असे कसे चालेल?
इंद्रसेना,चाललं तरी काय इकडे.कस शांत आहे सर्वत्र. कल्ला,किल्ला,गोंधळ,वाद,वितंडवाद काहीच कसे नाही. महेश्वर, इंद्रसेनांना बोलते झाले.
देवांच्या राजधानित, इंद्रप्रस्थात शांतीचा महापूर आल्याचं त्यांच्या कानावर गेलं होतं.चिरंजीव एकदंतांकडून त्यांनी याची खात्री करुन घेतली होती. इंद्रप्रस्थ असे शांततेत जाणे हे त्यांना योग्य वाटेना. त्यांनी व्यंकटेश्वरांच्या निदर्शनास ही बाब आणली.त्यांनाही चिंता वाटली.दोघांनीही प्रत्यक्ष परिस्थिती तपासून खात्री करुन घेण्यासाठी इंद्रप्रस्थाकडे कूच केले.
कैक युगानंतर इंद्रप्रस्थी येऊनही आपल्या आगमनाच्या वेळी वाद्यांचा आवाज नाही,टाळमृदंग नाही,घोषणा नाही,रणभेरी नाही,सगळी कशी शांतता.हे बघून महेश्वर आणि व्यंकटेश्वरांना कसेसेच वाटले.आपण इंद्रप्रस्थसोडून अन्यत्र तर आलो नाही ना.हा इंद्रेसन तोतया तर नाही ना अशीही शंका त्या दोघांना वाटली.मग त्यांनी थेट विषयाकडे जाण्याचे ठरवले.
इंद्रसेना,हे चालल तरी काय,महेश्वर म्हणाले.
अत्युकृष्ट चालले आहे,महेश्वरा..सर्वत्र कसे शांत शांत..
यास तुम्ही अत्युकृष्ट म्हणता,इंद्रेसना,व्यंकटेश्वर म्हणाले.त्यांच्या बोलण्यातला नाराजीचा सूर स्पष्टपणे जाणवत होता.
इंद्रसेनांनी ते बरोबर ताडले.ते दचकले सुध्दा.महेश्वर आणि व्यंकटेशवर हे उगाच इंद्रप्रस्थी आले नसून त्यांच्या मनी काहीतरी वेगळेच आहे,हे चाणाक्ष इंद्रसेनांनी बरोबर ओळखले.माझी गच्छंती तर यांना करावयाची नाही ना,अशीही एक सुक्ष्म शंकाही त्यांच्या मनी आली.ते सावध झाले आणि अतीनम्रतेने त्यांना म्हणाले,इंद्रप्रस्थीची शांती आपणास खटकते का देवा.
इंद्रसेना खटकण्याचीच बाब आहे ही.शांततामय सहजीवन हे फक्त ग्रंथांमध्ये शोभून दिसते हो.तुझा आणि ग्रंथांचा काहीच संबंध नसल्यानं तुला हे ठाऊक नसावं,असं दिसतं.महेश्वर म्हणाले.
इंद्रेसना,तू आर्ट ऑफ लिव्हिंगची शिकवणी लावलीस की काय.व्यंकटेश्वरांनी विचारलं.
दोन्ही देव काय बोलताहेत याचा काहीच संदर्भ इंद्रसेनांना लागेना.त्यामुळे काय बोलावं हे त्यांना कळेना. इंद्रदरबारी शांती नावाची अप्सरा नाही,असं तर यांना म्हणावयाचे नाही ना,असे इंद्रसेनांना वाटलं.या दोघांचेही प्रस्थान होइस्तोव आपण ही अप्सरा शांती,दरबारी आणून यांच्यासमोर पेश करु हे त्यांनी ठरवलं.
इंद्रसेन काहीच बोलत नाही हे बघून महेश्वरांना राग येऊ लागला.ते चढ्या आवाजात म्हणाले,इंद्रसेना इथे अशी ही शांतता कशापायी.स्मशान सुध्दा शांत नसतात, इतके.
मंदिरात तर घंटी,घोषणा,मंत्रस्तवण,आगे जाव,जगह करो,दिखता नही क्या,मूर्ती बघा नि मागे जावून प्रार्थना करा,असे बोल,गार्डच्या शिट्टया असा गिलका असतो.व्यंकटेश्वर म्हणाले.
देवादीदेवा,म्हणजे इंद्रप्रस्थातील शांती तुम्हास पसंत नाही.
कशी राहणार? कल्ला,गिलगा,गोंधळ,विंतडवाद,याशिवाय जीवन पुढे जायचे कसे? नदी पुढे गेली नाही तर मृत होते.मग जीवन पुढे गेले नाही तर तेही मृत होते.असे मृतमय जीवन तू इंद्रप्रस्थी आणले आहेस.या विश्वात काय चालले आहे हे बघत नाहीस का तू.महेश्वर म्हणाले.
देवादीदेवा,रावणाचा वध झाला,राक्षसमंडळी कुठे गेली समजायला काहीच मार्ग नाही,कुणालाही इंद्रपस्थावर स्वारी करावी असे वाटत नाही,श्रीकृष्णाला महाभारताचे दुसरे महायुध्द करावयाचे अद्याप सुचलेले नाही.कोणत्याही ज्येष्ठ मुनींना आता संताप येत नाही.हनुमंताच्या पुढच्या पिढीस सूर्य गिळावा असे वाटत नाही.आताशा इंद्राणी सोडून एखाद्या अहिल्येकडे लक्ष द्यावे असे आमच्या मनी येत नाही.तेव्हा अशांती येणार तरी कशी तुम्हीच मार्गदर्शन करा..इंद्रसेन काकुळतीने म्हणाले
त्यांचे म्हणणे महेश्वर आणि व्यंकटेश्वरांना ध्यानी आले.दोघेही काही क्षण विचारमग्न झाले.आणि त्यांना एक नामी उपाय सूचला.आधी व्यंकटेश्वर बोलते झाले ..
इंद्रसेना,तुला शेक्सपिअर ,वर्डस्वर्थ,चार्लस डिंकन्स,टॉलस्टाय,होमर,विन्स्टन चर्चिल,दांते,मॅक्समुल्लर,सॉमरसेट मॉम,कार्ल मार्क्स या मंडळींचा परीचय असेलच ना.
म्हणजे काय,देवादीदेवा,अहो ते येथील सन्मानीय ज्येष्ठ नागरिक आहेत.
छान,म्हणजे एवढे तरी तुला ठाऊक आहे तर,समजून बरे वाटले.महेश्वर म्हणाले.इंद्रसेनांना मूठभर मास चढले.
देवादीदेवा या ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही काय करायचे.
हे ज्येष्ठ नागरिक इंद्रप्रस्थिची शांती भंग करण्यास तुला सहाय्य करु शकतात.
ते कसे,
इंद्रसेना,वरील मान्यवरांच्या मदतीने इंद्रप्रस्थात गॅलेक्सी इंटरयुनिव्हर्स लिटरेचर महामंडळाची स्थापन करा.त्याच्या वार्डनिहाय शाखा काढा,प्रत्येक निवासनिहाय उपशाखा काढा.
मग काय करु,
मग,अमावशेला एक आणि पोर्णिमेला एके असे प्रत्येक महिन्याला दोन गॅलेक्सी इंटरयुनिव्हर्स साहित्य संम्मेलन घेण्याचे जाहीर करा. त्यासाठी अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्या..कुबेर कुमारांना सांगून त्यासाठी निधीची तरतूद करा आणि मग बघा कसे कल्ला,गिलका,वाद आणि वितंडवाद होते.ते एकदा सुरु झाले की मग शांतता भंग पावलीच म्हणून समजा..
इतके सोपे आहे ते..इंद्रसेन उत्साहाने म्हणाले..
इतके सोपे असते तर ते केवळ महाराष्ट्र देशीच कसे झाले असते,बिहार देशी,आर्यलंड देशी,हाँगकाँग देशी,सौदी अरेबिया देशी,उत्तरप्रदेशी देशी नसते का झाले.पण जे झाले नाही त्याबद्यल बोलायचे कशाला.महाराष्ट्री देशी ते झाले.दुसरा क्रमांक इंद्रप्रस्थाचा.तुम्ही एक पाऊल पुढे टाका,दुसऱ्या पावलावर महाराष्ट्र देशीचे थोर थोर साहित्यिक जे सांप्रतकाली इंद्रप्रस्थाचे ज्येष्ठ नागरिक झालेत,ते त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन तुम्हाला करतीलच.बाकी आम्हा दोघांचे आशीर्वाद आहेतच तुमच्या भाळी..व्यंकटेश्वर म्हणाले. दोघांनी इंद्रसेनांचा निरोप घेतला.