ब्रँड बबनराव !
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचं एक प्रसिध्द वचन आहे, जर तुम्हाला प्रतिष्ठापूर्वक आयुष्य जगायचं असेल तर, तुम्हाला स्वत:लाच सहाय्य करावं लागेल, असं स्वयंसहाय्य किंवा मदत हीच सर्वश्रेष्ठ असते.
या वचनाला मूर्तिमंत स्वरुपात बघायचं असेल तर माझ्या डोळयापुढे बबन जोगदंड यांचं नावं येतं.
बबन जोगदंड, हे एक भारदस्त नाव. ते इतकं की, यशदा सारख्या संस्थेला या नावानं वलय मिळवून दिलं. ही कुणाला किंवा बऱ्याच जणांना आतिशयोक्ती वाटेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की, यशदामध्ये तथाकथित निम्नश्रेणीच्या पदावर असणारे बबन जोगदंडच हे महाराष्ट्राला ज्ञात आहेत. साधारणत: प्रधान सचिव ते अप्पर मुख्य सचिव या दर्जाचे अधिकारी या संस्थेचे प्रमुख पद भुषवतात. गेल्या दोन दशकातील किती अधिकाऱ्यांची अशी नावे सांगता येतील? मेंदुला खूप ताण दिला तरच एक दोन नावे आठवतीलही. पण पुढे काय? ही मंडळी इथे त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत होती. तो कार्यकाळ संपला नि तेही दुसऱ्या वाटेने निघून गेले. यापलिकडे फारसे हाती गवसत नाही. पण बबन जोगदंड या व्यक्तिने, त्याच्याकडे जी काही लहानशी जबाबदारी आहे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा इतक्या उंचिवर नेऊन ठेवलाय की, यशदा संस्थेचा उल्लेख त्याच्या नावाशिवाय अपूर्णच राहतो.
सदैव हसतमुख असणं, हे काही बबनरावांचं मुख्य वैशिष्ट ठरत नाही. तसे अनेकजण हसतमुख असतातच की ! पण या हसतमुख चेहऱ्याच्या पाठिमागे असावा लागतं एक सरळमार्गी आणि संवेदनशील, पारदर्शक मन. बबनराव त्यात शंभर टक्के उत्तीर्ण होतात.
यशदामध्ये असंख्य प्रशिक्षण होत असतात. त्यामध्ये सामील होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना शिकवायला, अनेक मोठी मोठी तज्ज्ञ मंडळी येतात. यशदा मधील काही कायमस्वरुपी अधिकारी मंडळी यात आहेत. पण या प्रशिक्षणार्थींची थेट नाळ जुळते ती बबनरावांशीच. प्रत्येकाशी ते कनेक्ट होतात. प्रत्येकजण त्यांच्यामध्ये आपला एक सखा आणि मित्र बघतात. अनेकदा यशदाचे महासंचालक कोण हे सुध्दा या प्रशिक्षणार्थींना ठाऊक नसतं. त्याचं दालनही ठाऊक नसतं. तिथे जायचं म्हणजे एक उगीच भीती असते आणि तिकडे जायचं तरी कशाला असंही बहुतेक साऱ्यांनाच वाटतं. मात्र बबनरावांची केबिन प्रत्येकजण हुडकून काढतो. प्रशिक्षणाच्या कालावधीत एकदा तरी हा प्रशिक्षणार्थी त्यांच्या केबिनमध्ये डोकावून जातोच. बबनरावांना वेळ असेल तर छान गप्पा होतात. चहा नाश्त्याचा आग्रह होतो. गेल्या अनेक वर्षांपासून, बबनराव हे यशदातील प्रशिक्षणार्थींसाठी हक्काचा माणूस ठरले आहेत. हे त्यांचे मोठेपण ते कधीही मिरवत नाही. त्याचे भांडवलही करत नाहीत. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रभर अनेक थोरामोठ्यांची मैत्री लाभली. ही मैत्री बबनरावांनी छान जपली सुध्दा. महाराष्ट्रातील बहुतेक भागात त्यांचे किमान दोन तीन तरी चांगले मित्र आहेतच आहेत.
यशदा मध्ये ते प्रशिक्षकाची भूमिका बजावतात, समन्वयाची भूमिका बजावतात, अनेक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठीही ते तप्तर असतात. अनेक विभागांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी संबंधित विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले. त्याप्रमाणे अनेक विभागाचे, टू द पॉईंट प्रशिक्षणही होऊ शकले..
इतकं सगळं करत असताना, त्यांचं आवडत काम म्हणजे यशमंथन या त्रैमासिकाचे संपादन. ते अतिशय तन्मयतेनं करतात. यशमंथन ही यशदाची ओळख आहे. प्रत्येक अंकासोबत यशदाच जणूकाही वाचकांपर्यंत पोहचते. वाचकांना सुसवांदाची कौशल्ये अवगत करुन देते. प्रशासनात घडत असलेले उत्तमोत्तम कार्य, प्रयोग, उपक्रम यांना अवगत करते. अधिक कार्यक्षम होण्यासाठी आधुनिक कार्यशैलीचे तंत्र आणि सिध्दांत प्रभावीरीत्या स्पष्ट करते. अधिकार- कर्तव्य- जबाबदाऱ्यांची ठोस आणि ठामपणे जाणीव करुन देते. सकारात्मकता आणि व्यक्तिमत्व विकास यांचे धडेही देते. असा हा चौफेर अंक वर्षानुवर्षे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णरीत्या काढण्याचे कसब बबनरावांनी प्राप्त केले आहे. कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये इतके उत्कृष्ट आणि उत्तम नियतकालिक निघत नसावे. मांडणी – सजावट – सादरीकरण सारे काही मनमोहक आणि यशमंथनाच्या कायम प्रेमात पाडणारे. यशदाने अनेक महत्वाच्या विषयांवर ग्रंथसंपदेची निर्मिती केली आहे. त्याचीही धुरा बबनराव समर्थपणे पार पाडत असतात.
हे इतके यश एखाद्याला मिळाले असते, तर त्याने पुरे झाले आता, शांतपणे वाटचाल करु या, असे स्वत:ला समजावून किंवा सतत स्वत:चा डिंडिम वाजवून आपल्या भोवती वर्तृळ किंवा चौकट मारुन घेतली असती. मात्र बबनरावांना अशा चौकटित अडकणे मान्य नाही.
त्यांची प्रतिभा अनेक क्षेत्रात गरुडभरारी घेत असते. नांदेड सारख्या तसे म्हंटले तर मागास गावातील, लहानपणी उपक्षेचे जीवन जगावी लागणारी एक व्यक्ती, त्या उपेक्षेचे कोणतेही भांडवल न करता आणि ओझे न बाळगता केवळ स्वत:च्या परिश्रमावर आणि नेहमीच दूरदृष्टीने बघण्याच्या सवयीमुळे पुण्यात आपले स्वत:चे स्थान निर्माण करते, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात येणाऱ्या मुलांसाठी सुविधा केंद्र उभारते, प्रकाशन संस्था उभारुन अनेक दर्जेदार ग्रंथांची निर्मिती- विक्री-वितरण सारे काही लिलया करते, हे सारे काही अकल्पित ठरावे. मात्र बबनरावांनी वयाची पन्नाशी गाठण्याच्या आधीच हे कर्तृत्व सिध्द केले. बबनरावांनी स्वत:चा एक ब्रँड तयार केला असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरु नये. हा ब्रँड दर्जेदार आणि गुणवत्तेची हमी आणि खात्री देणारा आहे.
हे सर्व करत असताना, त्यांनी आपली शैक्षणिक तृष्णा अजिबातच कमी होऊ दिली नाही. एकापाठोपाठ एक पदव्यांनी त्यांच्या गळ्यात माळ घातली. बरे, हे काही केवळ आणखी एक पदवी, मिळवण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी नव्हे. सगळया विषयांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक परीक्षा देण्याचा उत्साह आणि उर्जा अगदी पहिल्या परीक्षेएवढीच. हे असं भल्याभल्यांना जमत नाही. ज्ञानसंचय करण्याची ही प्रेरणा अर्थातच त्यांना बाबासाहेंबानी दिली. मात्र अशी प्रेरणा घेऊन त्यात सातत्य राखणारे बबनरावांइतके अल्पच आढळतात. बबनरावांची ही ज्ञानतृष्णा वर्षागणिक नव्हे तर दिवसागणिक वाढताना दिसते. त्यांनी एका विषयात पीएचडी मिळवलेली आहे. आता दुसऱ्या एका विषयात पीएचडी मिळवण्यासाठी ते सज्ज होताहेत.
बबनरावांच्या संघटन कौशल्याचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. उपेक्षित घटकातील सर्वांनाच किमान न्याय मिळवून द्यावे, त्याचे प्रश्न आणि समस्या शासनदरबारी पोहचाव्यात, अशा प्रश्नांची वेगवेगळया व्यासपीठांवर चर्चा व्हावी, लोकांचे लक्ष तिकडे वळावे, लोकांनी त्यावर विचारमंथन करावे यासाठी बबनराव अनेक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात. हे प्रयत्न कधी प्रत्यक्ष संघटनेचा पदाधिकारी म्हणून तर अनेकदा अप्रत्यक्षरीत्या पडद्याआड राहून ते करीत असतात. बाबासाहेबांनी आखून दिलेल्या समाजाच्या उत्थानाचा मार्ग बबनरावांनी त्यांच्या परिने आणखी बळकट केला. सर्वांचे कल्याण ही त्याची आंतरिक तळमळ असते. या तळमळीतून ते दररोज कार्यरत असतात.
इतकी कार्यमग्नता असूनही आपल्या कुटुंबाकडे ते अत्यंत ममतेने लक्ष देतात. आपल्या कार्यमग्नतेचा कोणताही बाऊ करताना ते दिसत नाही. सर्वत्र संचार करत असताना, ते आपले मूळ गाव नांदेडशी स्वत:ची पाळेमुळे घट्ट करुन आहेत. ते आपल्या कुटुंबियांना सदैव आनंदी ठेवतात. ते स्वत:च एक आनंदी झाड आहेत.
परवा, बबनरावांनी नांदेड येथील त्यांच्या झेंडूच्या शेतीत पूर्ण फुललेल्या झेंडूंच्या फुलांसोबत स्वत:चे एक छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रदर्शित केले. झेंडूंची फुले ही मांगल्याचे प्रतिक आहेत. मनमोहक रंगांची, ठोस आणि लक्षवेधक, मनात उत्साह निर्माण करणारी. त्या फुलांमध्ये उभे असलेले, बबनराव हे सार्वजनिक मांगल्याचे प्रतिक आहेत. एखादी सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कोणत्याही कमतरतेचा अथवा अवस्थेचा भांडवल न करता यशाची शिखरे गाठू शकतो, याचे मूर्तिमंत प्रतिक म्हणजे बबनराव!
बबनराव या एकाच व्यक्तीमध्ये इतक्या असंख्य गुणांचा संगम झाला आहे. हे सर्व गुण बावन्नकशी आहेत. आज महाराष्ट्रात स्वत:चे एक वैशिष्ट्यूपर्ण स्थान निर्माण करुनही आपले पाय घट्ट जमिनीत रोवणाऱ्या बबनरावांकडून सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी. बाबासाहेबांचा आदर्श सदैव नजरेसमोर ठेऊन बबनरावांनी आतापर्यंत केलेली वाटचाल ही प्रत्येकास कर्तृत्व गाजवण्यासाठी उर्जा देणारी अशीच आहे.
सुरेश वांदिले