घात आणि आघात
महाराज महाराज घात झाला, प्रधानजी धावत धावत येऊन महाराजांच्या पुढे लोटांगण टाकत म्हणाले. धावल्यामुळे त्यांना फार दम लागला होता. महाराजांनी त्यांना उठवलं. आसन ग्रहन करायला सांगितलं. सेविकेस प्रधानजींसाठी लिंबू शरबत आणावयाची आज्ञा केली. लिंबू शरबत येईपर्यंत महाराजांनी प्रधानजींना डोळे मिटून नाडी प्राणायम करण्याची प्रेमळ सूचना केली. महाराजांची ही प्रेमळ सूचना ऐकून प्रधानजी नाडी प्राणायम करण्याचा प्रयत्न करु लागले. पण या प्रयत्नात आपलीच नाडी थांबते की काय अशी शंका सतत येत राहिल्याने ते एकाच नाकपुडीत श्वास घेत आणि सोडत राहिले. त्यांचे हे विपरित नाडीप्राणायम बघून महाराजांनीच त्यांना नाडी प्राणायम न करण्याचा प्रेमळ सल्ला दिला. या सल्ल्याची प्रधानजी वाटच बघत होते. त्यांनी तत्काळ नाकपुडीवरुन तर्जनी काढली. डोळे उघडले आणि महाराजांकडे भकास नजरेनं बघता बघता ते पुन्हा उद्गारले,
महाराज घात झाला. महाराज घात झाला.
एव्हाना सेविकेने लिंबूपाण्याचे शरबत आणलं होतं. महाराजांनी ते स्वहस्ते प्रधानजींना दिलं. प्रधानजींनी ते एका दमात प्राशन केलं. त्यांना बरं वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितशी तरतरी उमटली. ते बघून महाराज त्यांना विचारते झाले,
आता, काय झालं ते शांतपणे सांगा बघू, घाबरु नका. आम्ही आणि स्वामी भजनानंद महाराज, तुमच्या सदैव पाठिशी आहोत हे लक्षात ठेवा.
महाराजांच्या या प्रेमळ बोलण्यानं प्रधानजींना बराच धीर आला. सर्व प्राण कंठाशी आणून ते सांगू लागले.
महाराज, अहो सत्यमेव जयते हे ज्यानं कुणी प्रथम म्हंटलं असेल किंवा ज्याला कुणाला हा विचार सुचला असेल त्याला उद्याच्या उद्या रामप्रहरी सुळावर चढवायला पाहिजे.
असं, कां बरं प्रधानजी.
अहो, या सत्य मेव जयतेनेच आमचा घात केला आहे, महाराज.
प्रधानजी, तुम्ही आता गाडी थेट रस्त्यावरच आणा बघू. वळणं फार झालीत बुवा… जास्त वळणं घेतं बसलात तर गाडीचा अपघात व्हायचा.. महाराजांनी प्रधानजींना प्रेमळ तंबी दिली.
०००
प्रधानजी हा सोज्वळ गृहस्थ होता. प्रधानजीपदासाठी अशा सोज्वळांची गरज नसते हे महाराजांना ठाऊक होतं. छक्केपंजे करण्यात कोणत्याही प्रधानाने प्रावीण्य मिळवलेले असणं आवश्यकच असतं. खोट्याचं नाण खणखणीत वाजवण्यात त्याने उच्चतम कामगिरी बजावलेली असलायला हवी. तो गरीब गाय असून चालत नाही. तो मारका आणि बेरका म्हसोबाच असणं गरजेचं असतं. तरच राज्यकारभार नीट – व्यवस्थित- सुरळित चालू शकतो, अशी शिकवण थोरल्या महाराजांनी या धाकल्या महाराजांना दिली होती. या शिकवणीचं पालन काहीकाळ धाकल्या महाराजांनी केलं. पण थोरले महाराज जेव्हा या पृथ्वीतलावरील अवतारकार्य संपवून स्वर्गी निघून गेले तेव्हा धाकल्या महाराजांनी ही शिकवण गुंडाळून ठेवली. कारण मारका आणि बेरका म्हसोबा जर प्रधानजी असला तर तो ताटाखालचा मांजरच काय उंदिर आणि कुत्राही बनायला फार उत्सुक नसतो हे धाकल्या महाराजांना लक्षात आलं होतं. ताटाखालचा मांजर असलेला प्रधान आपल्या शब्दाचा बाहेर जात नाही. त्यामुळे प्रजा आणि राणीसरकारांच्या नजरेत येणार नाहीत अशा काही अर्थ आणि अनर्थपूर्ण कामगिरी करता येणं शक्य असल्याचं लक्षात आल्यावर या महाराजांनी सध्याच्या सोज्वळ प्रधानजींची नियुक्ती केली होती.
सोज्वळ प्रधानजी हे खरोखरच महाराजांच्या सुयोग्य निवडीस खरे उतरले. महाराजांचे सारे काही लाड पुरवण्याचं आणि त्याची कोणतीही वाच्यता होणार नाही याची दक्षता घेण्यात सोज्वळ प्रधानजी एकदम यशस्वी झाले होते.
०००
अशा या सोज्वळ प्रधानजींचं त्यांच्या सौभाग्यवतींवर खूप प्रेम होतं.
प्रधानजीपद मिळण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. एकदा ते घोड्यावरुन रपेट करायला रानात गेले असताना, एका तलावाकिनारी प्रधानजींना एक सुकन्या नुकतीच आंघोळ करुन आलेली दिसली. ओलेत्या वस्त्रातील त्या कन्येस बघून प्रधानजींचं देहभान हरपलं. ते त्याच क्षणी त्या कन्येच्या प्रेमात पडले.
आपणास कुणीतरी लपून छपून बघत असल्याचं त्या चाणाक्ष कन्येच्या लक्षात आलं. लगबगीनं झाडाच्या पाठीमागे जाऊन ती कोरडे वस्त्र परिधान करुन बाहेर आली. प्रधानजी जागेवरच खिळून होते.
त्यांच्यासमोर येऊन ती कन्या लाडिकपणे म्हणाली,
हे वीरेश्वरा तुम्ही मजला स्नान करताना बघितलं आहे. या देहास तुमच्या डोळयानं टिपलं आहे. तेव्हाच मी तुमची झाली आहे.
त्या कन्येच ते लाडिक ,मधूर आणि मंजूळ स्वर ऐकून प्रधानजी वेडावून गेले. ते आपल्या अश्वावरुन खाली उतरले. तिच्यापुढे गुडघे टेकत तिला विचारते झाले,
हे सुंदरी, तू म्हणालीस ते खरं आहे. तुला आम्ही बघितलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. हे सुंदरी तू माझ्याशी विवाह करशील काय. तुझ्यासोबत आमचा विवाह झाला तर ते आमचं मोठच भाग्य ठरेल. आमच्या भाग्याचा या सूर्याला, त्या चंद्राला, इकडच्या राजाला, तिकडच्या सम्राटाला हेवा वाटेल. असं बोलून प्रधानजींनी त्या कन्येच्या नजरेला नरज भिडवली.
वीरेश्वरा, तुम्ही अशी विनवणी करु नका. तुम्ही कुठे, मी कुठे. तुम्ही मला सरदार वाटता. तुमचं घराणं मोठं वाटतं. मी बापुडी एक वनकन्या. तुमच्या इभ्रतीला मी शोभत असेल तर मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे.
प्रधानजींना विवाहासाठी होकार देताच,झाडे-फुले-पक्षी आणि तलावाच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्या आणि ते पती पत्नी झाले.
अशा प्रकारे त्या वनकन्येला सौभाग्यवती करुन प्रधानजींनी त्यांना आपल्या महाली आणलं. प्रधानजी नवविवाहितेच्या प्रेमात आकंठ बुडून गेले. घरी प्रेमालाप आणि दरबारात महाराजांची सेवा करण्यात त्यांचा प्रत्येक दिवस कसा मस्त मस्त जात होता. त्यांना कोणतीही चिंता वाटत नव्हती की कसलही दु:ख, विषाद नव्हता.
०००
सदैव आनंदी आणि खुष असणाऱ्या या सोज्वळ प्रधानजींचा हेवा काही महिन्यांनी दरबाऱ्यातील सरदार- दरकदारांना वाटू लागला. २४ तास कुणीही सुखी राहूच शकत नाही, असा सिध्दांत महाराजांचे गुरु भजनानंद महाराज यांनी मांडला होता. या सिध्दांताच्या विरोधात प्रधानजींचं वागणं होतं.
काही सरदार-दरकदारांनी याबद्दल महाराजांचे कान भरण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी कान भरणाऱ्यांचे जरी कान उपटले असले तरी त्यांच्या मनात किडा वळवळलाच. त्यांनी मग प्रधानजींवर पाळत ठेवायला सुरुवात केली. प्रधानजी काय करतात, कुठे जातात, कोणती मासोळी खातात, कोणत्या टॉनिकच्या गोळया घेतात, कोणत्या जलस्याला जातात, कोणत्या मदिरालयात जातात अशी एक प्रश्नपत्रिका महाराजांनी आपल्या गुप्तहेरांना करुन दिली. या प्रश्नप्रतिकेतील एकाही प्रश्नाचं उत्तर गुप्तहेर मिळवू शकले नाहीत. कारण प्रधानजी घर आणि दरबार यापलिकडे कुठे जातच नव्हते असं गुप्तचरांना आढळून आलं.
ही माहिती मिळाल्यावर मात्र महाराजांचाही संशय बळावला. आता त्यांनी स्वत:च पाळत ठेवायचं ठरवलं. दरबारातून सुटी झाली की प्रधानजी सरळ घराकडे निघत. ते निघाल्यावर महाराज पाच मिनिटांनी वेषांतर करुन लगेच पाठोपाठ निघत. त्यामुळे कुणाला संशय येत नसे. प्रधानजी त्यांच्या महाली गेले की त्यांच्या महालांचे दरवाजे बंद होत.
०००
महाराज, असचे एके दिवशी पहाटेपर्यंत प्रधानजींच्या महालाभोवती घुटमळत राहिले. पण त्यांना काहीही वावगं आढळलं नाही. प्रधानजींसारख्या सोज्वळ गृहस्थावर आळा घेणाऱ्यांचा कडेलोटच केला पाहिजे असं त्यांना वाटून गेलं.
महाराज महाली परतले. आणि झोपी गेले. जाग आल्यावर त्यांच्या मनातील किडा पुन्हा वळवळ करु लागला. त्यांनी प्रधानजींना ताबडतोब राजमहाली बोलावून घेतले.प्रधानजी धावतपळत महालातील महाराजांच्या शयनगृहात पोचहले,
महाराज, आपणास बरं आहे ना,दुष्ट मच्छरांच्यामुळे आपल्या झोपेच खोबरे-किसमीस झाले नाही ना.. सोज्वळ प्रधानजींनी नम्रतेनं आणि झुकून विचारलं.
प्रधानजी आम्ही ठीक आहोत हो, आज आम्हाला जरा वेगळा चहा पिण्याची इच्छा झाली आहे. दररोज, महाराणीच्या हातचा तोच तो चहा घेऊन आम्हास कंटाळा आला आहे.
मग महाराज, आम्ही आपल्यासाठी आपल्या राज्यातील कराची चायवाला या प्रसिध्द चहाभंडारमधून चहा मागवून घेऊ का.
नको नको प्रधानजी, अहो हा चहा येईपर्यंत थंडा होऊन जायचा. चहा वाफेळलेलाच हवा आणि मदिरा थंडीच हवी. तरच त्याचा खराखुरा आस्वाद घेता येतो.
मग महाराज, आम्ही प्रयत्न करुन बघू का.
नको नको प्रधानजी, अहो तुम्ही या राज्याचे प्रधान आहात. तुम्ही आणि मी चाय पे चर्चा करायची असते. चहा नसतो करायचा.
आपण खानसामा बदलूया का महाराज.
त्यापेक्षा प्रधानजी आज आम्ही तुमच्या महाली येऊन वहिनीसाहेबांच्या हातचा चहा प्राशन करावा असा विचार करतो आहोत.
अहो भाग्य महाराज, आपले पाय या सुदाम्याच्या महाली लागणार या कल्पनेनच आमचं ह्रदय भरुन आलं आहे.
वहिनींसाहेबांना आमच्यासाठी चहा करणं आवडेल ना प्रधानजी,महाराजांना आपणास हे बोलताना फार कष्ट होताहेत अशा पध्दतीनं विचारलं.
तिलाच काय तिच्या बापालाही आवडेल असं काहीसं बोलून जावं,असं प्रधानजींना वाटलं, पण हे असंसदीय असल्याचं त्यांच्या पटकन लक्षात आल्यानं त्यांनी जीभ चावली आणि मुखावाटे पडू पाहणाऱ्या शब्दांना मागे ढकलले. चाणाक्ष महाराजांच्या लक्षात ही बाब आली. हसत हसत ते म्हणाले…
मग निघू या का आपण आपल्या महाली.
अं, हो हो महाराज. निघूया.
०००
महाराजांच्या खाशा रथातून दोघेही प्रधानजींच्या महाली पोहचले. प्रधानजींनी आत जाऊन सौभाग्यवतींना सारं काही सांगितलं. त्याप्रमाणे सौभाग्यवती कामाला लागल्या. चहा झाल्याची वर्दी त्यांनी काही वेळाने सेवकांमार्फत दिवाणखाण्यात पाठवली. प्रधानजी आत गेले. ते स्वत:च चहाचा ट्रे घेऊन आले.
अहो प्रधानजी हे काय, सेवकांच्यामार्फत चहा आणायचा, तुम्ही स्वत: असं केल्यानं आम्हास कसेसेच वाटत आहे.
महाराज आपणास सेवकांमार्फत चहा देणं योग्य वाटलं नाही.प्रधानजी म्हणाले.
महाराज हसले. त्यांनी चहा पिण्यास प्रारंभ केला. पहिला घूट पोटात जाताच , अहाहा, वावा अहाहा, चहा असावा तर असा, ते उत्स्फूर्तपणे बोलून गेले. प्रधानजींच्या चेहऱ्यावर हास्य उमललं.
प्रधानजी असा चहा आम्ही आमच्या आयुष्यात कधी प्यालो नव्हतो. तुम्ही भाग्यवंत आहात, दररोज तुम्हास असा चहा प्यायला मिळतो. महाराजांच्या या बोलण्यानं प्रधानजींना आपल्या भाग्याचा हेवा वाटू लागला. चहा पिऊन झाल्यावर महाराज प्रस्थान करण्यासाठी उठले. दोन पावलं समोर टाकल्यावर ते माघारी वळले.
प्रधानजी, इतका अप्रतिम चहा तयार करणाऱ्या वहिनीसाहेबांना आम्हास बक्षीस द्यावेसे वाटत आहे. आपण बोलावला का त्यांना बाहेर.
महाराजांच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी प्रधानजींनी सौभाग्यवतींना बाहेर बोलावलं. महाराजांनी त्यांचं मनसोक्त कौतुक केलं. अप्रतिम चहा केल्याबद्दल त्यांनी आपल्या गळातील रत्नहार काढून वहिनीसाहेबांच्या हाती दिला. तेव्हा दोघांची नजरानजर झाली. वहिनीसाहेबांनी त्यांना धन्यवाद म्हणून, नेहमी येत चला चहा घेण्यासाठी असं सांगितलं. तिने महाराजांना भावजी म्हटलं असतं तर बरं झालं असतं असं प्रधानजींना वाटलं. पण लगेच असही त्यांना वाटून गेलं की तिने महाराजांना भावजी नाही म्हंटलं, ते बरच झालं. नाही तर हे भावजी कधीही आपल्या महाली येऊन, दार उघड बये दार उघड करायचे आणि आपली अवस्था अवघड करुन जायचे. प्रधानजींनी कौतुकानं सौभाग्यवतीकडे बघून महाराजांना दारापर्यंत पोहचवून निरोप दिला.
०००
महाराज महाली परतले. त्यांना प्रधानजींच्या पत्नीचा चहाच नव्हे तर त्यासुध्दा खूपच आवडल्या. पण आपला विचार चहा पुरताच मर्यादित ठेऊन दुसऱ्या अविचारापासून त्यांनी स्वत:ला थोपवलं.
महाराजांना नेहमीच पोलिटिकली करेक्ट वागण्याची कला अवगत झाली होती. त्याचं प्रत्यंतर त्यांनी लगेच आणून दिलं. दुसऱ्या आठवड्यात त्यांनी महाराणींना सोबत घेऊन प्रधानजींच्या महालाची वारी केली. महाराणी आल्या म्हणून प्रधानजींच्या पत्नींना त्यांची आवभगत करण्यासाठी दिवाणखान्यात यावं लागलं.
महाराणींनीसुध्दा प्रधानजींच्या पत्निच्या हातचा चहा खूप आवडला. महाराणींनी त्यांना महाली बोलावलं. त्यानंतर त्यांचासारखा चहा बणवण्याची कला शिकण्यासाठी त्या प्रधानजींच्या सौभाग्यवतींना नेहमी बोलावू लागल्या आणि त्यामुळे आता प्रधानजी आणि त्यांच्या सौभाग्यवतीचं महाली जाणंयेणं वाढलं. महाराणी आणि प्रधानजींच्या सौभाग्यवतींची मैत्री झाली. महाराजही या मैत्रीचं कौतुक करायला कंजुषी करत नसत…सारं काही उत्तम चाललं होतं.
०००
अप्रतिम चहा करणाऱ्या बायकोच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रधानजींवर सुध्दा त्यांच्या सौभाग्यवती या प्रेमाचा पारिजातक चांगल्याच फुलवत होत्या. मात्र महाराजांच्या महाली जाणंयेणं वाढल्यावर या पारिजातकाला मोगऱ्याची-जाईजुईची फुलं येउु लागल्यानं प्रधानजींचा आनंद शतगुणितच झाला.
एकदा महाराजांनी प्रधानजींच्या कामगिरीवर खुष होऊन त्यांना रजा दिली आणि वहिनीसाहेबांना घेऊन पर्यटनास जा, अशी सूचना केली. त्यासाठी शाही खजिन्यातून सारीकाही व्यवस्था केली. खाशा रथ दिले.
प्रधानजींच्या आनंदाला पारावर उरला नाही. सौभाग्यवतीसुध्दा तितक्याच आनंदी झाल्या. दोघेही पर्यटनास निघाले. दरमजल करत करत अनेक प्रेक्षणीय स्थळे त्यांनी बघितली. एके ठिकाणी रात्री डेरा पडला होता. दिवस हिवाळ्याचे होते. मोकळे आभाळ होते. तो दिवस पोर्णिमेचा होता. नभी पूर्ण उगवलेला चंद्रमा मनोहारी भासत होता. प्रधानजी आणि त्यांच्या सौभाग्यवती राहुटीच्या बाहेर शेकोटीजवळ बसून प्रेमाच्या गप्पा- टप्पात रंगून गेले होते. सौभाग्यवतींच्या रेशमी केसांमधून बोटे फिरवता फिरवता प्रधानजी त्यांना म्हणाले,
आम्ही, खरच इतके भाग्यवान आहोत की आमचा हेवा देवांनाही वाटवा.
कां बुवा, प्रधानजींच्या सौभाग्यवतीने लाडिकपणे विचारलं.
तुमच्यासारखी सौंदर्यवती आणि अप्रतिम चहा करणारी पत्नी आमच्या नशिबी आली म्हणून. देवांच्या बायका सुंदर असतील पण त्या अप्रतिम चहा करत असल्याचं आपण तर बुवा कधी ऐकल नाही की आमच्या आजोबांनी सुध्दा आम्हास सांगितलं नाही.
खरच, प्रधानजींच्या सौभाग्यवती पुन्हा लाडानं म्हणाल्या.
होय खरच, आता तुम्ही आणि आम्ही एक झालो आहोत. शिवपार्वतीसारखं.
अहो नाथ, तुम्ही माझं कितीही कौतुक करा की, पण शिवपार्वतीला मध्ये आणू नका बुवा. ते ऐक होते का दोन होते का अनेक असे कुणीही सांगू शकत नाही. आमच्या आजोबांनाही माहीत नव्हतं.
बरं बाबा, तुम्ही माझा जीव, मी तुमचा प्राण हे तरी कबूल कराल की नाही.
नाथ, असं काही वास्तवात नसतं. प्रत्येकाचा प्राण वेगळा नि जीवही वेगळा. एकाचा प्राण गेला तर दुसऱ्या जीव जाईलच असं नाही की.
बरं बाबा, तुमचं हे म्हणणं सुध्दा खरं, पण तुम्ही मोर आणि आम्ही तुमच्या अंगावरील इंद्रधनुषी पिसारा असं म्हंटलं तर कसं वाटतं.
छे हो. मोराला तर त्याच्या पिसरा काळाकुट्ट असतो का पांढराफटक असतो हे ही ठाउुक नसतं. पण नाथ, तुम्ही कां बरं असं आमच्याशी बोलता आहात. आमची परीक्षा घेत आहात वाटतं.
नाही हो, आम्ही तुमची परीक्षा घेत नाही आहोत. तुम्हाला पहिल्यांदा ज्या दिवशी आम्ही ओलेते बघितलं त्याच दिवशी तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला. पण आम्ही मात्र अनुत्तीर्ण झालो. प्रधानजी चंद्राकडे बघत म्हणाले.
नाथ, असं काही कोड्यात बोलू नका बुवा.
अहो, खरं तर आम्ही तेव्हाच सांगून टाकायला हवं होतं. तुमच्यापासून काहीही लपवून ठेवायला नको होतं. पण एवढे महिने तशी हिम्मतच झाली नाही. पण आता कसं, मला तुम्ही आणि आम्ही एकच झाल्यासारख वाटतना सारं काही सत्य सांगून टाकावं असं वाटतं. त्यामुळे, सत्यमेव जयते याचंही प्रत्यंतर यानिमित्त तुम्हास आणि आम्हास येऊन जाईलच की.
नाथ, एवढी लांबलचक प्रस्तावना करु नका ना गडे. प्रस्तावनतेच कंटाळा आला तर कादंबरीची चार पानेही वाचली जाणार नाहीत बघा.
अहो, आज या चंद्राच्या साक्षीनं सारं काही सत्य सांगून टाकणार आहोत आम्ही. तुम्ही रागावू नका, की आमचा व्देष करु नका, हे ऐकल्यावर आम्हास सोडून जाऊ नका. तुम्हास जरी वाटत नसलं तरी तुम्ही माझा प्राण आणि मी तुमचा जीव आहे…..
नाथ, तुम्ही अजूनही प्रस्तावनेतच अडकलाय बुवा. पुढे चला की.
अहो, तुमच्या प्रेमात पडण्याआधी आमचं एक प्रेमप्रकरण होतं..ते सांगायचं राहून गेलं. तुमच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. पण हिम्मत होत नव्हती. प्रधानजींना हे बोलता बोलता हुंदका आला.
आता, सौभाग्यवतींची काय प्रतिक्रिया असेल याचा अंदाज ते करु लागले. त्यांनी डोळे मिटून घेतले. त्या कशाही वागल्या ,काहीही बोलल्या तरी ऐकून घेण्याची त्यांनी मानसिक तयारी केली.
खाली मान घालून हुंदके देणाऱ्या प्रधानजींची मान सौभाग्यवतींनी हलकेच वर केली. त्यांचे डोळे उघडले आणि त्यांच्या नजरेला नजर भिडवत त्या फिस्सकन हसल्या.
अहो, तुम्ही आमचं सांगणं हसण्यावरी नेता. प्रधानजींनी आश्चर्यानं विचारलं. अमावस्येला तर पोर्णिमेचा चंद्र उगवला नाही ना, असं वाटून त्यांनी आकाशाकडे बघितलं. चंद्र पोर्णिमेचाच होता. त्यांची ही अवस्था बघून सौभाग्यवतींना हसू आवरेना.
तुम्ही आमच्यावर कां हसता आहात, काहीच कळेनासं झालय.
अहो नाथ, तुमचं एक प्रेमप्रकरण होतं ,याचं काय एवढं वाईट वाटून घेता. माझी तर तीन प्रेमप्रकरण झालीत की. त्यातलं तर एक नुकतच फुलू लागलय, डुलू लागलय...सौभाग्यवतींचं हे बोल कानी पडताच, प्रधानजींना वाटलं आपल्या पायाखालची जमीन तर दुभंगली नाही ना. अंगावर मोठे पाषाण तर आदळले नाही ना. आभाळातली वीज तर पडली नाही ना. पोर्णिमेच्या चंद्राचं रुपांतर चेटकिणीत होऊन तिने आपल्याला गिळलं तर नाही ना.
पण असं काहीही झालं नव्हतं. फक्त घात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. तसं वरकरणी न दाखवता, त्यांनी सौभाग्यवतींकडे बघून मोठ्या कष्टाने स्मित केलं. आता पुढे जाण्यात त्यांचा रस संपला होता. त्यामुळे ते सौभाग्यवतीसह माघारी फिरले. महाली परतल्यावरच दोन घटकेतच त्यांनी धावत धावत राजमहाल गाठला…
००००
आपल्या सुंदर जीवनात अखेर घात झाल्याचं त्यांना महाराजांना सांगायचं होतं. महाराजाचं दर्शन होताच त्यांच्या पायावर लोटांगण घालून प्रधानजी महाराजांना कैफियत सांगत सुटले. महाराज त्यांना शांत करत गालातल्या गालात हसत होते.
प्रधानजींच्या सौभाग्यवतींच्या प्रेमप्रकरणातील एक पात्र ते स्वत: होते. हे सत्य मात्र आपण उघडकीस आणलं तर सोज्वळ प्रधानजींचा प्राण इथेच जायचा आणि मनुष्यवधाचं पाप आपल्यास लागायचं असं वाटून महाराज गप्प बसले. सत्यमेव जयते हे वचन शोधणारा गृहस्थ हा वेडाच होता याची त्यांना खात्री पटली.
प्रधानजी काही काळाने शांत झाले. आपलं मन मोकळं केल्यानं त्यांना बर वाटू लागलं.
पण प्रधानजी, तुम्हास जर आणखी मन मोकळं करायचं असेल तर तुमच्यासुध्दा एका प्रेमप्रकरणाचही सांगून द्या की..असं मनात साचून साचून ठेवलं की त्यावर बुरशीच चढते. बुरशीमुळे प्रकृतीवर परिणाम होतो…
महाराजांचं सांगणं बरोबरच होतं. इतकं बोललोच आहोत तर आता आपण आपलंही प्रेमप्रकरण, मन हलकं करण्यासाठी सांगून टाकायला काहीच हरकत नाही, असं प्रधानजींना वाटलं…
खरंतर त्यांच्या सौभाग्यवतींनी जो गौप्यस्फोट केला त्याच्या धक्क्यातून प्रधानजी अद्यापही बाहेर पडले नव्हते. त्यामुळे समोर महाराज असतानाही काय आाणि किती बोलावं यावर त्यांचं काही नियंत्रण नव्हतं. ते अघळपघळ बोलत राहिले. त्यांनी डोळे मिटून घेतले .
ते महाराजांना म्हणाले,
शिवकुमारी, या आमच्या एकमेव प्रेमप्रकरण, महाराज.
महाराजांना हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होतं.
काय म्हणालात प्रधानजी, पुन्हा एकदा सांगा.
शिवकुमारी..
यांचं नाव कुठे तरी ऐकल्यासारखं वाटत आम्हास.
महाराज, कुठेतरी काय, या महालातच तुम्ही ऐकलं आहे. आपल्या महाराणी शिवकुमारी,
आँ…महाराजांनी आँ फासला. प्रधानजींना वाटत होतं की त्यांचा घात झाला पण प्रधानजींच्या पहिल्या प्रेमप्रकरणाचं नाव महाराजांच्या कर्णपटलावर पडताच, या आघाताने त्यांची वाचाच गेली…
सुरेश वांदिले