्वांशी समानतेनं वागणं हाच त्यांचा राजधर्म होता. त्यामुळे महाराजांनी दरबाऱ्यांची वेगवेगळी मतेमतांतरे शांतपणे ऐकून घेतले.
वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा,अस्वलराव या दरबाऱ्यांना वाटले की आता महाराज उंदीर, मुंगी यासारख्या छोट्या शुल्लक आणि क्षुद्र प्राण्यांना दरबारात येण्यास मनाई करतील आणि त्यांचं महत्व कमी करणारा आदेश काढतील. पण महाराजांनी तसं काही केलं नाही. त्यांनी कोणताही निर्णय न घेता दरबार बरखास्त केला.
अपूर्ण