जलयुक्त शिवार – हा घ्या पुरावा
कोणतीही आकडेवारी ही वस्तुनिष्ठता दर्शवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेली कामे डोळे दीपवणारी आहेत. ते आकडे मोठे आहेतच. त्याच्यापलिकडे जाऊन बघितले असे लक्षात येते या अभियानामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्हे जलसमृध्दी अनुभवत आहेत.
सततचा दुष्काळ आणि वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे महाराष्ट्रात शेतकरी हवालदील झाला होता. शेती उत्पादनावर परिणाम झाला होता. पिण्याच्या पाण्याचेही संकट उदभवू लागले. ही चिंताजनक परिस्थिती बदलण्यासाठी विद्यमान सरकारने ठळकरीत्या लक्ष केंद्रित केले. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच श्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा केला. जलयुक्त शिवार अभियान कार्यान्वित केले. हे अभियान लोकचळवळ व्हावी यासाठी त्यांनी व्यक्तिश: घेतलेले कष्ट फार मोठे आहे. जवळपास आख्खा महाराष्ट्र त्यांनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालथा घातला.
सर्वत्र जलसाठा
जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांमध्ये कितीतरी कामे मूर्त स्वरुपात आली. नद्यानाल्यांचे गाळ काढले गेले. शेततळी झालीत. नाल्यांचे रुंदीकरण झाले. लोकांनी या कामांमध्ये भरभरुन योगदान दिले. असे एकदिलाने जेव्हा कामे होतात तेव्हा त्याला फळेही उत्कृष्ट येतात. आता हेच बघा ना, नगापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे पेरणीचे क्षेत्र वाढले. दुबार पिकांचे संकट टळले. खरीप पिकांना लाभ झाला. वर्धा जिल्ह्यात साडेतीन दशलक्ष घन मीटर पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. याच जिल्ह्यातील यशोदा नावाची नदी पुर्नजीवनाचा महत्वाचा टप्पा गाठती झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२ हजार ६७० हेक्टर ओलीत क्षेत्र निर्माण झाले. भंडारा जिल्ह्यातील धान पिकास जलयुक्त शिवारच्या पाण्यामुळे संजीवनी मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात पाणीसाठ्यामुळे खरीपानंतर रब्बीच्या परेण्या झाल्या. असे कधी घडत नव्हते याआधी. अमरावती जिल्ह्यात रब्बी क्षेत्रात २१ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली.
टँकरमध्ये घट झाली
यवतमाळ जिल्ह्यात तर कमाल झाली. या जिल्ह्यात ५८ गावांमध्ये पूर्वी टँकरने पाणी पुरवठा केला जायचा. मात्र या अभियानातील कामांमुळे यातील ४६ गावे टँकरमुक्त झाली. ६७ हजार हेक्टर अतिरिक्त क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण झाली. वाशिम जिल्ह्यात तामसी येथे ५ कोटी लिटर क्षमतेचे तळे बांधले गेले. अकोला जिल्ह्यात २७ हजारपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात पिकांकरिता दोन वेळेच्या संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली. नांदेड जिल्ह्यात ४१ नाल्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आल्याने दीडशे गावांना लाभ झाला.
लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी पात्रातील २ लाख घनमिटरहून अधिक गाळ या अभियानात काढण्यात आला. हा गाळ नदीकिनाऱ्यातील २० गावातील शेतीला देण्यात आला. त्यामुळे या शेतीची सुपिकता वाढली. एकूण ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. नदीपात्रात २०४ टीसीएम जास्तिचा पाणीसाठा झाला. लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यास सहाय्य झाले. गेल्या वर्षी लातुरला रेल्वे गाडीने पाणी पुरवठा करण्याच्या पार्श्वभूमिवर ही कामगिरी लक्षणीय ठरते.
सुपिकता वाढली
हिंगोली जिल्ह्यात ३५ लक्ष घनमीटर गाळ शेतीत टाकला गेला. त्यामुळ दोन हजार हेक्टर शती सुपिक झाली. सिंचन तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ झाल्याने विहिरींची जलपातळी वाढली. गेल्या वर्षी जिल्ह्यात ५५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा हा आकडा पाचावर आला. अभियानामुळे पुरेसा पाणी साठा निर्माण झाल्याने शेतकरी आता बारमाही पिके घ्यायला लागली आहेत. परभणी जिल्ह्यातील गहू हरभरा,ज्वारी या पिकांच्या उत्पादनात दीडपट वाढ झाली. ११ शेपेक्षा अधिक विहिरी पाण्याने भरल्या. नाशिक जिल्ह्यातील ४४७ गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. अहमदनगर जिल्ह्यात ५४७ गावांमध्ये जवळपास अशीच स्थिती निर्माण झाली.
धुळे जिल्ह्यातील विहिरींच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली सातारा जिल्ह्यात माण ,खटाव,कोरेगाव आणि फलटण तालुक्यातील अनेक गावांना पूर्वी टँकरने पाणी पुरवठा करावा लागयाचा. यंदा ही परिस्थिती राहिली नाही. पुणे जिल्ह्यात २०० गावे टँकरमुक्त झाली. दुष्काळी जिल्हा म्हणून चर्चेत राहणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे भूजल पातळीत १.३२ मीटरने वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकरची गरज अतिशय अल्प राहिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५२ गावे जलस्वंयपूर्ण झाली. गाळ आणि कचरा साचून ठाणे मृतवत झालेली कनकवीरा नदी अभियानातील कामांमुळे पुर्नजीवित होऊन दुथडी वाहू लागली.
महाराष्ट्रात घडलेल्या पाणीसमृध्दीची ही काही मोजकी उदाहरणे. एकदिलाने झोकून देऊन काम केल्यावर लोकांच्या जीवनात समृध्दी आणणारी अशी कामे घडून जातात. जलयुक्त शिवार पर्वाची नोंद महाराष्ट्रात याचसाठी कायमस्वरुपी केली जाईल.
सुरेश वांदिले