अल्लाऊद्दीन, जादूचा दिवा आणि प्रपत्र अ
अल्लाऊद्दीन, जादूचा दिवा आणि प्रपत्र अ चा काही संबंध असू शकतो असं कुणासही वाटणार नाही. पण असा संबंध समजा असेलच तर कसं वाटेल ? रामरावांच्या बाबत हा असा संबंध आपणास जोडता येतो. ते कसं पुढे कळेलच. पण मुद्दलात हा अलाऊद्दिन नेमका आहे तरी कोण ? त्याचा आणि जादूच्या दिव्याचा काय संबंध? आपल्या आजोबांच्या आजोबांच्या काळातही तो होता. सध्याच्या काळातही तो आहे. हा इंग्लडच्या राणीच्या बंकिंगहम पॅलेसमध्ये राहतो की, आफ्रिकेच्या जंगलात राहतो की इराणमधील तेलाच्या विहिरीत की भाम्रागडात की अलिबाबाच्या गुहेत हे कुणालाच माहीत नसावं. तो कोण, कुठचा याच्या शोधासाठी कष्ट घ्यावे असं आलमगीर औरंगजेब आणि बराक ओबामा यांना सुध्दा वाटलं नाही.
आम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की रघुनाथराव पेशवे अटकेपार गेले होते ते या अल्लाऊद्दिनच्या शोधात तर नाही ना. सुखाच्या चौफेर चांदण्यात न्हाऊन निघत असताना तेव्हा अशी हिम्मत आणि हिकमत कोण कशासाठी दाखवणार ? पण रघुनाथरावांच्या अटकेपारच्या मोहिमेचा हाच जर उद्देश असेल तर तो कितपत यशस्वी झाला किंवा कसे या बाबीचा सांप्रतकाली शोध घेणं शक्य नाही. पण एक आपला अंदाज इथे व्यक्त केलाय. त्यांना जादूचा दिवा मिळाला नसण्याशी शक्यता अधिकच दिसते. कारण अटकेपार झेंडा रोवूनही पुढे शनिवारवाड्यात त्यांची अवस्था ना घर का ना घटका अशी झाली. अल्लाऊद्दिन आणि जादूच्या दिव्यातील जिन कधीही कुणाला अशा स्थितीत बघू शकत नसत. कारण बोलो मेरे आका, हाजीर शिपाई बाँका असं म्हणत दिव्याला घासला की जिन काहीही करण्यासाठी आकासमोर तय्यार होणार हीच त्याची ख्याती.(असं आपणास वाल्ट डिस्नेच्या अल्लाऊद्दिन चित्रपटानं दाखवलं आहेच.)
रघुनाथरावांकडे जर अल्लाउद्दिनचा दिवा असता तर चिफ पेशवे बनण्याची त्यांची मनीषा पूर्ण झाली असती. प्रस्तावना लांबण्याचं कारण की अल्लाऊद्दिन आणि जादूचा दिव्याच्या अस्तित्वाच्या वस्तुनिष्ठेवर कुणालाही शंका राहू नये. रामरावांच्या बाबत त्याचं कोरिलेशन असं आहे.
त्यांच्याकडेही प्रत्यक्षात अल्लाऊद्दिनचा जादूचा दिवा होता की नाही, हे निश्चितरीत्या सांगता येत नाही. पण रामरावांना त्यांच्या अत्यंत अडचणीच्या काळात अल्लाऊद्दिन आणि जादूचा दिवा अदृष्यपणे साहाय्यला येत असला पाहिजे. यावर आमचा ठाम विश्वास बसला आहे. हा विश्वास किती यथार्थ आहे हे समजण्यासाठी रामरावांची पूर्वपीठिका समजून घेऊ या.
रामरावांचं महत्व शासननामे प्रशासकीय व्यवस्थेत फार मोठं आहे. रामराव तसे मध्यम श्रेणीतीलच अधिकारी. पण ते त्यांच्या वरिष्ठांना आणि त्यांच्याही वरिष्ठांना व हाताखालील कनिष्ठांचा आधारस्तंभ वाटतात. शासकीय कागदावरील दोन ओळींमधील अर्थ समजून घेण्याची रामरावांची क्षमता आणि कौशल्य हे एक कारण होतच. अशी क्षमता आणि कौशल्य असलेले बरेच अधिकारी प्रशासकीय व्यवस्थेत असतात. मात्र रामरावांनी त्यापुढील टप्प्यावर प्रावीण्य मिळवलं होतं. शासकीयच नव्हे तर अशासकीय नियमांच्या दोन ओळींमधील अदृष्य अर्थाचा नेमका अन्वयार्थ काढणं हे अत्यल्प अधिकाऱ्यांना जमायचं. त्यात रामराव हे एव्हरेष्टच्या आसपास पोहचले होते. त्यामुळे वरिष्ठ आणि त्यांचे वरिष्ठ यांना रामराव कायम त्यांच्या अवतीभवतीच असावेत असं वाटत असे. बदलीचा कायदा आला, माहितीचा कायदा आला पण रामरावांची इमारत कोसळली नाही. त्यांचं स्थान ध्रुवालाही हेवा वाटावा असं अढळ झालं होतं.
इंटरनेट आणि ई- ऑफिसच्या काळात पेपरलेस कार्यालयीन कामकाज वगैरेची स्मार्ट चर्चा होत असली तरी प्रशासन मात्र प्रत्यक्षात चालतं, थांबतं, बिघडतं, कधीकधी धावतं ते कागदावरच. कागदावरची मांड ज्यांची पक्की त्याच्या घोड्याला समोरुन वाघोबा आला काय नि डायनोसार आला तरी शून्य फरक पडतो. अशा घोड्यासमोर हे दोघेही बकरी बनून शेपूट हलवू लागतात. या कागदावर चालणाऱ्या प्रशासनासाठी नियम, उपनियम यांची काळीपांढरी कागदं अणुउर्जेसारखी असतात.
या नियमनिर्मिती सर्जनशील साखळीतील प्रतिभावंत अधिकारी नियम लिहिताना त्यात अनेक अदृष्य जागा, खिंडारं, वळणं, दऱ्या, जाणीवपूर्वक सोडतात किंवा निर्माण करुन ठेवतात.यावर काही कुणी अद्याप संशोधन केलेलं नाही. चौकशी आयोगही बसलेला नाही. पीआयएल दाखल झालेला नाही. अण्णा टू अरविंदबाबू यांनी अद्याप याकडे आपली नजर वळवलेली नाही. विधीमंडळात यावर गदारोळ होऊन कामकाज बंद बिंद झालेलं नाही. याचा अर्थ या विषयात दम नाही असा नाही. कारण नियमांची निर्मिती करणाऱ्यांच्या क्रिएटिव्ह मनात नियमांच्या दोन ओळींमध्ये वाटा आणि वळणे टाकण्याची खुबी असल्याचे निष्कर्ष काढण्यासाठी अनेक पुरावे इतस्तत: दिसतात. रामरावांसारख्यांसाठी या अदृष्य जागाच घोड्यावरील मांड पक्की करण्यासाठी आणि प्रशासनातील आपली इमारत मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
रामरावाचं हे कौशल्य आणि प्रावीण्य वादातीत असल्यानं त्यांच्याकडे न सुटू शकणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत. त्यांची नोटिंग एकदम परफेक्टच असते असा विश्वास शासन आणि प्रशासनातल्या त्यांच्या वरिष्ठांना बसला होता. त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेवर जेव्हा जेव्हा आभाळ कोसळण्याची, भूकंप येण्याची, चक्रीवादळ येण्याची शक्यता दिसू लागायची तेव्हा रामराव दोन ओळींमधील अदृष्य अर्थाचा अपेक्षित अन्वयार्थ काढण्याचं आपलं ब्रम्हास्त्र अचूक काढत आणि आलेल्या किंवा येऊ घातलेल्या संकटाची तीव्रता कमी करत किंवा असं संकटच येणार नाहीत यासाठीची तटबंद्दी भक्कम करीत. बरेचदा तर अशा संकटांना (सुवर्ण)संधीत सुध्दा रुपांतरीत करुन टाकत.
आता ही परवाचीच गोष्ट.
दोन दोन अतिशय आधुनिक एसी लावलेल्या ऑफिस चेम्बरमध्ये रामरावांचे वरिष्ठ घामाघूम होत असल्याचं बघून पीएंनी विचारलं…
सर, एनीथिंग राँग. तब्येत बरी नाही का ? डॉक्टरांना बोलावू का?
नको , मला डॉक्टरची गरज नाही. रामरावांची गरज आहे सध्या. बोलवा त्यांना .क्विक.
पीएंना या क्विकचा अर्थ कळायला क्षणही लागला नाही. त्यामुळे ते स्वत: रामरावांच्या केबीनमध्ये धावत गेले.
रामराव नुकतेच ऑफिसमध्ये आले होते आणि भिंतीवर लावलेल्या बापूश्रींच्या तसबरीला नमस्कार करत होते. हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता. त्याशिवाय त्यांचा कार्यालयीन दिवस यशस्वीरीत्या पुढे सरकत नसे. बापूश्रींच्या कृपेमुळेच आपणास काहीही शक्य होतं, यावरचा रामरावांचा विश्वास, सूर्यामुळे प्रकाश मिळतो या तथ्यांपेक्षा अधिक होता. असो, तर रामरावांचे बापूश्रींच्या या नामस्मरण आणि नमस्काराच्या वेळेत त्यांच्यापुढे इंद्रदेवांनी मेनका पाठवली असती तर तिच्याकडेही त्यांनी ढुंकून बघितलं नसतं. सुश्री मेनकांपुढे इतरेजण तर किस झाड की पत्ती. त्यामुळे आपलं सारं काही साग्रसंगीत पार पाडल्यावरच साहेबांच्या पीएकडे रामरावांनी लक्ष दिलं.
साहेबांच्या घामामुळे विचलित झालेला पीए या विलंबामुळे स्वत:च घामाघूम झाला. त्याच्या ह्रदयाचे ठोके वाढले. आणखी काही क्षण रामरावांनी त्याच्याकडे लक्ष दिले नसते तर एखादे वेळेस त्याला हार्टॲटॅकही आला असता. पण बापूश्रींच्या तसबिरीने तसं काही होऊ दिलं नाही. पीएंची ही अवस्था रामरावांच्या लक्षात आली. त्यांनी त्यास पाणी दिलं. येण्याचं प्रयोजन विचारलं.
काय रे,सरांना सोडून इकडे कसा काय ?
अहो सर, साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलावलय. त्यांची तब्येत बरी दिसत नाहीय. एक दीर्घ श्वास आणि पाण्याचा घूट घेत पीए उद्गारला.
अरे मग,ॲम्बुलन्स बोलाव ना. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ.
मी विचारलं सर, पण त्यांना तुम्हीच हवे आहात. तेही क्विक.
अरे पण,मी काही मेडिसिन नाही ..
पण सर, सध्या तरी तुम्हीच साहेबांसाठी हॉस्पिटल आणि इर्मजन्सी मेडिसीन. चला क्विक.
परिस्थिती गंभीर असल्याचे रामरावांच्या लक्षात आले. ते ताबडतोब वरिष्ठांच्या चेम्बरमध्ये दाखल झाले. साहेब घामानं निथळत होते.
अहो सर, तुमची प्रकृती ठीक दिसत नाहीय. हॉस्पिटलमध्ये जाऊ या का? मी येतो तुमच्यासोबत. साहेबांची ती स्थिती बघून रामराव काळजीयुक्त स्वरात बोलले.
अहो रामाराव, आय ॲम ओके, पण हे जरा आजचे वर्तमानपत्र बघा. काहीबाही लिहून आलंय. असल्या काहीबाहींच एरव्ही काही वाटत नाही हो, पण हे प्रकरण जरा असं घामाघूम करणारं ठरतय बघा. रामरावांकडे आजचा पेपर सरकवत वरिष्ठ म्हणाले.
रामरावांनी पहिल्या पृष्ठावरील साहेबांनी लाल पेन्सिलनं मार्क केलेली बातमी बघितली. हरवलेल्या तिनशे विहिरींचा विस्तृत वृत्तांत त्यात होता. आपल्याकडे मुली हरवतात. अदृष्य होतात. पाकिट हरवतं, मारलं जातं. तसच हे विहिरी हरवणं प्रकरण होतं. हा वृत्तांत वाचून झाल्यावर रामरावांनी साहेबांकडे बघितलं. त्यांचा चेहरा पांढराफटक पडू लागल्याचं रामरावांना जाणवू लागलं.
मिस्टर रामाराव, धिस इज टू सिरीयस ? यातून मार्ग निघाला नाही तर मला सलाइनवरच पुढचे दिवस काढावे लागतील.डू समथिंग.
पण सर, या तिनशे विहिरी अशा एकदम कशा काय स्थलांतर करतील ? कुणी पळवून बिळवून तर नेल्या नसतील ना. आपल्या हितशत्रूचा तर हा कट नसेल ना. साहेबांना दिलासा देण्यासाठी रामराव काहीतरी बोलून गेले.
रामराव, या बातमीतला अदृष्य अर्थ तुमच्या लक्षात आलाच आहे. त्यामुळे आता चर्चेचं गुऱ्हाळ लावण्याऐवजी, यातून मार्ग काढला पाहिजे. नाहीतर आपलं संस्थान बरखास्त होणार असच समजा. राज्यावरही बालंट येईल याची भीती वाटतेय हो मला.
अहो पण सर, तिनशे अदृष्य झालेल्या किंवा पळून गेलेल्या किंवा चोरी झालेल्या विहिरींचा मी कसा काय शोध घेणार? आपण पोलिसातच जायला हवं.
रामाराव ते मला सुध्दा कळतं. पण हे प्रकरण पोलिसांच्या पलिकडचं आहे. साहेब जरा करड्या आवाजात म्हणाले. साहेबांच्या पुढे ज्ञान पाजाळायचं नसतं, हे समजण्याइतपत रामराव सुज्ञ होते. पण वेळ अशी होती की संवाद पुढे नेण्यासाठी बोलणं गरजेच होतं .दुसरी वेळ आणि इतर कुणी असते तर अशा समयी साहेबांनी त्यास फायर करायला मागेपुढे बघितलं नसतं. पण नारायण अडला की त्याला गाढवाचे पाय धरावे लागतात नि कोल्ह्याला द्राक्षाची चव समजावून सांगावी लागते. त्यामुळे साहेबांना त्याक्षणी फक्त किंचित आवाज चढवण्यापुढे काहीही करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. रामरावांच्या ते लक्षात आलं. त्यामुळे हरवलेल्या विहिरीच्या शोधासाठी लष्कराला किंवा अमेरिकेच्या सैन्याला सांगू या का, असं उत्तर द्यावं असं रामरावांच्या मनात येऊनही ते स्तब्ध राहिले.
रामराव ट्राय टू अंडरस्टँड, या विहिरींचा अदृष्य होण्याचा मुद्दा आता शिल्लकच नाही.
मग सर..
अहो आता जे भूकंप होतील,जी सुनामी होईल त्यासाठी आपण तयार राहायला हवं.
डिझास्टर मॅनेजमेंट..
दॅट्स इट. आणि ते तुम्हीच करु शकता. अशा इर्मजन्सीच्या वेळी मला तिरुपती बालाजीपेक्षा तुम्हीच अधिक स्ट्राँग आणि सूपरडिव्हाइन वाटता. तिरुपती बालाजी फक्त दोनच डोळयांनी बघतो. तुमच्याकडे तिसरा डोळा आहे. आय नो दॅट. साहेब घाम पुसत म्हणाले.
साहेब आपणास गव्हाच्या ओबींवर चढवताहेत हे रामरावांनी ओळखलं. पण हे आव्हान स्वीकारणं आवश्यक होतं. कारण तो त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न होता. कायम गडगडगाट करणारा साहेब गिडगिडतोय म्हंटल्यावर रामरावांच्या ह्रदयाला पाझार फुटलं.
सर, तुम्ही काळजी करु नका. मी बघतो काय ते. त्यांनी साहेबांना आश्वस्त केलं. साहेबांसोबत ब्लॅक टी पिऊन ते आपल्या केबिनमध्ये स्थानापन्न झाले.
त्यांनी पेपरमधील बातमी पुन्हा काळजीपूर्वक वाचली. तीनशे विहिरींच्या अदृष्य होण्याची घटना अभूतपूर्वच होती. साहेबांसमोर जरी रामरावांनी डोण्ट वरी म्हंटल असलं तरी आता त्यानांही घाम फुटू लागला. साहेब स्पष्ट काही म्हणाले नव्हते तरी त्यांच्या सांगण्याचा एकच अर्थ होता की हे प्रकरण रफादफा करा.
प्रकरण रफादफा करायचा एकच मार्ग होता तो म्हणजे हरवलेल्या तिनशे विहिरी शोधून पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन ठेवणं. जी बाब सर्वसमर्थ तिरुपती बालाजीलाही शक्य नसल्याची खात्री साहेबाला वाटत होती, ती आपण एक सामान्य व्यक्ती कसं करणार? रामरावांचं डोकं चालेना. त्यांचही हार्टबिट वाढू लागलं.साहेबांसारखा त्यांनाही घाम फुटला. अशा अवघड आणि अडचणींच्या समयी रामरावांचे दोन आधार होते. पहिला आधार होता तो बापूश्रींचा.
बापूश्रींच्या बंगल्यावजा किंवा महालवजा आश्रमात जाऊन त्यांचं दर्शन झालं ,त्यांनी रामरावांकडे कटाक्ष टाकला की समस्या सुटण्याचे मार्ग दिसू लागतात, असा रामरावांचा अनुभव होता. (आपणास त्यावर अविश्वास कसा बरं ठेवता येणार?)
या कठीण प्रसंगात बापूश्रींच पथदर्शक ठरतील या विश्वासानं ते दुसऱ्या दिवशी कार्यालयात जाण्याऐवजी आश्रमात गेले. रामराव हे इतर भक्तांपेक्षा वरिष्ठ श्रेणीचे भक्त असल्याने आणि त्यांच्याकरवी भरपूर दक्षिणा वगैरे मिळत असल्याने आश्रमासाठी ते व्हॅल्यूएबल भक्तशिरोमणी होते. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा आश्रमात येत तेव्हा तेव्हा काही मिनिटांच्याच प्रतिक्षेनंतर बापूश्रीचं नजिकचं दर्शन आणि नेत्रकटाक्षाचा लाभ त्यांना मिळत असे. बापूश्री अनेकदा त्यांच्याशी एकांतात आत्मा-परत्म्याविषयी सुक्ष्म चर्चा करत. अशी संधी अत्यल्प भक्तांना मिळत असे. त्यामुळे आश्रमात रामरावांची वट होती.
आजही नेहमीप्रमाणेच रामरावांना तत्काळ बापूश्रींचे दर्शन मिळाले. त्यांचा नेत्रकटाक्ष रामरावांवर पडला. रामराव धन्य जाहले. त्यांनी त्यांच्यापुढे असलेल्या सध्याच्या समस्येचं निराकरण बापूश्रींना विचारलं.
त्यांची समस्या ऐकून बापूश्री थक्क झाले. मात्र त्यावर काय तोडगा सुचवावा हे त्यांच्या ध्यानी आणि मनी येईना. बापूश्री चमत्काराने अनेक वस्तू भक्तांना काढून देत. पण त्या साऱ्या अस्तिवातीलच असत. अस्तित्वहीन गोष्टी त्यांच्या चमत्काराच्या परिघात नसत. बापूश्रींनी अदृष्य झालेल्या विहिरी हवेत हात फिरवून आणि एक फुंकर मारुन मिळवून द्याव्यात अशी रामरावांची अप्रत्यक्ष इच्छा होती. भक्ताची इच्छा अचुकरीत्या अंर्तयामी बापूश्रींकडे पोहचली. ही इच्छापूर्ती करण्यासाठी आपणास ध्यानधारणा करायला हवी असं मधूर स्वरात त्यांनी रामरावांना सांगितलं. संवादाला पूर्णविराम दिला. काही क्षणानंतर बापूश्री ध्यानकक्षात निघून गेले. हरवलेल्या विहिरी बापूश्रीच मिळवून देतील याची खात्री असल्याने त्यानंतर पुढील पंधरा दिवस रामराव बापूश्रींच्या आश्रमात जात राहिले. त्यासाठी त्यांनी अर्जित रजा घेतली. एरवी किरकोळ रजेसाठी किटकट करणाऱ्या साहेबांनी एका सेंकदात ही अर्जित रजा मंजूर केली.
सतत पंधरा दिवस आश्रमात जाऊनही आणि जप,ध्यानधारणा करुनही ध्यानस्थ झालेल्या बापूश्रींनी रामरावांना दर्शन आणि नेत्रकटाक्ष दिला नाही. प्रकरण हातघाईवर येत असताना बापूश्रींचं असं वागणं हे रामरावांना पटलं नसलं तरी बापूश्रींवरील त्यांचा विश्वास यत्किंचतही घटला नाही. कदाचित यावेळेच्या समस्येच्या निराकरणासाठी अधिक आत्मिकशक्तीची गरज बापूश्रींना असावी, त्यामुळे ही इज टेकिंग हिज ओन टाइम, असा सकारात्मक विचार रामरावांनी केला.
बापूश्रीं नक्कीच साहाय्य करतील हा विश्वास जरी रामरावांकडे होता तरी अधिक कालापव्यय करणं म्हणजे आगिचं रुपांतर स्वत:हून फुफाट्यात करण्यासारखं होतं, याची जाणीव रामरावांना असल्यानं त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या प्लॅन बी नुसार आता समस्या निरकरण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं.
हासुध्दा त्यांचा नेहमीचा शिरस्ता होता. कठीण प्रसंगी बापूश्रींकडून यदाकदाचित मार्ग निघालाच नाही तर ते सिध्दीविनायकांकडे जात. इथे सुध्दा रामरावांचं मोठेपण अधोरेखित झाल्याने अंगारकीच्या महागर्दीसह कोणत्याही क्षणी सिध्दीविनायकांचे सुलभ दर्शन घेण्यास रामरावांना कोणतीच अडचण जात नसे.
प्लॅन अ नुसार सध्या कोणतेच निराकरण होत नसल्याने रामराव प्लॅब ब नुसार सिध्दीविनायकांच्या दर्शनाला गेले.दर्शनानंतर ध्यानस्थ बसले की रामरावांसमोर सिध्दीविनायक टक्क डोळे उघडून त्यांच्याकडे बघू लागत. मग दोघांचा संवाद चाले. त्यातून समस्यांचे निराकरणही होई. आताही रामरावांनी तेच केलं.मात्र यावेळी वेगळेच घडले. रामराव ध्यानस्थ होताच, सिध्दीविनायक स्वत:च ध्यानमग्न झाले. त्यांच्याकडे बघत असलेले मुषकस्वामी रामरावांकडे वळले. त्यांनी रामरावांशी संवादाची इच्छा प्रदर्शित केली.
आपण आणि सिध्दीविनायक यांच्यामध्ये संवाददूत म्हणून मुषकस्वामी हे उत्तम कार्य करतील, याबद्दल रामरावांच्या मनात शंका नव्हती. पण मुषकस्वामींसोबत संवाद कोणत्या भाषेत करायचा हा मोठा प्रश्न होता. या भाषिक समस्येने त्यांचे डाके दुखू लागल्यानं ते ध्यानातून बाहेर आले. त्यांनी डोळे उघडले. मुषकस्वामी पूर्ववत आपल्या जागी जाऊन सिध्दीविनायकांकडे बघत बसले होते. हे प्रकरण हाताळण्यास सिध्दीविनायक अजिबातच उत्सुक नसल्याचे चाणाक्ष रामरावांच्या लक्षात आले. त्यांनी सिध्दीविनायकांना दंडवत घालून त्यांचा निरोप घेतला.
प्लॅन अ होल्डवर असल्याने आणि प्लॅ बीचा प्रश्नच मिटल्याने आता मात्र विहीर प्रकरणी रामरावांना स्वबळावरच मार्ग काढायचा होता. कितीही विचार केला तर कोणताच मार्ग त्यांना सूचत नव्हता. डोक्याची हजार शकले होतील असं त्यांना वाटू लागलं. विविध पर्यायांचा विचार करण्यासाठी डोकं खाजवत असताना त्यांच्या मनातील अलाऊद्दीनने त्यांच्यासमोर जादूचा दिवा ठेवला. हा जादूचा दिवा होता, नियमांची पुस्तिका.
करेक्ट.अतिंद्रीय शक्तींच्या पाठीमागे न लागता, समस्या सोडवण्यासाठी वास्तवाशीच सामना करायला हवा. हा सामना करण्याचं बळ नियमांचं पुस्तकच देऊ शकतं. आपलं गांडीव धनुष्य तेच. हातचं सोडून आपण पळत्याच्या पाठीमागं कां धावत होतो आतापर्यंत, ते स्वत:लाच म्हणाले. याचं त्यांना वाईट वाटलं. मनातल्या अलाउद्दिनचं त्यांनी आभार मानलं. त्यानंतर त्यांनी बापूश्री आणि सिध्दविनायकांचं स्मरण करत नियमांच्या पुस्तकात जे डोकं खुपसलं ते हुर्यो असं तोंडातून येईपर्यंत बाहेरच काढलं नाही.
दोन ओळींमधील अदृष्य अर्थ आणि या अदृष्य अर्थाचा अन्वयार्थ काढण्याच्या रामरावांच्या क्षमतेला आणि कौशल्याला नियमांच्या पुस्तिकेने मोठा किक दिला. त्यांना हायसं वाटलं. आशेचा अंधूक किरण त्यांना दिसू लागला. यातच उज्ज्वल सुटकेचा मोठा दिवाही गवसेल ही खात्रीही त्यांना वाटू लागल
साहेबांची WORRY दूर करण्याची जबाबादरी घेतलेल्या रामरावांनी काही गोष्टींची पूर्तता करण्याची विनंती साहेबांना केली. साहेबांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या विहिरींची यादी नाव, गाव पत्त्यांसह तातडीने मिळवून द्यावी, अशी रामरावांची साधी आणि सोपी मागणी होती. एरव्ही बारिकसुरिक बांबींवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या साहेबांची स्थिती गरजवंताला अक्कल नसते अशी झाल्याने ते, कशासाठी? हा सवाल विचारण्याची शक्तीच हरवून बसले होते. रामरावांना हो म्हणण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता त्यांच्यापुढे.
क्षेत्रीय अधिकारी हे हुकूमाचे ताबेदार असल्याने ते तर कधीच, कशासाठी हा सवाल वरिष्ठांना करु शकत नसत. फक्त त्यांना कृती करायची असते. त्यामुळे साहेबांचा निरोप जाताच पुढील काही दिवसात विविध गावात, शेतात प्रत्यक्ष असलेल्या विहिरींच्या छायाचित्रासह माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून साहेबांच्या कार्यालयात पोहचली.
साहेबांकडून ही सचित्र माहिती रामरावांकडे गेली. त्यांचा चेहरा खुलला. हा तर जादूचा दिवाच गवसला असं ते स्वत:शीच उद्गारले. त्यांच्या उत्साहाला पारावर उरला नाही.
ही माहिती हाती येताच त्यांनी तडक घर गाठलं आणि कागद पेन घेऊन ठाण मांडून बसले. दोन तीन दिवस ते कार्यालयाकडे फिरकलेच नाही. ते सतत लिहित होते. लिहिलेली कागद फाडत होते. लेखन पुर्नलेखन चाललं होतं. कोणताही महान लेखकसुध्दा आपल्या ड्रॉफ्टचं इतकं पुर्नेलेखन करणार नाही. फाडलेल्या ड्रॉफ्टची एखादी महाकादंबरी सुध्दा होऊ शकली असती. अखेर सातव्या दिवशी शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रामरावांनी ड्रॉफ्ट फायनल केला. तडक साहेबांचा बंगला गाठला. ड्रॉफ्ट वाचल्यावर साहेबांना गदगदून आले. त्यांनी फक्त रामरावांच्या पायावर डोकच ठेवायचं तेवढं शिल्लक ठेवलं. खरंतर रामराव यांच्या रुपानं तिरुपती बालाजीच आपल्या सुटकेसाठी धावत आलाय, अशी त्यांची भावना झाली
रामरावांनी नियमांच्या दोन ओळीतील दडलेल्या अर्थाच्या विविध छटांचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांनी एका नव्या योजनेच्या प्रस्तावाला जन्मास घातले. साहेबांच्या कनिष्ठांनी अस्तित्वात असलेल्या ज्या 300विहिरींची सचित्र माहिती पाठवली होती, त्या विहिरींच्या पुर्नभरण ,नूतनीकरण आणि बळकटीकरण्याची ती योजना होती. या योजनेमुळे या 300 विहिरींचं खोलीकरण करणं, गाळ काढणं, दुरुस्ती आदी बाबी करता येणं शक्य होतं. त्यामुळे 300 विहिरींच्या परिसरातील पाण्याच्या शास्वत पुरवठ्याची हमी मिळाली असती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. काही प्रमाणात सिंचनाचाही प्रश्न मिटला असता. काहीशे कोटीरुपयांच्या या योजनेला जागतिक बँक वा तत्सम जागतिक संघटनेकडून अर्थसाहाय्य कसं मिळू शकेल याचंही विस्तृत विवेचन यात होतं. काही विहिरींचं हे असं काम खाजगी सहभाग किंवा कार्पोरेट रिस्पाँसिबिलिटी योजनेमध्ये टाकून करता येणं शक्य होतं. विभागाला केवळ शुल्लक निधी योजनेचा प्रारंभाचा टिळा म्हणून उपलब्ध करुन द्यायचा होता. नियमित निधीतूनच ते विभागाला शक्य होतं. साहेबांच्या साहेबांनी त्यावर सहिची मोहर उमटवली की मार्ग मोकळा आणि सुसाटच होता. साहेबांचे साहेब या मंजुरीसाठी नक्कीच नडले नसते, याची खात्री रामरावांना होती. कारण अदृष्य झालेल्या 300 विहिरींचा नाही म्हंटला तरी ताण त्यांच्यावरही होताच. तो दूर करण्याची ही नामी संधी त्यांना केवळ एका सहिमुळे मिळत होती. ती ते नाकारणं शक्यच नव्हतं.
विहिरींच्या पुर्नविकासाचा रामरावांनी ड्रॉफ्ट केलेला हा विस्तृत आणि प्रॅक्टिकल प्रस्ताव वाचताना प्रत्येक वाक्यागणिक साहेबांची कळी खुलत गेली. शेवटचं वाक्य संपलं तेव्हा ते पूर्णपणे फुलून गेले होते.
रामरावांनी ड्रॉफ्ट केलेल्या प्रस्तावाचा हा काही शेवट नव्हता.
या प्रस्तावास रामरावांनी प्रपत्र अ जोडले होते. ते बघितल्यानंतर आणि दोन वेळा त्याचे परिशिलन केल्यानंतर साहेबांना रामरावांच्या पायावर तिरुपती बालाजी समजूनच डोकं ठेवावं वाटलं होतं.
अत्यंत विचारपूवर्क रामरावांनी प्रपत्र अ ची संरचना केली. मुख्य प्रस्तावामध्ये काही मुख्य अथवा दुय्यम बाबी जर समाविष्ट करावयाच्या राहून गेल्या तर त्या बाबी प्रपत्र अ मध्ये सामील करता येतात. त्यावर सर्व संबंधितांच्या सह्या झाल्या की मुख्य प्रस्तावाला जो मान -सन्मान आणि कायदेशीरत्व प्राप्त होतं, डिट्टो सारं काही तेच या प्रपत्र अ ला मिळतं.
रामरावांच्या प्रपत्र अ मध्ये नव्या 300 विहरींच्या बांधणीचा समावेश होता. या सर्व विहिरी ज्या 300 विहिरी अदृष्य झाल्या होत्या, त्याच परिसरातील होत्या. यांची बांधणी कालबध्दतीनं करण्याचा एक वेगळा कार्यक्रम रामरावांनी तयार केला होता. या विहिरींमुळे संबधित परिसरातला कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मिटणार होता. जुन्या 300 विहिरी आणि या नव्या 300 विहिरी यामुळे एक व्यापक जलक्रांती दृष्टिक्षेपात येत होती. नव्या विहिरींच्या बांधणीसाठी लागणारा निम्मा निधी जागतिक बँकेकडून मिळणं शक्य होतं. काही विभागाचा आणि काही निधी केंद्राचा टाकून संपूर्ण निधीची उभारणी शक्य होती.
साहेबांनी पपत्र अ ची शेवटची ओळ वाचली आणि सोफ्यावरुन ताडकन उठून त्यांनी रामरावांना मिठीच मारली. अफजलखानाने शिवाजी महाराजांना मारलेल्या मिठीसारखीच ती मिठी असल्याचे रामरावांना वाटले. पण हा आधुनिक अफजलखान स्वत:च संकटात असल्यानं तो त्यांच्यावर वार करण्याची शक्यता नव्हता. त्यामुळे रामराव निश्चिंत होते.
गळामिठीतून मुक्त केल्यावर गदगदित होऊन साहेब म्हणाले,
रामराव, अहो अदृष्य झालेल्या विहिरी शोधण्याचा चमत्कार कसं करणार हे तिरूपती बालाजीच काय 33 कोटी देवांना सुध्दा कळलं नसतं.
सर, तिरूपती बालजींना प्रपत्र अ चं तंत्र आणि मंत्र अवगत नाहीय ना.
पण आम्हाला तरी कुठाय रामराव. साहेब कौतुकानं म्हणाले…
त्यासाठी अभ्यास करावा लागतो. डोकेफोड करावी लागते, असं रामरावांना म्हणावसं वाटलं. पण ते काही बोलले नाही.
अहो रामराव, धिस इज मिरॅकल. खरं तर यासाठी तुम्हाला मॅगेसेसे पुरस्कारच द्यायला हवा.
सर मला, तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय हाच मोठा पुरस्कार आहे हो, रामराव नम्रपणे म्हणाले.
साहेबांचा त्यांनी निरोप घेतला. जड अंत:करणानं साहेबांनी त्यांना दारापर्यंत सोडलं. केवळ प्रोटोकॉलच्या भानगडीमुळे नि अहंमुळे साक्षात तिरुपती बालाजीच्या पाया पडू शकलो नाही, याची खंत त्यांना लागून राहिलीच.
साहेबांनी पुढच्या काही दिवसात वरिष्ठांकडून रामरावांनी ड्रॉफ्ट केलेला प्रस्ताव मान्य करुन घेतला. अत्यंत गतीने निधीची जुळवाजुळव केली. याबाबत त्यांची कार्यक्षमता अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती. या त्यांच्या वैशिष्ट्याचं कौतुक सदैव वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर होत असे.
निधी प्राप्त होताच जुन्या विहिरी आणि नव्या विहिरींची कामे एका शुभमुहूर्तावर मिशन मोड पध्दतीनं सुरुही झाली.
रामरावांच्या अंतर्मनातील अल्लाउद्दिनचा जादूचा दिवाच त्यांच्यासाठी अशाप्रकारे कामी आला. आता त्यांनी त्यांच्या घरी असलेल्या देवघरातील बाबूश्रींची तसबीर काढून टाकली आहे. त्या रिकाम्या भिंतीवर त्यांनी काहीही लावलेलं नाही. मात्र आता पूर्वीपेक्षाही ते अधिक भक्तीभावानं भिंतिला नमस्कार करतात. डोळे मिटले की त्या भिंतीवर त्यांना प्रपत्र अ रुपी जादूचा दिवसा कायम दिसत असतो…
असं असलं तरी बापूश्रींवरील भक्ती त्यांची यत्किंचितही कमी झालेली नाही. हे विशेषत्वानं नमूद करावं लागतं. बापूश्रींनीच आपली बुध्दी योग्य दिशेनं चालवल्यानच हे शक्य होऊ शकलं, असच रामरावांना वाटतं.
त्यानांच जर असं वाटत असेल तर आपण अविश्वास दाखवणारे कोण? नाही का..
सुरेश वांदिले
9324973942
दिनांक
4 सप्टेंबर 2017