गुलाम
तो जेव्हापासून तिच्याकडे कामाला आला,तेव्हा पासून तिच्या व्यवसायाने गती पकडली. तिला एक नाव असावं म्हणून आपण तिला रेवती म्हणूया! त्याचं नावं,.रविराज. रेवतीचं व्यवसाय हा तसा फार मोठा नव्हता. पण टाइमपासही नव्हता. आपल्या कॉलनीतल्या लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तिने छोटासा फूडमॉल उभारला होता.
एखाद्या भव्य मॉलमध्ये गेल्यावर जे हवं ते मिळतं. क्रेडीट कार्ड असेल तर मग खिशात पैसे नसले तरी हवी तेवढी मनाजोगती खरेदी करता येते. हे मॉल अलिबाबाच्या गुहेसारखे असतात. खुला जा सिमसीम म्हंटलं की लगेच गुहेचा दार उघडला जाणार नि मग फक्त थक्क होऊन जाणारं आणि डोळे दिपवणारं सर्वत्र दिसणार. पुराण कथेतील अलिबाबाची गुहा म्हणजे आजच्या काळातील मॉल असले पाहिजेत यावर रेवतीचा ठाम विश्वास! खरं तर यावर तिला संशोधन करायचय. पण सध्या व्यवसाय करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचं ठरवल्यानं तिने अलिबाबाची गुहा ते आजचे मॉल- एक शोध प्रवास हा संशोधनाचा विषय बाजूला ठेवलाय.तर मॉलमध्ये येणारा ग्राहक हा खाली हात परत जात नाही , तद्वतच आपल्या फूडमॉलमध्ये येणारा ग्राहक माघारी फिरायलाच नको, असं रेवतीचं स्वप्नं आहे.या स्वप्नपूर्तीची पहिली पायरी म्हणून तिने आपल्या दुकानाचं नाव फूडमॉल असं ठेवलं. यात केवळ वडापाव,कांदे पोहे,फ्रँकी असे काही-चार पाच पदार्थ चहा/कॉफी आणि काही कोल्ड्रिंक्स,असा माल ठेवण्याची तिची आर्थिक आणि दुकानाची क्षमता होती.
मुद्रा बँकेतून कर्ज मिळवून तिने यातील काही रक्कम एक गाळा घेण्यासाठी व इतर रक्कम साहित्य घेण्यासाठी खर्ची घातले. थोडक्यात काय तर रेवतीचं फूडमॉल म्हणजे चहा-पान-नाश्त्याचे पाच-पंचेवीसशे जी अतिसामान्य प्रकारची दुकानं असतात त्यातील एक होतं.नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा असा काहीसा हा प्रकार!
या प्रकारातील पाच-पंचेवीसशे दुकानांना जशी ग्राहक संख्या मिळते,तशी कमीजास्त रेवतीच्या फूडमॉललाही मिळाली होती. तसं तिचं बरं चाललं होतं. खाऊन पिऊन चार पैसे सुटत.
साधारणत: वर्षभराने तिच्या या फूडमॉलमध्ये रविराज आला. आपण त्यास रवी नावाने संबोधू. हा रवी शेफ होता. त्याला सर्व प्रकराचे पदार्थ तयार करण्याची कला अवगत होती. त्याने तसं प्रशिक्षण घेतलं होतं. तो सांगितलेला कोणतेही पदार्थ टेलर मेड म्हणजेच अचूक बनवू शकत असे. हा जो रवी आहे,याला पूर्वी पदार्थ करण्याचा अनुभव होता किंवा नाही,हे रेवतीनं जाणून घेतलं नाही. कारण या रवीस तिच्याकडे पाठवलं होतं तिच्या मावशीनं!
मावशीवर तिचा भारी जीव आणि विश्वासही.कारण रेवतीची आई अवचित देवाघरी गेल्यावर मावशीनेच तिचा सांभाळ केला.मोठं केलं.बऱ्यापैकी शिक्षण झाल्यावर आता मावशीवर अधिक भार नको म्हणून रेवतीने कोणतातरी व्यवसाय करण्याचं ठरवलं. त्यातूनच तिच्या फूडमॉलचा जन्म झाला.
मावशीच्या उपस्थितीतच या फूडमॉलचा शुभारंभ झाला. फूडमॉल किंवा मावशीच्या भाषेत अशा उपहारगृहाच्या यशासाठी चांगल्या आचाऱ्याची गरज असते. तो मिळणं हे भाग्यात असावं लागतं. ते गं कोणतं कपाळावरचं की उजव्या हातावरील सर्वत्र पसरलेल्या जाळयावरचं? असं रेवती गमतीनं बोलून गेली.कारण तिचा भाग्यावर किंवा दुर्भाग्यावर विश्वास नव्हता. भाग्य से पहले आणि समय से ज्यादा, या अजरामर वचनाची ती रेवडी उडवायची. त्यामुळे मावशीने सांगूनही तिने फूडमॉल सुरु करताना मुहूर्तही बघितला नव्हता की संख्याशास्त्र किंवा टॅरोट कॉर्डानुसार तारीखही काढली नव्हती. सत्यनारायण स्वामींना तर तिने चार हात दूर ठेवले.मावशी नाराज झाली.पण रेवतीनं तिची नाराजी फार मनावर घेतली नाही.
तिचा व्यवसाय सुरु झाला. जी काही मानसं तिला मिळाली त्यांच्या मदतिने ती ग्राहकांच्या पोटोबाच्या इच्छा पुरवू लागली. पण ग्राहकांच्या आवडीनिवडी इतक्या वाढल्या होत्या, त्या काही तिला पूर्ण करता येईना. सत्यनारायण केलं नाही त्याचा हा परिणाम असं एकदा मावशी म्हणाली सुध्दा. वर्षभरात रेवतीचं फूडमॉल स्थिरावलं पण गती काही पकडू शकलं नाही. हे मावशीच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तिने रवी आचारी किंवा रवी शेफ शोधून रेवतीच्या ताब्यात दिला. मावशीने दिला असल्यामुळे त्याच्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तो कोण,कुठला,काय पगार असे प्रश्नही रेवतीने विचारले नाहीत.
०००
रवीनेही कोणतेही प्रश्न न विचारता कामाला सुरुवात केली. त्याची काम करण्याची तऱ्हा किंवा पध्दत वेगळी होती. तो कोणेतेही पदार्थ करु शकत असे. असे २०० पदार्थ तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागू शकते, याची यादी त्याने तिला दिली. २००पदार्थांची यादी दर्शनी भागावर लावण्याची विनंती केली. रेवतीला हा विनोद वाटला. २०० पदार्थ ताज एंड्स किंवा ताजमहाल हॉटेलमधील किचनमध्येही बनवले जात नसणार? रवी शेफ हा बनवाबनवीचा खेळ करतोय असं रेवतीला वाटलं. या शंकेची नस रवीनेबरोबर पकडली.त्याने स्वत:च तयार केलेली २०० पदार्थांची यादी रेवतीसमोर ठेवली. यातील कोणत्याही पदार्थावर बोट ठेवा आणि तो पदार्थ तयार करायला सांगा, अशी विनंती त्याने केली. रेवतीने पान्झानेला या इटालिअन डिशवर बोट ठेवलं. त्याने त्यासाठी लागणारे साहित्य रेवतीस आणावयास सांगितलं. हे साहित्य आल्यावर रवी शेफने तो पदार्थ अवघ्या दहा मिनिटात तयार केला. रेवतीच्या डोळयावर विश्वास बसेना.
सहज गम्मत म्हणून सांगितलेली डिश करण्याची पात्रता अंगी बाळगणाऱ्या या रवी शेफचं तिला फार कौतुक वाटलं. त्याच्या सांगण्याप्रमाणे तिने तिच्या फूडमॉलच्या समोर दोनशे पदार्थांची नावं लिहिली.आता खऱ्या अर्थाने तिचं दुकान फूडमॉल झाल्याचं तिला वाटू लागलं.
टिचभर दुकान आणि नाव फूडमॉल आणि आता २०० पदार्थ पाहिजे तेव्हा मिळणार असा दावा, त्यामुळे तिचे दुकान काही दिवस उपहासाचे झाले. त्यावर विनोद होऊ लागले,पिजे होऊ लागले. हे दोनशे पदार्थ तयार करणारी चेटकीण वगैरे तर आली नाही ना तुमच्याकडे असही कुणीतरी बोलून गेलं.जे काही घडत होतं,त्यावर काय उत्तर द्यावं हे काही रेवतीस सूचेना.आपला प्रछन्न विनोद होतोय तो व्यवसायासाठी बरं नाही, हे तिला कळत होतं.यावरचा उपाय एके दिवशी रवी शेफनेच सुचवला. त्याचा उपाय असा होता की,एके दिवशी ग्राहकांना जो पदार्थ पाहिजे तो मोफत द्यायचा. खर्च होईल. पैसे जातील. पण जर ग्राहकांचा विश्वास बसला तर मात्र ग्राहकांची रांग लागेल. खर्च झालेले पैसे दामदुपटीने नव्हे चौपटीने भरून निघतील. असा विचार रवीने मांडला.याला भाबडा म्हणावं की मूर्ख हा प्रश्न रेवतीला पडला. पण आलीया भोगासी असावे सादर, या न्यायाने तिने रवी शेफ हा मूर्ख असून त्याच्या मूर्खपणात एकदा सामील होऊनच बघू, पुढचं पुढं!असं स्वत:ला सांगत रवीचं ऐकायचं ठरवलं.
सुटीचा दिवस बघून मोफतचा बोर्ड लावला. मोफत म्हंटलं की आपल्याकडे गर्दी करण्याची महान संस्कृती!. या संस्कृतीचे पाईक होण्याची कोणतीही कमतरता कॉलनीतल्या आणि आजूबाजूच्या नागरिकांनी ठेवली नाही.सकाळी गर्दी कमी होती. पण संध्याकाळपर्यंत गर्दी बरीच वाढली. साहित्य संपत आल्याचं लक्षात आणून दिल्यावर रेवतीने फूडमॉल बंद केलं.
मोफत खाऊ घालण्याचा परिणाम चांगला झाला तर ठीक अन्यथा गेली माझी सहा महिन्याची कमाई लोकांच्या पोटात फुकटात! तुझा पगारच देणार नाही. असं त्याच्याकडे बघत रेवती म्हणाली.
रवीची तिला कमाल वाटली.ग्राहकाने सांगितलेला कोणत्याही अजब-गजब नावाचा पदर्थ पाच मिनिटात तयार करुन पेश करत असे. चमत्कारावर विश्वास ठेवायचा नाही असं रेवतीस कितीही वाटत असलं तरी रवीच्या या अचाट कृत्याला तिने चमत्काराच्या परिघात ढकलून दिलं.
फूडमॉलमध्ये कोणताही पदार्थ मिळू शकतो हे काही प्रमाणात ग्राहकांच्या मनात ठसवण्यात यश मिळतेय हे चाणाक्ष रेवतीच्या लक्षात आलं होतं. तिने तिच्या फेसबूकवर आणि इन्स्टाग्रामवर २०० पदार्थांची यादी टाकली. ती ज्या ज्या ग्रुपमध्ये होती त्या सर्व व्हाट्सग्रुपवरही तिने यादी पोस्ट केली.
आता वाट होती दुसऱ्या दिवसाची!
दुसऱ्या दिवशी काही ग्राहकांनी रांगा लावल्या नाहीत. तिला फोनवरुन घरपोच अमूकतमूक पदार्थ मिळू शकेल का अशी विचारणा होऊ लागली. तिला ते काही शक्य नव्हतं. कारण तिच्याकडे तेवढे मनुष्यबळ नव्हतं. खरं काय ते तिने सांगून टाकलं. एक चांगली व्यवसाय संधी अशी हातून निसटत असल्याचं तिच्या लक्षात आलं.पण रवी शेफ तिच्या पुन्हा मदतीला आला. वीस जणांची टीम बनवण्याचा त्याने सल्ला दिला. सल्ला खर्चिक होता.पण आता मूर्खाच्या नंदवनात शिरलोच आहोत तर हे ही करुन बघायला हरकत नाही, असं स्वत:ला सांगत तिने आठ दिवसात २० होतकरू मुलांना कामाला लावून घेतले. आता कोणतेही पदार्थ ती घरपोच पोहचवू लागली.
३००-३५० चौरस फुटाच्या जागेतला हा फूडमॉल कसा काय कोणताही पदार्थ तत्काळ तयार करुन पुरवठा करु शकतो.याचं आधी कौतुक नंतर आश्चर्य आणि त्यानंतर वेगवेगळ्या शंका-कुशंका लोक व्यक्त करु लागले.काही प्रतिष्ठीतमंडळींनी येऊन तपासणीही केली.त्यांना पाहिजे तो पदार्थ रवी शेफने तयार करुन दिला. पदार्थ तर मिळतो. पण सात-आठ जणांच्या टीममध्ये हे कसं शक्य होऊ शकतं?हे मात्र त्यांनाही कळलं नाही.
रेवतीला पहिल्या दिवसापासूनच रवी शेफ हा चमत्कार वाटला होता. तो सभ्य गृहस्थ होता.त्याने फूडमॉलमध्ये आल्यापासून कोणताही नखरा केला नव्हता. आपल्यामुळे फूडमॉलने गती पकडलीय याचा अभिमानही बाळगला नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल संशय बाळगण्यात काहीच हशील नाही,हे रेवतीला कळलं होतं.
लोक काय म्हणतायत याकडे दुर्लक्ष करुन तिने फूड मॉलवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं.आता ख्याती दूरवर पसरली. इतर ठिकाणांहूनही मागणी येऊ लागली.पदार्थपुरवणाऱ्या टीममधील संख्या रेवतीने आणखी वाढवली.
०००
फूडमॉलचे स्वप्न पूर्ण करणारा हा रवी शेफ तिला आता आवडू लागला. खरं सांगायचं तर ती त्याच्या प्रेमात पडली होती. एके दिवशी सर्व ग्राहक आणि कामगार घरी गेल्यावर फूडमॉल आतमध्ये बंद करुन तिने रवी शेफला विचारलं,
माझ्याशी लग्न करशील का?
रवी शेफ यावर काहीच बोलला नाही.
तिने पुन्हा विचारलं,
तू माझ्याशी लग्न करशील का?
रवी शेफ पुन्हा चूप.तो काहीच बोलेना.फक्त तो तिच्या डोळयात एकटक रोखून बघत राहिला.
अरे असा बघतोस काय?माझ्याशी लग्न करुन या फूडमॉलचा आणि माझाही मालक हो ना! रेवती काकुळतीने म्हणाली.
पण रवी चूप.
हा असा काय करतोय हे रेवतीला कळेना. तिने त्याला मिठी मारली. पण तो ढिम्म. मिठीतून बाहेर पडून रेवतीने एक धाडसी निर्णय घेतला. तो त्याक्षणी सर्वस्वी अयोग्य होता.पण रवी शेफला आज आपलसं करायचचं ही भावना रेवतीच्या मनात उफाळून आली होती. तिने अंगावरील सर्व वस्त्रे काढली. आता ती पूर्ण विवस्त्र झाली होती. परपुरुषासमोर असं विवस्त्र होण्याची जी स्त्रीसुलभ लज्जा असते, तिच्या पहिल्या आर्वतनातून तिने स्वत:ला कठोरपणे बाहेर काढलं. रवी शेफ समोर ती पूर्ण विवस्त्र असतानाही तो जागचा हलला नाही. रेवतीने त्याला पुन्हा मिठ्ठी मारली. त्याच्या ओठावर ओठ ठेवले.त्याचे हात सर्वांगावरुन फिरवू लागली.पण रवी ढिम्म.
त्याचं हे असं रुप बघून रेवती चिडली.त्याला वाट्टेल तसं बोलायला लागली.पण तरीही रवी ढिम्म.
रवीच्या या शांततेनं आता रेवतीचं मानसिक संतुलन पूर्ण बिघडलं. चित्रपटातील चिडलेली नागीन जशी प्रतिशोधासाठी डोळ्यातून विखार बाहेर काढत भेदक नजरेनं सावजाकडे बघते तसं ती रवी शेफकडे बघू लागली.तिचा राग अनावर झाला.तिने आजूबाजूला बघितलं. किचन ओट्यावर असणाऱ्या लवलवत्या पात्याचा चाकू तिने हाती घेतला.तो चाकू रवीच्या पोटात खुपसून त्याचा कोथळाच बाहेर काढावा असं तिला तीव्रतेनं वाटलं. पण हा उत्साह आणि उर्जा दुसऱ्या क्षणी गळून पडला. ती तशीच खाली बसली. धाय मोकलून रडू लागली.
रवी शेफने तिच्या कपड्यांकडे लक्ष वेधलं. आता मात्र रेवतीची नजर झुकली. शरमेनं मेल्यासारखं झालं. विवस्त्र होताना मोठा पराक्रम गाजवतोय असे वाटणाऱ्या रेवतीचे हात अंगावर कपडे घालताना इतके थरथरु लागले की तिला व्यवस्थीत कपडेही घालता येईना.रवी शेफने तिला कसबसं सावरलं आणि कपडे घालावयास मदत केली.
त्याने तिला प्यायला पाणी दिलं.
असं कां केलस रे तू?
मी काहीच केलं नाही. रवी म्हणाला.
माझ्याशी लग्न करुन तुला काय दु:ख झालं असतं,सांगना? हुंदका देत ती म्हणाली.
रवी गप्प.
अरे काहीतरी बोलना.
कसं बोलणार?मला फक्त पदार्थ कसे बनवायचे हेच शिकवण्यात आलं आहे.तसच माझं प्रोग्रॅमिंग आहे.लग्न लग्न म्हणजे मला माहीत नाही.
आँ! तू आहेस तरी कोण?आश्चर्याने आणि भीतिने गर्भगळीत झालेली रेवती कशीबशी म्हणाली.
तुम्हाला मावशीने सांगितलं नाहीय का?
तू प्रेतात्मा आहेस का?
ते मला माहीत नाही.
मग कोण आहेस तू?
टोकियोमध्ये रोबोटिक्स कंपनीत काम करणाऱ्या मावशीच्या मुलानं मला तयार केलं आहे. कोणताही पदार्थ बनवू शकणारा मी शेफ रोबो आहे. मी फक्त २०० च पदार्थ तयार करु शकतो. म्हणून तेवढीच यादी मी तुला दिली. २०१ वा पदार्थ मी बनवू शकत नाही.
पण तू तर हुबेहूब आमच्यासारखाच दिसतो.
दिसण्यावर भुलू नका हो. मी फक्त रोबा शेफ आहे. तेव्हढीच भाषा मला कळते. लग्न लग्न काय म्हणालात ते मला नाही माहीत.
माझा देह…
तो काय असतो.
मी विवस्त्र झाले ते
ते काय असतं.
रवी शेफ यापलिकडे काहीच बोलू शकत नाही. सांगू शकत नाही. हे रेवतीच्या लक्षात आलं. झाल्या प्रकाराने प्रचंड थकवा तिला जाणवत होता. ती मटकन खाली बसली. त्याच्याकडे बघत बघत तिला तिथेच कधी झोप आली हे कळलं नाही.
सकाळी सकाळी भ्रमणध्वनीवर वाजलेल्या रिंगटोनने तिची झोप मोडली.तिने डोळे उघडले. रवी शेफ अस्ताव्यस्त पडलेला होता.
रेवती शहारली.
तिने त्याला हलवून बघितलं.
रवी शेफ काहीच प्रतिसाद देत नव्हता.
आता मात्र ती ओक्साबोक्सी रडायला लागली.
पुन्हा रिंगटोन वाजली.
पलिकडे मावशी होती.
मावशी, रेवतीने हुंदका दिला.
त्याचा स्वीच ऑफ केलाय, इकडे नियंत्रणकर्त्यांनी! तो तुझ्याकडे आता राहण्यात धोका असल्याचं कालच्या प्रकरणातून लक्षात आलय त्यांच्या.
काय?रेवती किंचाळून उठली.
होय सारं काही बघितलं गेलय ,सारं काही नोंदवलं गेलय.
नाही नाही मावशी हे खोटं आहे.
रेवती हेच खरं आहे.मानवी सलगीपणा सहन करण्याची शक्ती, क्षमता अदृयाप रोबोत म्हणावी तितकी आलेली नाही. सध्या तरी तो गुलामच आहे,तंत्राचा. त्याला तू बंधनातून मुक्त करु बघत होतीस. पुढे काय घडलं असतं हे ठाऊक नाही. पण नियंत्रणकर्त्यांना यात धोक्याचीच घंटा दिसली. गुलामांचं राज्य येणं सध्या तरी परवडणारं नाही कुणालासुध्दा…
तो गुलाम होता? रेवती अस्फुटशी स्वत:शीच पुटपुटली.तिने डोळे मिटून घेतले.
सुरेश वांदिले