(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

(भाग एक)

वेगळी सफर,अनोखा आनंद

मित्रांनो, संपली ना परीक्षा. कसं वाटतय. छान ना. आता काय करायचं ठरवलं या
सुट्यांमध्ये तुम्ही. धम्माल मौज-मस्ती तर होणारच. ती व्हायलाच हवी. नाही का
?

दरवर्षी तुमचे आईबाबा या सुट्यांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी किंवा मग
मामा-मावशीच्या गावाला/शहरात नेतात. तुम्ही सुध्दा हट्ट करत असाल की. यंदा जरा एका
वेगळ्या ठिकाणी जाऊया का
? तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय बरं ? हे वेगळं ठिकाण कोणतं नि तिथे कोण नेणार बरं?

मित्रांनो, हे वेगळं ठिकाण तुम्हास ठाउुक असलेलं नि तुमच्या जवळचं आहे. तिथं
नेण्यासाठी कुणाची गरज नाही. इतकं स्पष्ट केल्यावरही तुम्हास अजून कळलेलं नाही ना.
चला तर, स्पष्टच सांगतो. तुमच्या परिचयाचं नि तुम्हास ठाऊक असलेलं ठिकाण म्हणजे
तुम्ही सध्या राहत असेललं गाव किंवा शहर.

फुस्स की फर्स्ट क्लास

फुस्स. डोंगर पोखरला नि निघाला काय तर पिटुकला उंदिर. अशीच काहीशी
प्रतिक्रिया बऱ्याच मित्रांची राहू शकते. पण मित्रांनो, फुस्स करु नका की हुश्श
करु नका. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे स्वत:ला विचारा की तुम्ही इतकी वर्षे, ज्या
गावात/शहरात राहता, ते तुम्हास कितपत ठाऊक आहे. तुमच्या गावात/शहरात किती उद्याने
आहेत किंवा पडके वाडे किती आहेत. किंवा मग वस्तुसंग्रहालयात नेमकं काय आहे. गाव
किंवा शहराच्या अवतीभवती एखादी नदी आहे का, जंगल आहे का
? हे प्रश्न कधी कोण
विचारत का
? असं तुम्ही म्हणाल. जर कुणी विचारत नसेल तुम्हीच तुम्हाला विचारा. म्हणजे
मग, तुमच्या लक्षात येईल की गड्या, खरच आपण ज्या गावात/शहरात राहतो, त्याबद्दल
बरचं काही आपल्या ठाउुक नाही.

मित्रांनो, आपण ज्या गावात/शहरात राहतो ना त्या प्रत्येकाचं खास असं
वैशिष्ट् असतचं.
मात्र,बऱ्याचदा ते आपणास ठाऊक नसतं.

गाव/शहर बघण्याची धम्माल

तर मित्रांनो, यंदाच्या या सुट्टीत तुम्ही राहत असलेलं गाव/शहर बघण्याची
धम्माल करा की. त्यासाठी आईबाबांची परवानगी घ्या. दोनचार मित्रांची टोळी बनवा. शक्यतो
सायकल घ्या. पाण्याची बॉटल. डोक्याला बांधायचा कपडा आणि काहीसं अघळपघळ खायला असं
तीन साहित्य घेऊन सायकलवर टांग मारा नि निघा सकाळी-सकाळी आपल्या गाव/शहर-दर्शनाला.

तुम्ही जेव्हा सकाळी घराबाहेर पडाल तेव्हा एक निश्चित आराखडा तयार करा. याचा
अर्थ असा की, अमूक एक दिशा पक्की करायची नि त्या दिशेनं निघायचं. गाव/शहराच्या सीमेपर्यंत
जायचं. त्या दिशेनं वाटेत काय काय लागतं हे मन लावून बघायचं. हे एकाच दिवशी शक्य
होत नसेल तर दुसऱ्या दिवशी जायचं. ही काही परीक्षा नाही. त्यामुळे सगळं कसं
आरामात, हसतखेळत, रमतगमत करायचं. उन्ह खूप तापायच्या आधी घरी परतायचं. म्हणजे
साधारणत: दहाची वेळ पक्की करायची नि कोणत्याही स्थितीत साडेदहा पर्यंत परतायचच. म्हणजे
मग उन्ह लागणं नको की आईबाबांचं बोलणं खायला नको.

मित्रांनो, अशा प्रकारे एका दिशेचा प्रवास करायला चार-पाच किंवा त्यापेक्षा
अधिक दिवस लागले तरी हरकत नाही. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी प्रवास संपला तिथं
जायचं नि मग पुढे. हे करताना सोबत एक पॉकेट डायरी आणि पेन ठेवा. शक्य असेल आणि
बाबाआईंनी परवानगी दिली तर घरचा कॅमेरा सोबत राहू द्या. किंवा मग या गाव/शहर दर्शनासाठी
खास म्हणून बाबांकडून स्मार्ट फोन घ्या. त्यातलं छायाचित्रे काढण्याचं आणि व्हीडीओ
चित्रिकरण करण्याचं तंत्र समजून घ्या. हे कशासाठी, तर तुमच्या या गावदर्शनात
कोणत्याही ठिकाणी काहीही भन्नाट दिसू शकतं. ते कॅमेऱ्यात बंद करता यावं म्हणून. हे
सगळं घरी आईबाबा मित्रांना दाखवता येतं. तेही याचा आनंद घेऊ शकतात.

गाव/शहराचं प्राचीनत्व

प्रत्येकच गावात/शहरात प्राचीन मंदिरं असतात. नेहमीच्या देव-देवतांशिवाय
आपणास ठाऊक नसलेल्या नाव असणाऱ्या देव-देवींचे मंदिरं असतात. त्यांच्या काही
गोष्टी असतात. ही मंदिरं विशिष्ट पध्दतीनं बांधलेली असतात. मंदिरातील पूजारी बाबास
मंदिराची कथा ठाऊक असते. ती आपण विचारु शकतो. त्याने सांगितलं तर ठीक नाहीतरी ठीक.
पण मंदिराचं वैशिष्ट तुम्ही नोंदवू शकता. प्राचीन मंदिरातच अनेकदा त्या
मंदिराविषयची माहिती सांगणारा फलक असतो. वेगवेगळया धर्मियांची प्रार्थनास्थळे
असतात. ती तुम्हाला या गाव/शहर दर्शनात दिसतील. गाव/शहराच्या बाहेर बरेचदा
ग्रामदेवतेचं मंदिर असतं. त्याचं एक वेगळच महत्व असतं. हे ग्रामदैवत गावाचं/शहराचं
रक्षण करत, असं समजलं जातं. या ग्रामदैवताचं नाव गाव/शहरपरत्वे बदलत जातं.

तुमच्या गाव/शहर दर्शनात डोंगरावर असलेला पडका किल्ला. किल्ल्यात अजूनही
दिसणाऱ्या तीन चार तोफा. एखादा शिलालेख. भरपूर वाढलेली झाडी, एवढ्या उंचीवर असणारी
पिण्याच्या पाण्याची विहीर, बऱ्यापैकी शाबूत असलेला किल्ल्याचा परकोट, या बाबी दिसू
शकतात. हे कदाचित तुम्ही आतपावेतो बघितलेलं नसाल.

गाव/शहराच्या सीमेपार एखादी छोटी नदी वाहत असते. ती
तुम्हाला दिसू शकते. नदीत पाणी असेल तर ते झुळझूळ वाहणारं पाणी बघणं खूप आनंददायी
असतं. सकाळी सकाळी वेगवेगळया रंगांचे पक्षी नदीकिनाऱ्यावर आले असतात. ते तुम्हाला
दिसतील. त्यांचे फोटो काढून ठेवा. ते  कोणते पक्षी आहेत याचा शोध, मग दुपारी घरी घेता
येऊ शकतो.