(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

अपशकून?

परवा तेजोमयी,बाबा,आई आणि अलेक्झांडर कॉलनीच्या आवारात फिरत असताना एक मांजर अचानक आडवी धावत गेली. तिथेच थांबून आई सात पावलं मागे गेली. ती परत आल्यावर चौघं पुढे चालू लागले. वाटेत एक उंदीर आडवा गेला. आता आई पुन्हा सात पावलं मागं जाईल म्हणून तेजोमयी आणि बाबा थांबले. हे दोघे थांबले म्हणून अलेक्झांडरही थांबला. कां थांबलात, अशा नजरेने आईने तिघांकडे बघितलं. बाबांनी खुणेनेच उंदीर पळाला त्या दिशेने बोट दाखवलं.आई हसून पुढे चालू लागली. त्यामुळे तेजोमयी, बाबा आणि अलेक्झांडरही पुढे चालू लागले. 

पुढे काही अंतर गेल्यावर कॉलनीतलं बदक आडवं गेलं.आई आता काय करणार म्हणून तेजोमयीनं तिच्याकडे बघितलं. चला पुढे,असं म्हणत ती समोर निघाली. बाबा हसले. या तिघांचं हे चाललं तरी काय, हे न कळून अलेक्झांडरने प्रश्नार्थक चेहऱ्यानं आईकडे बघितलं. ठोंब्या, तुला नाही कळायचं ते, बापलेक माझी फिरकी घेताहेत“, असं अलेक्झांडरकडे बघून आई म्हणाली. पण हे त्याच्या कळण्यातलं नसल्यानं प्रश्नार्थक चेहरा ठेऊन तो तिघांसोबत चालू लागला. मात्र, कुणीतरी आडवं गेलं की ही मंडळी थांबतात, खाणाखुणा करतात असं अलेक्झांडरच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे असं काही करुन बघूया, असं त्याला वाटलं. तिघांचही लक्ष नाही हे बघून तो समोर धावत गेला आणि या तिघांच्या समोर येऊन त्यांच्याकडे बघत आडवा चालू लागला. बाबांना हसू आवरेना. आईलाही हसू आलं. आईबाबांना अलेक्झांडरच्या आडवं जाण्यात गंमतजंमत असल्याचं जाणवल्यानं दोघेही हसल्याचं तेजोमयीस कळलं. तिही खुदकन हसली. हे तिघेही हसतात तेव्हा सगळं कसं छान असतं हे एव्हाना अलेक्झांडरला चांगलच कळलं असल्यानं,त्याने स्वत:भोवती गिरकी घेऊन आणि शेपूट हलवून आनंद व्यक्त केला. 

असं चालत असताना काही वेळाने एका जांभळाच्या झाडाखाली असलेल्या बाकावर आईबाबा बसले. 

तेजोमयी आईला म्हणाली,

तू रागावणार नसशील तर एक गोष्ट विचारु का?”

एक काय दहा गोष्टी विचारना…”

जेव्हा मांजर आडवी गेली तेव्हा तू थांबून सात पावलं मागे गेलीस.मात्र जेव्हा उंदी,बदक आणि अलेक्झांडर आडवा गेला तेव्हा तू थांबली नाहीस. एकसुध्दा पाऊल मागे गेली नाहीस. असं कां?” तेजोमयीने चाचरत  विचारलं.

असा काही प्रश्न तेजोमयी विचारेल हे आईला अपेक्षित नसल्यानं ती थोडी गडबडलीच. या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे तिला काही सुचेना.

मी सांगू का?”,बाबा म्हणाले.

सांगाना बाबा…”तेजोमयीने उत्सुकतेनं विचारलं.

असं म्हणतात की मांजर आडवी गेली की अपशकून होतो. त्यामुळे सात पावलं मागं गेलं की अपशकून टळतो.”

अपशकून होतो, असं कोण म्हणतं बाबा?”तेजोमयीने विचारलं.

ते मात्र मला ठाऊक नाही.

तू सांग ना आई.तेजोयमी म्हणाली. 

बाबांना जर माहीत नसेल तर मला कुठून असणार?” आणि काय करायचंय नसत्या त्या फंदात पडून.”

असं कसं आई?मांजर आडवी जाते तर अपशकून आणि बदक किंवा कोंबडी आडवी गेली तर मात्र काहीच नाही?हा मांजरीवर अन्याय नाही का ? काय हो.तेजोमयीनं विचारलं.

त्यात कसला आलाय अन्याय,बिन्याय.जायलाच नको ना मग मांजरीनं आडवं. तिला काय मी निमंत्रण दिलं होतं.आई थोड्या त्रासिक स्वरात म्हणाली.

तेजोमयीला हसू आलं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं की मोठी मंडळी त्रासतात. मग अशा प्रश्नाचं उत्तर देण्यापासून पळ काढतात हे तिला एव्हाना चांगलच ठाऊक झालं होतं.

०००