घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग दोन)
दक्षिण आफ्रिकेतला महाराज गाढवाला गुळाची चव काय,
या तक्रारीचा निवाडा करण्यासाठी येतो आहे,
असे म्हंटल्यावर
पहिल्या दोन महाराजांची बोबडी वळली.
पहिल्या महाराजांची बोबडी वळली नाही. पण त्यांना यात काहीतरी काळंबेरं दिसू लागलं.
दक्षिण आफ्रिकेतील या सिंहमहाराजांना गाढवाचा एव्हढा पुळका येण्याचं कारणच काय? असा प्रश्न त्यांना पडला. या प्रश्नानं त्यांची झोप उडाली.
त्यांनी सर्व प्रमुख दरबाऱ्यांना आपली शंका विचारली. पण सर्वांनी ही शंका हसण्यावारी नेली.
गाढव आणि घोड्याचा तर हा कुटील डाव नसेल ना, असेही पहिल्या महाराजांना वाटून गेले.
तो कसा काय,
महाराणींनी विचारलं..
अहो, आपणास या अशा आरोपाच्या तक्रारीत गुंतवून ठेवायचं आणि आपलं राज्य ताब्यात घ्यायचं.
गाढव राजा आणि घोडा प्रधान.
पण यात, त्या दक्षिण आफ्रिकेतील महाराजांचा काय संबंध?
त्याची मदत घेऊन हा डाव साधतील ते.
त्यालाच हे राज्य देऊन टाकतील.
मग त्याच्या वतिने गाढव आणि घोडा राज्य करतील.
आपणास हाकलून लावेल तो सिंह महाराज.
एव्हढा काय बलाढ्य असतो आपल्यापेक्षा.
तुम्हीसुध्दा शक्तीशाली आहातच ना महाराज.
त्याने असा काही प्रयत्न केला तर त्याला आपण जमीनदोस्त करुन टाकूना.
महाराणी म्हणाल्या. महाराजांना त्यांचं बोलणं ऐकूण बरं वाटलं. पण त्यांना धोका दिसतच होता.
दुसऱ्या प्रांतातल्या राजाने बलिष्ठ असला तरी काय म्हणून आपल्या राज्यात येऊन निवाडा द्यायचा. आपणच समर्थ नाहीत का, असा प्रश्न त्यांनीच स्वत:ला विचारला.
याप्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी एका विशेष दरबाराचं आयोजन केलं.
पिंकू गाढव आणि ढिंकू घोडा यांनाही या दरबारात सन्मानानं बोलावण्यात आलं. दोघांना महाराजांनी उच्चासनी बसवलं. त्यांचा सत्कार केला. इतर दरबाऱ्यांसाठी हे सारं चमत्कारिक होते. आपल्या हुषार महाराजांच्या बुध्दीला चार दिवसात कसा काय गंज लागला याचा विचार ते करु लागले. महाराजांनी दरबाराचं कामकाज सुरु केलं.
ते म्हणाले ,
पिंकू गाढवराव आणि ढिंकू घोडेराव यांचा आपणास अभिमान वाटतो.
कारण एकानं प्रश्न निर्माण केला आणि दुसऱ्यानं त्यावर आक्षेप घेतला.
असं जेव्हा घडतं.
तेव्हाच ज्ञान वाढतं.
आम्हास यांचं वागणं फार आवडलं आहे.
आम्ही मधल्या काळात गुळाची चव काय असते आणि गाढवरावांना गुळाची चव कळतं काय,
याचा शोध घेतला.
अरे वा महाराज,
मग आपणास काय कळलं महाराज,
प्रधानजी उत्सुकतेने म्हणाले. घोडेरावांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. गाढवरावही आनंदले.
महाराज म्हणाले,
आम्हास जे कळलं ते आणि दक्षिण आफ्रिकेतील महाराजानांही कळलं ते एकच आहे का हे आधी बघून घ्यायला हवं,
असं आम्हास वाटतं.
आपल्याकडचे गाढवराव आणि तिकडचे गाढवराव वेगळे थोडेच आहेत,
नाही का?
अगदी बरोबर. सेनापती म्हणाले.
तेव्हा गाढवाला गुळाची चव काय,
या तक्रारीवर निर्णय देण्याआधी आपण पिंकू गाढवराव आणि ढिंकू घोडेराव यांना दक्षिण आफ्रिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
तिकडचे सिंह महाराज या दोघांना त्यांची माहिती देतील.
हे दोघेजण ती माहिती इकडे घेऊन आले की,
आम्हाला मिळालेली माहिती आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून आणलेली माहिती ताडून बघू आणि मग योग्य तो निवाडा देऊ.
चालेल ना दरबाऱ्यांनो,
महाराजांनी विचारलं.
सर्वांनी होकार दिला. काही दरबाऱ्यांना पिंकू आणि ढिंकूचा हेवाही वाटला. एका साध्या तक्रारीतून या दोघांना महाराजांच्या खर्चातून दक्षिण आफ्रिकेची सफर घडत होती. इतरांपेक्षा हे दोघेही हुषार निघाल्याचं काही दरबाऱ्यांना वाटलं.
पिंकू आणि ढिंकूही आनंदले. बरेच दिवस ते राज्याच्या बाहेर गेले नव्हते.
इतर प्रांतातल्या मोफत सफारीची संधी अशी मिळेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
पहिल्या महाराजांनी लगोलग या दोघांच्या जाण्याची तयारी करुन दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या महाराजांकरवी दक्षिण आफ्रिकेतील महाराजांना तसा निरोप धाडण्यात आला.
000
3
दक्षिण आफ्रिकेतील महाराज या निरोपानं चक्रावलेच. कारण आपण समजतो तसे हे पहिले महाराज अडाणी नाहीत
,याची त्यांना खात्री पटली. या महाराजाला गाढवाला गुळाची चव काय समजू शकते, पण आपणास नाही. याचा अर्थ आपल्या दरबाऱ्यांसह आपणही महामूर्ख आहोतच, असा मनात विचार करत महाराजांनी आरशात बघितले. त्यांना आपण खरोखरच मूर्ख आहोत. आपल्या राज्यातील गाढवापेक्षाही आपली बुध्दीमत्ता कमी आहे, असं वाटू लागलं. असं वाटावं म्हणूनच तर आपल्या आणि तिकडच्या गाढवांनी कट रचला नसेल ना, असंही त्यांना वाटून गेलं.
या सर्व गाढवांचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि घोड्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे असं त्यांनी त्याक्षणी मनोमन ठरवून टाकलं.
त्यांनी दरबार भरवून आपला निर्णय घोषित केला.
दक्षिण आफ्रिकेतल्या जंगलातील गाढवे आणि घोड्यांना जंगलातून हाकलून लावण्याची निर्णय घेत असल्याचं त्यांनी दरबाऱ्यांना सांगितलं.
सर्व दरबाऱ्यांनी उत्तम, असं या निर्णयाचं वर्णन केलं.
या निर्णयाचं पालन ताबडतोब झालं. जंगलातील घोडे आणि गाढव जंगलाबाहेर आले. या महाराजांनी आपला बुध्दीमान निर्णय तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या महाराजांना कळवला. तुम्हीही असा निर्णय घेतला तर आपण कधीच तुमच्या प्रांताकडे येणार नाही असही त्यांनी कळवलं. सर्व महाराजांनी दक्षिण आफ्रिकेतील महाराजांचा निर्णय योग्यच वाटला.
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार हा सगळ्या महाराजांसाठी अपमानास्पदच प्रकार होता. त्यामुळे तिन्ही महाराजांनी लगोलग आपल्याही प्रांतातील घोडे आणि गाढव यांना जंगलातून बाहेर काढले.
पिंकू आणि ढिंकूला याची काहीच कल्पना नव्हती. ते आपले रमतगमत, मजा करत दक्षिण आफ्रिकेकडे प्रवास करत राहिले. ते तिकडे पोहचले की नाही,
याची चौकशी ना पहिल्या महाराजांनी केली. ना दक्षिण आफ्रिकेतल्या महाराजांनी …
गाढवाला गुळाची चव काय हा प्रश्न मात्र जिथल्या तिथे राहिला तो राहिलाच राहिला.या प्रश्नामुळे मात्र गाढव आणि घोड्यांना जंगलातून बाहेर पडावं लागलं ते कायमचं!