आरोग्यतपासणीचा उत्तम योग…
कार्यालयीन कामात व्यस्तता वाढ असतानाच आपण पन्नाशी कधी आणि कशी पार करतो हे लक्षात येत नाही. तसं लक्षात आलं तरी अजूनही उत्साह, उर्जा आणि रग काही कमी झालेला नसतो. आत्यंतिक धावपळ करण्याची, ताणतणाव घेण्याची आणि नवी आव्हानं स्वीकारण्याचीही आपली मानसिक आणि शारीरिक तयारी अद्यापही असते. पुढील चार पाच वर्षे अशीच निघून जातात आणि आपल्याला शारीरिक आणि मानसिक सक्षमतेला काही धक्के कळत नकळत बसू लागतात. त्याची चिन्हे दिसू लागतात. आपलं शरीर आणि मन त्याची जाणीव हळूहळू करुन द्यायला लागतं. पण त्या जाणिवेकडे कधी ठरवून तर कधी अगदी सहजच दुर्लक्ष करतो. आपलं कार्यमग्न असणं सुरुच राहतं. बघता बघता आपण कधी पंचावन्न पूर्ण केले ते, लक्षात येत नाही. केसात पांढऱ्या बटा येऊ लागतात. पाय आणि गुढघे दुखण्याची प्रक्रिया सुरु होते. अधूनमधून डोळे आणि दात दुखू लागल्याचंही कळतं. कामावर पूर्वीसारखं लक्ष केंद्रित होत नाही असं जाणवू लागतं.
बाह्यता आपण तंदुरुस्त असल्याचं वाटत असलं तरी अंतरंगात मात्र काहीतरी वेगळ चालल्याची चिन्हे दिसू लागतात. काही सिग्नल्स मिळू लागतात. कामाचा झपाटा, चालण्याचा आवेग कमी होत असल्याचं लक्षात येतं. थोडं वेगानं चालायला गेलं तरी धाप लागू लागतं. चार पावलं पळणं अशक्य होऊन बसतं. पोटाचा घेर बऱ्यापैकी वाढल्याचं लक्षात येतं. आतापावेतो डॉक्टरकडे फारसं जाण्याची पाळी आली नसते. किरकोळ सर्दी खोकल्यापलिकडे फारसं काही झालं नसतं. त्यामुळे तेवढयापुरत्या गोळया आणि औषधी घेतलं की काम भागत असतं. पण पन्नाशीत पोहचल्यावर शरीरात काही दुखणी वर काढू लागतात. छातीत जळजळ सुरु होते. धाप लागण्याचं प्रमाण वाढू लागतं. तेव्हा डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित तपासणी करण्याची वेळ आलीय असं आपलं एक मन सांगतं आणि छे आपल्याला काहीच झालं नाही किंवा होऊ शकत नाही. असं दुसरं मन सांगतं. दुसऱ्या मनाच्या पारडयात माप टाकून आपण कामात पुन्हा गुंतून जातो.
सावधानतेचा इशारा
पहिलं मन मात्र सतत प्रसंगपरत्वे सावध करत राहतं, काही बाबींची आठवण करुन देत राहतं. पण आपण फिट आहोत, खाणं-पिणं व्यवस्थित आहे, नियमित व्यायामही करतो तेव्हा आपणास काहीच होऊ शकत नाही असंच वाटत राहतं. या वाटण्यावर आपलं दुसरं मन शिक्कामोर्तब करत राहतं. त्यातून डॉक्टरांकडे जाण्याच्या मार्गावर फुली मारतो. एके दिवशी कुणाची तरी बातमी कानावर पडते. ती असते, स्ट्रोक आल्याची. अँजिओप्लॅस्टी झाल्याची. ब्रेन हॅमरेज झाल्याची, पॅरॅलिसीस झाल्याची आणि अर्थातच कायमचं निजधामास गेल्याची सुध्दा. हा कुणी एक आपल्या ओळखीचा, आपला नातेवाईक, आपला सहकारी किंवा आपला ज्याच्याशी काहीच संबंध नाही असा असतो. असं काही कानावर आलं की आपण हळहळतो. हे हळहळणं ह्रदयाचे ठोके वाढवून जातात. जेव्हा आपणास कळतं की अरे, हे ज्याच्या बाबतीत घडलंय तो आपल्याच वयोगटातला म्हणजे पन्नाशी किंवा त्यापुढचा, असं काही घडण्याचं काही वय नव्हतं राव, आपण स्वत:ला समजावतो. पुन्हा कार्यमग्न होतो. हे जे काही संबंधित व्यक्तिच्या बाबत घडलं ते आपल्याही बाबत घडू शकतं. याचा अजूनही मनापासून विचार करत नाही.
भ्रमाचा भोपळा
आपल्याला काहीच होऊ शकत नाही हा भ्रम आपण जोपासत राहतो. पन्नाशी गाठलेल्याने या भ्रमातून तत्काळ बाहेर पडणं फार गरजेचं असतं. वयपरत्वे प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक उर्जा कमी कमी होत जाते. शरीराची प्रतिकार शक्ती कमी होत जाते. सर्वप्रकारचे ताण तणाव, अनियमितपणा, खाण्या पिण्यातला शुध्दतेचा अभाव, विविध प्रकारचे पदूषण यांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडत जातो. त्याचा परिणाम शरीरयंत्रावर पडून ते यंत्र हळूहळू नादुरुस्तीकडे वाटचाल करु लागतं. ही नादुरुस्ती अचानक मोठी होते तेव्हा सारीच गडबड होऊ जाते. तेव्हा हळहळण्यापलिकडे काहीही उरलेलं नसतं.
आरोग्य तपासणी
ही परिस्थिती ओढवू नये यासाठी पन्नाशितल्या सर्वांनीच स्वत:ची वार्षिक आरोग्य तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. आपणास काही झालेलं असो वा नसो, आपण डॉक्टरांच्या मदतीनं सर्व प्रकारच्या चाचण्या करुन घेणं इष्ट ठरतं. सध्या वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झालयं. विविध प्रकारच्या संगणकीय चाचण्या करणं शक्य झालयं. रक्त, लघवी, थुंकी अशा काही चाचण्या केल्या जातात. त्यासाठी काही पथ्य पाळली तरी पुरे. उदाहरणार्थ रक्त तपासणीला जाण्याआधी किमान बारा तास पोटात काही गेलंलं नसावं. म्हणजेच उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर अशा दोन वेळेस जाऊन रक्त द्यावं लागतं. या व इतर चाचण्या एका दिवसात करण शक्य होतं. संगणकीय चाचण्या होत असल्यानं सूक्ष्म निष्कर्ष शक्य होतात. यातून शरीरयंत्रात काय काय बिघाड होऊ घातलाय हे डॉक्टरांना लक्षात येतं. या चाचण्यातून काही गंभीर स्वरुपाच्या आजाराची चिन्हे दिसू लागली तरी घाबरुन जाण्याचं कारण नाही. कारण ही चिन्हे वेळेवर लक्षात आल्यानं त्याच्या दुरुस्तीचे उपाय डॉक्टर सुरु करु शकतात. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, असं जे काही आपण लहानपणासनू ऐकत असतो, त्याचं प्रत्यंतर हे असं येतं.
डॉक्टरांकडून वैदयकीय उपायांसोबतच खाण्यापिण्यावरचे नियंत्रण, व्यायामाची दिशा, मानसिक शांती मिळवण्याचं तंत्र आदी बाबी सांगितल्या जातात. त्याचा प्राणामिकरीत्या अंगिकार करायचा असतो. यात सातत्य ठेवलं की शंभर टक्के तंदुरुस्त राहू याची शास्वती देता येत नसली तरी, आपण घेत असलेली काळजी ही शरीरयंत्रातील बिघाडाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत राहते. त्यामुळे अचानक काहीतरी अघटित घडण्याचं प्रमाणही अल्प राहतं. शिवाय त्यामुळे मोठा आघात घडल्यानंतर जी धावपळ होते, संसाधानं खर्ची पडतात, घरच्या मंडळींना वेगळयाच ताण तणावातून जावं लागतं आणि आपल्या शरीरयंत्राची पुढे न भरुन येणारी हानी होते, ते सारं काही थांबू शकतं.
खर्च मर्यादितच
ही अशी सकारात्मक गोष्ट करण्यास आपण कां बरं मागे पाहत असतो. वार्षिक आरोग्य तपासणीस फार काही खर्चही येत नाही. चांगल्या प्रयोगशाळेत आठ- दहा हजार रुपये खर्च येतो. इतका खर्च करण्याची आपली ऐपत नाही असं म्हणणं किंवा हा फिजूल खर्च आहे असं समजणं ही स्वत:चीच फसवणूक ठरते. आपल्या इतक्या वर्षाच्या संबंधातून किंवा ओळखीपाळखीतून काही डॉक्टर या चाचण्यांच्या खर्चात सूटही देऊ शकतात. मोठया शहरातील शासकीय रुग्णालयात आता रक्त व इतर तपासण्यांची सोय आणि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्यांना तिथे जाण्यास कोणताही कमीपणा वाटत नसेल, त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यायला हवा. कारण इथे खर्च कमी लागतो. ज्या चाचण्या शासकीय रुग्णालयात शक्य नसतात त्या बाहेरुन करता येतात.
स्वत:चे कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने, बूट, मनोरंजन, प्रवास आदीवर हात सैल सोडून खर्च करत असतोच की. आरोग्यावरील खर्चसुध्दा वर्षातून एकदा करायला काय हरकत आहे. हा झाला आपला स्वत:चा खर्च. पण त्याचं पूर्णत्व हे तुमची पत्नी आणि मुलांच्याही आरोग्य तपासणीनेच होऊ शकतं.
मुलांची जरी तुम्हास आरोग्य तपासणी दरवर्षी करावी वाटली नाही तरी दोन-तीन वर्षांनी करणं आवश्यकच ठरतं. कारण त्याच्या शरीराला कशाची (व्हिटॅमिन्स,मिनरल्स) कमी आहे किंवा त्याच्या शरीरयंत्रानं कोणत्या दिशेनं प्रवास सुरु केलाय हे त्यातून कळू शकतं. त्यामुळे त्यावरील उपायही तातडीने सुरु करुन त्याची मानसिक आणि शारीरिक सक्षमता अधिकाधिक वाढवता येऊ शकते. सध्याच्या स्पर्धात्मक काळात तर याची फार गरज आहे. कोणत्याही ताण-तणावास तोंड देणारा तुमचा मुलगा किंवा मुलीला, यशाच्या दिशने धावत असताना आरोग्याची कोणतीही समस्या आड येणार नाही हे बघणं पालक म्हणून तुमचं पहिलं कर्तव्य असतं. दर दोन वा तीन वर्षाने केलेल्या अशा तपासणीतून हे कर्तव्य उत्तम प्रकारे निभावल्याचा आनंद तुम्हास मिळू शकतो.
वाढदिवसाची भेट
तुमच्या पत्नीची आरोग्य तपासणी मात्र तुम्ही तुमच्या सोबतच दरवर्षी करायलाच हवी. अशी तपासणी करण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अद्यापही तितकासा सकारात्मक नसला आणि मला काय झालय किंवा होणारेय असं बोलून आरोग्य तपासणीपासून पळवाट काढण्याचा प्रयत्न पत्नी करु शकते. मात्र हा प्रयत्न तुम्ही हाणून पाडायला हवा. आरोग्य तपासणीची एक शिस्त लावायला हवी. तुमच्या पत्नीला तुम्ही वाढदिवसाला आतापावेतो साडी-दागिणे अशासारखे भेटवस्तू दिल्या असतील. यानंतर तिला दरवर्षी मेडिकल चेकअपची भेट दया. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सुटी काढून तुम्ही तिला आरोग्य तपासणीसाठी घेऊन जा. दोघेही एकाच दिवशी सुध्दा आरोग्य तपासणी करु शकता. एखादया मंदिरात जाण्यासाठी आपण कसे उत्सुक असतो किंवा भक्तिभावाने जातोच तसंच आरोग्य तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये जा. एकमेकांचा वाढदिवस हा उत्तम योग असतो. सकाळी सकाळी आरोग्य तपासणी करुन या. आख्खा दिवस तुमचा उत्तम आणि आनंदात जाईल. यापेक्षा वाढदिवस कोणत्या चांगल्या पध्दतीने साजरा करता येऊ शकेल बरं.