अवगुणांचा शोध…सद्गुणांची जोपासना
आर्य चाणक्यास एकानं विचारलं होतं की एखाद्याचं प्रारब्ध आधीच जर ठरलं असेल तर परिश्रम करण्याची आवशक्यता तरी काय? यावर चाणक्यांनी उत्तर दिलं की, जर प्रारब्धात परिश्रमाशिवाय काहीच मिळणार नाही असं लिहिलं असेल तर..या उत्तरानं ती व्यक्ती नक्किच निरुत्तर झाली असेल. प्रारब्ध, नशीब, भाग्य यांचं प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात जे काही महत्व असतं किंवा नसतं, ते जरी बाजूला ठेवलं तरी कोणत्याही भाग्यवान वा नशिबवान व्यक्तिस परिश्रमाशिवाय यश प्राप्त होत नाही, हेच अंतिम सत्य ठरतं.
असं म्हणतात की परीश्रमच व्यक्तिचं भाग्य ठरवत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चं साम्राज्य स्थापन केलं ते अखंड परिश्रमातून. सरदारकी करत राहण्याचा पर्याय त्यांच्यापुढे होता. बाजीराव पेशवे (पहिले) हे अद्वितीय योध्दा झाले. प्रत्येक मोहीम त्यांनी जिंकली. अखंड परिश्रमाशिवाय हे शक्य झालं नसतं. पुण्याच्या वाड्यात सुखनैव आयुष्य जगणं त्यांना काय कठीण होतं?
शंभर टक्के विश्वास
सातत्यपूर्ण परिश्रम करण्यासाठी स्वत:वर शंभर टक्के विश्वास हवा. तो असला की स्वत:चे गुण जितके लक्षात येतात त्यापेक्षा अवगूण अधिक लक्षात येतात. कोणत्याही व्यक्तिच्या अपयशासाठी त्याचे अवगुण हेच जास्त जबाबदार असतात. माणूस ज्या गुणांच्या सर्वाधिक प्रेमात असतो खरतर ते अवगुण असतात. त्यामुळे या अवगुणांकडे दुर्लक्ष करण्याकडे आणि त्याचे कोडकौतुक करण्याकडे अधिक कल असतो. हा कल कालपरत्वे वाढत जातो. त्यामुळे खरे गुण बाजूला राहतात. त्यांची जागा हे अवगुण घेतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तिस प्रारंभी काही प्रमाणात यश मिळतही असेल, पण नंतर मात्र त्यास व्यक्तिगत आणि व्यावहारिक जीवनात अपयशच मिळत राहतं. अवगुणांचा शोध ज्या व्यक्तिस जितक्या लवकर लागेल तितक्या लवकर ती व्यक्ती स्वत:ला अधिक सक्षम आणि समर्थ करु शकेल.
अवगुणांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तिस स्वत:साठी अतिशय कठोर व्हायला हवं. कारण अशी कठोरता या अवगुणांच्या मुळापाशी घेऊन जाऊ शकते. शिवाय या अवगुणांना मुळापासून निपटून काढण्यासाठी सहाय्य सुध्दा करु शकते. असं सहाय्य मिळालं की अंगात भिनलेल्या एकएक अवगुणांवर मात करण्यासाठी उपाय मिळू लागतात. मार्ग दिसू लागतात.
अवगुणांवर मात
अवगुणांवर मात करणारी व्यक्तीच अधिक परिश्रम करु शकते कारण तिला आपली सर्व उर्जा परिश्रमावर केंद्रित करणं शक्य होतं. तुम्ही परिश्रमी असाल , गुणवान असाल पण दुर्गुणावर मात करु शकला नाहीत तर अर्धी उर्जा त्यादिशेनं जात राहते. ही उर्जा, उत्साह कमी करत राहते. एकदा उत्साह कमी झाला की उसनी उर्जा आणता येत नाही.
अवगुणांनीच अनेक श्रेष्ठ व्यक्तिंचं पानिपत केलं. यशोशिखर चढत असतानाच त्यांचे पाय अधू केले. त्यामुळे गुणांपेक्षा अवगुणांचा शोध सतत घेत राहणं अत्यावश्यक ठरतं. एक अवगुण गेला की आपण सद्गुणाचे पुतळे होत नाही. दुसरा अवगुण त्याची जागा घेण्यासाठी तयारच असतो. त्यामुळे क्षणोक्षणी सावध रहावं लागतं.
अवतीभवती खूप आकषर्णाच्या बाबी आहेत. त्यात नित्य नव्या बाबींची भर पडत असते. त्याकडे वळण्याचा मानवी स्वभाव आहे. ती त्याची कमतरता आहे. याची जाणीव आद्य मानवापासून आधुनिक मानवापर्यंत सर्वांना आहे. त्यामुळे वेळोवेळी झालेल्या नुकसानीची तीव्रता देखील त्यास ज्ञात असते. तरीसुध्दा मानवी मन तिकडे धाव घेत असते.
सद्गुणांवर अवगुण भारी ठरत असतात. त्यामुळे ते भारी पडू नये यासाठी कायम दक्ष आणि सावध राहायला हवं. हे ज्या व्यक्तिस जमतं. त्यापासून अपयश चार हात आणि दोन पावलं दूर राहतं.
मन शुध्द हवं
अवगुणांवर मात करण्यासाठी मन शुध्द असायला हवं. ती आपली मोठी कमजोरी आहे. मनाची शुध्दता राखणं दिवसागणिक कठीण होत चाललं आहे. हे पावित्र्य तो मंदिरातही राखू शकत नाही. मंदिरात देवाच्या दाराजवळ पोहचता पोहचता मोबाइलची घंटी वाजली तरी तो अस्वस्थ होतो. मोबाइल कानी लावतो. त्याक्षणी देवाचं दर्शन महत्वाचं की मोबाइल मधील आवाज महत्वाचा हे ठरवण्याची शक्ती मनाचं पावित्र्य घालवून बसल्यामुळे गमावून बसतो. मनाचं पावित्र्य असं घालवून बसल्याने व्यक्तिगत आयुष्यातल्या पारदर्शकतेला घालवून बसतो. पारदर्शकता नाही याचा अर्थ प्रामाणिकतेचा अभाव, असं समजायला हवं.
प्रामाणिकतेची आपली व्याख्या सोईनुसार बदलत जाते. यावेळी नेमकं, कधीकधी चांगल्या गोष्टीसाठी असत्य बोललेलं चालू शकतं, या गीतावचनाची आठवण होते. गीता वचनाची नेमकी हीच आठवण इतक्या वर्षात आपण फारच पक्की करुन ठेवली आहे. गीतेनं कितीतरी गोष्टींपासून सावध होण्यासाठी मार्ग दाखवले, दिशा दाखवली. विविध सूत्रे दिली. अनेक पात्रांची निर्मिती करुन अवगुणांमुळे कसं होत्याचं नव्हतं होतं हे प्रभावीरीत्या ठसवण्याची किमया केली. पण सारं काही ओम फस्स.
महाभारतीय प्रत्येक व्यक्तिचा सोईचा अर्थ लावतो. अधिकाधिक वेळा दुर्योधन होण्यात भूषणावह मानतो. दु:शासन तर खिशातच पडलेला असतो. धृतराष्ट्राचं सहाय्य तो देत नसतानाही घेत राहतो. धृतराष्ट्राचं उदाहरणं किती विविध अंगानं अवतीभवती दिसतात. त्या धृतराष्ट्राला शिव्याशाप देताना स्वत:ला कधी धृतराष्ट्र करुन घेतो हेही कळत नाही. आजच्या काळात शकुनी मामाश्री आपलं दिवसभराचं वागणं-बोलणं आणि व्यवस्थापन नियंत्रित करत राहतो. या शकुनी मामाश्रींना आपण गोंजारत राहतो. श्रीकृष्णाचा तत्वज्ञानी आणि पराक्रमी चेहरा फार ओळखीचा वाटत नाही. त्याची रोमँटिक प्रतिमा भव्यदिव्य वाटते. पांचालीचा त्याग , बुध्दिमत्ता, शौर्य, कष्ट, दूरदृष्टी याच्याशी काहीही देणंघेणं न ठेवता भलत्याच कारणासाठी तिचा आदर्श ठेवावा वाटतो किंवा तेवढीच एक चर्चा करतो. अवगुणांना वरचढ होऊ देऊ नका. तेच गुण समजू नका हे सांगण्यासाठी व्यासमुनींनी किती कष्ट घेतले. त्यांचे सारे कष्ट वाया जावेत अशी परिस्थिती आपण निर्माण करुन ठेवली आहे.
भरकटवणारे अवगूण
अवगुण हे व्यक्तिच्या व्यक्तिमत्वास काळवंडतात. त्याला भरकटवतात. यशाची खोटी आशा दाखवत अपयशाच्या खाईत ढकलून देतात. अहंकार जोपासतात. कौर्य वाढवतात. आक्रमक करतात. नकारात्मक बाबी ठासून भरतात. इतरांना तुच्छ समजायला भाग पाडतात. इतरांना पाण्यात पाहायला लावतात. इतरांचे वाईट कसे घडेल यासाठी प्रयत्न करायला भाग पाडतात.
अवगुणांनी कोणत्याही व्यक्तिस घडवलेलं नाही. त्याचा विध्वंसच केला आहे. हा विध्वंस केवळ एकट्याचा होत नाही. कुटुंबियांना, कुटुंबियांच्या परिघातील स्नेही मंडळींना, व्यावसायिक आणि व्यावहारिक परिघातील सहकाऱ्यांना याचा फटका या ना त्या रुपात वेळोवेळी बसत असतो. अंतिमत: त्याचा मोठा परिणाम समाजावर होतो. गेल्या काही वर्षात अवतीभवती जो विध्वंस झाला, नुकसान झाले, समाजजीवन गढूळ झाले त्याच्यामुळाशी हे अवगुण होते. ते दूर सारावे यासाठी संबंधित व्यक्तिने त्यात्यावेळी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्याच्या अवतीभवतीच्या लोकांना हे अवगुण पराक्रमाचे प्रतिक वाटत राहिले. त्यामुळे त्याची जोपासना करुन आणि हवा देऊन या व्यक्तिंनी संबंधित व्यक्तिंचा अहं आणखी फुलवण्यात आणि खुलवण्यात धन्यता मानली. त्याचे दुष्परिणाम मुंबईपासून पॅरिसपर्यंत, जाफन्यापासून लंडनपर्यंत सारेचजण भोगत आहेत. पुढील काळात यात काही फरक पडेल असं सध्याचं अजिबात चित्र नाही. अवगुणांची ही मात्रा फार जालीम असते. त्यामुळे त्यापासून स्वत:ला जितकं दूर ठेवता येईल तितकं ठेवलं पाहिजे. ते नक्किच करु शकतो. अवगुणांचा डोंगर आपल्या वजनापेक्षा जास्त होऊ न देणं हे श्रेयस्कर ठरतं. कारण या डोंगराखाली कधी आणि कसं दबून जाऊ किंवा गाडलं जाऊ हे कळायचं नाही.
अवगुणांमुळे एकप्रकारची शिथिलता येते. ही शिथिलता आळसास जन्म देते. सर्वगुणसंपन्न आहोत असं वाटू लागतं. त्यातून परिश्रमाची गरज काय असही वाटू शकतं किंवा लागतं. जेव्हा असं वाटतं तेव्हा आपलं प्रारब्ध रुसतं किंवा भाग्य आपल्याला सोडून जातं असं समजावं. भाग्य प्रसन्न होण्यासाठी परिश्रम हा खरामंत्र आहे. तो मंत्र सफळ होण्यासाठी सद्गुणांची जोपासना करणं गरजेचं आहे.